ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाचा वाटा, सहभाग असलेल्या गोष्टींची यादी केली तर, त्यात ठाण्यातील शिक्षण संस्थांचे नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. ठाण्यातल्या अनेक शाळा आणि शिक्षण संस्था स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झाल्या आहेत. त्यामुळे त्या काळातील राष्ट्रीय विचारांचा आणि स्वातंत्र्य आंदोलनाच्या वातावरणाचा प्रभाव या शाळांवर असणं स्वाभाविकच होतं. मात्र ठाणे शहराच्या अभिमानास्पद शैक्षणिक परंपरेचा पाया रचण्याचे श्रेय जातं ते ब्रिटिशांनी तब्बल 204 वर्षांपूर्वी ठाण्यात सुरू केलेल्या सरकारी इंग्रजी शाळेला. तेव्हा ब्रिटिशांनी ठाणे शहर आणि जिल्ह्याचा कारभार पाहायला नुकतीच सुरवात केली होती.
1821 मध्ये इंग्रजी शाळेला सुरुवात
ठाणे शहरात पहिली औपचारीक शाळा सुरू झाली ती 1817 मध्ये. मुंबईच्या बॉम्बे एज्युकेशन सोसायटीतर्फे ही शाळा ठाण्यात चालवली जात होती. ठाण्यातल्या ब्रिटिश सैनिकांच्या मुलांसाठी ही शाळा प्रामुख्याने सुरू करण्यात आली होती. या शाळेत 1818 मध्ये 20 ख्रिश्चन आणि 24 स्थानिक ( ख्रिश्चन नसलेले ) विद्यार्थी शिकत होते. मात्र ही शाळा योग्य शिक्षकांच्या अभावी बंद पडली. नंतर सेव्हिल मॅरिएट याने नॉर्थ कोकण जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून काम पाहायला सुरवात केली. तेंव्हा त्याने मुंबईच्या गव्हर्नरला एक अहवाल सादर करुन जिल्ह्या–जिल्ह्यात कशा प्रकारे शाळा सुरू कराव्यात, त्यात कोणते विषय असावेत आणि त्यासाठी शिक्षकांना किती पगार द्यावा याच्या सूचना केल्या. त्याचवेळी ठाण्यातील प्रतिष्ठित गृहस्थांनीही मुंबई सरकारकडे अर्ज करुन ठाण्यात कायमस्वरूपी शाळा सुरू करण्याची मागणी केली. यामुळेच 1821 मध्ये ठाण्यात सरकारी इंग्रजी शाळा सुरू झाली. तेंव्हा या शाळेचं नाव होतं ‘ठाणा इंग्लिश स्कूल’.
1849 मध्ये विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येनं शाळा बंद
याच शाळेनं ठाण्यातील काही पिढ्यांना घडवलं, शहाणं केलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवायला सक्षम केलं. ठाणे इंग्लिश स्कूल सुरू झालं तेंव्हा शाळेची जबाबदारी ‘नानाभाई मोरोजी’यांच्याकडे सोपवण्यात आली होती आणि त्यांना दर महा रुपये 100 पगार मिळत असे. पुढे या शाळेचा प्रमुख म्हणून रेव्हरंड फ्लेचर यांनी काम पाहिले. नंतर रामचंद्र बाळकृष्ण जयकर यांच्याकडे शाळेची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांची घटती संख्या ही त्या काळातली मोठीच समस्या होऊन बसली होती. त्यामुळे 1849 च्या जुलै महिन्यात सरकारनं शाळा बंदच केली.
हेही वाचा: ठाण्याची ओळख – मासुंदाची तलावपाळी
1880 मध्ये बैरामजी जीजीभाईंकडून पाच हजार रुपये
पुढे ठाण्याला ‘की ’ नावाचे न्यायमूर्ती आले, त्यांच्या पुढाकाराने आणि ठाण्यातल्या नागरिकांच्या सहभागाने 8 सप्टेंबर 1851 मध्ये जहांगीर होर्मुसजी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शाळा सुरू झाली ती 90 विद्यार्थ्यांसह.1879 मध्ये या शाळेतून पहिली मॅट्रीकची तुकडी परिक्षेला पाठवण्यात आली, त्यात 8 विद्यार्थ्यांचा समावेश होता, त्यातले पाच जणच मॅट्रिक होऊ शकले.1880 मध्ये शाळेचं भाग्य पालटलं. मुंबईतील धनवान पारशी कुटुंबातील शेठ बैरामजी जीजीभाई यांच्या ट्रस्टकडून शाळेला पाच हजार रुपयांची मोठी देणगी मिळाली आणि त्यातून शाळेची स्वतःची इमारत उभी राहिली. त्यानंतर ही शाळा बैरामजी जिजिभाई यांच्याच नावाने म्हणजेच बी.जे.हायस्कूल म्हणून ओळखली जाऊ लागली.
1951 पासून मुलींना प्रवेश
1890 मध्ये बी.जे.हायस्कूलचा विद्यार्थी एम.जी.डोंगरे मॅट्रीकच्या परिक्षेत मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम आला ( तेव्हा मॅट्रीकची परिक्षा विद्यापीठातर्फे घेतली जात असे). त्यानंतरच्या काळात 1917 मध्ये एस.व्ही.देशपांडे हा बी.जे.चा विद्यार्थी मॅट्रीकमध्ये सर्वप्रथम आला.1951 पूर्वी बी.जे.मध्ये मुलींना शिकण्यासाठी प्रवेश दिला जात नसे. नंतर मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. लीला गुप्ते (रणदिवे) ही बी.जे.हायस्कूलची पहिली विद्यार्थीनी होती. नंतरच्या काळातील बी.जे.च्या विद्यार्थीनींमध्ये चंपूताई मोकल (आधी गव्हर्न्मेंट गर्ल्स स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि नंतर ठाण्याच्या पहिल्या महिला आमदार), ताराबाई शाळीग्राम (लेखिका) अशी काही मोजकी नावे सांगता येतात. बी.जे.हायस्कूलने घडवलेल्या विद्यार्थ्यांची यादी मात्र बरीच मोठी आहे.
हेही वाचा: ठाणे – एक समृध्द बंदर !
शाळेतून घडले अनेक नामवंत
महाराष्ट्र सारस्वतकार वि.ल.भावे, नगराध्यक्ष वामनराव रेगे, कॉम्रेड बाबूराव फडके, कायदेपंडीत माधवराव हेगडे, कृष्ण स्टोअर्सचे छबुनाना जोशी, ठाण्याचा इतिहास लिहिणारे दा.बा.देवल, ठाणे जिल्ह्याचे सार्वजनिक काका गजाननराव नाईक, रत्नमालाकार भास्कर दामोदर पाळंदे, ठाण्याचे पहिले मंत्री सर गोविंदराव प्रधान, ठाण्याचे थिऑसॉफिस्ट रा.स,भागवत, कुस्तिगीर संघटक यशवंतराव ठाणेकर, स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणे हे सगळे बी.जे.हायस्कूलच्याच मुशीत घडले. बी.जे.हायस्कूलच्या गौरवशाली परंपरेत तिथल्या शिक्षकांचा वाटा अर्थातच सर्वात महत्वाचा आणि मोठा. या शाळेचा दबदबा निर्माण करणाऱ्या शिक्षकांमध्ये जनार्दन बाळाजी मोडक, दि.ह.लिमये, नारायणराव फडके, के.के.काळे, केळकर, सुर्वे, मंत्री अशा अनेक शिक्षकांचा उल्लेख करता येईल.
स्वातंत्र्योत्तर काळात ठाणे शहरात अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आणि विस्तारत जाणाऱ्या ठाण्यातील नागरिक आपल्या जवळच्या शाळेत पाल्यांना दाखल करू लागले. त्यामुळे बी.जे.हायस्कूलचा प्रभाव ओसरू लागला. या काळात विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख करण्यासाठी बी.जे.मध्ये कमर्शिअल विषय जसे टायपिंग वगैरे शिकवण्याचे प्रयत्नही करुन झाले. मात्र काळाच्या ओघात आपल्या नावाची तेजस्वी प्रभावळ सांभाळत असलेली ही शाळा जणू बाजूला पडली. नंतर अनेक वर्षे हिच्या इमारतीचे नुतनीकरण लांबले. आता मात्र बी.जे.हायस्कूलची नवी इमारत जुन्याच जागेवर, टेंभीनाक्यावर डौलात उभी राहिली आहे. या शाळेनं ठाण्याच्या शैक्षणिक मंदिराची पायाभरणी केली. त्यामुळे एका अर्थाने ही ठाण्यातील शिक्षणाची गंगोत्री ठरते.
4 Comments
ठाण्या वरच्या प्रेमामुळे तुझे ठाणे आख्यान भावून जात. बी जे हाय स्कूल मधे पूर्वी फायनल च्या परीक्षा व्हायच्या. माझा नंबर त्या शाळेत आला होता म्हणून अजून जवळची. शाळेच्या बाजूला खूप आंब्याची झाडे होती आणि शिसवी मोठे बाक हे आठवणीतील
खूप भारी लिहिता मकरंद सर !!
खूपच छान माहिती. अतिशय माहितीपूर्ण लेख.
मकरंद,
तुझ्या लिखाणाने जवळपासच्या अनेक गोष्टींची, स्थानांची, वास्तूंची नव्यांर अधिक माहिती मिळते.
तुझं हे लिखाण चौफेर यात्रा घडवत असते.
आभार.