पहाडासारखे बळवंत कान्होजी जेधे !

वेध शिवकाळाचा : प्रत्येक राजासाठी काही सहकारी हे फार मोलाचे असतात. काही प्रसंगात ते असं काही काम करून जातात की, केवळ राजाच नव्हे तर आपण सारे त्यांचं ऋण आयुष्यभर विसरू शकत नाही. शिवकाळातील असं एक पहाडासारखे व्यक्तिमत्व म्हणजे कान्होजी जेधे..! जाणून घेऊया त्यांच्याबाबत…
[gspeech type=button]

प्रत्येक राजासाठी काही सहकारी हे फार मोलाचे असतात. काही प्रसंगात ते असं काही काम करून जातात की, केवळ राजाच नव्हे तर आपण सारे त्यांचं ऋण आयुष्यभर विसरू शकत नाही. शिवकाळातील असं एक पहाडासारखे व्यक्तिमत्व म्हणजे कान्होजी जेधे..! जाणून घेऊया त्यांच्याबाबत…

भावकीच्या वादाची झळ गर्भारणीला

कान्होजी जेधे. भोर जवळील हिरडस मावळातील कारीचे. एखाद्या भक्कम दुर्गाप्रमाणे असलेला हा बुलंद माणूस. त्यांची जन्मकथाही अद्भुत. असं सांगतात की, जेधे घराण्यात मोठी भाऊबंदकी. त्यातून कान्होजी पोटात असताना जेध्यांच्या वाड्यात मोठी धुमश्चक्री उडाली. त्यात कान्होजींचे वडील वगैरे लोकांची हत्या झाली. भिवजी आणि सोनजी जेध्यांनी भावासह इतरांना कापून काढले. पोटुशी असलेली कान्होजींची आई अनुसयाबाई त्यातून वाचली. मात्र कान्होजींच्या जन्मानंतर भिवजी आणि सोनजी पुन्हा त्यांच्या जीवावर उठले. अनुसयाबाई आणि मुलाची काळजी घेणाऱ्या देवजी महाला यानं हुषारीनं त्यांना वाड्याबाहेर काढले. त्या दोघांच्या ऐवजी एक दाई आणि तिचं मूल बळी पडलं. 

माहेरीही आश्रय नाही

देवजी मग लहानगा कान्होजी आणि त्याच्या आईला घेऊन थेट अनुसयाबाईच्या माहेरी मांढरगावात आला. तिथलं मांढरे यांचं घर हेही भिवजी- सोनजी यांच्या दहशतीने घाबरलेले. त्यांनी आसरा द्यायला नकार दिला. मग देवजी या मायलेकरांची काळजी घेत मोसे खोऱ्यातील धनगर वाड्यात राहू लागला. तिथं मग सरदार बाजी पासलकर यांच्याशी त्याची ओळख झाली. बाजींचं सगळ्या परिसरात एक सज्जन आणि बलवान सरदार म्हणून नाव होतं. त्यांनी सगळी कथा ऐकून घेतली आणि या सर्वांना प्रेमाने आश्रय दिला. 

वडिलांच्या हत्येचा बदला

कान्होजीला तलवारबाजी, घोडेस्वारी आदि सगळं शिक्षण दिलं. बाजींना मुलगा नव्हता. त्यामुळे आपल्या मुलावर करावं तसे प्रेम त्यांनी कान्होजीवर केले. इतकंच नव्हे तर त्यांना आपला जावई करून घेतलं. कान्होजी मोठे झाल्यावर मग बाजींनी कान्होजींना त्याच्या काकांच्या दहशतीचा इतिहास सांगितला. आणि बाजी पासलकर यांनी कान्होजीना घेऊन सैन्याच्या तुकडीसह कारी गावात हल्ला केला. कान्होजीनी आपल्या दुष्ट काकांना देहदंड दिला आणि पुन्हा कारीचे वतनदार बनले. 

हे ही वाचा : मिठावरील कर आणि शिवशाही…!

शहाजीराजांच्या पदरी 

1635 पर्यंत कान्होजी आदिलशाही सरदार रणदुल्लाखान यांच्याकडे चाकरी करत होते. शहाजीराजे जेव्हा निजामशाही खांद्यावर घेऊन लढत होते, तेव्हा त्यांना जेरबंद करायला 1636 मध्ये प्रत्यक्ष शाहजहान बादशहा आणि आदिलशाह यांनी संयुक्त मोहीम काढली. माहुलीच्या बळकट दुर्गाजवळ मोठी लढाई झाली. अखेर शहाजीराजे पराभूत झाले. तहानुसार त्यांना सह्याद्री सोडून आदिलशाही चाकरीत कर्नाटकात जावे लागले. यावेळी रणदुल्लाखान यांच्या चाकरीत असलेले कान्होजी जेधे आणि दादोजीपंत लोहोकरे हे त्यांचे कारभारी शहाजीराजांच्या पदरी दाखल झाले. कान्होजींना पाच बायका होत्या; सावित्रीबाई, येसूबाई, चंदुबाई, कृष्णाबाई आणि रखमाबाई अशा नावाच्या. त्यांच्यापासूनची पाच मुलेही होती. त्यांची नावे बाजी, चांद्जी, शिवजी, नाईकजी आणि मताजी अशी होती. बाजी जेधे हा मुलगा बाजी पासलकर यांच्यासोबत शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या दिवसात सहभागी होता.

शिवरायांची ताकद वाढली

फत्तेखानासोबत महाराजांची जी पहिली लढाई झाली तेव्हा पुरंदर जवळ खळद- बेलसरच्या लढाईत मराठ्यांचं निशाण वाचवत बाजींनी पराक्रम गाजवला होता. तेव्हा महाराजांनी त्यांना ‘सर्जेराव’ हा किताब बहाल केला. फत्तेखानाच्या पराभवानंतर त्याचा पाठलाग करत जाताना झालेल्या युद्धात बाजी पासलकर हे स्वराज्याचे पहिले सेनापती धारातीर्थी पडले. यावेळी शहाजीराजांना आदिलशहाने कपटाने कैद केले होते. वजीर मुस्तफाखान, अफझलखान आणि शिवरायांचा नातेवाईक बाजी घोरपडे यांनी  शहाजीराजांना कैद करून जिंजी येथे ठेवले होते. तिथेच कान्होजी आणि दादोजीपंत लोहोकरे हे देखील कैदेत होते. फत्तेखानाचा शिवाजीराजांनी या पहिल्याच मोठ्या लढाईत संपूर्ण पराभव केला. तर त्याचवेळी त्यांचे भाऊ संभाजीराजे यांनी बंगळूरच्या लढाईत फर्राद्खान याचा पराभव केला. मग मोघली बादशहाचा मुलगा मुराद याच्यामार्फत शिवरायांनी राजकारणाचा डाव टाकला. आदिलशाहीवर दबाव टाकून वडिलांची सुखरूप सुटका करवून घेतली. यानंतर शहाजीराजांनी कान्होजी जेधे व लोहोकरे यांना 1649 नंतर पुण्याला पाठवले. ते आल्यामुळे शिवरायांची ताकद वाढली. 

आपापसांत लढणारे मराठे शिवरायांमुळं आले एकत्र

जेधे यांचे मावळात खोपडे आणि बांदल यांच्याशी हाडवैर होते. मावळातील बरेचसे सरदार असेच आपापसांत लढत होते. एकमेकांचे जीव घेत होते. त्या सर्वाना एकत्र करायला सुरुवात झाली ती शिवकाळात..!  जेधे, बांदल, पासलकर, शिळीमकर, कोंढाळकर, ढमाले, कोंडे देशमुख, मालुसरे, कंक आदि अनेक घराणी स्वराज्याच्या कार्यात सहभागी झाली. तरीही जे शिवरायांशी दुष्मनी बाळगून होते, त्या चंद्रराव मोरे यांच्यासारख्या वीरांना शेवटी नमवले गेले. जावळीपासून कोकणातील कल्याण-भिवंडीपर्यंतचा मुलुख स्वराज्यात आला. पुरंदर, लोहगड, तुंग, तिकोना, रायगड, राजमाची, प्रबळगड, सरसगड, सिंहगड आदि बलवान दुर्ग स्वराज्यात दाखल झाले. या सर्व धामधुमीत सरसेनापती माणकोजी दहातोंडे, नेताजी पालकर यांच्यासह शिवरायांचा मुख्य आधार होते ते कान्होजी जेधे..! 

शिवरायांच्या वाढत्या बळाला थोपवायला खानाची नेमणूक

पाहता पाहता नव्याने बांधलेली राजधानी राजगड आणि शेजारचा तोरणा उर्फ प्रचंडगड हे गड स्वराज्याच्या गाभ्यातील प्रमुख आणि भक्कम ठिकाण बनले.

प्रतापगडसारखा नवा दुर्ग बांधून तयार झाला. आणि आता एका मोठ्या युद्धाची नांदी दिसू लागली. शिवाजीराजांचे हे वाढते बळ आदिलशहाला दिसत होते. आता तर जावळीचे खोरेही गेले. मग शिवरायांना नेस्तनाबूत करायला मोठ्या सरदाराची नेमणूक झाली. तो होता अफझलखान. वाईचा आणि जावळीच्या सुभ्यावर त्याचा अंमल होता. 

अफझलखानाचा धमकीचा खलिता

जून 1659 मध्ये आदिलशहाने कान्होजींसह मावळातील अनेक वतनदार मंडळींना खलिते पाठवले. त्यात असे लिहिले होते की, “शिवाजीने निजामशाही कोकणातील मुसलमानांना त्रास देऊन, लूट करून तिथले आणि आदिलशाही मुलुखातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव शिवाजीच्या पारिपत्यासाठी अफझलखान महमंदशाही यास सुभेदारी देऊन नामजद केले आहे. तरी तुम्ही खानाचे रजामंदीत व हुकुमात राहून शिवाजीचा पराभव करून निर्मूळ फडशा पाडावा. शिवाजीच्या पदरच्या लोकांस ठार मारावे आणि आदिलशाही दौलतीचे कल्याण चिंतावे. तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही…

हे ही वाचा : एका स्वामिनिष्ठेचा सन्मान…

कान्होजींनी सोडलं वतनावर पाणी

या फर्मानापूर्वीही कान्होजींना चाकरीबाबतचे फर्मान आले होतेच. मात्र ह्या फर्मानातील भाषा जरबेची होती. असे फर्मान मिळताच मावळातील वतनदार मंडळींच्यात खळबळ उडाली. खंडोजी खोपडे, सुलतानजी जगदाळे आदि मंडळी खानच्या फौजेत दाखल झाली. कान्होजींच्या पुढे मोठा पेच निर्माण झाला. ते त्वरेने उठले, आपल्या पाचही मुलांना सोबत घेऊन थेट राजगडावर आले. 

आदिलशाही फर्मान त्यांनी महाराजांना दाखवले. महाराजांना कान्होजींची परीक्षा पहायची असावी.. महाराज उद्गारले, “ नाईक, तुम्हीही आता विचार करा. अन्य वतनदारही खानाला सामील होत आहेत. तुम्ही आमच्यासोबत राहिलात तर तुमचे वतन जाणार आणि तुमच्या जिवालाही धोका.. तुम्ही देखील इतरांसारखे आदिलशाही सैन्यात जा. आम्ही तुमची मनःस्थिती समजू शकतो..”

महाराज असे बोलले आणि एखाद्या धिप्पाड पर्वतासारखे असणारे कान्होजी गदगदले. पुढे येत महाराजांना म्हणाले, “ महाराज, गेली तेवीस वर्षं शहाजीराजांशी इमान ठेवले. त्यांच्या सांगण्यावरून गेली 8-9 वर्ष तुमची सोबत केली. आता आम्ही व आमचे पुत्र स्वराज्यासाठी खस्त होऊ पण हरामखोरी करणार नाही… वतनाचा लोभ आम्हास नाही.. हे पहा आम्ही आमच्या वतनावर पाणी सोडले…” असं सांगत त्यांनी जवळचा पाण्याचा तांब्या उचलला आणि आपल्या हातावरून पाणी महाराजांच्या पावलांवर सोडले. महाराज थक्क झाले. पट्कन बैठकीवरून उठले. कान्होजीना आलिंगन देत उद्गारले, “ नाईक, तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलात. आता आम्हाला शंभर हत्तींचे बळ आले. आपण गनिमाचे पारिपत्य करू. तुम्ही मावळच्या सर्व देशमुखांना एका जागी बैसोन सर्व मनसुबा सांगावा. त्यांना जोडून घ्यावे. तसेच पुढची धामधूम पाहता तुमचा कुटुंब कबिला कारीहून घाटाखाली तळेगाव ढमढेरेकडे हलवावा.”

आणि कान्होजी निघाले…

मावळातील समस्त देशमुखास एकत्र केले. सर्वाना मनसुबा सांगितला. ही आपली मोठी लढाई. आता अफझलखानाचे निर्दालन केले की हे आपले राज्य. आपले स्वराज्य. आता कुणा बादशहासाठी मरायचे नाही. लढायचे नाही. आपल्या राज्यासाठी लढायचे. मी माझ्या वतनावर पाणी सोडून आलो. आता जे करायचे ते मऱ्हाट राज्यासाठीच..!  कान्होजींची जरब मोठी.. त्यांच्याप्रती सर्वाना आदरही तितकाच. पाहता पाहता सगळा मावळ प्रांत कान्होजीनी एक केला. अफजलखान वाईला आला. आणि मग मुत्सद्दी महाराजांनी गोपीनाथकाका बोकील यांच्यामार्फत खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी ओढून आणले आणि शेवटी खानाचा वध केला. कोयनेच्या तीरावर जावळीच्या खोऱ्यातील पार, कुंभरोशी, मेटतळे आदि गावांजवळ भीषण युध्द झाले. मराठ्यांच्या फौजेने खानच्या फौजेची दाणादाण उडवली. हजारो हशम मरण पावले. कित्येक जखमी झाले. कित्येकांनी मराठ्यांची चाकरी पत्करली. प्रचंड लूट मिळाली. त्यापुढील 15 दिवसात कोल्हापूरपर्यंतचा आदिलशाही मुलुख स्वराज्यात आला… सहा महिन्यांपासून जावळीच्या खोऱ्यात धुमसत असलेली मोहीम फत्ते झाली..!

तलवारीच्या मानाचे पहिले पान

महाराजांनी मग सर्वांच्या कौतुकासाठी दरबार भरवला. जीवा महाले, संभाजी कावजी, शिळीमकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक आदि अनेकांचे सत्कार केले. गोपीनाथ काका बोकील आणि कान्होजी यांचं योगदान सर्वात मोठं होतं. त्यांनी गोपीनाथ काकांचा सन्मान केला. मग कान्होजीना बोलावले. आणि तलवारीच्या मानाचे पहिले पान त्यांना दिले. शाहीर अज्ञानदास पोवाड्यात म्हणून सांगून गेले..

अंगद हनुमंत रघुनाथाला / तैसे जेधे बांदल शिवाजीला…

जेधे आणि बांदल खरे तर एकमेकांचे मोठे वैरी होते. स्वराज्याच्या कामात मात्र शिवाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून लढले. इतकंच नव्हे तर पावनखिंडीच्या लढाईत जेंव्हा बाजीप्रभूसह बांदलांची एक मोठी तुकडी संपूर्ण खर्ची पडली तेव्हा शिवरायांची विनंती स्वीकारून कान्होजीनी मोठ्या मनाने तलवारीचा आपला पहिला मान बांदलांना देऊन टाकला. असे दिलदार शूर होते कान्होजी..! 

महाराजांवरील वडिलकीचे छत्र हरपले

शाहिस्तेखानाची स्वारी स्वराज्यात दाखल झालेली. त्यावेळी कान्होजी थकले होते. कारी-आंबवडे इथे आपल्या वाड्यात होते. आपल्या प्रकृतीची खबर महाराजांना पाठवून कान्होजी पत्रात लिहितात, “ माझी सर्व मुले आणि देशमुखीचे वतन आपले पायांवर ठेवले आहे. आपण त्यांचा सांभाळ करावा. आणि 1660 मध्ये कान्होजींचे निधन झाले. महाराजांना वाईट वाटले. त्यांच्यावर असलेले एक वडिलकीचे छत्र कायमचे हरपले..!

कान्होजीन्सारखी माणसे होती म्हणूनच स्वराज्य उभे राहिले. साल्हेरपासून जिंजी तंजावर पर्यत ते वाढत गेले..! कान्होजींसारख्या हजारो लाखो लोकांनी कोणत्याही फायद्याची अपेक्षा न करता प्रसंगी जीवावर उदार होत झुंज दिली. त्यामुळेच हे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांच्या नंतरही 27 वर्षे बादशाहाशी झुंजत राहिले.

या साऱ्या वीरांचे स्मरण आपण नित्य जपलं पाहिजे. भोर परिसरातील कारी-आंबवडे इथे जाऊन कान्होजींच्या समाधीचं, वाड्याचं दर्शन घेऊन तिथं अवश्य नतमस्तक होऊ या..!

संदर्भ –

शिवकालीन पत्र-सार संग्रह आणि जेधे शकावली

शककर्ते शिवराय – विजयराव देशमुख

राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे

2 Comments

  • Rajendra K Shelke

    अप्रतिम आणि वाचनीय लेख
    धन्यवाद सर

  • फोर्ट अर्नाळा.

    मराठी/इंग्रजी/हिंदी मधे वाचता येण्यासाठी सक्षम करावी ज्यामुळे वाचक बेस वाढेल,बरीच संकेतस्थळे जागतिक भाषा मोडवर आहेत,
    श्रेष्ठ महाराष्ट्र ने पण जागतिक व्हावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 Responses

  1. मराठी/इंग्रजी/हिंदी मधे वाचता येण्यासाठी सक्षम करावी ज्यामुळे वाचक बेस वाढेल,बरीच संकेतस्थळे जागतिक भाषा मोडवर आहेत,
    श्रेष्ठ महाराष्ट्र ने पण जागतिक व्हावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Vedh Shivkalacha : दुर्गबांधणीचे शास्त्र आपल्या देशाला फार प्राचीन काळापासून माहिती होतं. दुर्गाचे विविध प्रकार कोणते? याचा शिवकाळात देखील बारकाईने
National Milk Day : राष्ट्रीय दूध दिनानिमित्त भारतातल्या दुग्ध क्रांतीविषयक विशेष लेख.
Vedh Shivkalacha : कोणत्याही युद्धाचे यश हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ