रयतेला मुलाप्रमाणे जपणारे शिवछत्रपती …

वेध शिवकाळाचा : “राजा हा उपभोगशून्य स्वामी असतो, त्याने प्रजेची आपल्या पोटच्या मुलासारखी काळजी घ्यावी.. प्रजेचे हित सांभाळणे हेच राजाचे आद्य कर्तव्य आहे” असे आर्य चाणक्य यांनी दोन हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते. छत्रपती शिवराय अगदी असेच होते हे त्यांचा इतिहास अभ्यासताना, काळाच्या ओघात टिकून, आपल्यापर्यंत पोचलेली त्यांची पत्रे वाचताना जाणवत राहते. हा लेख अशाच एका पत्राच्या संदर्भाने..
[gspeech type=button]

“राजा हा उपभोगशून्य स्वामी असतो, त्याने प्रजेची आपल्या पोटच्या मुलासारखी काळजी घ्यावी.. प्रजेचे हित सांभाळणे हेच राजाचे आद्य कर्तव्य आहे” असे आर्य चाणक्य यांनी दोन हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते. छत्रपती शिवराय अगदी असेच होते हे त्यांचा इतिहास अभ्यासताना, काळाच्या ओघात टिकून, आपल्यापर्यंत पोचलेली त्यांची पत्रे वाचताना जाणवत राहते. हा लेख अशाच एका पत्राच्या संदर्भाने..

 शेतकऱ्यांना सुविधा पुरवण्यासाठी शेतसारा (करआकारणी)

शत्रूच्या सैन्याचा आपल्या रयतेला त्रास होऊ नये म्हणून शिवरायांनी जसे आपल्या संरक्षण सिद्धतेकडे लक्ष दिले. तसेच लक्ष इथले सर्वसामान्य लोक, शेतकरी, व्यापारी यांच्याकडे दिले. आपल्या राज्याचा विस्तार करणे, त्यासाठी नवा मुलुख नवे दुर्ग स्वराज्यात आणणे ही सारी धावपळ करत असताना, जे जे हाती आहे त्याची काटेकोर जपणूक करण्याकडेही शिवकाळात बारकाईने लक्ष दिले गेले. एक गड आसपासच्या किमान 20-25 मैल परिघावर लक्ष ठेऊन असायचा. या परिसराची सुरक्षा जशी पाहिली जाई. तसेच तिथल्या प्रजेच्या दैनंदिन जीवनाकडेही लक्ष पुरवले जाई. शेतकऱ्याला पाणी मिळावे म्हणून बांध बंधाऱ्याचे काम तर स्वराज्याच्या सुरुवातीपासून केले गेले. ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे बी –बियाणे नसे, शेतीसाठी अवजारे नसत, बैल जोडी नसे त्यांना सरकारातून हे सारे पुरवण्याची व्यवस्था होई. मात्र ती मोफत नसे. त्यासाठी ठराविक सारा नेमून दिला जाई.

वस्तूरुपानं सारा

शेतकऱ्याने अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणावी यासाठी प्रोत्साहन दिले जाई. शेतीचे उत्पन्न मिळाल्यावर त्यातून शेतसारा (कर) वसूल केला जाई. मात्र तो वसूल करताना त्याचे स्थैर्य डगमगू नये याचीही काळजी घेतली जाई. प्रसंगी वस्तुरूपाने सारा जमा करायला परवानगी असे. त्यामुळे कित्येकदा स्वतःहून शेतकरी गडावर येऊन मुदतीपूर्वी सारा जमा करून जात.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

गडावर हवालदार, तटरक्षक दल असे तसेच सबनीस, खजानीस, सुरनीस, न्यायाधीश आदि मंडळी असायची. गडाचे आणि परिसराचे संरक्षण, तिथल्या रयतेच्या भल्याची जबाबदारी त्यांच्यावर असे. त्यांच्याही ठराविक काळाने बदल्या केल्या जात. त्यामुळे कुठे भ्रष्टाचाराला थारा नसे. प्रसंगी कुणी गैरव्यवहार करताना आढळला तर त्याला त्वरित सजा होई.

हे ही वाचा : पहाडासारखे बळवंत कान्होजी जेधे !

युद्धजन्य परिस्थितीत मोफत धान्य

रयतेचे सुख जपण्याला कायमच प्राधान्य दिले जाई. शेतकऱ्याने घरात अधिक धान्य ठेवले तर शत्रूच्या हाती लागू शकते याची जाणीव ठेवत अधिकचे धान्य गडांवरील कोठारात जमा करून ठेवले जाई. ज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होई तेंव्हा आधीच जमा केलेले हे धान्य रयतेच्या कामी येत असे. अशावेळी सरकारतर्फे मोफत धान्य वितरण केले जाई. ज्या भागात युद्ध होण्याची शक्यता आहे तिथल्या रयतेला त्याची कल्पना दिली जाई. त्याप्रमाणे सारी सिद्धता केली जाई. यात कुणी कुचराई केली तर शिवराय संतापून जात असत.

सर्व अधिकाऱ्यांना लेखी सूचना आणि कामाचा आढावा

शासनव्यवस्थेतील पेशवे, सरनौबत, विविध सरदार, सुभेदार, शिलेदार हे आपापली कामे चोखपणे करताहेत का याकडे त्यांचे बारीक लक्ष असे. कित्येकदा लोकांना आधीच पत्र लिहून सगळ्या सूचना दिल्या जात. शिवरायांची ही पत्रे पाहिली की, त्यांच्या काटेकोर कडक प्रशासन कौशल्याचे आणि प्रजेप्रती असलेल्या मायाळू मनाचे सुखद दर्शन होत राहते. त्यांच्या पदरी असलेल्या सरदार कान्होजी जेथे यांच्याविषयी आपण मागील लेखात माहिती घेतली होती. त्यांचेच पुत्र होते बाजी उर्फ सर्जेराव जेधे. तेही सुरुवातीच्या लढाईपासून शिवरायांच्या सोबत असायचे. अत्यंत तडफदार शूर असणाऱ्या सर्जेराव यांना युद्धकाळात तर महत्वाची जबाबदारी दिली जात असेच पण त्यांना त्यांच्या प्रांतातील रयतेची काळजी घेण्यासाठी शिवराय पत्राद्वारे कशा सूचना देत हे देखील पाहण्यासारखे आहे.

शायिस्तेखानाच्या पुणे स्वारी दरम्यानचं पत्र

ज्यावेळी शाहिस्ताखान पुण्यात दाखल झाला होता त्या काळातील हे पत्र आहे. खानाच्या सैन्यातील विविध सरदारांनी पुणे परिसरातील विविध प्रांतात धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. रोहिडा किल्ल्याच्या परिसरातील रोहिडखोऱ्यावर जेधे यांची पकड होती. हा भाग पुण्यापासून जवळचा. त्यामुळे त्यांनी कशी काळजी घ्यावी हे सांगताना शिवराय आपल्या पत्रात जे लिहितात त्याचा मथितार्थ साधारण असा आहे;

“सध्या खानाचे सैन्य तुमच्या परगण्याकडे स्वारी करण्यास येईल अशी खबर हेरानी आणली आहे. तेंव्हा हे पत्र मिळताच त्वरेने आपण गावोगावी जाऊन आपल्या रयतेला ही खबर कळवावी. सर्व माणसे, लेकरे बाळे, गुरेढोरे याना घाटाखाली (म्हणजे कोकणात) सुरक्षित स्थळी हलवावे. जेथे शत्रूचा कोणताही उपद्रव होणार नाही अशा ठिकाणी ताबडतोब पाठवावे. या कामी कोणतीही हयगय करू नये. यात जर तुम्ही कुचराई केली तर मोगल ज्या लोकांना कैद करून नेतील त्यांचा सारा दोष तुमच्या माथी येईल हे ध्यानी ठेवावे. तरी त्वरेने तुम्ही गावोगावी हिंडावे, रात्रीचा दिवस करून घाटाखाली सुरक्षित जागा निवडोन तेथे माणसांना पाठवावे. यात जराही दिरंगाई होऊ देऊ नये. तुम्हीही गडकोट सांभाळून आपल्या जागी दक्ष राहणे. गावच्या वेशीवरील शेतवाडीचे रक्षण करणे. त्यासाठी जे लोक नामजद आहेत त्यांना हुषारीने राहण्यास सांगणे. गनिम येत आहे असे दिसताच त्यांनी शिताफीने त्या स्वारीची वाट चुकवून डोंगरावर पळून येण्यास सांगणे… या कामी कोणतीही दिरंगाई न करणे..तसे केल्यास मुलाहिजा बाळगला जाणार नाही..”

हे ही वाचा : एका स्वामिनिष्ठेचा सन्मान…

प्रजेची काळजी वाहणारा राजा

या पत्रात लहान मुलांना सांगावे तसे महाराज एकच मुद्दा वारंवार सांगत आहेत तो म्हणजे कामात कुचराई करू नका आणि रयतेला गनिमाकडून अजिबात त्रास होणार नाही याची काळजी घ्या..! हेरानी खबर आणल्यावर बहुदा महाराजांनी आपल्या चिटणीसाला बोलवून गडबडीने हे पत्र लिहायला सांगितले असावे कारण प्रजेचे हित सांभाळणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे शिवरायांना वाटत होते. आयुष्यभर धडपड करत असताना त्यांच्याकडून कधीही रयतेच्या सुखाकडे दुर्लक्ष झाले नाही ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहते. हा राजा आपला होता.. ज्या महाराष्ट्राच्या मातीत तो जन्माला होता तिथेच आपण जन्म घेतला आहे, या अभिमानाने ऊर भरून येतो..! त्यांच्याबद्दल कितीतरी वेळ बोलत राहावे असे वाटत राहते..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Vedh Shivkalacha : दुर्गबांधणीचे शास्त्र आपल्या देशाला फार प्राचीन काळापासून माहिती होतं. दुर्गाचे विविध प्रकार कोणते? याचा शिवकाळात देखील बारकाईने
National Milk Day : राष्ट्रीय दूध दिनानिमित्त भारतातल्या दुग्ध क्रांतीविषयक विशेष लेख.
Vedh Shivkalacha : कोणत्याही युद्धाचे यश हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ