2025 च्या नवीन वर्षाचा पहिला महिना संपत आला. या पहिल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बदलत्या जागतिकीकरणातला एक सामाजिक मुद्दा चर्चेत आला आहे. तो म्हणजे घटस्फोट – डिव्होर्स.
जानेवारी 2025 च्या शेवटच्या आठवड्यात एक सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सुगंधा ठाकुर यांनी एका पॉडकास्टवर या विषयावर भाष्य केलं. त्यांच्या या विषयावरील टिप्पणीमुळे सोशल मीडियावर हा विषय चर्चेत आहे.
काय म्हणाल्या सुगंधा ठाकुर?
पॉडकास्टमध्ये सुगंधा ठाकुर यांना डिव्होर्सविषयी प्रश्न विचारला. तेव्हा त्या म्हणाल्या, तुम्ही तुमच्या आई आणि वडिलांशी सुद्धा डिव्होर्स घ्या. त्यांच्याशी सुद्धा आपलं भांडण होतं. भाऊ – बहिण यांच्यासोबतही आपलं भांडण होतं. मग त्यांच्याशीही आपण डिव्होर्स घेतला पाहिजे. पण आपण घेत नाही का तर तिकडे डिव्होर्स हा पर्याय नसतो. डिव्होर्स हा इंग्लिश शब्द आहे, तो उर्दू आहे. आपल्या सनातन धर्मांमध्ये डिव्होर्स ही संकल्पना नाही. सनातन धर्मामध्ये डिव्होर्स याला काही शब्द आहे का?
त्यांच्या या टिप्पणीमुळे कायदेशीर, धार्मिक, सामाजिक आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे व्यक्तिच्या वैयक्तिक जगण्याच्या हक्काचा प्रश्न उपस्थित होतो. मुळात डिव्होर्स हा कोणी एक फॅशन म्हणून घेत नाहीत. तर, पती आणि पत्नीपुढे असलेल्या सद्य परिस्थितीसमोर पूर्णत: हतबल झाल्यामुळे हा निर्णय घेतला जातो. या निर्णयानंतर दोघांच्याही वैयक्तिक, कौटुंबिक आयुष्यावर त्याचा परिणाम होणार असतो. त्याची त्यांना पूर्ण जाणीव असते. त्यामुळे घटस्फोट घेण्याच्या मार्गावर असलेल्या दाम्पत्यांना आपण समजावून सांगू शकतो. पण त्यांचा हा निर्णय वैयक्तिक असतो. समाजाने त्याचा आदर ठेवावा.
विवाह धार्मिक आणि सामाजिक संस्था
विवाह संस्था ही मूळ सामाजिक गरजेसाठी निर्माण केलेली एक संस्था आहे. जगभरातल्या सर्व संस्कृती, धर्म, जातींमध्ये लग्न संस्थेला अधिष्ठान आहे. त्यामुळे लग्न हे कोणत्या एका ठराविक जाती-धर्मापुरते मर्यादित ठेवता येणारी क्रिया नाही आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा ते समाजासमोर जाहीर व्हावं, त्यामुळे आपण त्या-त्या धर्माच्या प्रार्थनास्थळी धार्मिक विधी करुन त्यांच्या नात्याला मान्यता देतो. पण याचा अर्थ लग्न संस्था ही फक्त आणि फक्त धर्माच्या अखत्यारीत येते असा होत नाही.
समाजवाढीसाठी, माणसाच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक गरजांसाठी लग्न ही क्रिया आवश्यक असते. त्यामुळेच तर लग्न हे आपल्याला धार्मिक स्थानीच करता येते असं नाही. आपण कोर्टाच्या माध्यमातूनही लग्न करुन आपल्या नात्याला कायदेशीर मान्यता मिळवून संसार सुरू करु शकतो.
डिव्होर्स शब्दाची उत्पत्ती
डिव्होर्स हा शब्द पहिल्यांदा 14 व्या शतकात वापरला गेला होता. लॅटिन शब्द ‘डिव्हॉरटियम’ या शब्दापासून डिव्होर्स हा शब्द प्रचलित झाला. याचा इंग्रजी अर्थ सेपरेशन असा होता. मराठी मध्ये याचा साधा सरळ अर्थ ‘वेगळं होणं’ असा होतो.
डिव्होर्स या शब्दाला संस्कृतमध्ये ही शब्द आहे तो म्हणजे ‘विवाहविच्छेद’. याचा अर्थ कायदेशीररित्या लग्न नात्यातून बाहेर पडणं. हा अलीकडचा शब्द आहे. कारण प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ‘घटस्फोट’ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे या शब्दाची उत्पत्ती वा कोणतेही संदर्भ त्यावेळचे नाहीत.
घटस्फोट घेणं चुकीचं आहे का?
आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये घटस्फोट ही संकल्पनाच नव्हती, त्यामुळे घटस्फोट घेणं चुकीचं आहे. समाजाच्या नियमांमध्ये बसणार नाही असा समज ठेवणं चुकीचं आहे. याचा अर्थ सरसकट कोणीही घटस्फोट घ्यावा वा आम्ही घटस्फोटचं समर्थन करतो असं नाही.
मात्र, लग्नाचं नातं जे प्रेम, विश्वास आणि आपुलकीच्या भावनांवर निर्माण होतं. त्या नात्यातून जेव्हा एखादं दाम्पत्य बाहेर पडू इच्छिते तेव्हा त्यांच्या भावनिक आणि मानसिक परिस्थितीचा विचार करणं आवश्यक आहे.
काळ बदलत चालला आहे. काळाच्या ओघात नातं जपणं आणि ते निभावण्याच्या पद्धतीही बदलत आहेत. लग्नाच्या नात्यात एकत्र आलेल्या दोघांचीही जबाबदारी असते ते नातं टिकवणं. त्यामुळे पुरातन काळानुसार महिलेने निमुटपणे सगळं सहन करत नातं टिकवावं, अशी अपेक्षा करणे हे आता कालबाह्य झालं आहे. आताच्या काळात महिला ही शिकलेली असते. काही घटनांमध्ये महिला ही नोकरी, व्यवसाय करणारी असते. तेव्हा कुटुंब सांभाळणे, मुलांची जबाबदारी अशा ज्या लग्नाच्या नात्याला जोडून आलेल्या जबाबदाऱ्या आहेत त्या पती आणि पत्नी या दोघांनीही बरोबरीने सांभाळल्या पाहिजेत. तसं झालं तर लग्न हे नातं तुटण्याची वेळ येत नाही.
लग्नबाह्य संबंध
अनेकदा डिव्हॉर्स घेण्याचं कारण हे नवरा किंवा बायको यांच्यापैकी कोणा एकाच लग्नबाह्य संबंध असणं हेही असतं. ज्या व्यक्तिशी आपण धार्मिक विधीनुसार लग्न केलं आहे. तो किंवा ती व्यक्ती अन्य व्यक्तीशी त्याचपद्धतीचे संबंध ठेवत असेल तर ते कोणाला सहन होईल? अशा नात्यामध्ये विश्वास आणि प्रेम या भावनाच संपलेल्या असतात. मग कोणत्या भावने अंतर्गत त्या दोन व्यक्ती एकत्र राहणार आहेत?
सनातन धर्माचा सोयीस्कर वापर
सनातन धर्मामध्ये घटस्फोट ही संकल्पनाच नसावी आणि त्याला मान्यताही नसावी. हे मान्य. मात्र, याच सनातन धर्मामध्ये महिलांना आदराचं सन्मानाचं स्थान दिलेलं आहे. सनातन धर्मामध्ये महिलांना त्यांच्या चारित्र्यांवरुन नव्हे तर बुद्धिमत्तेवरुन गौरविलेलं आहे. समाज असो वा कुटुंब प्रत्येक ठिकाणी महिलांच्या मतांचा, कार्याचा गौरव केलेला आहे. आजच्या आधुनिक जगात महिलांना भारताच्या अतीप्राचिन काळी मिळालेलं स्थान, बहुमान मिळतो का?
अनेकदा महिला कितीही शिकलेली असली तरी तिला सार्वजनिक, कुटुंबातील महत्त्वाच्या कामकाजात वा कामाच्या ठिकाणीही बोलू दिलं जात नाही. तर अनेकदा तिच्या मतांना डावललं जातं. हे महिलेसोबत सामान्य परिस्थितीत घडतं. घटस्फोटित महिलेच्या बाबतीत तर याहून वाईट परिस्थिती असते. तिलाच घटस्फोटाला जबाबदार धरलं जातं. त्यानंतर तिलाच समाजाच्या वाईट नजरांना सामोरं जावं लागतं. अशावेळी कोणताच समाज सनातन धर्माची आठवण ठेवून त्या महिलेला आदराचं स्थान का देत नाही?
रक्ताच्या आणि लग्नाच्या नात्यातला फरक
सुगंधा ठाकूर या म्हणतात की, आई-वडिल, भाऊ-बहिण यांच्याशी आपले वाद झाल्यावर आपण घटस्फोट घेतो का? नाही घेत, कारण या नात्यांमध्ये आपल्याला हा पर्याय नसतो. खरं आहे त्याचं. आपलं जर आपल्या आई-वडिलांशी किंवा भाऊ-बहिणींशी पटत नसेल तर भांडतो. या नात्यामध्ये जरी कायदेशीर डिव्होर्स घेत नसलो तरी अनेकदा हे संबंध अतीप्रमाणात बिघडले तर ही नाती सुद्धा जन्मभराकरता तुटली जातातच. अशी अनेक उदाहरणं आहेत. जिथे संपत्तीच्या वाटपावरुन भाऊ-बहिणींचं रक्ताचं नातं तुटलेलं आहे. तर मुलगा किंवा मुलीनं आंतरजातीय विवाह केल्यामुळे आई-वडिलांनी तिच्याशी संबंध तोडलेले आहेत.
आई-वडिल, भाऊ – बहिण ही नाती रक्ताची नाती असतात. त्यांची कुठेही नोंद नसते. म्हणून ही नाती जेव्हा अपरिहार्य कारणास्तव तुटतात तेव्हा ती तुटल्याची नोंद कायदेशीर केली जात नाही. पण लग्नाचं नातं हे दोन वेगवेगळे व्यक्ती एकत्र येऊन निर्माण करत असतात. त्यांच्या लग्नांच्या नात्याची कायदेशीर नोंद होते. त्यामुळे हे नातं जर यापुढे कायम ठेवलं जाणार नसेल तर तशी नोंद करावीच लागते.
लग्नाचं नातं हे जबरदस्तीचं नसावं
निसर्गत: प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्यांने जगण्याचा हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीला तिच्या-त्याच्या जीवाचं संरक्षण करण्याचा हक्क आहे. त्यामुळे एखाद्या नात्यामध्ये शारीरिक हिंसाचार, मानसिक छळ होत असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. मग ते कोणतंही नातं असू देत.
रक्त्याच्या नात्यातही जेव्हा एखाद्या बालकावर त्याचे आईवडिल मारहाण करीत असतील तर बालहक्क संरक्षण कायद्या अंतर्गत अशा पालकांवर कारवाई केली जाते. कौटुंबिक पातळीवरही कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण प्रदान केलेलं आहे.
त्यामुळे ज्या नात्यामध्ये शारीरिक हिंसा, अत्याचार, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं, असं नातं जर अनेक प्रयत्नातून सावरता येत नसेल तर पूर्ण विचार करुन अशा नात्यातून बाहेर पडणं केव्हाही शहाणपणाचं असेल.