ब्राझीलमधील एका लिलावात ‘वियाटिना-19’ नावाची गाय तब्बल 40 कोटी रुपयांना विकली गेली आहे. ही गाय नेल्लोर (Nelore) जातीची असून ती आपल्या भारतीय वंशाची आहे. ब्राझीलमध्ये खूप गायी आहेत. पण ही गाय खूप स्पेशल आहे. या गाईंची काळजी घ्यायला डॉक्टर आहेत. चोरांपासून या गायीचे संरक्षण व्हावे यासाठी कॅमेरेदेखील लावले गेले आहेत.
वियाटिना-19 ही गाय दिसायला पांढऱ्या शुभ्र रंगाची, मोठ्या शरीराची आहे. भारतीय वंशाच्या गायींचे वैशिष्ट्य असणारा पाठीवरचा उंचवटा आणि सैल त्वचा यामुळे ही गाय सुंदर दिसते. तिचे वजन 1,101 किलो आहे. जे इतर नेल्लोर गायींच्या तुलनेत दुप्पट आहे. दुर्लभ जेनेटिक्स आणि शरीर वैशिष्ट्यामुळे या गायीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने जगातील सर्वात महाग गाय होण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. ही गाय आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे. तिला “मिस साउथ अमेरिका” आणि “चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड” असे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.
ही गाय एवढी महाग का?
नेल्लोर हा गायीचा प्रकार भारतात ‘ओंगोल’ म्हणूनही ओळखला जातो. आंध्रप्रदेशातील ओंगोल प्रदेशातील या गायी अति उष्णतेचा सामना करण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जातात. या गायींची रोगप्रतिकारशक्तीही उत्तम असते.
तज्ज्ञांच्या मते, वियाटिना-19 या गाईची वाढ लवकर होते. तसेच ती लवकर गाभण राहते आणि तिच्या वासरामध्येही हेच चांगले गुण येतात. त्यामुळे तिच्या जेनेटिक्सची मोठी मागणी आहे. ब्राझीलसारख्या देशांमध्ये गायींवर वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करून त्यांची उत्पादकता वाढवली जाते.
नेल्लोर गायीबद्दल माहिती
नेल्लोर गाय भारतातून 18 व्या शतकात ब्राझीलमध्ये नेली गेली. आज ब्राझीलमध्ये पशुपालन हा मोठा व्यवसाय आहे आणि तिथल्या बहुतेक गायी नेल्लोर जातीच्या आहेत. ही गाय मुख्यतः मांस उत्पादनासाठी वापरली जाते. ती मजबूत शरीराची, आजारांना लवकर बळी न पडणारी आणि गरम हवामान सहन करणारी आहे. या जातीच्या गाईंच्या देखभालीसाठी जास्त कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळे जगभरात गोपालन क्षेत्रात तिचे खूप महत्त्व आहे.
पर्यावरणावर परिणाम
ओक्लाहोमा राज्याच्या माहितीनुसार ब्राझील नेल्लोर जातीची गुरं अनेक देशांना निर्यात करतो. जसे की अर्जेंटिना, पॅराग्वे, व्हेनेझुएला, मध्य अमेरिका, मेक्सिको आणि अमेरिका. पण यात एक मोठी समस्या आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार, ब्राझीलमधील हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात ( greenhouse gas emissions ) 86% हानिकारक वायू (greenhouse gases) हे शेतीमुळे तयार होतात.
सध्या ब्राझीलमध्ये 23 कोटी गायी आहेत, त्यामुळे जंगलतोड आणि मिथेन वायूच्या उत्सर्जनामुळे पर्यावरणाला मोठा फटका बसत आहे. गाईंना लागणार चारा तयार करण्यासाठी अॅमेझॉन जंगल तोडले जाते. तसेच गायींमधून मिथेन वायू बाहेर पडतो, जो ग्लोबल वॉर्मिंगसाठी धोकादायक आहे.
भारताच्या गायींचे जागतिक महत्त्व
आंध्र प्रदेशातून आलेली नेल्लोर गाय आता संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाली आहे. तिच्या चांगल्या गुणधर्मांमुळे ब्राझीलसह अनेक देशांमध्ये तिची मोठी मागणी आहे. वियाटिना-19 ही या जातीच्या वैशिष्ट्यांचा परिपूर्ण नमुना असल्यामुळे ती इतक्या प्रचंड किमतीला विकली गेली. या विक्रीमुळे गोपालन क्षेत्रात नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. यामुळे भारतातील गायींचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत आहे.