महिलांवर ‘आघात’ हा फक्त देहविक्रीसारख्या व्यवसायामधूनच होत नाही. तर कोणत्याही लैंगिक अत्याचार किंवा कौटुंबिक हिंसेतून महिलांवर आघात होतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास गमावलेला असतो. त्यांच्याकडे कोणतीही कौशल्य नसतात. आघातांमुळे या महिला त्यांच्या नशिबालाच दोष देत बसतात. लोक काय म्हणतील? हा आणखी एक भुंगा या लैंगिक हिंसाचारातील बळी महिलांचं डोक खात असतो. या महिलांच्या डोक्यातील या सर्व प्रकारच्या विचारांना दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याचं काम क्षमतामध्ये केलं जातं. हे बदल लगेचच होतात असं नाही. याकरता काही दिवस, महिने तर कधी वर्ष द्यावी लागतात. प्रत्येक केसनुसार हा कालावधी बदलत जातो. गेल्या 12 वर्षात ठाण्यातील ‘क्षमता’ या सामाजिक संस्थेने पंधराशेच्या आसपास मुली-महिलांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून स्वयंपूर्ण आणि सक्षम केलं आहे.
क्षमताचे बीजरोपण
साधारण 2000 च्या आसपास भारती ताहलियानी या ठाण्यातल्या रेड लाईट एरियामध्ये एच आय व्ही, एडस् जागृती आणि आरोग्य यावर काम करत होत्या. त्यावेळी नुकतचं त्यांचं एम.एस.डब्ल्यू. शिक्षण झालं होतं. या कामादरम्यान देहविक्री व्यवसायात अडकलेली एक 20-21 वर्षांची मुलगी त्यांच्याकडे आली आणि तिला या सगळ्यातून बाहेर पडायचंय असं सांगू लागली. भारती यांची संस्था आरोग्यावर काम करत होती आणि त्यांच्या स्वतःच्या कामाची नुकतीच सुरूवात झाली होती. त्यामुळं त्यांच्या काही मर्यादा होत्या. त्यांनी नोकरी बदलली तरी ती मुलगी आणि तिनं मागितलेली मदत त्यांच्या डोक्यातून जाईना. भारती काम करत असलेल्या ऑफिसच्या डायरेक्टरशी बोलून त्या मुलीला स्वयंपाकाचं काम मिळवून देण्यात आलं. शिक्षण आणि इतर काही कौशल्य माहीत नसल्यानं स्वयंपाकाचाच काम करावं लागलं. अर्थात हे करताना त्या मुलीची पूर्वओळख लपवण्यात आली. पण पुढं या मुलीसाठी निवारा शोधताना, तिला देहविक्रीत आलेल्या अनुभवांतून बाहेर काढताना समुपदेशन करण्यात भारती यांना यश आलं. वैयक्तिक पातळीवर हे साध्य झालं होतं. जर साधनं आणि नेटवर्क उपलब्ध असतील कित्येक महिलांना आपण मदत करू शकतो. यातूनच त्यांना अशा महिला-मुलींना सक्षम करण्यासाठी संस्था उभारावी हा विचार आला आणि मग ‘क्षमता’ची स्थापना झाली.
क्षमता परिवर्तन केंद्र
2011 मध्ये ‘क्षमता’ सुरू झाल्यावर सुरुवातीची दोन वर्ष फार काही काम झालंच नाही. भारती यांनी स्वतःकडचे आणि काही मित्रमैत्रिणींकडून आर्थिक साहाय्य घेत घोडबंदरला एका लहानशा जागेत ‘क्षमता’चं सेंटर सुरू केलं. पण हे सेंटर फक्त निवाराकेंद्र म्हणून न करता ते सक्षमीकरणाचं केंद्र असावं यावर भारती ठाम होत्या. त्यामुळंचं त्यांनी निवासी प्रशिक्षण केंद्र हे त्याचं स्वरुप ठेवलं. सध्या याला ‘क्षमता परिवर्तन केंद्र’ म्हणून ओळखलं जातं. यात महिलांच्या साक्षरता, आरोग्य, मानसिक आरोग्य, जीवनकौशल्य प्रशिक्षण या विकासाच्या सर्व बाजूंवर काम करण्यात येतं. महिला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहज मिसळून राहू शकेल, स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल यावर इथं काम केलं जातं. केंद्रातून बाहेर पडल्यावरही ती महिला स्वयंपूर्ण आहे ना यावर ‘क्षमता’ लक्ष ठेवते. अगदी त्यांना सार्वजनिक वाहनातून प्रवास कसा करायचा हेही शिकवलं जातं. या केंद्रात लहान लहान युनिटमध्ये इतर महिलांसोबत त्यांचं वास्तव्य असतं. 18 ते 26 वयोगटातल्या महिला इथं असतात.
आऊटरीच प्रोग्राम- बाह्यसंपर्क अभियान
क्षमताचा दुसरा उपक्रम आहे, ‘आऊटरीच प्रोग्राम-संपर्क अभियान’. यात शासनाच्या विविध निवारा केंद्रातील महिलांपर्यंत जाऊन त्यांना क्षमताच्या उपक्रमांची माहिती देणं. रेड लाईट एरियात पोलिस कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांना या शासकीय निवारागृहात ठेवण्यात येतं. तिथं जाऊन क्षमता या महिलांचं समुपदेशन करते. तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याबद्दल आवाहन आणि मार्गदर्शन करते.
क्षमता अनलिमिटेड
क्षमता अनलिमिटेड या उपक्रमाद्वारे महिलांना विविध व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येतात. या प्रशिक्षणांद्वारे महिलांना स्वयंरोजगार किंवा नोकरिच्या संधी उपलब्ध होतात. यात शिवणकाम, चित्रकला, हस्तकला, ज्वेलरी मेकिंग अशा विविध प्रशिक्षणांचा समावेश आहे. पण जर एखादीला या प्रशिक्षणांमध्ये रस नसेल तर तिच्या आवडीच्या प्रशिक्षणाला जायची मुभा क्षमताकडून देण्यात येते. त्याची पूर्ण सुरक्षित व्यवस्था क्षमताद्वारे करण्यात येते. या महिलांद्वारे तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंचं मार्केटिंगही क्षमताद्वारे करण्यात येतं.
हे ही वाचा : उभारणीचा ‘प्रारंभ’!
महिलांना क्षमतासोबत जोडून घेताना

निवारा केंद्रात किंवा रेड लाईट एरियामध्ये या महिलांशी संपर्क आला आणि लगेचच त्या क्षमतासोबत जोडल्या जातात असं होत नाही. रेड लाईट एरियातल्या महिलांशी पुनर्वसनाबद्दल बोलणं किंवा यातून बाहेर काढणं आव्हानात्मक असतं. निवारागृहातील महिलांशी पुनर्वसनासंबंधी संवाद साधणं सोपं असतं. प्रत्येक केसला सोशल वर्कर, फॉलोअप, असेसमेंट, काउन्सिलिंग या पातळ्यातून समजून घेण्यात येतं. त्या महिलेसोबत विश्वास आणि मैत्रीचे संबंध निर्माण करावे लागतात, तरच ती महिला सहज व्यक्त होते. तिला तिच्यावरील लैंगिक अत्याचार, हिंसाचार, आघातांची जाणीव करून द्यावी लागते. हे काम केलं नाही तर आपल्याकडं उत्पन्नाचं दुसरं साधन काहीच नाही किंवा पार्टनरचा दबाव या गोष्टीही महिलांना मागे खेचत असतात. अशा वेळी त्यांना ‘क्षमता’ त्यांच्याकरता निर्माण करत असणाऱ्या रोजगाराच्या संधींची माहिती देते. या नरकातून सुटलेल्या महिलांशी बोलणं करवून देते. जीवनाचं आशादायी चित्र या महिलांच्या मनात निर्माण करावं लागतं.
काम करताना येणाऱ्या अडचणी
रेड लाईट एरियात थेट काम करताना बऱ्याचदा धमक्यांनाही सामोरं जावं लागतं. कारण समाजकंटक मध्यस्थांचा हा व्यवसाय असतो. त्यामुळं तिथं काम करताना आरोग्याच्या प्रश्नावर काम करत आहोत, याचा आधार घ्यावा लागतो. इथल्या महिलांना बाहेर जाऊन काय करू असा झगडा स्वतःशीच असतो. त्यामुळं एखादी महिला स्वतः तयार होत नाही तोवर तिच्यासोबत काम करणं कठीण असतं. कोविड काळात मात्र रेड लाईट एरियातल्या महिलांना आपल्याला काहीतरी कौशल्याचं काम यायला हवं याची जाणीव झाली.
समुपदेशकांकरता थेरपीज
सतत नकारात्मक गोष्टी आणि वेगवेगळ्या आव्हानांमधून मार्ग काढण्याचं काम संस्थेचे समुपदेशक करत असतात. त्यामुळं समुपदेशकांकरताही क्षमतातर्फे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांना त्यांच्या कामाचा ताण येऊ नये याकरता नृत्य, नाटिका शिबिर घेतलं जातं.
शिक्षण पूर्ण करणे

विविध निवारागृहातील अगदी तरुण मुलींचं शिक्षण पूर्ण करण्यावरही क्षमता भर देते. सीबीएससीच्या ओपन स्कूलिंग माध्यमातून या मुलींचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं जातं.
‘क्षमता’च्या कक्षा रुंदावणे

2011 ते 2025 या काळात क्षमताच्या सेंटरमधून अडिचशे मुली-महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. तर विविध शासकीय निवारागृहातील बाराशेहून अधिक मुली-महिलांना क्षमतानं सक्षम केलं आहे. या सर्व मुली-महिला आपलं पूर्वायुष्य विसरून नव्या क्षितिजाकडे झेपावल्या आहेत. सध्या ठाण्यात ‘क्षमता’चं एक वर्कशॉप, एक निवाराकेंद्र आणि रेड लाईट एरियात 2 केंद्र आहेत. उल्हासनगरमध्ये 2, भिवंडीत 1 आणि मुंबई—ठाण्यातील अने शासकीय निवाराकेंद्रात ‘क्षमता’ काम करते. यापुढं राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात ‘क्षमता’ला पोहचवण्याचं उद्दीष्ट आहे.
क्षमता संपर्क-
प्रथमेश निवास, रांका बँक्वेटच्या मागे, रामचंद्र नगर नं २, ठाणे पश्चिम – 400604
फोन नं : 7219145186
ईमेल : response@kshamata.org