गेल्या भागात काही शतकांपूर्वी महाराष्ट्रातून केरळमधल्या कोचीन येथे स्थलांतरित आणि स्थायिक झालेल्या मराठी समूहाची आपण तोंडओळख करून घेतली. आज आपण त्यांच्या व्यवसाय-उद्योगांविषयी, त्यांच्या कुटुंबव्यवस्थेविषयी आणि त्यांच्या भाषेविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
कोचीन येथील मराठी कुटुंबे
राजापूर (रत्नागिरी) येथील पंडित तसेच अन्य काही कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबे ही कोकणी लोकांच्या गोव्यातील देवळांमध्ये पुजाऱ्याचे काम करत असत. पोर्तुगीजांच्या आक्रमणांमुळे गोव्यातील गौड सारस्वत ब्राह्मण, कुणबी वगैरे अनेक समूह सागरी मार्गाने बोटीने दक्षिणेकडे मार्गस्थ झाले.
त्यांच्यासोबतच देवळात पूर्ण वेळ पुजाऱ्याचे काम पाहणारी ही मराठी कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबेदेखील बोटीने स्थलांतरित झाली. या मार्गावर त्यांना जिथे जिथे जमीन लागली तिथे तिथे यातील काही लोक स्थायिक झाले. तर काही कोचीन येथे स्थायिक झाले. कोचीन येथील तत्कालीन राजांनी सढळ हस्ते स्थलांतरितांना जमिनी देऊ केल्या. तेथे या कुटुंबांनी देवळे बांधली. याचबरोबर अन्य जातींचे मराठी लोकही व्यापार-उदिमासाठी कोचीन येथे स्थलांतरित झाले.
काही लोकांनी मसाला-अत्तर वगैरे नवे व्यवसाय सुरू केले. त्याचप्रमाणे खोबऱ्याचा व्यापार करणारे गुर्जर नावाचे कुटुंब राजापूरमध्ये होते. तेही कोचीनमध्ये ये-जा करत असत. त्यांच्यासोबत देव नावाचे कुटुंब अत्तराचा व्यापार करण्याच्या निमित्ताने कोचीनमध्ये आले. काही मराठी कुटुंबे कालिकत किंवा मंगलोर येथून कोचीन येथे येऊन स्थायिक झाली. मात्र कालौघात यातील अनेक कुटुंबे नोकरी-धंद्याच्या निमित्ताने आपापल्या मूळ गावी किंवा मुंबई -पुणे येथे माघारी गेली.
सध्या कोचीन येथे नऊ मराठी कुटुंबे आहेत. वर उल्लेख केलेल्या व्यवसायांसोबतच कोचीन येथील प्रसिद्ध सराफ इस्पितळ हेदेखील मराठी कुटुंबांचेच आहे.
वरील नकाशांवरून आपल्याला महाराष्ट्रातून कोचीनला गेलेल्या मराठी भाषकांचा प्रवास तसेच त्यांचे आजचे वास्तव्याचे ठिकाण याची माहिती मिळते.
कोचीनची मराठी भाषा
कोचीनमधील मराठी लोकांच्या भाषेवर तिथल्या स्थानिक मल्याळम् भाषेचा प्रभाव फारसा दिसून आला नाही. त्यामुळे यामागचे कारण काय असावे याचे कुतूहल जास्तच वाढले. तंजावर, आरे या दक्षिण भारतातील मराठी समूहांपेक्षा या समूहाचे वेगळेपण हे की इतकी वर्षे मल्याळम भाषेच्या सान्निध्यात राहूनही या कुटुंबांनी आपली भाषिक वैशिष्ट्ये बहुतांशी टिकवून ठेवली आहेत. याविरुद्ध मराठी कुटुंबांसोबतच कोचीन येथे स्थलांतरित झालेल्या शेकडो कोकणी भाषकांच्या भाषेवर मल्याळम भाषेचे संस्कार सहज दिसून येतात.
कोचीन मराठी कुटुंबियांची महाराष्ट्रात सोयरिक
भाषिकदृष्ट्या मराठी भाषकांनी हे वेगळेपण टिकवून ठेवण्यामागे कारणही तसेच आहे. कोचीनच्या मराठी कुटुंबांमध्ये आजही लग्न करून येणारी मुलगी ही महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सांगली, नागपूर इ. ठिकाणांहूनच येत असते. स्थानिक मुलींशी होणाऱ्या विवाहाचे प्रमाण त्यामानाने कमी आहे. असे विवाह झालेच तरीही त्या मुलींनी मराठी भाषा चांगल्या पद्धतीने आत्मसात केली आहे. साहजिकच घरची भाषा, पुढच्या पिढीकडे संक्रमित होणारी भाषा ही मराठीच आहे. घराबाहेर वापरली जाणारी भाषा ही मल्याळम असल्याने तसेच सर्व पिढ्यांचे शिक्षणाचे माध्यम इंग्रजीसोबतच मल्याळम असल्याने त्या भाषेवरही त्यांचे तितकेच प्रभुत्व आहे.
अर्थात ही गोष्ट आहे कोकणातून थेट कोचीनमध्ये स्थलांतरित झालेल्या मराठीची!
मंगलोर-कालिकत वगैरे प्रदेशांत राहून पुढे कोचीनमध्ये स्थायिक झालेल्यांची मराठी निराळीच आहे! त्याविषयी पुन्हा कधीतरी जाणून घेऊया.
(लेखात देण्यात आलेली माहिती कोचीन येथील श्री. विजय देव, व्यावसायिक यांच्याशी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे गोळा केली आहे.)
2 Comments
Kindly share part 1 (कोचीनमधले मराठी बांधव – भाग 1)
Kindly share part 1