ध्येयांच्या चाकांवर जग पालथं घालणारे राजेश खांडेकर!

Rajesh Khandekar : कोणत्यातरी ध्येयाने झपाटलेल्या माणसांना आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य घडवावंसं वाटत असतं. अंगातल्या साहसी उर्मींना प्रत्यक्षात साकार करावंसं वाटत असतं. अर्थात अशी झपाटलेली माणसंच नेत्रदीपक कामगिरी करतात, स्वत:ची स्वप्नं पूर्ण करतात, भलेही वाटेत कितीही अडचणी येईनात ..त्यावर मात करत अशी माणसं आपलं ध्येय गाठतात. अशीच एक  प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे ठाण्यातील वर्तकनगरचे रहिवासी राजेश खांडेकर!
[gspeech type=button]

आपण जन्म घेतो, लहानाचे मोठे होतो, प्रौढ होतो, यथावकाश म्हातारपण येतं आणि निसर्गनियमानुसार मरणही येतंच. उत्पत्ती-स्थिती-लय हे निसर्गचक्र आहे. असं असताना काही माणसं धोपटमार्ग सोडून काहीतरी वेगळी वाट का बरं चोखाळत असतील? कारण सोपं आहे. कोणत्यातरी ध्येयाने झपाटलेल्या माणसांना आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य घडवावंसं वाटत असतं. अंगातल्या साहसी उर्मींना प्रत्यक्षात साकार करावंसं वाटत असतं. अर्थात अशी झपाटलेली माणसंच नेत्रदीपक कामगिरी करतात, स्वत:ची स्वप्नं पूर्ण करतात, भलेही वाटेत कितीही अडचणी येईनात ..त्यावर मात करत अशी माणसं आपलं ध्येय गाठतात. अशीच एक  प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे ठाण्यातील वर्तकनगरचे रहिवासी राजेश खांडेकर!

पायावर तीनशे किलोचा जॉब पडून पाय निकामी

आता साठीच्या घरात असलेल्या खांडेकरांना पाहिलं की, उत्साह आणि झपाटलेपणाला मूर्तरूप मिळालं आहे याची खात्री पटते. महाराष्ट्रातील ‘सायकलिंग’ची हौस आणि वेड असलेल्या जनतेला खांडेकर नीटच ठाऊक आहेत. मुंबईत जन्मलेल्या राजेश खांडेकर यांचं बालपण ठाण्यातील वर्तकनगर येथे  हलाखीतच गेलं. वर्तकनगर पूर्वीच्या जिल्हापरिषद शाळेत इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षणही नजीकच्या सावित्रीबाई थिराणी विद्यालयात घेतलं. सुरुवातीपासूनच अभ्यासात विशेष रुची नसल्याने कसंबसं दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून एल अँड टी कंपनीमध्ये ‘टूल ऑपरेटर’ म्हणून ते कामाला लागले. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होते. कंपनीतील ‘अप्रेंटीसशीप’ला दोन वर्ष पूर्ण होण्यास आठ दिवस शिल्लक असतानाच तब्बल 300 किलोचा ‘जॉब’ त्यांच्या पायावर पडला. निकामी झालेल्या पायामध्ये चार इंचाचे स्क्रू बसवून पायाचं हाड जोडण्यात आलं. या अपघाताने नोकरी तर गेलीच, पण काही अंशी अंपगत्वही आलं. परंतु,खचून न जाता राजेश यांनी सायकल चालवण्याचा छंद जोपासला. त्याचबरोबर उदरनिर्वाहासाठी एक छोटेखानी किराणामालाचं  दुकान सुरू केलं. तब्बल 15 वर्ष  किराणा दुकान चालवलं.

1989 मध्ये पहिला सायकल दौरा

वयाच्या 19व्या वर्षी 1989 मध्ये राजेश यांनी ठाणे ते वज्रेश्वरी हा तब्बल 60 किलोमीटरचा पल्ला सायकलने पार केला. शहरापासून दूर अशा या सहलीने राजेशला अनोखा आनंद तर मिळालाच; त्याशिवाय प्रखर आत्मविश्वास अन् बळ प्राप्त झालं. या सहलीनंतर दोन वेळा ठाणे-शिर्डी, एकदा ठाणे-तिरुपती आणि दोन वेळा ठाणे-गोवा असा प्रवास त्यांनी सायकलीवरून केला. त्यांच्या एका जवळच्या मित्राला भेटायला म्हणून ते सायकलवर ठाण्याहून बुलढाण्याला जाऊन आले. 

1997 पासून संपूर्ण भारतात सायकल भ्रमंती

तिरूपती-गोवा अशा लांबच्या सहली झाल्यावर त्यांनी एड्स जनजागृतीचा हेतू मनात ठेवून संपूर्ण भारत यात्रेचा बेत आखला आणि 1997 मध्ये त्यांनी पहिली मोठी ‘सायकल एक्स्पेडिशन’ करण्याचा निर्णय घेत भारत दौरा केला. चार महिन्यांच्या सायकल भ्रमंतीच्या कालावधीत तब्बल 13 हजार, 800 किलोमीटरचं अंतर कापत त्यांनी कन्याकुमारी, चेन्नई, कोलकाता, आसाम, भूतान, अलाहाबाद, वाराणसी, दिल्ली, कुलू-मनाली, वैष्णोदेवी, चंदिगढ, अमृतसर, गांधीनगर आदी भागांची सफर केली. 2000 साली त्यांनी कारगील युद्धानंतर कारगीलमधील भागाचा 40 दिवसांकरिता सायकल दौरा केला. याच दौर्‍यादरम्यान सर्वांत उंचावर म्हणजेच 18 हजार 383 फुटांवर असलेल्या खार्दुंगलापास या रस्त्यावरही त्यांनी सायकल सफारी केली होती. या दौर्‍यानंतर 2007 मध्ये श्रीनगर ते चंदिगढ असा 29 दिवसांचा सायकलीवरून प्रवास केला. यानंतर त्यांना खुणावत होता तो सगळ्या जगाच्या सफरीचा बेत! 

जगाची सफर आणि आर्थिक पाठबळ

‘ग्लोबल वॉर्मिंग’चा संदेश देण्याकरिता केलेल्या या जागतिक दौर्‍यात राजेश यांनी  सात महिने सायकल प्रवास केला.यात म्यानमार, थायलंड, हाँगकाँग, चीन, कोरिया, जपान, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रिया, जर्मनी, बेल्जियम, पोलंड, फ्रान्स, स्पेन, इटली, ग्रीस, तुर्की आदी देशांची सफर त्यांनी केली. मुंबई ते म्यानमार हा सुरुवातीचा आणि परतीचा ग्रीस ते नागपूर हा विमान प्रवास वगळता संपूर्ण प्रवास त्यांनी  सायकलनेच केला. तब्बल 16 हजार 800 किलोमीटरच्या या दौर्‍यासाठी साडेसहा लाखांचा खर्च आला. मित्रमंडळींची साथ, छोटेखानी व्यवसायातले उत्पन्न आणि मलेशियाच्या महाराष्ट्र मंडळाकडून मिळणारे आर्थिक पाठबळ यांच्या जोरावर राजेश सायकलवरुन देशोदेशीची भ्रमंती करत आहेत. 

दौऱ्यासाठी स्वनिधीचं नियोजन

कोणतीही आर्थिक पार्श्वभूमी नसल्याने सुरुवातीला अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला असल्याची आठवणही खांडेकर सांगतात. त्यांचं म्हणणं असं की, ‘मी एक सर्वसामान्य माणूस आहे. कुठेही वशिला किंवा उपयोगी पडतील अशा ओळखी नाहीत. त्यामुळे भरपूर पाठपुरावा करूनही मोहिमांसाठी आर्थिक मदत मिळणं अवघड आहे. ही वस्तुस्थिती मी वेळीच ओळखून स्वतःची कमाई आणि काही जवळच्या मित्रमंडळाची मदत या जोरावर मोहिमा आखतो आणि पूर्णत्वाला नेतो.’ 

सायकल दौऱ्यात स्वहस्ते स्वयंपाक आणि मुक्काम

त्यांच्या सायकल मोहिमांचं नियोजन याबद्दल विचारलं असता ते म्हणाले,”मी मुळात शाकाहारी आहे. आशियाई देशात प्रवास करत असताना अगदी नाईलाज झाला म्हणून अंडी खायला सुरुवात केली. त्यामुळे स्वहस्ते स्वयंपाक करून खाण्यास माझं प्राधान्य असतं. मोकळ्या जागी संबंधितांची परवानगी घेऊन  तंबू ठोकून निवांत राहणं मला जास्त आवडतं. सायकलची दुरुस्ती स्वतः करत असल्याने तिथेही विशेष खर्च नसतो. आणि ठिकठिकाणची भली माणसं स्वतःहून आश्रय आणि खायला अन्न देतात हा माझा अनुभव आहे.”

निधन झालेल्या सायकलिस्ट जपानी मुलाच्या वृद्ध पालकांकडून आतिथ्य

प्रवासात भेटलेल्या अविस्मरणीय आठवणी कोणत्या असं विचारलं असता जपानमधला एक किस्सा त्यांनी सांगितला. तिकडे मोहिमेवर असताना एका गावातून प्रवास सुरू होता. रात्र झाली तशी निवारा शोधताना एक घर दिसलं. एक वृद्ध दाम्पत्य तिथे राहत होतं. अंगणात तंबू टाकून राहू का विचारल्यावर त्या जोडप्याने राजेश यांना घरात बोलावलं आणि जेवू -खाऊ घातलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नाश्ता तर दिलाच पण सोबत शिदोरी म्हणून खाणं बांधून दिलं. या अगत्याने भारावलेल्या राजेश यांना कळलं की, त्या वृद्ध दाम्पत्याचा तरुण मुलगा वीस वर्षांपूर्वी असाच जगभर सायकलवर फिरायचा आणि आता तो या जगात नाही. राजेश यांच्या रूपात तोच आला असल्याचा भास त्या जोडप्याला झाला होता. अशा हृद्य आठवणी त्यांच्या पोतडीत आहेत. 2014-15 साली दुसरी जागतिक मोहीम झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं एक ‘फॅब्रिकेशन शॉप’ सुरू केले असून, सध्या ते तिथेच काम करीत आहेत. 

अर्जेंटिना ते कॅनडा मोहिमेवर कोविडचा फटका

मार्च 2020 मध्ये ते ‘अर्जेंटिना ते कॅनडा’ मोहिमेवर असताना कोव्हिडमुळे लॉकडाऊन जाहीर झालं. खांडेकर तेव्हा अर्जेंटिनात कुठेतरी होते. हायवेवर, आजूबाजूला चिटपाखरूही दिसेना. वाटेतल्या पोलिस चौकीत त्यांना अडवलं गेलं आणि लांबूनच चौकशी करत पुढे जाता येणार नसल्याचं सांगितलं. खांडेकर यांनी स्वतःची माहिती दिल्यावर, त्यांचं संपूर्ण हेल्थ चेक अप झाल्यावर त्यांना कोव्हिड आणि पर्यायाने लॉकडाउनची कल्पना आली. त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्या पोलिसांनी खाऊ-पिऊ घालून जवळच्या एक हॉस्टेलमध्ये त्यांची रवानगी केली. मदत मिळाली, मात्र परिस्थितीमुळे त्यांना ती मोहीम अर्धवट सोडून भारतात परत यावं लागलं. आणि आता चार वर्षांनंतर खांडेकर त्याच मोहिमेच्या आखणीत पुन्हा एकदा नव्याने व्यग्र आहेत. सायकलिंग सोबत मैदानी खेळ आणि ट्रेकींगमध्ये रमणार्‍या राजेश यांचा फिटनेस जबरदस्त आहे. ठाणे-मुंबई परिसरात ते सगळीकडे सायकलवर फिरतात आणि घरी रोज एक तासभर व्यायामही करतात. त्यांच्या  मोहिमा बघून अनेक सायकलपटू तयार झाले असून ते छोट्या छोट्या मोहिमा पूर्ण करीत असल्याने त्यांना समाधान वाटतं.

1 Comment

  • संजय गडकरी

    हार्दिक अभिनंदन राजेश

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Womenhood : दुर्दैवाने व्हीलचेअरशी खिळलेले आयुष्य वाट्याला आलेली;पण उमेद न हारता अपंगांसाठी सुलभता वाढवण्याची मोहीम हाती घेतलेली, फॅशनच्या जगातली चाकांच्या
Womenhood : बारामतीमधल्या लता भगवान करे या अशाच एक साहसी महिला आहेत. त्यांच्या साहसाची कसोटी लागली ती वयाच्या 62 व्या
Indian naval officers : अलीकडेच भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी, लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए. यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ