छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेला महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा नक्षलवादाचा प्रमुख गड राहिल्याचं सांगितलं जायचं. इथला रक्तरंजित इतिहास देखील आपल्याला सांगण्यात येतो. 2009 ते 2014 या या सहा वर्षाच्या कालखंडात नक्षलवाद्यांनी 128 निर्दोष नागरिकांची हत्या केली. तर दुसरीकडे पोलिसांवरही 194 वेळा नक्षलवाद्यांनी हल्ले केले होते. त्यामध्ये जवळपास 100 जवान शहीद झाले. याला कठोर उत्तर देताना पोलिसांनी केलेल्या कारवाईत 61 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. मात्र हे सर्व घडत असताना बदलाचे वारेसुद्धा फिरत होते.
नक्षलवाद्यांकरता रिपोर्टिंग करणारा असीन
नक्षलवाद हा काही फायद्याचा नाही याची जाणीव या प्रवाहात काम करणाऱ्यांना होवू लागलेली. आणि याच दरम्यान नक्षलवाद्यांशी फारकत घेवून अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. आम्ही ज्यावेळी गडचिरोलीतील विविध भागात आत्मसमर्पण केलेल्या व्यक्तींना भेटत होतो. त्यावेळी आम्हाला एक असा तरुण भेटला की ज्याच्याकडे पाहिल्यानंतर कधीकाळी नक्षलवादी हा नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी होता. यावर विश्वासच बसला नाही. कारण त्याचे राहणीमान अगदी सुशिक्षित मुलासारखं, बोलणं अस्सल हिंदी… हा नक्षलवादी प्रवाहात कसा गेला हाच पहिला प्रश्न असीनकडे पाहिल्यानंतर आम्हाला पडला. असीन राजाराम म्हणजेच अनिल हा नक्षलवाद्यांसाठी रिपोर्टिंग करत होता. त्याच्याशी बोलल्यानंतर आम्हाला त्याने असं काही सांगितलं जे ऐकून आम्हाला धक्काच बसला.
हे ही वाचा : गडचिरोलीला नक्षली विळख्यातून बाहेर काढणारे सी 60 कंमाडो
जल, जंगल, जमीनीच्या नावाखाली तरुणांना जाळ्यात
जल जंगल जमीन वाचवण्याचं सांगत गरीब आणि असहाय्य स्थानिक आदिवासींनाच नाही, तर दुसऱ्या राज्यातील युवकांनाही माओवादी आपल्या जाळ्यात ओढत होते. हरियाणातल्या जीद इथं राहणाऱ्या असीनही या जाळ्यात असाच अलगद अडकला होता.
असीनच्या लेखन कौशल्याचा वापर नक्षलवादी साहित्याकरता
असीन विदयार्थी दशेत असताना पीपल्स वॉर गृपला जोडला गेला. त्यावेळी त्याच्यावर नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यात प्रचाराची जबाबदारी देण्यात आली. असीन उत्तम लेखन करत होता. कथा लिहणे, आर्टिकल लिहिणे त्याला चांगले जमत होतं. याचाच वापर करत नक्षलवाद्यांनी त्याला प्रभात प्रेसमध्ये काम करण्यास सांगितले. असीनने नक्षलवादी चालवत असलेल्या प्रभात प्रेसमध्ये 2006 ते 2011 काम केले. 2011 ते 2013 गडचिरोलीत त्याला मिलिट्री विंगच्या ट्रेनिंग साठी पाठवण्यात आले. 2013 ते 18 या दरम्यान उडीसा मध्ये त्याच्यावर जनसंग्राम प्रेस ची जबाबदारी सोपवण्यात आली. एकूण 12 वर्ष अनीस नक्षलवाद्यांसोबत काम करत राहिला.
हे ही वाचा : गडचिरोली सिव्हिक एक्शन प्रोग्राम
मुख्य प्रवाहात राहूनच आदिवासींचा विकास याची जाणीव
बारा वर्ष नक्षलवादी विचारांबरोबर काम करत राहिल्यानंतर असीनला वेगवेगळे प्रश्न पडू लागले. त्याला सिद्धांत आणि वास्तविकता काय आहे. याच्या मधला फरक जाणवू लागला. त्याच्या लक्षात आलं की, ज्या आदिवासींवर अन्याय होतोय म्हणून आपण लढा हातात घेत नक्षलवाद प्रवाहात आलो. त्याच आदिवासींना या नक्षलवादामुळे मरण येऊ लागलंय, सोबतच अनेक प्रवाहामध्ये या नक्षलवादाचा दुष्परिणाम होत असल्याचं त्याच्या लक्षात आले. काही काळ या नक्षलवाद्यांसोबत काम केल्यानंतर असीनला वास्तवाची जाणीव झाली आणि म्हणूनच आता तो सांगतोय मुख्य प्रवाहात राहूनच आदिवासींचा विकास केला जाऊ शकतो.
आज असीन सामान्य आयुष्य जगण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे.