दूध: एक पूर्ण अन्न 

Milk revolution in India : पूर्ण अन्न मानल्या गेलेल्या दुधाची ओळख, भारतीय दूध उत्पादन क्षेत्राचा ऐतिहासिक आढावा, आणि दूध उत्पादनात भारत शून्यातून सुरुवात करून जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर गेला त्या प्रवासाचा थोडक्यात आढावा घेणारा हा या लेखमालिकेचा पहिला भाग.
[gspeech type=button]

“अन्न हे पूर्णब्रह्म” मानणाऱ्या भारतीय उपखंडातील संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून, दूध आणि दही, ताक, लोणी, तूप, पनीर, श्रीखंड यासारख्या विविध पौष्टिक पदार्थांच्या रूपात दुधाचे सेवन केले जात आहे. दुधामध्ये चरबी (वसा), प्रथिने (केसीन हे मुख्य प्रथीन आणि सोबत मठ्ठा प्रथिने whey proteins), कार्बोहायड्रेट (लॅक्टोज ही दुग्धशर्करा), खनिजे (कॅल्शियम, फॉस्फरस), जीवनसत्त्वे (ए, बी, डी), आणि वितंचके (एन्झाईम्स) असे विविध अन्नघटक आणि पोषक तत्त्वे संतुलित प्रमाणात असल्यामुळे त्याला ‘पूर्ण अन्न’ असेही म्हटले जाते. यापैकी बहुतेक पोषक तत्वे आपल्या शरीरात सहजपणे शोषली जातात. लॅक्टोज दुग्धशर्करा ज्यांना पचत नाही अशा lactose intolerance असलेल्या व्यक्ती मात्र याला अपवाद आहेत. दुधामध्ये असे विविध अन्नघटक आणि मोठ्या प्रमाणावर (81 ते 90 %) पाणी असल्यामुळे त्यात सूक्ष्मजीवांची वाढ सहजपणे होते त्यामुळे ते अतिशय नाशवंत असते. दूध उत्पादन आणि हाताळणी करताना योग्य स्वच्छतेने काम न केल्यास दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये विविध प्रकारचे रोगजंतू वाढू शकतात आणि ते पदार्थ आरोग्याला अपायकारक ठरू शकतात.

भारतीय कृषीक्षेत्रात पशुपालन व दुग्ध-उत्पादनाचे महत्त्व

पशुपालन हा भारताच्या कृषी व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. कृषी क्षेत्राचे अधिक फायदेशीर आणि शाश्वत पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी उपलब्ध असलेला पशुपालन हा एक चांगला पर्याय आहे. अन्नधान्य पिके आणि पशुधन यांची मिश्र-शेती ही भारतातील प्रमुख शेती-प्रणाली आहे. जगात दुभत्या जनावरांची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. भारतात एकूण पशुधनाची संख्या 536 दशलक्ष आहे. ज्यात 36 टक्के दुभती गुरे आणि 20 टक्के म्हशी आहेत. प्राणी अनुवांशिक संसाधने (Animal genetic resources) ही देशाची पारंपरिक शक्ती आहे. ICAR (Indian Council of Agricultural Research) ने केलेल्या भारतातील पशुधनाच्या अभ्यासात उपयुक्त जनावरांच्या 197 जातींची नोंदणी केली आहे. यामध्ये गायींच्या 50 जाती, म्हशीच्या 17 जाती, शेळ्यांच्या 34, मेंढ्यांच्या 44, उंटाच्या 9, घोड्याच्या 7, आणि कोंबडीच्या 19 जातींचा समावेश आहे. पशूंमध्ये असलेली ही जैव-विविधता जगातील अन्य देशांपेक्षा जास्त आहे, हे भारताचे खऱ्या अर्थाने पशुधन आहे. भारतातील दुग्ध क्षेत्राअंतर्गत येणारे अन्य उद्योग, जसे पशुखाद्य, उपकरणे आणि पॅकेजिंग, इत्यादीमधून अतिरिक्त उपजीविकेच्या संधी आणि उत्पन्न निर्माण होतात. भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्र भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) सुमारे 4 टक्के आणि राष्ट्रीय कृषी उत्पन्नाच्या सुमारे 25 टक्के योगदान देते. दूध आणि संबंधित व्यवसायांमध्ये होणाऱ्या उत्पादनाचे एकत्रित मूल्य 2021-22 मध्ये तब्बल 9.95 लाख कोटी रुपये होते.

भारतीय दुग्ध व्यवसायाचा ऐतिहासिक आढावा

दुधाचे कृषी क्षेत्रात असलेले महत्त्व, त्याचे उच्च पोषणमूल्य आणि नाशवंतता यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे लक्षात येते की, असे उच्च पोषणमूल्य असलेले अन्न वापरायचे असेल तर त्याचे उत्पादन, प्रक्रिया आणि वापर यांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे ज्ञान आणि तशी परंपरा भारतीय उपखंडात अतिशय प्राचीन काळापासून आहे. वन्य प्राण्यांना मानवी उपयोगासाठी माणसाळवणे, त्यांना पाळून त्यांचा वापर शेतीमध्ये करणे, त्यांच्यापासून अन्न मिळवणे हे भारतीय उपखंडात इसवी सन पूर्व सुमारे 9 हजार वर्षांपासून सुरू झाले, असे मानले जाते. या काळात सुरुवातीला शेळ्या व मेंढया व नंतर इसपू 8 हजार दरम्यान दुभत्या गुरांचे पालन, तर इसपू 4 हजार आणि त्यानंतरच्या सुमारे 700 ते 1000 वर्षांमध्ये गहू, सातू (बार्ली), मोहरी, चणा, ज्वारी इत्यादी पिकांची लागवड सुरू झाल्याचे पुरातत्त्व संशोधनात दिसून येते. म्हणजेच, कृषी क्षेत्रामध्ये पशुपालन ही अन्नधान्य पिकांच्याही अगोदरपासून चालत आलेली परंपरा आहे.

दूधटंचाई ते सर्वाधिक दूध उत्पादकांचा देश, भारत 

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात पशुपालन मुख्यत्वे केवळ एक उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मर्यादित होते. जनावरांच्या चांगल्या जाती, आहाराचे वेळापत्रक आणि रोग व्यवस्थापन याबाबत त्या काळात लोकांना पारंपरिक माहिती होती. आता जगात सर्वाधिक दूध उत्पादक देश असलेला भारत 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले; त्यावेळी मात्र दुधाच्या टंचाईमुळे त्रस्त होता. औपचारिक पशुवैद्यकीय शिक्षणाची सुरुवात, संशोधन संस्थांची स्थापना आणि दुग्ध सहकारी चळवळीची सुरुवात यासारख्या घडामोडींनी स्वातंत्र्योत्तर काळात साधलेल्या प्रगतीचा पाया रचला. 1946 मध्ये गुजरातमध्ये ‘खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा’च्या स्थापनेपासून दुग्धव्यवसायात सहकारी चळवळ सुरू झाली. ती खूप यशस्वी झाली आणि स्वातंत्र्यानंतर देशभरात दुग्ध सहकारी संस्थांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळाले.

योग्य नियोजनामुळे भारताची भरारी 

स्वातंत्र्यानंतर मात्र दुग्ध व्यवसाय क्षेत्रात सर्वांगीण वाढ झाली. 1950 आणि 1960 च्या दशकात भारत जगातील इतर देशांच्या तुलनेत दुधाची कमतरता असलेला देश होता. त्यामुळे दूध आणि दुधाची भुकटी आयात करावी लागत होती. परंतु अगदी पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून कृषी क्षेत्राचा विकास होण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन केले गेले. त्याचा परिणाम म्हणून 1950-51 पासून आतापर्यंत भारतात अन्नधान्याचे उत्पादन 6 पटीने, बागायती पिकांचे 11 पट, मासे 18 पट, दूध 10 पट आणि अंडी उत्पादन 53 पटीने वाढले, ज्याचा एकत्रित दृश्यमान परिणाम राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षेवर झाला.

भारतातील छोट्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दुधाची ‘धवल-क्रांती’ कशी घडवली याची माहिती पुढील भागात घेऊ!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Vedh Shivkalacha : दुर्गबांधणीचे शास्त्र आपल्या देशाला फार प्राचीन काळापासून माहिती होतं. दुर्गाचे विविध प्रकार कोणते? याचा शिवकाळात देखील बारकाईने
National Milk Day : राष्ट्रीय दूध दिनानिमित्त भारतातल्या दुग्ध क्रांतीविषयक विशेष लेख.
Vedh Shivkalacha : कोणत्याही युद्धाचे यश हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ