आपल्या सर्वांना आतापर्यंत माहीत झालंच आहे की, पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. 2024 या वर्षात जगानं हवामान बदलाचे परिणाम चांगलेच अनुभवले आहेत. या वर्षी पृथ्वीवरचं तापमान औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या तापमानापेक्षा जवळपास 1.6°C नी जास्त होतं. जागतिक हवामान संस्थेच्या (WMO) 2024 अहवालानुसार मागची दहा वर्षे ही आतापर्यंतची सगळ्यात उष्ण वर्षे होती.
2024 हे सर्वात उष्ण वर्ष
जागतिक हवामानाची नोंद ठेवायला सुरू झाल्यापासून ते आतापर्यंतची सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून गेल्या दशकाची नोंद झाली आहे. बुधवार, 19 मार्च 2025 रोजी जागतिक हवामान संस्थेने दिलेल्या (WMO) अहवालानुसार गेल्या 175 वर्षांच्या नोंदीनुसार 2024 हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे. याआधी 2023 हे सर्वात उष्ण वर्ष होतं. त्यावेळी तापमानात 1.45°C ± 0.12°C इतकी वाढ झाली होती.
2024 च्या सुरुवातीला ‘एल निनो’ (El Niño) चा प्रभाव वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढलं. पण, 2023 मध्ये तापमानात उच्चांक गाठायला सुरुवात झाली होती. जून 2023 ते डिसेंबर 2024 पर्यंत दर महिन्यातील जागतिक सरासरी तापमान हे, 2023 मधील आधीच्या सगळ्या नोंदींपेक्षा जास्त होतं.
वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढलं
जागतिक हवामान संस्थेच्या (WMO) नव्या अहवालानुसार, हवेतील कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण गेल्या 8 लाख वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहचले असल्याचं सांगितलं. आणि जगभरात गेल्या 10 वर्षांतील प्रत्येक वर्षं हे आतापर्यंतच्या सर्वात उष्ण वर्षांमध्ये गणलं गेलं आहे.
समुद्राचं तापमान वाढतंय
गेल्या आठ वर्षांत समुद्राच्या पाण्याची पातळी आणि उष्णता दोन्हीही वाढत आहे. त्यामुळे सतत नवीन रेकॉर्ड बनत आहे. समुद्राप्रमाणेच हिमपर्वत, हिमनद्या आणि हिमसमुद्रावरही उष्णतेचा परिणाम स्वाभाविकपणे होत आहे. आर्क्टिक प्रदेशात गेल्या 18 वर्षात समुद्रातील बर्फ 18 वेळा कमी झाला आहे. तर अंटार्क्टिकमध्ये गेल्या 3 वर्षात 3 वेळा सर्वात कमी बर्फाचे प्रमाण नोंदवले गेले आहे.
हवामानबदलामुळे ओला आणि सुका दुष्काळाचे संकट सतत येतच आहे. यामुळं अन्नाची कमतरता झाली. पूर आणि वणव्यामुळे 8 लाख लोकांना आपली घरं सोडावी लागली आहेत.
पॅरिस करार अजूनही शक्य आहे…
हवामान बदलामुळे परिस्थिती गंभीर दिसत असली, तरी पॅरिस करारात ठरवलेली उद्दिष्ट्ये साध्य होऊ शकतात. असा विश्वास गुटेरेस यांनी व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका वर्षात तापमान 1.5°C पेक्षा जास्त होत आहे. पण कराराचे नियम आपण पाळले तर यातून किमान दिलासा मिळू शकतो. त्यामुळे कराराची उद्दिष्ट्ये अजूनही गाठता येणं शक्य आहे.