लोकसहभाग आणि गाव विकास

Grampanchayet Village Development : "आमच्या गावचे उत्पन्न फारच कमी. कसा करणार आम्ही गावचा विकास?” असा प्रश्न अनेक सरपंचांना पडतो. गावाच्या विकासासाठी पैसा आवश्यक असतोच. मात्र त्याहीपेक्षा  मुख्यत: गरज असते ती लोकसहभागाची. त्यातून शाश्वत विकासाची अनेक कामे गावात उभी करता येतात. हा मुद्दा ग्रामपंचायतींना  मुळातून समजावून घ्यावा लागेल. 
[gspeech type=button]

“आमच्या गावचे उत्पन्न फारच कमी. कसा करणार आम्ही गावचा विकास?” असा प्रश्न अनेक सरपंचांना पडतो. गावाच्या विकासासाठी पैसा आवश्यक असतोच मात्र त्याहीपेक्षा  मुख्यत: गरज असते ती लोकसहभागाची. त्यातून शाश्वत विकासाची अनेक कामे गावात उभी करता येतात. हा मुद्दा ग्रामपंचायतींना  मुळातून समजावून घ्यावा लागेल. 

नवीन सरपंचांसमोरचे प्रश्न

अलीकडे सरपंच हे जनतेतून थेट निवडून येतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी तरुण आणि उच्चशिक्षित व्यक्ती सरपंच पदावर आरूढ झालेली  दिसून येते. त्यांचा उत्साह, धडपड,काम करण्याची क्षमता, कल्पकता यामुळे  गावात आपल्या कारकिर्दीत खूप काही करावे ही त्यांची प्रामाणिक इच्छा असते. त्यांच्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न फार कमी असल्याने व त्यातूनही ग्रामपंचायत करवसुली कमी होत असल्याने यातून मार्ग कसा काढावा हा त्यांना पडलेला मुख्य प्रश्न असतो . केवळ त्यांनाच नव्हे गाव विकासासाठी धडपडणाऱ्या अनेकांना हाचं प्रश्न पडतो. कारण विकासाच्या बाबतीत आपल्या कल्पनाच फार वेगळ्या आहेत. 

विकास म्हणजे नेमकं काय?

विकास म्हणजे नेमके काय इथे आपणास मुख्यतः हे समजावून  घ्यावे लागेल की नेमका विकास कशाला म्हणतात. आम्ही एका सरपंचांना प्रश्न विचारला. गावात कशा प्रकारे विकास तुम्हाला हवा आहे ?’  यावर त्यांनी ‘गावातील रस्ते, नाल्या, ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत,शाळेला वॉलकंपाउंड अशा बांधकामाचा पाढा वाचला. खरं पाहता  रस्ते, नाल्या,कार्यालयीन इमारती या झाल्या पायाभूत बाबी. या पायाभूत बाबींनाच आपण विकास समजतो. गावात या सुविधा देखील महत्त्वाच्या. शासनाच्या  विविध योजनेतून त्या  गावी निर्माण करता येतात. मात्र या गोष्टीमधून विकास साधला जाईलच असे नाही. गावात सर्वांना चांगले शिक्षण, उत्तम आरोग्य  आणि हाताला काम या बाबी आपल्या जीवनमानाचा दर्जा ठरवत असतात. विकासात समावेश होतो तो अशा बाबींचा.त्यांच्या पूर्ततेसाठी आपले गावात कार्य होणे गरजेचे असते . त्यासाठी पैशापेक्षा गरज असते ती आपल्या स्वतःच्या मानसिकतेची, लोकसहभागाची.

लोकसहभागातून कामे मार्गी

गावी सरकारी शाळा, दवाखाने आहेत. तेथील सेवा परिणामकारक आणि तत्पर मिळण्यासाठी  गरज असते ती गावकऱ्यांच्या जागरूकतेची. घराजवळची तुंबलेली नाली, परिसर साफ ठेवणे ही नागरिक म्हणून आपली देखील जबाबदारी आहे. त्यासाठी कशाला हवा असतो पैसा? गावात लावलेली झाडे जगविण्यासाठी, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण, कुपोषण कमी करण्यासाठी, गावातील लहान मुलांचे लसीकरण,चांगल्या आरोग्यासाठी कशाला हवा असतो पैसा? अशी अनेक कामे असतात जी पैशाशिवाय  लोकसहभागातून करता येतात. मात्र ‘पैसा बोलता है!’च्या या युगात आपण तिकडे दुर्लक्ष करतो.   

आपणास गाडगेबाबा बनता येईल का?                    

गावाचा खरा विकास घडवून आणण्यासाठी आपणास काही वेळा स्वतः गाडगेबाबा बनावे लागेल ‘आठवड्यातून केवळ एक तास सरपंचांनी स्वतः गावासाठी गाडगेबाबा बनावं.’म्हणजे काय करायचं? तर एक तास  हातात झाडू घ्यायचा आणि आपला परिसर साफ करायचा. आपल्याला पसंत करणारे  गावातील चार जण तरी असतीलचं, त्यांना सोबत घ्यायचे. आणि आपल्या घराजवळील रस्ता,घरासमोरील नाली ,महत्वाची सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करायची. सरपंचांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेल्या कृतीमुळे त्यांना गावातील लोकांच्या प्रतिसाद चांगला मिळू लागतो आणि एक वेगळी प्रतिमा जन माणसांसमोर सरपंचांची निर्माण होते ‘ अनेक सरपंचांना  ही कल्पना जरा विचित्र वाटेल. ते म्हणतील.’ साहेब, आम्ही सरपंच आहोत . आम्ही हातात झाडू घ्यायचा? लोक काय म्हणतील?  सरपंचाला काही इज्जत असते की नाही! मात्र या ठिकाणी नम्रपणे सांगावेसे वाटते की, सरपंचांच्या या अशा कृतीमुळे त्यांची इज्जत घटत नाही तर ती आणखी वाढते. 

                              गावातील रस्ते स्वच्छ करताना महिला

ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवणे

विकासासाठी दुसरा पर्याय म्हणजे ग्रामपंचायतीचे विविध मार्गांनी उत्पन्न वाढविणे. त्यासाठी गावामध्ये उत्पन्न वाढीचे स्त्रोत आपल्याला निर्माण करावे लागतील. जसे की ग्रामपंचायतीचे स्वमालकीची फळबाग लागवड  करणे. गावात उत्पन्न देणाऱ्या विविध मालमत्ता निर्माण करणे. त्या भाड्याने देणे.जर या बाबी जर शक्य नसतील तर लोक सहभागाशिवाय दुसरा पर्याय नसतो. 

ब्राह्मणी गावातील प्रयोगाला यश

नागपूर जवळील ग्रामपंचायत ब्राह्मणी या गावी आम्ही एक प्रयोग करून बघितला. पूर्वसूचना देऊन ठरल्याप्रमाणे  रविवारी पहाटे आमच्या रोजगार संघाच्या टीम सोबत आम्ही ब्राह्मणी या गावी गेलो.  तेथील सरपंच परिचित होत्या. त्यांना गाडगे बाबाचा प्रयोग आपल्या गावी करूया म्हणालो. त्यांना आश्चर्य वाटले. पण खरंच… सरपंच मॅडम गाडगेबाबा झाल्या. त्यांनी पदर खोचला, झाडू हाती घेतला.  गावातील चार-पाच लोक जमले. गाव स्वच्छता सुरु झाली.सात आठ तरुण आणखी जुळलेत. लोकांना वाटले सरकारी कार्यक्रम आहे.ते सूचना,आदेश देवू लागले. गावातील नाल्या तुंबलेल्या होत्या.  त्यात मच्छराची पैदास.तरुणांशी संवाद साधला.  एक हळूच कानाजवळ येवून म्हणाला,’सर,ग्रामपंचायतीचे इकडे अजिबात लक्ष नाही’.  त्या तरुणांना  म्हणालो, जर आपणास ‘मलेरिया झाला,गावात आजार वाढले तर खर्च कुणाचा होणार? भोगावे कुणाला लागणार? आपल्यालाच ना? मग ग्रामपंचायतीला दोष देवून प्रश्न सुटणार आहेत का?  …आणि सर्वांनी मोर्चा तिकडे वळविला. त्यांनी आपआपल्या घरासमोरील नाल्या साफ केल्या.  श्रमाचे काम करूनही कुणाच्याही चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता. सामूहिक कामाचा आनंदच वेगळा असतो.  तो चेहऱ्यावर झळकत होता..

              गाव स्वच्छता अभियानात शाळकरी मुलांचा सहभाग

गावासाठी आठवड्याला एक तास

‘यापुढे सर्वांनी गावासाठी  आठवड्यातुन एक तास द्यायचा.वेळ पाळायची. स्वतःला फसवायचे नाही’ याला सरपंचांसह सर्वांनी दुजोरा दिला, संकल्प केला.  काहींनी तो पाळला. थोड्यांनी त्यात सातत्य ठेवले.  त्यातून गावात काही शोषखड्डे , परसबागा तयार झाल्या. काही विषमुक्त भाजीपाला पिकवू लागले. आजार कमी झाले.  गावी झाडे लागली. लोकांनीच ती जपली,जगवली.  आवश्यक सामानाची खरेदी गावातीलच दुकानातून होऊ लागली.   गावातला पैसा गावी राहू लागला. अनेक बाबीत लोक रुची घेऊ लागले.  गावी सामुदायिक प्रार्थना सुरू झाली.  ग्रामसेवक,अंगणवाडी ताई, शाळेतील शिक्षक,आरोग्य सेविका,कृषी सेवक सीआरपी,आशा वर्कर, यांचेकडे गावाचा कटाक्ष असायचा.  गाव बदलायला लागलं.आम्ही जाणे बंद केले. दिवस लोटले. एक दिवस सरपंच मॅडम भेटल्या. गावात छान कामे सुरू आहेत म्हणाल्या.  ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढले का मॅडम? या प्रश्नावर त्या फक्त  हसल्या. यातील सांगायचा मुद्दा म्हणजे इच्छा असली तर गावामध्ये लोकसहभागातून अनेक कामे आपल्याला निर्माण करता येतात. वरील प्रयोगातून हेच सिद्ध होते.

1 Comment

  • अनिल पं. अर्डक

    प्रत्येकाने आपापली मानसिकता बदलायलाच पाहिजे. तरच हे सर्व श्यक्य आहे.. आणि होऊ शकत….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

  1. प्रत्येकाने आपापली मानसिकता बदलायलाच पाहिजे. तरच हे सर्व श्यक्य आहे.. आणि होऊ शकत….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT
आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ