हिंदू पंचांगानुसार चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी आहे. या काळात भगवान विष्णू आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे तब्बल चार महिन्यांच्या काळात निद्रासनात जातात. ते क्षीरसागरात योगनिद्रा करण्यासाठी जातात आणि या काळात संपूर्ण विश्वाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही भगवान शंकराकडे सोपवतात, अशी लोकांची धारणा आहे. पंढरपुरातील चातुर्मास म्हणजे अनेक मठांमधून चाललेले ग्रंथपठण, किर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम सुरू असतात. परगावहून या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी अनेक आबालवृद्ध भाविक या चार महिन्यात पंढरपूरला वास्तव्य करून असतात.
5 ते 6 हजार युवक भागवत संप्रदायाच्या अभ्यासाकरता
येथे येणाऱ्या लोकांचे प्राधान्यक्रम त्यांच्या वयानुसार बदलतात. ज्येष्ठ मंडळी ही परमार्थिक समाधानासाठी असलेले विविध कार्यक्रम पाहतात, ऐकतात. तर तरुण मुले विशेषतः वारकरी संप्रदायातील मुले ही ज्ञानार्जन करून आपले अनुभवविश्व समृद्ध करण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या तरुण मुलांची संख्या पाच ते सहा हजाराच्या घरात असते. या मुलांना संस्कृत व्याकरण, भागवत संप्रदायातील सर्व महत्त्वाचे ग्रंथ, गायन-वादन या सर्व विषयात रस असतो. आपल्या आवडीनुसार विविध ठिकाणी जाऊन ही मुले शिकतात.
विद्यार्थ्यांचा चातुर्मासातील दिनक्रम
पहाटे साडेतीनच्या सुमाराला उठतात. देवळातील काकड्याला जातात. काकडा संपल्यानंतर चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा करेपर्यंत सहा वाजतात. सहा ते सात या कालावधीत गानसेवा होते. सात ते आठ न्याहरी. आठ ते नऊ शिवचरित्र श्रवण. साडेनऊ ते साडेदहा चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची तुकाराम गाथा ऐकणे. याचवेळी पंढरपुरात इतर काही ठिकाणी ज्ञानेश्वरीदेखील सांगितली जाते. आपल्याला जसा रस असेल त्याप्रमाणे ही मुले त्याचेही श्रवण करतात. अकराच्या सुमाराला माधुकरी मागणे आणि दुपारी थोडा वेळ विश्रांती घेणे. दुपारी दोन वाजता संस्कृत व्याकरण अध्ययन, विविध ग्रंथ पठण, तालवाद्यांचा अभ्यास, गायनाचा रियाज इत्यादी गोष्टी चालतात. संध्याकाळी मुले धूपारतीला जातात. सात नंतर चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या ज्ञानेश्वरी श्रवणासाठी बसतात. रात्री मधुकरी मागून दहाच्या सुमाराला दिनक्रम संपतो. मधल्या कालावधीत व्यक्तिगत अभ्यास टिपण काढणे आदि गोष्टी होतात. चार महिने अशाप्रकारे भरगच्च कार्यक्रम असतो.
भागवत सांप्रदायासोबत शिवरायांची ओळख
या सर्व पारंपरीक गोष्टींना एका महत्त्वाच्या ऐतिहासिक गोष्टीची जोड देण्याचे महत्त्वाचे काम पंढरपुरातील ज्येष्ठ शिवप्रेमी अनिल बडवे यांनी केले. भागवत धर्म परंपरेबरोबरच या मुलांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास माहीत व्हायला हवा असे अनिल बडवे यांना प्रकर्षाने वाटत होते. त्यासाठी त्यांनी स्वतः चातुर्मासात शिवचरित्र पारायण करण्याचा एक अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम 2000 साली सुरू केला. आता या उपक्रमाची धुरा त्यांचे चिरंजीव विधिज्ञ आशुतोष बडवे चालवीत आहेत.
किर्तनात शिवचरित्राचाही समावेश
चातुर्मासात हा उपक्रम अनिल बडवे यांनी सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात श्रोत्यांची संख्या तीन ते चार असायची. सुरुवातीला या उपक्रमासाठी मारुती बुवा तुणतुणे, बाबुराव वाघ, कानशिवणीकर या कीर्तनकारांनी मनापासून सहकार्य केले आणि ते स्वतः चार महिने चरित्र ऐकायला उपस्थित राहिले. अनिल बडवेंची अपेक्षा फक्त एकच होती. तुम्ही चार महिने जे ऐकणार आहात, ते तुमच्या कीर्तन प्रवचनात जरूर वापरा. कमीत कमी दहा मिनिटे तरी श्री शिवाजी महाराजांच्या बद्दल बोला. याबद्दलचा एक किस्सा ऐकण्यासारखा आहे. संजय मामा पाचपोर हे विदर्भातील एक ख्यातनाम कीर्तनकार आहेत ते भागवत आणि रामायण यावर उत्तम प्रतिपादन करतात. एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी सुरुवातीचा अर्धा तास शिवाजी महाराजांवर माहिती दिली. ही माहिती ऐकून सायंकाळच्या सत्रात गावकऱ्यांनी त्यांना रोज कमीत कमी एक तास महाराजांचे चरित्र आम्हाला ऐकायचे आहे असे सांगितले. समाज मनावर शिवचरित्राचे भारुड कसे आहे त्याचे हे प्रतिनिधिक उदाहरण.
दसरा ते दिवाळी दरम्यान शिवस्थळांना भेट
शिवचरित्र म्हणजे राष्ट्रोन्नती, समाजोन्नती आणि आत्मोन्नती. अनिल बडवेंचा अजून एक आगळावेगळा उपक्रम असतो दसरा दिवाळी ते शिवचरित्रातील महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्यासाठी पंढरपुरातील तरुणाईला घेऊन जातात. या भेटीमध्ये चातुर्मासातील त्यांचे हे विद्यार्थी देखील असतात. या सहलीत सर्वजण आपापली शिदोरी सोबत घेऊन येतात. सार्वजनिक स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळतात. आपला कचरा आपल्या सोबत आणलेल्या पिशव्यात जमा करतात. पहिले पाणी संपेपर्यंत दुसरे पाणी भरले जात नाही. किल्ला दाखवल्यानंतर अनिल बडवे या मुलांना विचारतात माझी दक्षिणा कुठे आहे ? मुले गोंधळात पडतात. त्यावर हसत बडवे काका म्हणतात “आजपासून तुमची गुरुदक्षिणा म्हणजे, तुमच्या प्रतिपादनात शिवचरित्राचा आवर्जून उल्लेख तुम्ही कराल. गडकिल्ल्यांना भेटी द्याल आणि महाराजांचे शौर्य पाहून तुमच्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा व उर्मी निर्माण होईल.” आजपर्यंत अशा पद्धतीने अनिल बडवे यांनी सुमारे एक हजार मुलांना शिवचरित्रामृत पाजले आहे. यातील 25 ते 30 मुले स्वतंत्रपणाने शिवचरित्र कथन करतात.
कोजागिरीला गडकिल्ल्यांची सहल
या मुलांसाठी दर कोजागिरी पौर्णिमेला रायगड, विशालगड प्रतापगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजापूर, बदामी इत्यादी ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी सहल आयोजित केली जाते. यावेळी या तरुण मुलांना कमीत कमी पाच मिनिटे स्वतंत्रपणे शिवचरित्र आधारित आख्यान सांगावे लागते. यावेळी ही मुले “मी यापुढे शिवचरित्र सांगीन” अशी प्रतिज्ञा करतात.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी
ही मुले सधन घरातील नाहीत. काही वेळेला त्यांच्यापुढे अभ्यासासाठी वही, पेन देखील नसते. ही मुले गरीब असल्याने चार महिने त्यांचा उदरनिर्वाह माधुकरीवरच होतो. पंढरपुरातल्या काही मठांमध्ये अशा पद्धतीने राहणाऱ्या 700 ते 800 मुलांना माधुकरी देण्याची प्रथा आहे. खानदेश ,विदर्भ, मराठवाडा, कोकण येथील काही भाविक मंडळी या मुलांना आवर्जून माधुकरी देतात. यातील काही मुलांना गाण्याचे अंग असते. तालाचा अभ्यास असतो. चांगले पाठांतर असते. त्यामुळे ही मुले अत्यंत रसाळ कीर्तन करतात.
विद्यार्थ्याला कसलेही शुल्क नाही आणि गुरूंना कसलीही गुरुदक्षिणा नाही या तत्त्वावर हे ज्ञानदान चाललेले असते.