गँगस्टर्सना आपला प्रभाव कमी झालेला आवडत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणानं ते त्यांचा दबदबा कायम दाखवून देत असतात. असाच एक गँगस्टर होता रवी पुजारी. सन 2000 च्या आसपास कुणावरही छोटा मोठा हल्ला झाला तरीही तो रवी पुजारी गँगनं केला असे फोन क्राईम रिपोर्ट्सना यायचे. त्या हल्यात हल्ला झालेल्या व्यक्तीला काहीही झालं नसलं तरीही आपण रवी पुजारी आहोत, आणि आपला दबदबा कायम आहे हे दाखवण्याचा त्याचा हा केविलवाणा प्रयत्न असायचा.
पैसे कमावण्यासाठी मुंबईत
1968 मध्ये कर्नाटकात जन्मलेल्या रवी पुजारीला लहानपणापासून प्रसिद्धीची हाव होती. त्याला बॉलीवूडचं प्रचंड आकर्षण होतं. आणि त्याला पैसेही कमवायचे होते. म्हणूनच तो 80 च्या दशकात मंगलोर सोडून मुंबईत आला. त्यानं अंधेरीतल्या एका टपरीवर चहा विकायला सुरुवात केली. टपरीवर चहा प्यायला येणाऱ्या टपोरींशी त्यानं मैत्री करायला सुरुवात केली. छोटा राजनचे दोन शार्प शुटर्स विनोद मटकर आणि रोहित वर्मा तिथंच चहा प्यायला जायचे. रवी पुजारीनं त्यांच्याशीही ओळख वाढवली, मैत्री केली.
पहिला गुन्हा
अंधेरीतल्या एका गुंडाची रोहित वर्माबरोबर दुश्मनी होती. त्यांची दुश्मनी इतकी वाढली की रोहीत वर्मानं त्याला गोळ्या घालून ठार मारलं. असं म्हणता की, रोहित वर्मापर्यंत बंदूक पोहचवण्याचं काम रवी पुजारीनं केलं होतं. ऑन रेकॉर्ड या गुन्ह्यात रवी पुजारीचं नाव नसलं तरीही हा त्याचा अंडरवर्ल्डमधला पहिला गुन्हा मानला जातो. त्यानंतर त्याची आणि रोहित वर्माची चांगली मैत्री झाली. आणि काही दिवसांतच रोहित वर्मा यानं रवी पुजारी आणि छोटा राजनचा भेट घडवली. रवी पुजारीला त्यानं शुटींगमध्ये ट्रेन केलं. छोटा राजन तेव्हा दाऊद ईब्राहिमसाठी काम करत होता. हळू हळू रोहित वर्मासोबत रवी पुजारीही छोटा राजनसाठी मुंबईत छोटी-मोठी कामं कामं करु लागला.
छोटा राजनशी जवळीक
रवी पुजारी दाऊदसाठी काम करत असला तरी, त्याचा दाऊदशी प्रत्यक्ष संबंध तसा कधी आला नाही. तो कायम छोटा राजनच्याच संपर्कात होता. दाऊद दुबईत पळून गेल्यानंतर छोटा राजननं काही वेळा रवी पुजारीला दुबईत पाठवलं होतं. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर जेव्हा दाऊद आणि छोटा राजन वेगळे झाले, तेव्हा रवी पुजारीनं आपली इमानदारी दाखवत छोटा राजनसोबत राहण्याचा निर्णय घेतला. छोटा राजन बँकॉकमध्ये गेल्यावर काही दिवसांनी त्यानं रवी पुजारीला बँकॉकमध्ये बोलावून घेतलं. आणि मुंबईतलं काम त्याच्यावर सोपवलं. इतके दिवस गँगसाठी छोटी मोठी कामं करणारा रवी पुजारी छोटा राजनसाठी बिल्डर्स, बॉलिवुड अभिनेते यांना फोन करुन त्यांच्याकडून खंडणी वसुल करण्याची कामं करु लागला. हळूहळू छोटा राजनच्या विश्वासातला अशी त्याची ओळख निर्माण झाली. खंडणी वसूल करणं त्याचा हातखंडा झाला.
स्वत :ची गँग
कितीही प्रामाणिकपणे काम केलं तरीही छोटा राजनचा आपल्यावर विश्वास नाही असं रवी पुजारीला वाटायचं. 2000 मध्ये छोटा शकिलनं छोटा राजनवर बँकॉकमध्ये हल्ला केला. छोटा राजन तर यातून वाचला. पण रोहित वर्मा आणि त्याच्या बायकोचा या हल्यात मृत्यू झाला. यानंतर मात्र रवी पुजारीनंही छोटा राजनची साथ सोडून दिली आणि त्याचा एक साथीदार गुरु साटम याच्यासोबत स्वत :ची गँग सुरु केली. पैसा कमावण्याबरोबरच प्रसिद्ध होणं हेही त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यानं बॉलीवुडचा वापर करायला सुरुवात केली.
शाहरुख, सलमान पासून अगदी नेस वाडीयापर्यंत त्यानं सगळ्याच प्रसिद्ध व्यक्तींना खंडणीसाठी फोन करुन धमकवायला सुरुवात केली. रवी पुजारी इंटरनेट कॉल करायचा. त्यामुळं जेव्हा त्याच्याविरोधात पोलिस तक्रार व्हायची आणि पोलिस फोनचं लोकेशन तपासायचे तेव्हा त्यांच्या हाताला काहीच लागायचं नाही. त्यामुळं अनेक वर्ष रवी पुजारीचा ठावठिकाणा पोलिसांना कळाला नाही. पण या धमक्यांनी मात्र त्याला हवी असलेली प्रसिद्धी मिळवून दिली. त्याचं नाव टिव्ही चॅनल आणि वर्तमानपत्रांतून झळकायला लागलं. याचा फायदा घेऊन तो बिल्डर्सकडून खंडणी गोळा करु लागला.
अफ्रिकेत बस्तान
दुबई हे मुंबईतल्या गँगस्टर्सचा दुसरा ठिकाणा झालं होतं. मुंबई असुरक्षित वाटली की हे गँगस्टर जगातल्या कोणत्याही मोठ्या शहरात जाऊन स्थायिक व्हायला लागले. 2005 नंतर रवी पुजारीसाठीही मुंबई असुरक्षित झाली. तेव्हा 2007 च्या दरम्यान त्यानं मुंबई सोडली. पण तो कोणत्याही मेट्रोपोलीटन शहर किंवा सहज लक्षात येईल अशा देशात गेला नाही. त्यानं स्थायिक व्हायला निवडलं अफ्रिका. अफ्रिकेतल्या सेनेगल देशात जाऊन त्यानं बस्तान बसवलं. ‘नमस्ते इंडीया’ नावानं त्यानं तिथं भारतीय हॉटेल चेन सुरु केली. अँथनी फर्नांडीस नावानं त्यानं नविन पासपोर्ट बनवून घेतला होता. पण हळूहळू त्याचा प्रभाव कमी होत गेला. त्यानंतर कोणताही गुन्हा झाला, तर तो आपणच केल्याचं तो माध्यमांना कळवायला लागला. त्याचा प्रभाव अजुनही कायम आहे हे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असायचा.
हिंदू देशभक्त डॉन
आपण देशभक्त आहोत असं रवी पुजारीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर तो सतत हेच सांगायचा. आपण देशभक्त आहोत, आणि दाऊदसारख्या देशद्रोही गँगस्टर्सना आपण संपवणार असल्याचं तो म्हणायचा. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी तो अशाच क्लृप्त्या शोधुन काढायचा. आपण हिंदू डॉन असल्याचंही तो सतत सांगायचा.
अफ्रिकेत अटक आणि प्रत्यर्पण
सिनेगलच्या दकार शहरात रवी पुजारीचा हॉटेल व्यवसायात जम बसला होता. त्याला तिथं कुणी पकडू शकेल असा त्यानं स्वप्नातही विचार केला नव्हता. पण भारतीय तपास यंत्रणांना एक दिवस त्याच्याबद्दल माहिती मिळालीच. त्यांनी सिनेगल पोलिसांना खात्री करुन दिली की अँथनी फर्नांडीस हाच रवी पुजारी आहे. आणि तो भारतातला एक वॉन्टेड गुन्हेगार आहे. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये दकार शहरातल्या एका सलुनमधुन सेनेगल पोलिसांनी रवी पुजारीला अटक केली. पोलिस सलुनमध्ये आले, तेव्हाही त्याला वाटलं होतं, की ते दुसऱ्याच कुणाला पकडायला आले आहेत. तो एकदम बिनधास्त तिथं बसून होता. पोलिसांनी त्याला अटक करुन कोर्टात हजर केल्यावर आपण इथलेच नागरीक असल्याचे सगळे पुरावे त्यानं कोर्टापुढे सादर केले. आणि आपण रवी पुजारी नसून अँथनी फर्नांडीसच आहोत हे सिद्ध केलं. अटकेच्या दोन दिवसांतच कोर्टानं त्याला जामिन मंजूर करुन दिला.
जामिन मिळाल्यानंतर तो लगेच सेनेगल सोडून दक्षिण अफ्रिकेत पळून गेला. तो अशा पद्धतीनं गायब झाल्यानंतर सेनेगल पोलिसांना खात्री पटली की, भारतातला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार हाच आहे. पण त्यानंतर मात्र त्याला शोधायला एक वर्ष गेलं. अखेर फेब्रुवारी 2020 मध्ये दक्षिण अफ्रिकन पोलिस आणि सेनेगल तपास यंत्रणांनी एका जॉइंट ऑपरेशनमध्ये त्याला अटक केली. आणि त्यानंतर त्याला भारतात प्रत्यार्पित करण्यात आलं. रवी पुजारीवर कर्नाटकात 90 आणि इतरत्र मिळून 100 गुन्हे दाखल आहेत. पण अजुनही तो मुंबई पोलिसांच्या हातात आलेला नाही.