पंढरपूरस्थित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. ते नुसते महाराष्ट्रातच प्रिय आहे असं नसून निकटवर्ती कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या राज्यातील भाविकांनाही विठुराया पालवीत असतो. पंढरपूर हे नुसतंच धार्मिक क्षेत्र नसून ते एका समाजक्रांतीचे पीठही आहे. या समाजक्रांतीचे दोन उदगार भारतात गाजलेले आहेत. हरिजन मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषण करून एक अडथळा पार केला, तर विनोबाजींनी सर्व धर्मीयांचेसह मंदिर प्रवेश करून श्री विठ्ठलाला खऱ्या अर्थाने ‘विश्वदेव’ बनवले.
वारकरी पंढरपूरचा केंद्रबिंदू
वर्षातून चारदा होणाऱ्या वाऱ्या हे पंढरपुरचे वैशिष्ट्य. शिवाय महिन्याच्या एकादशीला येणारे भाविक वेगळेच. वर्षभराचा विचार केला तर अशाप्रकारे पंढरपूरला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या एक कोटीच्या आसपास जाते. इतक्या मोठ्या संख्येने येणारा ‘वारकरी’ हाच पंढरपूरचा केंद्रबिंदू आहे हे उघड आहे. पंढरपुरात ज्या भक्ती संप्रदायाचे प्रचलन आहे, तो भागवत धर्म किंवा भागवत संप्रदाय या रूढ नावाने ओळखला जातो. खरं पाहिलं तर संप्रदाय शब्दात त्याला बांधणं चुकीचं आहे.
कारण संप्रदाय म्हणलं की एक प्रवर्तक आला ,संप्रदायाचे यम नियम आले.विशिष्ट उपासना पद्धती आली व महत्त्वाचे म्हणजे प्रवर्तकाचे भक्तगण आले. पंढरपुरात यातले काहीच आढळत नाही. त्यामुळे हा भागवत ‘धर्म’ आहे असं म्हणणंच जास्त संयुक्तिक आहे. पांडुरंग हा विष्णूचा/ श्रीकृष्णाचा अवतार आहे ही समाजमनातील श्रद्धा असल्याने ‘भागवत’. धर्म म्हणजे जगण्याची एक विशिष्ट धारणा. “भेदाभेद भ्रम अमंगळ” ही धारणा व “उच्चनीच काही नेणे भगवंत” हा तिचा उद्घोष आहे. भाळी गोपीचंदनाचा टिळा, खांद्यावर भगवी पताका व गळ्यात तुळशीमाळ घातलेले पंढरीचे वारकरी एकमेकां भेटले की एकमेकांच्या वयाचा, प्रतिष्ठेचा विचार न करता परस्परांचा चरणस्पर्श करतात. एकमेकांच्या हृदयी विराजमान एकाच अविनाशी तत्वाला केलेला हा नमस्कार विलोभनीय असतो.
असामान्य वारकरी
या वारकऱ्याचे वर्णन करताना सहिष्णू व सोशिक ही विशेषणे हमखास वापरली जातात. व्यक्तिगत वर्तनाची विशेषणे म्हणून ती चांगली असली तरी समाजव्यवस्थेत आत्यंतिक सोशिकपणा फारसा चांगला नसतो. या सोशिकपणाचा व्यवस्था गैरफायदा घेते. वेगवेगळ्या पातळीवर होणारे अनेकविध अन्याय हे यामुळे वर्षानुवर्षे निमूट सोसले जातात किंवा सोसणं भाग पाडले जाते. वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या सामान्य भाविकाची अपेक्षा काय असते ते पाहिले ही त्यांचे ‘असामान्यत्व’ लगेच लक्षात येते.
वारकरी विठूरायाचं बंध
चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा, पदस्पर्श दर्शन: ते काही कारणाने न जमल्यास मुख दर्शन, तेही न जमल्यास शिखर दर्शन. हे झाले की यात्रा सुफल संपूर्ण झाली. वारकऱ्यांसाठी वारीचे हे हे ध्येय असते परंतु इतरांना ही वारी कायकाय देते ते पाहणेही ही मनोरंजक ठरते. वारी ही नुसती धार्मिक घटना नाही तर ती सामाजिक, राजकीय, आर्थिक व प्रशासकीय घटनाही आहे. लाखोंच्या संख्येने येणारी गर्दी ही कोणत्याही मंदिरातील पुरोहितशाही साठी एक पर्वणीच असते.
वारीचं व्यवस्थापन
सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरात दहा ते बारा लाख लोकांची व्यवस्था करणे ही स्थानिक, जिल्हा व राज्य प्रशासनाची एक कसोटी आहे .यात्रा कालावधीत शासनाचे लोकाभिमुख अस्तित्व दिसणे हे काहीसे राजकीय अभिव्यक्तीचे साधन आहे. एकादशीला होणारी शासकीय महापूजा, त्यानिमित्त उच्चपदस्थांची पंढरपूर भेट व त्यावेळी पंढरपूर विकासाची होणारी ‘उडती’ चर्चा असा याच अभिव्यक्तीचा एक साचा आहे. पंढरपुरात यात्रेसाठी आलेला एक वारकरी एकावेळी कमीत कमी पाचशे रुपये खर्च करतो असं गृहीत धरलं तर वर्षभरात 500 कोटी रुपयांची उलाढाल होते. हे पाचशे कोटी रुपये हा पंढरपूरच्या अर्थव्यवस्थेचा प्राणवायू आहे.
यात्रेकरूना प्रवास साधनांची उपलब्धता
या यात्रेला सातशे आठशे वर्षांची परंपरा आहे. दळणवळणाच्या साधनांची रेलचेल झाल्याने वारीचे स्वरूप आता पूर्वीपेक्षा फारच बदलते आहे. वारी साठी येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या त्यामुळे दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता कधीतरी भविष्यात या संख्येवरती नियंत्रण ठेवण्यासाठी काहीतरी करावं लागेल अशी चिन्हे आहेत. वारकऱ्यांबरोबरच येणाऱ्या वाहनांची संख्याही प्रचंड वाढते आहे. त्याचा यात्रेतील वाहतूक व्यवस्थेवर असह्य ताण पडतो. या वाहनांची हालचाल, रहदारी व थांबण्याची व्यवस्था ही अनेक प्रशासनाची एक मोठी डोकेदुखी बनली आहे. गावाच्या हद्दीबाहेर वाहनतळ केले जातात परंतु त्याचा म्हणावा तेवढा प्रभावी वापर होताना दिसत नाही.
आता रेल्वेनेसुद्धा खूप प्रवासी येतात पंढरपूरला. अशा प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाण्याचे कारण रेल्वे हे एक आहे. तिकीट दर कमी, बसायला जागा आणि आरामशीर प्रवास हे त्याचे एक मुख्य कारण आहे. आलेला वारकरी पहाटे जर पंढरपुरात उतरला तर तो पांडुरंगाचे दर्शन,चंद्रभागा स्नान आणि प्रदक्षिणा करून संध्याकाळी परत त्या रेल्वेने आपल्या घरी जाऊ शकतो.
पंढरपूरची रेल्वे ही खूप जुन्या काळातली आहे इंग्रजांच्या काळात हे रेल्वे स्टेशन बांधले गेले होते. आजही तेथे नॅरो गेज स्टेशनवर धावणारे इंजिन जतन करून लोकांना दाखवण्यास ठेवलेले आहे. येथील फलाट नेहमीच्या फलाटांपेक्षा ऐसपैस आहेत, भरपूर स्वच्छतागृहे, मुबलक पाणी आधी सुविधा आहेत. त्यामुळे येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात सोय होते. आज मितीला मुंबई, नागपूर, धुळे, बेंगलोर, लातूर, कोल्हापूर आदी ठिकाणांपासून येथे गाड्या येत असतात. त्यामुळे भक्तगणांचा मेळा हा कायमस्वरूपी फलाटावर दिसत असतो.
लालपरीची साथ
राज्य परिवहन मंडळ यात्रा कालावधीत काहीही हजार जादा गाड्या सोडते. त्याचाही येणाऱ्या भाविकांना खूप मोठा फायदा होतो. हल्ली राज्य शासनाने महिलांच्या एसटी प्रवासात खूप सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महिला वर्गाचे प्रमाणही यात्रेत वाढले आहे. शिवाय गेल्या काही वर्षात स्वतःचे खाजगी वाहन करून येणाऱ्या भाविकांची संख्या ही खूप मोठी आहे.
पूर्वी यात्रेची गर्दी ही चार मोठ्या यात्रा पुरती मर्यादित असायची. दळणवळणाच्या सुविधा खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता प्रत्येक महिन्याच्या एकादशीला तसेच शनिवार-रविवारी पंढरपुरात खूप गर्दी असते.