सीबीएसई पालकांसाठी घेणार विशेष कार्यशाळा

CBSE Parenting workshop : पाल्यांचा आणि पालकांचा नियमित संवाद व्हावा, त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण, सामंजस्याचं नातं निर्माण व्हायला हवं यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी सीबीएसईने पाऊल उचललं आहे. नवीन शैक्षणिक धोरणातंर्गत सीबीएसई बोर्डाने 'पॅरेंटिंग प्रोग्राम' या उपक्रमाला सुरुवात करणार आहे.
[gspeech type=button]

करिअरची स्पर्धा आणि गॅझेटचा भडीमार असलेल्या या युगात पालकत्व निभावणं आव्हानात्मक आहे.  लहान मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण,  लहान वयात व्यसनांची लागण, भावनांवर अनियंत्रण अशा अनेक समस्या निर्माण होतात.  अनेक पालकांना आपली मुलं चिडचिड करत असतील तर त्यांना कसं हाताळावं, जर आपलं मूल शांत बसलं असेल तर त्यामागे काय कारण आहे, आपलं मुलं तणावात आहे का अशा अनेक गोष्टी ठाऊक नसतात किंवा त्यावर काय उपाय करावा याची कल्पना नसते. 

पाल्यांचा आणि पालकांचा नियमित संवाद व्हावा, त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण, सामंजस्याचं नातं निर्माण व्हायला हवं यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. आणि यासाठी सीबीएसईने पाऊल उचललं आहे. 

पॅरेंटिंग कॅलेंडर 

पालकांना पालकत्व निभावण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी सीबीएसई बोर्डाने ‘पॅरेंटिंग प्रोग्राम’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामध्ये पालकांचे आणि त्यांच्या पाल्यांचे (विद्यार्थ्यांचे) नातं कसं असलं पाहिजे या विषयावर वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाणार आहे.  नवीन शिक्षण धोरण 2020 नुसार हा उपक्रम राबविला जाणार आहे. या संपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, व्यक्तिमत्व आणि भावनिक विकास साधणे हा मूळ उद्देश आहे. 

या उपक्रमासाठी सीबीएसई बोर्डाने संपूर्ण भारतातल्या पालकांशी संवाद साधून याचा आराखडा तयार केला आहे. दिल्ली, ओडिसा, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, लडाख आणि मणिपूर इथल्या 13 हजार पालकांनी आणि कायदेशीर पालकत्व घेतलेल्या व्यक्ती (गार्डियन्स)  सहभाग घेतला होता. यामध्ये 69.6 टक्के महिला, 28.2 टक्के पुरुष आणि 2.1 कायदेशिर पालकांचा समावेश होता. काही पालक हे आपल्या पाल्याचा स्वतंत्रपणे सांभाळ करण्यासाठी सक्षम आहेत. पण काही पालकांना मुलांचा सांभाळ करणं, अभ्यास घेण्यासाठी शाळेकडून मदतीची, मार्गदर्शनाची गरज असल्याचं दिसून आलं आहे. यासाठी शाळेच्या माध्यमातून विविध कार्यशाळा, शिबिरं, चर्चासत्र आयोजित करुन त्यांच्या माध्यमातून पालक आणि पाल्यांमधील संबंध दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. 

पालकांची काय गरज आहे? 

सीबीएसईने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 19.7 टक्के पालकांना ‘पालकत्व’ निभावताना अडचणी येत आहेत. तर, 43.5 टक्के पालकांना ते उत्तमरित्या आपल्या मुलांचा सांभाळ करत असल्याचा आत्मविश्वास आहे. 36.8 टक्के पालकांना पालकत्वाची जबाबदारी आणखीन चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शन हवं आहे. मुलांनी समाजात कसं वावरावं, नातेसंबंध कशी जपावित याविषयी मुलांना शिकविण्यासाठी 12.3 टक्के पालाकांना मार्गदर्शन हवं आहे. मुलांना भावनांवर नियंत्रण कसं मिळवावं हे शिकवण्यासाठी 10.9 टक्के पालकांना मार्गदर्शन हवं आहे. तर 11 टक्के पालकांना त्यांना त्यांच्या पाल्यांना शिस्त लावणे, मर्यादेत राहणे आणि मुलांच्या चांगल्या गोष्टी साठी प्रोत्साहित कसं करावं यासाठी मदतीची गरज आहे. 

मुलांची वर्तणूक सुधारण्यासाठी मदतीची गरज

मुलांचा सर्वांगीण विकास साधताना त्यांची वर्तणूक कशी असावी,  त्यादृष्टीने मुलांना कसं सांभाळावं याविषयी ही प्रश्न विचारले होते. यामध्ये 12.1 टक्के पालकांचं मत आहे की, मुलांमध्ये सकारात्मकता वाढीस लागायला हवी, 11.1 टक्के पालकांना मुलांशी प्रभावी संवाद कसा साधावा या विषयी मार्गदर्शन हवं आहे. मुलांना संयम पाळायला शिकवणं, नम्रपणे आवश्यक तिथे नाही म्हणायला शिकणं, शालेय अभ्यासक्रम पूर्ण करणं आणि अभ्यास व अन्य गोष्टी शिकताना वेळेचं व्यवस्थापन कसं करावा, हे पाल्यांना कशा पद्धतीने शिकवावं याविषयी पालकांना मार्गदर्शन हवं असल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट केलं आहे.  

हे ही वाचा : जनरेशन बीटा : शिक्षण घेण्याची नवी पद्धत, शाळा तयार आहेत का?

पालकांची सद्यस्थिती

दरम्यान, मुलांचे वर्तन सुधरवणे, त्यांना शिस्त लावणे हे उत्तमरित्या जमते असा 54.4 टक्के पालकांना आत्मविश्वास आहे. नोकरी, व्यावसायाच्या जबाबदारीमुळे 40 टक्के पालकांना आपल्या मुलांसोबत हवा तेवढा वेळ घालवता येत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर 5.5 टक्के पालकांना मुलांच्या संगोपणासाठी मदतीची गरज आहे. अभ्यासाच्या बाबतीतही 53 टक्के पालक हे त्यांच्या भूमिकेविषयी समाधानी आहेत. तर 40 टक्के पालकांना काहीक वेळेस मुलांचा अभ्यास घेण्यात वगैरे अडचणी येत असतात. 

शाळेकडून पालकांना कितपत मदत हवी आहे?

मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसह मुलांच्या संगोपणासाठी शाळा आपल्याला मदत करु शकेल असा पालकांचा विश्वास आहे. 49 टक्के पालकांना आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक, व्यक्तिमत्व आणि  सामाजिक विकासासाठी शाळेकडून मार्गदर्शनाची गरज आहे. तर 29 टक्के पालकांनी या सर्वेक्षणावेळी स्पष्ट केलं की, त्यांना ही पालकत्वाची जबाबदारी पेलताना शाळेसह अन्य सहकार्याचीसुद्धा गरज आहे. 72 टक्के पालक हे आपल्या मुलांच्या शाळेतील शिक्षकांसोबत मुलांच्या अभ्यासासह त्यांच्या वर्तणुकीविषयी सुद्धा चर्चा करण्यासाठी त्यांच्यामध्ये मनमोकळेपणा आहे. तर 3.8 टक्के पालक हे मुलांच्या शिक्षकांशी मुलांविषयी अन्य चर्चा करण्यासाठी इच्छुक नसतात. 

पॅरेटिंग प्रोग्राम उपक्रम कसा असावा?

सीबीएसई बोर्डाने या उपक्रमाचा आराखडा हा पालकांच्या गरजा आणि मत विचारात घेऊनच तयार केला आहे.  शाळेने पालकांसाठी मार्गदर्शनपर वर्कशॉप, प्रशिक्षण उपक्रम आयोजित करावेत, नियमित पालक-शिक्षक संवाद साधावा त्याचबरोबर पालकांना वैयक्तिक मार्गदर्शन करावं अशा मागण्या पालकांनी केल्या आहेत. 

यामध्ये पालकांनी कशा पद्धतीने मुलांसोबत वागावं, भावनिक नातं कसं जपावं, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कशी मदत करावी, पाल्यांसोबत संवाद कसा साधावा या सगळ्या गोष्टीविषयी या वर्कशॉपच्या माद्यमातून मार्गदर्शन करावं अशी पालकांची अपेक्षा आहे. 

दरम्यान, या सगळ्या उपक्रमामध्ये पालक-शिक्षक संघटनेनेसुद्धा प्रभावी भूमिका बजावावी असंही पालकांचं मत आहे. 

शिक्षक – पालक संवादावर भर

पॅरेटिंग कॅलेंडर उपक्रमामध्ये सीबीएसई बोर्डाने पालक आणि शिक्षकांच्या संवादावर अधिक भर दिला आहे. मुलांचा सर्वांगिण विकास साधताना मुलं कोणत्या गोष्टीत कमी पडतात, मग तो अभ्यास असो, वर्तणूक असो वा समाजात सरमिसळणं असो अशा प्रत्येक गोष्टीविषयी बारकाईने चर्चा करुन त्यावर उपाययोजना शोधणं आणि त्यांची अंमलबजावणी करणे. 

पालकांच्या कार्यशाळेमध्ये मुलांनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी, त्यांचा मानसिक, भावनिक विकास, वर्तणूक आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी पालकांना मार्गदर्शन करणे. यासह, मुलांच्या भावनिक गरजा समजून घेणं, त्यांची अस्वस्थता, चिडचिड, मोबाईल बघण्याचा वेळ अशा गोष्टीसंबंधित मुलांशी कशी समजूत कशी काढावी, त्या-त्या वेळी मुलांशी काय व कसं वागावं यावरही लक्ष दिलं जाणार आहे. 

हे ही वाचा : कृत्रिम कॉर्नियाच्या सहाय्याने 10 वर्षांनंतर दृष्टी परत !

इयत्तेनुसार पालकांना प्रशिक्षण

हा उपक्रम सीबीएसई शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी असणार आहे. यामध्ये किंडरगार्डन मध्ये शिकणाऱ्या मुलांच्या आईवडिलांना मुलांना भावनिकदृष्ट्या सक्षम कसं करावं, आनंदी हसरं बाळ म्हणून आपल्या मुलांना कसं वाढवावं, या वयात ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी हट्ट करीत असतात तेव्हा त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं आणि मुलांमध्ये आतापासूनच सकारात्मक विचार कसे रुजवावेत याविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे. 

पहिली-दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांना घरात साहित्यिक वातावरण कसं ठेवावं, मुलांना गोष्टी सांगणं, त्यांना गोष्टी सांगायला शिकवणं, एकमेकांना मदत करणं, सहानुभूती देणं, काही अडचण आली असेल तर ती कशी सोडवायची आणि आपल्या वयानुसार आपल्या वागण्यात, बोलण्यात मर्यादा कशी पाळावी याविषयी मार्गदर्शन करणे. 

तिसरी ते पाचवी इयत्तेच्या मुलांचा बौद्धीक विकास साधताना मुलांना तार्किक प्रश्न कसे सोडवायचे, निर्णय कसे घ्यायचे, मोबाईल वापरताना काय काळजी घ्यायची आणि शिस्त पाळणे यासारखे स्वावलंबनाचे धडे पालकांनी मुलांना कसे द्यायचे याविषयी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 

सहावी ते आठवी इयत्तेत शिकणारी मुलं ही या वयात कुमारावस्थेत येत असतात. तेव्हा या टप्प्यात त्यांच्यात घडणाऱ्या शारिरीक, भावनिक बदलांना कशाप्रकारे सामोरं जायचं याविषयी पालकांनी आपल्या मुलांसी कसा संवाद साधावा याविषयी पालकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. याशिवाय याच वयात मुलं ही समाजात एकट्याने वावरण्यास सुरुवात करतात तेव्हा समाजात कसं वावरावं, सामाजिक प्रभाव, मोबाईलचा अतिवापर न करण्याविषयी तसंच जबाबदारीने मोबाईल वा सोशल मीडिया कसं वापरावं यासारख्या बाबींविषयी सुद्धा पालकांना आणि मुलांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. 

तर नववी – दहावी इयत्तेतील मुलांना अभ्यासाचा ताण, लक्ष विचलीत करणाऱ्यां गोष्टीवर कसं दुर्लक्ष करावं,  नातेसंबंध कसे ठेवायचे, सुरक्षा आणि करिअरची निवड व त्याविषयी आवश्यक ते मार्गदर्शन पालकांनी मुलांना कसं करावं याविषयी पालकांना शाळेकडून प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

FASTag Annual Pass: येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून आपल्याला एक नवीन FASTag-आधारित वार्षिक पास मिळणार आहे. यामुळे तुम्हाला आता टोल
Iran - Israel War : इराण आणि इस्रायल दरम्यान संघर्ष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने दोन्ही देशांतील भारतीय नागरिकांना
G - 7 Conference : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 16 - 17 जून 2025 रोजी होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ