ख्रिस्ती समुदायाच्या उपवास काळाला 5 मार्चपासून सुरुवात झाली आहे. उपवास काळाचा पहिला दिवस हा ‘राखेचा बुधवार’ म्हणजेच ‘ॲश वेडन्सडे’ म्हणून ओळखला जातो. आजपासून पुढचे 40 दिवस हे ख्रिस्ती बांधवांसाठी आध्यात्मिक दृष्टिने महत्त्वपूर्ण आणि पवित्र काळ असणार आहे.
या उपवासकाळाला इंग्रजीमध्ये ‘लेंट सीझन’ असं संबोधलं जातं. लेंट हा शब्द लेंटेन या शब्दाचं लघुरुप आहे. डच शब्द लेंटिनपासून आलेला आहे. हा शब्द आजही युरोपमध्ये वापरला जातो. लेंटेन याचा अर्थ ‘वसंत ऋतू’ असा आहे. 13 व्या शतकामध्ये चर्चमध्ये ईस्टर सणाच्या आधी पूर्वतयारी करण्याच्या कालावधीसाठी पहिल्यांदा ‘लेंट’ हा शब्द वापरला गेला.
वसंत ऋतूमध्ये झाडाची पानगळती होते आणि नवीन पालवी फुटते. हे एक प्रकारे पुनरुज्जीवीत होण्याची क्रिया आहे. याचप्रमाणे उपवास काळात आपण आपल्या जीवनाचं आत्मपरिक्षण करुन, आपल्यामध्ये बदल घडविण्यासाठी योग्य असलेला असा हा काळ असतो. या काळामध्ये प्रार्थना, दानधर्म आणि सेवा या तीन कृतींना महत्त्व असतं.
उपवास म्हणजे नेमकं काय?
दैनंदिन जीवनात उपवास या शब्दाचा अर्थ आपण अन्नपदार्थ वर्ज्य करणं असा घेतो. मात्र, संस्कृत भाषेत ‘उप’ म्हणजे ‘जवळ’ आणि ‘वास’ म्हणजे ‘निवास, राहणे’ असा होतो. ‘देवाच्या सानिध्यात राहण्याचा काळ’ असा उपवास या शब्दाचा अर्थ होतो. ख्रिस्ती समाजामध्येही याच अर्थाने उपवास केले जातात.
या उपवास काळात अन्नपदार्थ वर्ज्य करण्याचा उपवास अनेकजण करतात. काही भाविक चाळीस दिवसातले बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवशी पूर्ण अन्नत्याग करतात. काही जण या दोन दिवशी एक वेळचंच अन्न ग्रहण करतात. तर काही जण या संपूर्ण चाळीस दिवसामध्ये मांसाहार टाळतात. तर काही जण या चाळीस दिवसात मद्दप्राशन करत नाहीत. जसं जमेल त्यानुसार ती व्यक्ती उपवास करते.
या पद्धतीच्या उपवासासह आपल्या आत्म्याच्या शुद्धीसाठी वाईट सवयी, व्यसनं जसं की, चाळीस दिवस मोबाईल कमी वापरणं, कुणाबद्दल वाईट न बोलणं किंवा ज्या वाईट गोष्टीमध्ये आपण अती प्रमाणात अडकलेलो असतो त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करणं हाही एक प्रकारचा उपवास आहे.
उपवासासाठी 40 दिवस कसे ठरवले?
उपवासासाठी पूर्ण चाळीस दिवसाचा कालावधी निश्चित केलेला आहे. बायबलमधल्या नवीन करारामध्ये मत्तय, लूक आणि मार्क या तीन शुभवर्तमानामध्ये याचा संदर्भ आढळतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाल्यावर पवित्र आत्म्याने त्याला यहूदी वाळवंट म्हणजे ज्यूडियन वाळवटांत आणून सोडलं. येरुसलेमच्या पूर्वकडे हे वाळवंट आहे.
या वाळवंटामध्ये येशू ख्रिस्ताने 40 दिवस 40 रात्री एकांतात घालवल्या. येशू ख्रिस्ताने या संपूर्ण कालावधीत काहीच खाल्लं नाही. तो उपाशी होता. चाळीस दिवस पूर्ण झाल्यावर येशूची परिक्षा घेण्यासाठी सैतान तेथे आला. त्याने येशूला ‘देवाचा पुत्र असशील तर धोंड्याच्या भाकरी करण्याचं, मंदिराच्या मध्यभागी उभं राहून खाली उडी मारण्याचं आणि सैतानाला नमन कर म्हणजे जगातलं सगळं वैभव तुला देईन,’ अशी तीन आमिषं दाखवली. मात्र, येशू ख्रिस्ताने ही तिन्ही आमिष झिडकारली. आणि ‘परमेश्वर तुझा जो देव आहे, त्याची परिक्षा पाहू नकोस’ असं सैतानाला सांगितलं. त्यानंतर प्रभू येशूला सैतान त्या वाळवंटात सोडून गेला.
याच चाळीस दिवसाचं स्मरण म्हणून चाळीस दिवसांचा उपवास कालावधी ठरवला. आणि मग या चाळीस दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचे दु:खसहन आणि पुनरुत्थान साजरं केलं जातं.
येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर लाकडाचा आडवा ओंडका देत येशूला कालवरी टेकडी चढायला लावलं होतं. यावेळी येशूच्या अंगावरचे कपडे फाडून टाकले होते. त्याला चाबकाचे 40 फटके मारले होते. हा लाकडी ओंडका खांद्यावर घेऊन चालताना येशू ख्रिस्त तीन वेळा खाली पडला. यावेळी त्याला जखमा झाल्या. या पूर्ण प्रवासात त्याला साधं पाणीही दिलं गेलं नव्हतं. संपूर्ण प्रवासात लोकांनी त्याची मानहानी केली. कालवरी टेकडीवर पोहोचल्यावर त्याला दोन गुन्हेगारांमध्ये क्रुसावर चढवण्यात आलं. त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकूट घातला. दोन्ही हातांच्या पंजावर खिळे ठोकलेले. पायावरही खिळे ठोकले होते. येशूचा मृत्यू झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याच्या कुशीत भाला भोसकला होता. या अशा वेदनादायी मृत्यू प्रसंगाला येशूचं ‘दु:खसहन’ म्हणून संबोधलं जातं.
गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला. त्यांच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे नंतरच्या रविवारी येशू ख्रिस्ताचा आत्मा पुन्हा भूतलावर अवतरला. याला बायबलमध्ये ‘ईस्टर संडे’ म्हणतात. मराठी बायबलमध्ये याला ‘पुनरुत्थान’ असं म्हटलं आहे.
उपवास काळातील कार्यक्रम
या उपवास काळामध्ये भाविकांना आध्यात्मिकरित्या येशूच्या जवळ आणण्यासाठी चर्चद्वारे विशेष धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. दर शुक्रवारी क्रुसाच्या वाटेची भक्ती, तेजे प्रार्थना, नाईट व्हिजील, रिट्रीट आणि मिशन भागामध्ये भेटीचं आयोजन केलं जातं.
राखेचा बुधवार
राखेचा बुधवार (Ash Wednesday) हा उपवास काळातला पहिला दिवस असतो. या दिवशी चर्चमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावर राखेने क्रुसाची खूण काढली जाते. त्यावेळी धर्मगुरू “माणसा तू माती आहेस आणि परत मातीत जाऊन मिळणार आहेस” असं म्हणतात. बायबलमधल्या उत्पत्ती पुस्तकातल्या 3 अध्यायामधली ही 19 वी ओवी आहे. या कृतीतून धर्मगुरू हे प्रत्येक भाविकाला आपलं शरीर हे मातीने बनलेलं आहे. आणि मृत्यूनंतर हे शरीर पुन्हा मातीत मिसळून जाणार आहे. याची आठवण करुन देतात. यावेळी ‘आत्मा चिरंतर राहतो. त्यामुळे आपल्या आत्म्याच्या शुद्धीसाठी पावित्र्यात जगावं,’ असा संदेश यातून दिला जातो.
आत्म्याच्या शुद्धीसाठी प्रार्थना करणं, पश्चाताप करणं, सेवा आणि दानधर्म करत आपल्यात बदल करण्यासाठी चर्च मार्गदर्शन करीत असतं.
झावळ्याचा रविवार
संपूर्ण उपवास काळ हा ख्रिस्ती समुदायासाठी पवित्र काळ असतो. या चाळीस दिवसांमध्ये तत्कालीन कालखंडात घडलेल्या घटना एक एक दिवस दाखवल्या जातात. यातलाच एक दिवस असतो झावळ्याचा रविवार. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येरुशलेममध्ये आला, तेव्हा तिथल्या लोकांनी खजूराच्या झावळ्या हातात धरून
‘ राजा ‘ म्हणून येशू ख्रिस्ताचं स्वागत केल्याची घटना घडली होती. राजा म्हणून गौरविलेल्या येशू ख्रिस्ताला पुढे याच समुदायाने अपराधी ठरवलं होतं.
याच प्रसंगाची आठवण म्हणून या झावळ्याच्या रविवारला ‘दु:खसहन रविवार’ असंही म्हटलं जातं. या रविवारी सकाळी प्रार्थनेमध्ये नारळाच्या झाडांच्या झावळ्यांना (आपल्याकडे या झावळ्या उपलब्ध असतात म्हणून) आशीर्वाद दिला जातो. पुढे या झावळ्यांचा क्रॉस तयार करुन तो घराच्या उंबरठ्यावर लावला जातो.
तर संध्याकाळी वेरोनिका येशूचा चेहरा पुसते हे दृश्य दाखवलं जातं. यावेळी चर्च परिसरामध्ये मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक ‘ येशूच्या दु:खसहनाच्या दिशेने सुरू झालेल्या प्रवासाचं ‘ प्रतीक असतं.
पवित्र गुरुवार
या दिवशी चर्च ‘ मिस्साबलिदान स्थापने’ चा सण साजरा करीत असते. याला इंग्रजीमध्ये ‘मौंडी थर्स्टेडे’ असं म्हणतात. येशू ख्रिस्ताने एके दिवशी रात्रीच्या जेवणाच्या आधी आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि त्यानंतर त्यांच्यासोबत जेवण केले. या जेवणानंतरच्या रात्री येशू ख्रिस्ताला त्याच्याच एका शिष्याने पकडून दिलं होतं. त्यामुळे या जेवणाला ‘लास्ट सपर’, ‘शेवटचं भोजन’ म्हणून संबोधलं जातं.
या प्रसंगाची आठवण म्हणून पवित्र गुरुवारची प्रार्थनासभा असते. ज्याप्रमाणे खुद्द येशू ख्रिस्ताने आपल्या 12 शिष्यांचे पाय धूत सेवेचा आणि परस्परांवर प्रेम करण्याची शिकवण दिली. त्याचप्रमाणे धर्मगुरूसुद्धा यादिवशी समाजातल्या विविध घटकातील 12 जणांचे पाय धूत भाविकांना सेवेचा संदेश देतात.
शुभ शुक्रवार
गुड फ्रायडे, येशू ख्रिस्ताला या दिवशी क्रुसावर चढवून त्याच्या हाताच्या पंजांना, पायाला खिळे ठोकले, त्याच्या कुशीत भाला भोसकला. या दिवशी चर्चमध्ये सकाळी 7 वाजता क्रुसाची वाट आयोजित केली जाते. या क्रुसाच्या वाटेमध्ये येशू ख्रिस्ताला कशाप्रकारे पकडून देण्यात आलं, तिथपासून येशूला अपराधी म्हणून कालवरी क्रुसावर खिळे ठोकण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास हा 14 टप्प्यांमध्ये दाखवण्यात येतो. काही चर्चमध्ये हा संपूर्ण घटनाक्रम नाट्यरुपात सादर केला जातो.
त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता चर्चमध्ये येशूच्या दु:खसहनाच्या प्रार्थनेला सुरुवात केली जाते. ही प्रार्थना नेहमीच्या मिस्सा प्रार्थनेसारखी सुरु होत नसते. गुरुवारी जी मिस्सा बलिदानाची प्रार्थना सुरु असते, त्याच प्रार्थनेचा हा पुढचा भाग असतो.
या प्रार्थनेमध्ये येशू ख्रिस्ताला कशाप्रकारे क्रुसावर चढवलं, त्यावेळी काय काय घडलं हा संपूर्ण प्रसंग वाचनातून सांगितला जातो. त्यानंतर अंत्ययात्रा काढली जाते.
संपूर्ण प्रार्थनासभा संपल्यानंतर येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवल्याचा आणि क्रुसावरुन खाली काढण्याचा प्रसंग नाट्यरुपामध्ये सादर केला जातो. हे नाट्यरुप सगळ्याच चर्चमध्ये दाखवलं जात नाही. व्हॅटिकन 2 परिषदेपूर्वी सगळ्या चर्चमध्ये लॅटिन भाषेमध्येच प्रार्थना व्हायच्या. स्थानिकांना ही भाषा समजायची नाही. शुभ शुक्रवार हा अती महत्त्वाचा दिवस असायचा. लोकांना शब्द समजायचे नाहीत. मात्र, येशूच्या मृत्यूचा क्षण हा लोकांना अनुभवायला मिळावा यासाठी नाट्यरुपांतर केलं जायचं. या परिषदेनंतर वेगवेगळ्या भाषेत प्रार्थनेचं, धर्मग्रंथाचा अनुवाद केला गेला. मात्र, आजही बहुतांशी चर्चमध्ये नाट्यरुपात येशू ख्रिस्ताचे दु:खसहन दाखवलं जातं.
येशूच्या मृत्यू दिनाला ‘गुड फ्रायडे’ का म्हणतात?
शुभ शुक्रवार – गुड फ्रायडे हा दिवस खरंतर दुःखाचा दिवस आहे. या दिवशी येशू ख्रिस्ताचा मृत्यू झालेला. मात्र, ख्रिस्ती श्रध्देनुसार, आपल्या पापाच्या शुद्धीसाठी येशु ख्रिस्ताचं बलिदान देण्यात आलं. ख्रिस्ताच्या बलिदानामुळे सर्व पापांपासून आपली मुक्तता झाली. या अर्थाने या दिवसाला ‘शुभ शुक्रवार – गुड फ्रायडे’ असं संबोधलं जातं.
दु:ख पाळण्याचा दिवस – शनिवार
येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर शनिवारी दररोज जी मिस्सा बलिदानाची जी प्रार्थना असते ती होत नाही. या दिवशी संपूर्ण दिवस चर्च उघडं ठेवलं जातं. येशू ख्रिस्ताचं पार्थिव हे लाकडाच्या पेटीत ठेवलं जातं. भाविक दर्शनासाठी येत असतात. या दिवशी पूर्ण मौन पाळत दु:ख व्यक्त केलं जातं.
ईस्टर संडे
येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान दिवस. ख्रिस्ती श्रध्देनुसार, येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवल्यावर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाला. यालाच पुनरुत्थान असं म्हणतात.
या दिवशी शनिवारी मध्यरात्री मिस्सा बलिदानाची प्रार्थना केली जाते. देव पिता हाच जगाचा निर्माणकर्ता असून तोच या जगाची सुरुवात म्हणजे अल्फा आणि अंत म्हणजे ओमेगा आहे हे दर्शविणारी मोठी मेणबत्ती प्रकाशित केली जाते. यानंतर संतांची संपूर्ण विनंतीमाला गायली जाते. या दिवशी चर्चमध्ये एकूण सात वाचनं वाचली जातात. मिस्सा बलिदानाची प्रार्थना संपल्यावर सर्व भाविक एकमेकांना ईस्टरच्या शुभेच्छा देत येशूच्या पुनरुत्थानाचा उत्साह साजरा करतात.
2 Comments
खूप छान
खूप छान माहिती 👍🏻