गावातील बहुतांश लोक हे धार्मिक वृत्तीचे असतात. देव, देवळे, भजन, कीर्तन, तीर्थयात्रा यासाठी वेळ आणि पैसा खर्च करण्यास ते मागेपुढे बघत नाहीत. गावकऱ्यांच्या याच धार्मिक प्रवृत्तीला स्पर्श करून जर विकासकामांमध्ये त्यांचा सहभाग घेतला, तर विकासाची वाट प्रभावीपणे विस्तारत जाते असा अनुभव आहे. व्यक्तीच्या कार्यामागे अध्यात्मिक बैठक असेल, तर त्या कार्यात आपसूक तन-मन आणि धन देखील ओतले जाते. ‘सत्संग’ हा अध्यात्म, धार्मिकतेशी जवळीकता निर्माण करणारा शब्द. खरे पाहता, सत्संग म्हणजे सत्याची जाणीव झालेल्या व्यक्तींचा सहवास. यालाच समोर ठेवून आम्ही काही गावात ‘ऋषी आणि कृषी सत्संग’ हा एक प्रयोग करीत असतो.
ऋषी सत्संग
आपल्या पारंपरिक कल्पनेतील ऋषी म्हणजे पांढरी शुभ्र दाढी असलेली, सर्वसंग परित्याग केलेली, निर्मोही, साधूवृत्तीची व्यक्ती. पण याठिकाणी अभिप्रेत असलेली संकल्पना जरा भिन्न आहे. इथे ‘ऋषी’ म्हणजे एखाद्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारी, समर्पित वृत्तीने समाज विकासासाठी झटणारी व्यक्ती. अशा व्यक्तींच्या सहवासात काही वेळ घालवणे, त्यांच्या समृद्ध अनुभवातून शिकणे, आपले प्रश्न जाणून घेत त्याची सोडवणूक करणे, वरिष्ठांचे मार्गदर्शन आत्मसात करून स्वतःचा मार्ग निश्चित करणे हाच ‘ऋषी सत्संग’.
सामाजिक कृतीचा सत्संग
आपल्या कृतीला प्रेरणा देण्यासाठी विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वांसाठी हा सत्संग उपयुक्त असतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या माध्यमातून यशस्वी झालेले अधिकारी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, पोलीस निरीक्षक, तहसीलदार, बँक अधिकारी किंवा सैनिक हे सुद्धा ‘ऋषी’ ठरू शकतात. त्यामुळे असा ऋषी सत्संग आयोजित करण्यासाठी ग्रामपंचायत वा गावातील युवक मंडळाने पुढाकार घ्यावा. त्यात अशा यशस्वी व्यक्तींना गावी आमंत्रित करावे. त्यांच्या यशस्वी ठरण्यामागील यशोगाथा, मेहनत, प्रेरणा यावर त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. असा सहवास आणि मार्गदर्शन गावातील तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
अध्यात्मिक सत्संगाला सामाजिक विकासाची जोड
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भागवत नाम सप्ताह आयोजित करण्यात येतो. त्यात महाराजांच्या भजन, कीर्तन, प्रवचन यांना प्राधान्य दिले जाते. गावकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच न लागू देता भागवत सप्ताहातील दुपारच्या सत्रात गावात असे “ऋषी” व “कृषी ” सत्संग गावातील तरुणांनी घडवून आणावे. त्यात सप्ताहातील सात दिवसात अलग अलग कार्यक्रमांतर्गत कधी गट विकास अधिकारी, कधी बँकेचे अधिकारी, कधी तहसीलदार, कधी उत्कृष्ट शेतकरी, कधी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यांना एक तास आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन या सप्ताहात आयोजित केल्यास त्यातून गावाचा प्रतिसाद मिळत बऱ्याच गोष्टी साध्य होतात.
पूर्वी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने राबविलेले ग्रामस्वच्छता अभियान आपल्या राज्यात लोकसहभाग मिळवत कमालीचे यशस्वी झाले हे आपण अनुभवले. हा चमत्कार त्या अभियानाला दिलेल्या दोन संतांच्या नावामुळे झाला हे निर्विवाद सत्य आहे. तोच भाव ‘ऋषी आणि कृषी सत्संग’ यातून साधला जाऊ शकतो.
हेही वाचा – ग्राम पंचायत अंदाजपत्रक
कृषी सत्संग संकल्पना
आपल्या गावामध्ये सामाजिक व कृषी विकासासाठी आपण एक प्रभावी उपक्रम सुरू करू शकतो.
1. कृषी सत्संग मंचाची स्थापना:
गावात कृषी सत्संग मंचाची स्थापना करून गावातील अनुभवी शेतकरी, नवीन शेतकरी, कृषी विद्यार्थी, स्थानिक कृषी अधिकारी व तज्ज्ञ यांना एकत्र आणून या माध्यमातून मासिक बैठकांचे आयोजन करता येईल.
या मंचाचे उद्दिष्ट ज्ञानाची देवाण-घेवाण, पारंपरिक व आधुनिक शेती पद्धतींचा अनुभव शेअर करणे व समस्यांवर चर्चा करणे हे असेल.
2. ‘सत्संग’ स्वरूपाचे संवाद सत्र:
पारंपरिक ‘सत्संग’च्या धर्तीवर प्रेरणादायी आणि विषयाधिष्ठित चर्चा घडून आणता येईल – जसे की शेतीत नाविन्य, नैसर्गिक शेती, पाणी व्यवस्थापन, बाजारपेठेतील संधी इ.
प्रत्येक सत्रात एक विशिष्ट विषय ठरवून त्यावर अनुभवसिद्ध बोलणारे किंवा कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन ठेवावे.
हेही वाचा – जिवंत सातबारा मोहीम
- ग्रामीण संवाद अभियान:
या कार्याच्या विस्तारासाठी शेजारील गावांमध्ये ‘कृषी सत्संग’ संकल्पनेच्या प्रसारासाठी जागरूकता मोहीम राबवता येईल.
शेतकऱ्यांच्या गटात चर्चा, समूह भेटी, शिवार फेरी (field visit) घेऊन प्रत्यक्ष अनुभवांचे आदान प्रदान करता येईल.
- यशोगाथा व अनुभव नोंदवही:
शेतकऱ्यांनी शेअर केलेले अनुभव, प्रयोग व यशस्वी गोष्टी लेखी स्वरूपात जमा करून हे अनुभव मासिक बुलेटिन, ब्लॉग, सोशल मीडिया किंवा स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करता येईल.
- युवक व महिलांचा सहभाग:
कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि गावातील युवक, महिला बचतगट यांचा सहभाग घेता येईल.
युवांसाठी कृषी आधारित स्टार्टअप, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, प्रक्रिया उद्योग यावर कार्यशाळा आयोजित कराव्यात.
- कृषी मार्गदर्शन व मदतीसाठी हेल्पलाइन:
मंचात सहभागी तज्ज्ञांच्या मदतीने एक माहिती सेवा सुरू करता येईल– जसे फोन, व्हॉट्सॲप गट, किंवा हेल्पलाइन.
- प्रशासन व कृषी विभागाशी समन्वय:
जिल्हा कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्रे (KVK), आणि पंचायत राज संस्थांशी सहकार्य करून अधिक शासकीय लाभ मिळवता येतो.
गावी अशा प्रकारे उपक्रम सुरू करून कृतिशील काही चांगले निर्माण करता येते. कृतीशील अध्यात्म्याचा अशाप्रकारे वापर करून गावकऱ्यांचा पर्यायी गावाचा विकास साधता येईल.
2 Comments
Sabale sir Apale Techanical knowladge He Culteral Ahe
धन्यवाद