भारतीय कृषी क्षेत्राची ओळख करून देणाऱ्या लेखमालिकेला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. आता कृषी क्षेत्रातील प्रमुख निविष्ठा उद्योगांची ओळख करून देणारी नवी लेखमालिका घेऊन येत आहोत.
भारतात कृषी हा आपल्या पारंपरिक संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे, आणि कृषी व कृषी-आधारित जीवनपद्धतीचा अंगीकार आपण प्राचीन काळापासून केलेला आहे. आधुनिक काळात, विशेषत: स्वातंत्र्य प्राप्तीनंतर वाढत्या लोकसंख्येला अनुसरून कृषी उत्पादन वाढवणे, त्यानंतरच्या काळात कृषी उत्पादकता वाढवणे आणि जागतिकिकरणानंतर निर्यातक्षम कृषी उत्पादन करणे हे भारतीय कृषी धोरणाचे बदलते आयाम राहिले आहेत. तसेच वाढत्या लोकसंख्येला उच्च पोषणमूल्य असलेले अन्नधान्य सातत्याने पुरवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरण ऱ्हास यासारख्या समस्यांना तोंड देणे, अशी मोठी आव्हानेसुद्धा भारतीय कृषी क्षेत्रासमोर आहेत.
त्यासाठी कृषी क्षेत्राचे पारंपरिक स्वरूप बदलून त्याचे रूपांतर व्यावसायिक शेतीच्या स्वरूपात होऊ घातले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादन कंपन्या स्थापन केल्या जात आहेत. या सगळ्यात, उत्पादनाचा उच्च दर्जा राखणे, जागतिक बाजारपेठेत पाठवण्यासाठी निर्यातक्षम उत्पादन करणे, व्यावसायिक तत्त्वावर नफ्याची शेती करणे, तसेच जमिनीचा कस दिवसेंदिवस कमीकमी होत असतानाही, प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाणाऱ्या जमिनीमध्ये दरवर्षी अधिकाधिक उत्पादन करणे आणि त्याचा उच्च दर्जा राखणे शक्य व्हावे यासाठी उच्च गुणवत्तेच्या कृषी निविष्ठा (Agricultural Inputs) उपलब्ध करून देणे अतिशय महत्त्वाचे आहे.
कृषी निविष्ठांमध्ये ज्यांचा थेट समावेश होतो ते उद्योग म्हणजे उच्च दर्जाचे बी-बियाणे तयार करणारा कृषी बीज उद्योग (Seed Industry), खत निर्मिती उद्योग (Fertilizer Industry), कृषी रसायन उद्योग (Agrochemicals Industry) आणि कृषी यंत्र व अवजारे उद्योग (Agricultural Machinery and Equipment Industry) हे आहेत. या उद्योगांची ओळख आपण या लेखमालिकेतून करून घेणार आहोत.
—
भुकेचे आव्हान
सध्या816 कोटी असलेली जगाची लोकसंख्या वाढून 2050 पर्यंत सुमारे 920 कोटी होणार आहे. या सातत्याने वाढत असलेल्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी पुरेसे अन्नधान्य पिकवणे हे सध्या जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रासमोर उभे असलेले एक मोठे आव्हान आहे. 2050 पर्यंत म्हणजे येत्या 25 वर्षांमध्ये अन्नधान्याची मागणी आताच्या मागणीपेक्षा साधारण 50 टक्क्यांनी वाढणार आहे असा अंदाज आहे.
म्हणजेच जर सध्या दरडोई जितके अन्नधान्य उत्पादन करणे आवश्यक आहे तीच पातळी टिकवून ठेवायची असेल तर सध्या होत असलेल्या उत्पादनापेक्षा 50 टक्के उत्पादन येत्या 25 वर्षांमध्ये वाढवणे आवश्यक आहे. म्हणजेच येत्या 25 वर्षांत उत्पादन आताच्या दीडपट व्हायला हवे, तेव्हा कुठे दरडोई अन्नधान्य उपलब्धतेची आताची पातळी टिकून राहील. खरंतर ती त्यापेक्षाही वाढवणे आवश्यक आहे !
सध्या जगाच्या एकूण लोकसंख्येत साधारण 17.76 टक्के म्हणजे 145कोटी भारतीय आहेत, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे. त्यामुळे हे भुकेचे आव्हान भारतीय कृषी क्षेत्रासमोर अधिकच मोठे आव्हान ठरते.
जग हे आव्हान कसे पेलणार आहे?
या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. यापैकी पहिला पर्याय म्हणजे अन्नधान्य पिकांचे हेक्टरी उत्पादन वाढवणे. त्यासाठी अधिक उत्पादन करणाऱ्या पिकांच्या जाती शोधाव्या लागतील, त्यांची उच्च दर्जाची बियाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी लागतील. हे करता येणे शक्य आहे, परंतु यामधील मोठे आव्हान हे आहे की, जगातील बहुतेक सर्वच प्रमुख अन्नधान्य पिकांमध्ये त्यांचे हेक्टरी उत्पादन पारंपरिक पद्धतींनी जेवढे वाढवता येणे शक्य होते तेवढे वाढवून झाले आहे. त्यात अजून वाढ करायची असेल तर मात्र आधुनिक जैवतंत्रज्ञान वापरुन नवी उच्च दर्जाची बियाणी निर्माण करावी लागतील.
दुसरा पर्याय म्हणजे, सध्या शेतीसाठी उपलब्ध असलेल्या शेतजमिनींखालील क्षेत्र वाढवून अधिकाधिक क्षेत्र अन्नधान्य पिकांखाली आणणे. या पर्यायालाही खूप मर्यादा आहेत. कारण ज्या आशिया खंडात जगातील सर्वाधिक लोकसंख्या राहते, तिथे पिकांखाली आणता येईल अशा जमीनींच्या सुमारे 95 टक्के जमिनी अगोदरच पिकांखाली आलेल्या आहेत. वाढते शहरीकरण व आधुनिकीकरण यांमुळे यापेक्षा अधिक जमीन शेतीखाली आणणे शक्य नाही. आफ्रिका खंडात अधिक जमीन पिकांखाली आणण्यात अर्थकारण आणि समाजकारण यांच्याशी निगडीत आणि राजकीय स्वरूपाचे अडथळे आहेत. तसेच आफ्रिकेत आणि दक्षिण अमेरिकेत अधिक जमीन शेती पिकांखाली आणण्यात पर्यावरणाशी निगडीत समस्या आणि धोके आहेत. दक्षिण अमेरिकेत सदाहरित जंगले तोडून ती जमीन शेतीखाली आणायची म्हटले तर त्यात पर्यावरणाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात कायमचा ऱ्हास होण्याचा धोका आहे. त्यामुळे हा दुसरा पर्याय प्रत्यक्षात आणता येणे शक्य नाही.
तिसरा पर्याय
तर मग यातून मार्ग काढण्यासाठी करायचं तरी काय? तर त्यासाठी तिसरा पर्याय निवडावा लागेल, आणि तो म्हणजे, उच्च दर्जाच्या कृषी निविष्ठा निर्माण करणे आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. शेतकऱ्यांनी त्या निविष्ठा परिणामकारक पद्धतीने वापरणे, हे घडवून आणण्यासाठी संशोधन व विकास प्रक्रिया सातत्याने अंगीकारणे आणि प्रयोगशाळेतून हे संशोधन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नेण्यासाठी कृषी-विस्तार यंत्रणा परिणामकारकरित्या राबवणे.
यावरून लक्षात येते की, जागतिक आणि भारतीय कृषी क्षेत्रासमोर असलेले भुकेचे आव्हान पेलायचे असेल तर उच्च दर्जाच्या कृषी निविष्ठा अत्यावश्यक आहेत. यामध्ये बी-बियाणे, खते, पीक-संरक्षक कृषी रसायने आणि विविध प्रकारच्या कृषी यंत्रसामुग्रीचा समावेश होतो.
हा तिसरा पर्याय भारतीय कृषी क्षेत्रात आणि इथल्या कृषी आर्थिक व्यवस्थेत अंमलात आणताना इथल्या कृषी व्यवस्थेचा मूलभूत ढांचा लक्षात घ्यावा लागेल, इथल्या कृषी अर्थव्यवस्थेत दिसणारे काही आर्थिक कल (trends) लक्षात घ्यावे लागतील आणि भारतीय कृषी क्षेत्रासमोर असलेली प्रमुख आव्हाने लक्षात घ्यावी लागतील. पुढील भागात आपण या बाबींचा विचार करू.