प्रयागराज इथला महाकुंभ मेळावा अतिशय उत्साह आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. आता 2027 मध्ये नाशिक इथे सिंहस्थ कुंभमेळावा होणार आहे. राज्य सरकारने या कुंभमेळाव्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुंभमेळाव्याच्या नियोजनासाठी राज्य सरकारने 1100 कोटीचा निधी जाहीर केला आहे. तसंच या कुंभ मेळाव्याच्या तयारीसाठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दिनांक 23 मार्च रोजी नाशिक इथे केली.
उत्तर प्रदेश सरकारने ज्याप्रमाणे महाकुंभ मेळाव्यासाठी विशेष व्यवस्थापन प्राधिकरण गठित केलं होतं, त्याआधारेच हे प्राधिकरण असेल. या प्राधिकरण कायद्या अंतर्गत पायाभूत सुविधा आणि कुंभ मेळावा नियोजनाची इतर कामं करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
रविवार दिनांक, 23 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभ मेळाव्याच्या तयारी संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये मंदिर समितीने त्र्यंबकेश्वर मंदिर विकासाचा आराखडा सादर केला.
मंदिर विकासाचा आराखडा
या नियोजित आराखड्यामध्ये, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरासह नाशिकमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वापर, इलेक्ट्रिक वाहनांचे एकत्रीकरण, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता सुविधांची व्यवस्था, गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करणं आणि नाशिकमधील आगामी कुंभमेळ्यादरम्यान भाविकांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं अशा सुविधांसह मंदिराच्या पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यावर भर दिला आहे.
प्रयागराज महाकुंभ मेळाव्याप्रमाणे नाशिकचा सिंहस्थ कुंभ मेळावा हा श्रध्दा आणि तंत्रज्ञानाची सांगड घातलेला कुंभमेळावा असेल. भाविकांच्या व्यवस्थेपासून अन्य अनेक सुविधांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामध्ये एआय तंत्रज्ञानाचासुद्धा उपयोग केला जाणार आहे. ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक अनुभव घेता येईल.
1100 कोटींची योजना कशी असेल?
1100 कोटी रुपयांची ही योजना दोन टप्प्यात राबवली जाणार आहे. हा कुंभ मेळा 300 एकर परिसरात आयोजित केला जाईल. याच्या व्यवस्थापनासाठी घोषित केलेला निधी हा दोन टप्प्यामध्ये वापरला जाणार आहे. अर्धा निधी हा 2027 पर्यंत आवश्यक त्या पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी वापरला जाईल. तर उर्वरित निधी हा 2027 नंतर वापरला जाणार आहे.
अर्थव्यवस्थेला चालना
उत्तरप्रदेश मधल्या प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळाव्याच्या नियोजनामुळे उत्तरप्रदेश सरकारच्या तिजोरीमध्ये मोठी वाढ झाली. आध्यात्मिकतेसह धार्मिक पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली. महाकुंभमेळाव्याच्या निमित्ताने अनेक नवनवीन उद्योग उभे राहिले, रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. थोडक्यात, या आध्यात्मिक उत्सवाच्या निमित्ताने एक नवीन अर्थव्यवस्था उभी राहते. त्यामुळे नाशिक सिंहस्थ कुंभमेळाव्याच्याद्वारेही अशीच अर्थव्यवस्था उभी करुन अधिकाधिक तरुणांना यामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.