‘हिरो’ किंवा नयनतारा सारखी ‘लेडी सुपरस्टार हिरोईन’ हे सिनेमाला ड्राईव्ह करत असतात, तेच सिनेमाला बंपर ओपनिंग मिळवून देत असतात हे बघत आपण लहानाचे मोठे झालो आहोत. प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचण्यासाठी सुद्धा एक चेहरा हवा असतो, ही थेअरी पूर्वापार चालत आली आहे. मोठा स्टार, मोठी नावं हे सिनेमाच्या यशाचे अर्धे मानकरी मानले जातात आणि म्हणूनच मागील काही वर्षांपासून प्रमुख कलाकार हे मानधन न घेता प्रॉफिट शेअरिंगवर काम करत असल्याचं ऐकिवात आहे.
कथा हीच यशस्वी सिनेमाची गुरूकिल्ली
दक्षिण भारतात तर तिथल्या कित्येक कलाकारांची मंदिरं आहेत. या कलाकारांचा सिनेमा प्रदर्शित होणार असला की, त्यांच्या सिनेमाच्या पोस्टर्सला दुधाने अभिषेकदेखील करतात. खरंच, एखादा सिनेमा यशस्वी होण्यासाठी मोठा कलाकार त्यामध्ये असण्याची इतकी गरज असते का ? बॉलीवूडमधली ही गरज आता संपली आहे असं आपण म्हणू शकतो. आज ज्या सिनेमाची कथा तुम्हाला सिनेमांत गुंतवून ठेवणारी आहे तो सिनेमा केवळ हिट होतो. मोठ्या पडद्यावर सलमान आहे की राजकुमार राव याने प्रेक्षकांना काही एक फरक पडत नाही. आश्चर्य म्हणजे हा ट्रेंड आजचा नसून खूप आधीपासून सुरू आहे.
आशिकीची जादू
1990 मध्ये प्रदर्शित झालेला, महेश भट यांचं दिगदर्शन असलेला ‘आशिकी’ हा त्या हिंदी सिनेमाच्या रोमँटिक दशकातील पहिला सुपरहिट सिनेमा होता. राहुल रॉय आणि अनु अग्रवाल या दोन्ही नवख्या चेहऱ्यांना घेऊन निर्माता महेश भट यांनी केवळ 40 लाख रुपयात हा सिनेमा तयार केला होता. ‘आशिकी’ची गाणी इतकी लोकप्रिय झाली की, ती आजही सर्वाधिक विकल्या गेलेल्या कॅसेट्सपैकी एक आहे. ‘आशिकी’ चे बरेच नायक होते. नदीम-श्रवण यांचं संगीत, कुमार सानू यांच्या आवाजातील गाणी ही या सिनेमाला रातोरात हिट करणारी ठरली. साधी प्रेमकथा ज्यामध्ये दर पंधरा मिनिटांनी एक गाणं सुरू होतं असा सिनेमा सुद्धा हिट केला जाऊ शकतो हा ट्रेंड या सिनेमाद्वारे महेश भट यांनी सेट केला होता.
हेही वाचा – कोरियन सिरीज, सिनेमा इतके लोकप्रिय का होत आहेत ?
मुख्य कलाकारांकरता डबिंग आर्टिस्ट वापरुनही सिनेमा यशस्वी
‘राज’ हा 2002 मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा सुद्धा या कॅटेगरीमध्ये येतो. दिनो मोरियो, बिपाशा बसू ही नावं या सिनेमा आधी कोणालाच माहिती नव्हती. या दोन्ही कलाकारांचं करियर हे या सिनेमामुळे सुरू झालं. या दोन्ही प्रमुख कलाकारांचे हिंदीचे उच्चार हे बरोबर नसल्याने त्यांच्यासाठी डबिंग आर्टिस्टचे आवाज वापरण्यात आले होते. 5 कोटीच्या बजेट मध्ये तयार झालेला हा सिनेमा 37 कोटींची कमाई करून त्यावर्षीचा ‘ब्लॉकबस्टर’ ठरला तेव्हा सर्व समीक्षक हे अवाक झाले होते. विक्रम भट्ट यांच्या दिगदर्शन असलेल्या या सिनेमाच्या यशाचं श्रेय हे संगीतकार नदीम श्रवण यांना देखील दिलं जातं. या सिनेमातील “आप के प्यार मे…” या गाण्यासाठी समीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार आणि अलका याग्निक यांना सर्वोत्कृष्ट गायिकेच्या त्या काळात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘खोसला का घोसला’
2006 मध्ये ‘खोसला का घोसला’ नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. दिबाकर बॅनर्जी यांचं दिगदर्शन असलेल्या या सिनेमात अनुपम खेर, बोमन इराणी, विनय पाठक आणि रणवीर शौरी हे चार कलाकार होते. बंपर ओपनिंग मिळवून देण्यासाठी यापैकी कोणीही त्या काळात सक्षम नव्हतं. पण, तरीही केवळ कथानक आणि सादरीकरणाच्या जोरावर या 4 कोटीचं बजेट असलेल्या सिनेमाने जवळपास 7 कोटी इतकी बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. काही गुंडांनी बळकावलेली आपली जमीन मुक्त करण्यासाठी संघर्ष कराव्या लागणाऱ्या एका कुटुंबाची ही कथा आहे. सिनेमातील प्रमुख कलाकार अनुपम खेर आणि बोमन इराणी यांनी आपल्या अभिनयाने हा हलका फुलका विनोदी सिनेमा सजवला आहे. या सिनेमातील “तुम, ब्रोकर हो या पार्टी ?” हा संवाद खूप लोकप्रिय झाला होता. या सिनेमाच्या निर्मात्यांना देखील सुखद धक्का बसला असणार जेव्हा या सिनेमाला त्या वर्षीचा ‘सर्वोत्कृष्ट सिनेमा’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
हेही वाचा – जुन्या सिनेमांच्या री-रिलीजची जादू
फ्रेंच सिनेमावर आधारित भेजा फ्राय
विनय पाठक यांचं नाव सिनेमा बघणाऱ्या सर्वांनाच परिचित आहे. ‘भेजा फ्राय’ या 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या पहिल्या सिनेमाने त्यांची ओळख निर्माण केली होती. या सिनेमामध्ये विनय पाठक आणि रजत कपूर हे दोन जण एका खोलीत गप्पा मारत असतात आणि विनय हे आपल्या अनाकलनीय गप्पांनी रजत यांचं डोकं अक्षरशः पकवत असतात. 95 मिनिटांच्या या सिनेमाचं बजेट हे 1.5 कोटी इतकं होतं आणि सिनेमाने केलेली कमाई ही 12.5 कोटी इतकी होती. विनोदी अंगाने सादर केलेल्या सिनेमाची निर्मिती सुनील दोशी यांनी केली होती. सागर बल्लारी यांचं दिगदर्शन असलेल्या या सिनेमाची प्रेरणा ही 1998 च्या एका फ्रेंच सिनेमाकडून घेण्यात आली होती.
प्रॅक्टिकल कथांना जास्त यश
2011 मध्ये प्रदर्शित झालेला, लव रंजन यांचं दिगदर्शन असलेला ‘प्यार का पंचनामा’ या सिनेमाचं यश सुद्धा सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं होतं. कार्तिक आर्यन, नुशरत भारुचा या आज ओळख निर्माण झालेल्या कलाकारांचा हा पहिला सिनेमा होता. तीन तरुणांच्या प्रेमाची ही कथा ही नव्या पिढीचा ‘प्रेमाकडे प्रॅक्टिकली बघण्याचा दृष्टिकोन’ म्हणून प्रेक्षक, समीक्षकांनी स्वीकारला होता. 3 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने 18 कोटी इतकी कमाई करत त्या वर्षीचा कोणताही स्टार नसतांना झालेला सुपरहिट सिनेमा म्हणून गाजला होता.
2012 मध्ये प्रदर्शित झालेला, आयुष्मान खुराणा आणि यामी गौतम या दोघांचा पहिला सिनेमा ‘विकी डोनर’चं यश सुद्धा कोणत्याही समीक्षकाने प्रेडिक्ट केलं नव्हतं. सुजित सरकार यांचं दिगदर्शन असलेला हा सिनेमा ‘स्पर्म डोनेशन’ सारख्या इतकी वर्ष कधीही मोठ्या पडद्यावर न आलेल्या विषयावर भाष्य करणारा होता. या संवेदनशील विषयाला दिगदर्शकाने हलक्या फुलक्या पद्धतीने एक रोमँटिक कॉमेडी म्हणून सादर केलं. 4 कोटींच्या बजेट मध्ये तयार झालेल्या या सिनेमाने 68 कोटींची कमाई करत हे परत सिद्ध केलं की, सिनेमा यशस्वी होण्यासाठी वेगळ्या विषयाची किंवा सुमधुर गाण्यांची गरज असते केवळ प्रसिद्ध कलाकारांची नाही.