व्यक्तिमत्व विकास किंवा ग्रुमिंग हा गेली 25-30 वर्ष परवलीचा शब्द आहे. पण अभिनय प्रशिक्षणातून व्यक्तिमत्व विकास आणि उत्तम सामाजिक वर्तन साधता येऊ शकते, हे ठाण्यातल्या प्रारंभ कला अकादमीनं सिद्ध केलं आहे. प्रारंभ कला अकादमी व्यक्तिमत्व विकास, महिला सक्षमीकरण, आदिवासी कल्याण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहे.
गेल्या 20 वर्षात 20 हजाराहून अधिक मुलं आणि 10 हजाराहून अधिक महिला प्रारंभच्या विविध कार्यशाळांमध्ये सहभागी झाले आहेत. प्रारंभच्या कार्यशाळा आणि प्रशिक्षणाचा वयोगट 3 ते 70 असा आहे. डॉ. अरुंधती भालेराव यांनी 2005 मध्ये लावलेल्या ‘प्रारंभ कला अकादमी’ या रोपाचं आता मोठ्या वृक्षात रुपांतर झालं आहे.
प्रारंभचा आरंभ
डॉ. अरुंधती भालेराव यांच्याकडील अनेक शैक्षणिक पदव्यांमध्ये बॅचलर्स व मास्टर्स इन थिएटर, सायकोलॉजीमध्ये एम.ए. आणि ‘महाराष्ट्रातल्या बालरंगभूमी एक चिकित्सा’ याविषयावर पी.एच.डी केली आहे. सन 2000 साली त्या ठाण्यामध्ये स्थायिक झाल्या. सन 2002 मध्ये त्यांनी त्यांच्या घरातूनच 5-6 मुलांकरता सुट्टीत अभिनय कार्यशाळा घ्यायला सुरूवात केली. 2005 मध्ये त्यांनी ‘प्रारंभ कला अकादमी’ या नावानं चॅरिटेबल ट्रस्टची नोंदणी केली. आणि मग सुरुवातीच्या कार्यशाळांचं रुपांतर वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये झालं. या वार्षिक कार्यक्रमांमध्ये अभिनयासोबतच सूत्रसंचालन, कथाकथन, कम्युनिकेशन यावर भर देण्यात आला. ठाण्यातील सरस्वती सेकंडरी शाळेपासून या वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरूवात झाली. मग भगवती शाळा, बेडेकर मराठी शाळा इथंही हे वर्ग सुरू झाले. साधारण 15 वर्ष या तिन्ही शाळांमध्ये हे प्रशिक्षण वर्ग सलग घेतले गेले.
व्यक्तिमत्व विकास आणि नाटकाचा संबंध
नाटकाचा नाटकाच्या माध्यमातून संभाषण कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासाकरता कार्यशाळा आणि प्रशिक्षण घेतलं जातं. या प्रशिक्षण वर्गांमधून अभिनयाचं प्रशिक्षण दिलं जात असलं तरी ‘मूल अभिनयाच्या क्षेत्रात चमकणं’ हा याचा उद्देश नाही. मुलांमधील गुण ओळखणे, त्यांच्यातील विविध कौशल्यांना वाव देणं, नेतृत्व करणे, व्यासपीठावर किंवा समुहामध्ये बोलणं या गोष्टींवर भर दिला जातो.
नाटक तुम्हाला भावना व्यक्त करायला, देहबोली, विचार करण्याची क्षमता, एखाद्या क्रियेची प्रतिक्रिया, उच्चार या सर्वच गोष्टी शिकवतात. त्यामुळं नाटक हे व्यक्तिमत्त्व विकासात महत्वाचं असल्याचं डॉ. अरुंधती सांगतात.
विविध संकल्पनांवर आधारीत कार्यक्रम
वर्षभर या मुलांकडून वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करुन घेतली जाते आणि मग वर्षअखेरीस या मुलांचा एक कार्यक्रम मोठ्या सभागृहात सादर करण्यात येतो. सतत वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग सादर केले जात नाहीत. मुलांकरता 9 महिने प्रशिक्षण, 1 महिना तालीम असते. तर महिलांकरता 5-6 महिने प्रशिक्षण कार्यक्रम असतो. प्रशिक्षण झाल्यावर नाटक रंगमंचावर सगळ्यांसमोर सादर करण्यात येतं. याकरता सर्व प्रेषकांना मोफत प्रवेश असतो.
बालमहोत्सव
सन 2013 सालापासून प्रारंभच्या बालमहोत्सवाला सुरूवात झाली. सामान्य मुलांसोबतच कॅन्सरग्रस्त, वस्तीतील मुलं, दिव्यांग मुलं अशा विविध मुलांकरता हे प्रयोग सादर केले जात आहेत. एकावेळी साधारण हजार मुलं हा प्रयोग पाहायला येतात. कित्येक मुलं सलग दहा वर्ष या प्रशिक्षणात सहभागी झाली आहेत. ही मुलं आज आयआयटी, एमबीए, एडिटर, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
महिला महोत्सव
2013 पासूनच सामान्य महिलांना व्यासपीठ मिळावं, म्हणून ‘महिला महोत्सवाला’ सुरूवात झाली. या दोन्ही महोत्सवांमध्ये बालक आणि महिला या दोन्ही घटकांकरता विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. या महोत्सवा दरम्यान विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना सौदामिनी पुरस्काराने गौरविण्यात येतं.
ज्येष्ठ महोत्सव
सन 2021 सालापासून आजीआजोबांकरताही ‘ज्येष्ठ महोत्सव’ सुरू करण्यात आला. या महोत्सवात ज्येष्ठांशी संबंधित विविध विषय हाताळले जातात.
‘कमल भालेराव संकल्पनात्मक’ कार्यक्रम
सन 2008 सालापासून डॉ. अरुधंती यांनी त्यांच्या सासूबाईंच्या स्मरणार्थ ‘कमल भालेराव संकल्पनात्मक’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यास सुरुवात केली. या कार्यक्रमात सुरुवातील 6 ते 80 वयोगटासाठी दिवाकरांच्या नाट्यछटांवर आधारीत कार्यक्रम केले जायचे.
त्यानंतर साधारण 2017 पासून विविध संकल्पनांवर आधारीत कार्यक्रम घेतले जातात. सुरेश भटांचं साहित्य, कॅन्सर, सहा ऋतूंचे सोहळे, करोनाच्या काळात इंदिरा संतावर 48 कलावंतांना घेऊन ऑनलाईन कार्यक्रम, नातेसंबंध अशा विविध विषयांवर अभिवाचन, गाणी असे कार्यक्रम घेतले गेले आहेत. यातील बरेचसे कार्यक्रम मुलांकरता मोफत प्रायोजकांच्या मदतीने केले गेले.
राष्ट्रीय बालभवन
केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय बालभवन दिल्लीसोबत प्रारंभ कला अकादमी संलग्न आहे. त्यामुळं प्रारंभच्या मुलांना याचा लाभ होतो. दरवर्षी किमान 4-5 मुलांना दिल्लीत बालभवनच्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. तसेच इथून मिळालेल्या प्रमाणपत्रामुळे मुलांना महाविद्यालयात प्रवेश मिळणं सुलभ होतं.
हसत खेळत शिक्षण
प्रारंभने 2019 पासून एक वेगळ्या प्रकारचं मॉड्यूल तयार केलं. ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकरता ‘हसत खेळत शिक्षण’ हा विशेष कार्यक्रम राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या शाळांमधील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरता हा खास कार्यक्रम आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान आणि भूगोल हे विषय नाटकाच्या माध्यमातून शिकवण्यात येतात. शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देऊन साडेसहा तासांचं ऑनलाईन मॉड्यूल तयार केलं गेलं. करोनाच्या काळात याचा चांगला वापर झाला. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, दातिवली, कौसा इथल्या महापालिकेच्या 100 शाळा आणि नवी मुंबई महापालिकेच्या 80 शाळा, अशा एकूण 180 शाळांमधील 14 हजार मुलांना सहा महिने प्रशिक्षण दिलं जातं.
आठवड्यातील एक पूर्ण दिवस या विषयांचं प्रशिक्षण शाळेत दिलं जातं. या उपक्रमावेळी प्रारंभच्या लक्षात आलं की, या सर्व वस्तीतील मुलांकरताही अभिनय प्रशिक्षण घ्यायला हवं. यासाठी सुरुवातीला साडेसहाशे मुलांची निवड करण्यात आली. मुख्यतः गरीब कुटुंबातील मुलांकरता या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या मुलांना मुख्य प्रवाहात येताना त्यांच्या परिस्थितीचं दडपण असू नये, त्यांच्यातील गुणांना वाव मिळावा हा उद्देश असतो. शंभर-शंभर मुलांचे गट करून त्यांना संगीत, नृत्य आणि नाट्य प्रशिक्षण देऊन ‘शोध कस्तुरीचा’ हा खास कार्यक्रम तयार करून तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर सादर करण्यात आला होता.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
सर्वाधिक महिला प्रायोगिक नाटकांसाठी प्रारंभ कला अकादमीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. महिलांना आत्मविश्वास मिळवून देण्याचं काम प्रारंभ करतं. कार्यशाळांकरता मुलांकरता सोडायला येणाऱ्या महिला “आमच्यासाठीही काहीतरी करा” असं म्हणू लागल्या. त्यानंतर महिलांकरताही या अभिनय कार्यशाळा सुरू झाल्या. आतापर्यंत 10 हजार महिला प्रारंभतर्फे नाटकात सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे या महिलांनी त्यापूर्वी कधीच कोणत्याही प्रकारचा अभिनय किंवा स्टेजवर कार्यक्रम सादर केला नव्हता. या महिलांना आत्मविश्वास मिळवून देण्याचं आणि त्यांच्यातील कलागुणांना बाहेर काढण्याचं काम प्रारंभने केलं.
आरोग्य क्षेत्रातील भरीव कामगिरी
साधारण 2012 पासून प्रारंभतर्फे आदिवासी पाड्यांवर विनामूल्य कॅन्सर तपासणी शिबीर घेतले जातात. विविध महोत्सवाच्यावेळी त्या-त्याठिकाणी दानपेटी ठेवली जाते. या दानपेटीत जमा होणाऱ्या पैशांनी या आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जातं.
लोह, कॅल्शिअम, मल्टी व्हिटॅमिन, आवश्यकता असल्यास अँटिबायोटिक्स गोळ्याही या महिलांना देण्यात येतात. हे सर्व काम पाहून गेल्या दोन वर्षांपासून जेएनपीए त्यांचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधी (CSR) प्रारंभला देत आहे. सध्या प्रारंभचं उरण परिसरात काम सुरू आहे.
दत्तक पाड्यावरील महिलांना रोजगार
इतकचं नाही तर वाडा परिसरातील दोन पाडे प्रारंभने दत्तक घेतले आहेत. इथल्या महिलांना या संस्थेकडून कापड आणि रंग दिले जातात. यापासून कापडी पिशव्या शिवून घेऊन त्यावर वारली पेंटिंग केली जाते. या पिशव्यांच्या विक्रीतून महिलांना रोजगार मिळत आहे. प्रारंभची टीम आणि विविध कलाकार गेल्या 5 वर्षापासून वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमात जाऊन कार्यक्रम सादर करतात. संपूर्ण वर्षभर ठरलेल्या वृद्धाश्रम आणि अनाथाश्रामात एक आठवडा आड जाऊन इथं उपक्रम घेण्यात येतात.
प्रारंभची टीम
हा एवढा मोठा डोलारा सांभाळणं एक हाती शक्य नाही. हा सर्व कारभार सांभाळायला मनिषा आचार्य, वैशाली कुलकर्णी, किर्ती केरकर, मिनाक्षी शितुत या शिलेदार डॉ. अरुंधती यांच्यासोबत 2005 पासून सोबत आहेत. सुरुवातीपासून सोबत असणाऱ्या वनिता थोरात यांचं 2018 मध्ये निधन झालं. 2023 मध्ये या टीममध्ये नीता कोल्हटकर, जयश्री मदाने, वैशाली पराड याही सामील झाल्या आहेत.