सेन्सिबल आदमी हूँ….. मॅच्युअर्ड आदमी हूँ…. दोन बच्चों का बाप हूँ…. तो मेरे पास थोडासा दिमाग हैं…. मेरेको लाईफ में क्या चाहीये……. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डक-गावस्कर ट्रॉफीच्या सिडनी टेस्टदरम्यान रोहित शर्माने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना अशाप्रकारे पूर्णविराम लावला होता. मात्र, अचानक पाच महिन्यानंतर परिस्थिती अशी काही बदलली की, रोहितने इंस्ट्राग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आपली निवृत्ती जाहीर करावी लागली. ऑस्ट्रेलियातील टेस्ट सीरिजमध्ये 3-1 ने सपाटून मार खावा लागल्यानंतर रोहित शर्मा टेस्टला अलविदा करणार या चर्चांना चांगलचं उधाण आलं होतं. मात्र, त्याने ये भाई मैं किधर जा नही रहां हूँ असं सांगत या चर्चांना ब्रेक लावला.
रोहितने निवृत्ती घेतली की, त्याला निवृत्ती घेण्यास भाग पाडलं?
इंडियन प्रिमियर लीग सुरु असताना रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मी इंग्लंड दौऱ्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन असं म्हणत इंग्लिश दौऱ्यासाठी आपण सज्ज असल्याचं सांगितलं होतं. पण या सीरिजसाठी टीम इंडियाची संघ निवड होण्यापूर्वी रोहितने टेस्ट क्रिकेटला अलविदा केला आणि क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. त्याने निवृत्ती जाहीर करण्यापूर्वी एकच दिवस आधी भारतीय क्रिकेट वर्तुळात बीसीसीआय रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून एखाद्या युवा क्रिकेटपटूच्या शोधात असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसारीत झाल्या. त्यानंतर बुधवारी साधारण 6 ते 6. 30 च्या दरम्यान रोहितला भारतीय संघाच्या कर्णधार पादावरुन हटवणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. आणि संध्याकाळी 7.29 मिनिटांनी रोहितने सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली. त्याने घेतलेल्या अचानक निवृत्तीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रोहितला कदाचीत बीसीसीआयच्या थिंक टँकने निवृत्ती घेण्यास भागही पाडले असल्याची शक्यताही वर्तवली जातेय.
सेल्फलेस कर्णधार म्हणून कौतुक
रोहितच्या नेतृत्वाखाली मायदेशात 12 वर्षांनी भारतीय संघाला न्यूझीलंडकडून टेस्ट सीरिजमध्ये 3-0 ने मानहानिकारक पराभव सहन करावा लागला होता. या सीरिज पराभानंतर रोहितने “12 साल में एक बार तो अलाऊड है” ! अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी साऱ्यांनाचं आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत 3-1 ने टीम इंडिया पराभूत झाली. या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडीवर असूनही भारतीय संघावर टेस्ट सीरिज पराभवा नामुष्की ओढवली होती. त्यातच अखेरच्या सिडनी टेस्टमध्ये धावा होत नसल्यामुळे कर्णधार रोहित शर्माने ही टेस्ट न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सेल्फलेस कर्णधार म्हणून त्याचं कौतुकही झालं होतं. मात्र, या सीरिजदरम्यानच कादचित रोहितच्या मनातही निवृत्तीचा विचार आला असल्याचंही बोललं जातंय. या दौऱ्यात 5 टेस्ट मॅचेसमध्ये तीन वेगवेगळ्या क्रिकेटपटूंनी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. टीम एक संघ म्हणून खेळली नसल्याचीही चर्चा सुरु होती. हीच परिस्थिती पुन्हा ओढवू नये यासाठी बीसीसीआय थिंक टँक आणि निवड समितीने रोहितला आणखी एका सीरिजमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची संधी न देता युवा क्रिकेटपटूवर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला असल्याचंही बोललं जातंय.
टेस्ट कॅप्टन आणि टेस्ट बॅट्समन म्हणून कशी होती रोहितची कामगिरी ?
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे ही बाब कुणी नाकारु शकत नाही. मात्र, हीच बाब रेड बॉल अर्थातच टेस्ट क्रिकेटबाबत म्हणता येणार नाही. रोहितच्या टेस्ट करिअरचा आलेख आपण पाहिला तर चढता आणि उतरता असा राहिलेला आहे. त्याच्याकडे सुरुवातीपासूनच टी-20 आणि वन-डे क्रिकेटपटू म्हणून पाहिलं गेलं. पारंपरिक क्रिकेटमध्ये त्याच्याबाबत शंका उपस्थित केली जायची. 2010 मध्ये रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नागपूर टेस्टमध्ये पदार्पणाची संधी चालून आली होती. मात्र, टॉस होण्यापूर्वी त्याला दुखातपत झाली आणि त्याची ती संधी हुकली. अखेर 2013 मध्ये रोहितला टेस्ट पदार्पण करता आलं. त्याने 177 धावांची खेळी करत झोकात पदार्पण केलं होतं. पण त्याला ज्यावेळी टेस्ट संघात स्थान मिळालं त्यावेळी आपण पाहिलं तर अनेकदा रोहितचा फलंदाची क्रम निश्चित नसायचा. आणि त्यामुळेच त्याचं संघातील स्थानही पक्क होऊ शकलं नव्हतं. अखेर 2019 मध्ये विराट कोहली आणि रवि शास्त्री यांनी टेस्टमध्ये सलामीला येण्याची संधी दिली. टेस्टमधीर रोहित शर्मा 2.0 यानंतर क्रिकेटप्रेमींनी पाहिला. 2021 मध्ये ओव्हलच्या मैदानावर झळाकावलेलं शतक रोहितच्या करिअरमधील सर्वोत्तम ठरलं. रोहितला 67 टेस्टमध्ये 40.57 च्या सरासरीने 4301 धावाच करता आल्या टेस्ट. यामध्ये 12 शतक आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितने 2022 मध्ये भारतीय टेस्ट टीमची धुरा सांभाळली. कर्णधार म्हणून त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा आपल्या संघाचं नेतृत्व करत ही सीरिज 2-0 ने जिंकून दिली. यानंतर 2022-23 मध्ये झालेल्या ब़ॉर्डर-गावसक्र ट्रॉफी 2-1 ने जिंकण्यात यश मिळवलं होतं. 2021 ते 23 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सर्कलमध्ये फायनलपर्यंत मजल मारुन दिली होती.
हेही वाचा – द बेबी बॉस
कोण होणार टीम इंडियाचा नवा टेस्ट कॅप्टन ?
रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटला अलविदा केल्यामुळे आता भारतीय संघाच्या नव्या कर्णधाराचा शोध सुरु झालाय. यासाठी प्रमुख दावेदार म्हणून अनुभवी जसप्रीत बुमराह आणि शूभमन गिलचं नाव आघाडीवर आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थित बुमराहने ऑस्ट्रेलियात भारताच्या टेस्ट टीमची धुरा सांभाळली होती. तर शुभमन भारताच्या वन-डे टीमचा उपकर्णधार आहे. तसं आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सची जबाबदारी सध्या त्याच्याकडे आहे. शुभमनकडे अनुभव कमी आहे. तर बुमराहकडे अनुभव आहे पण त्याच्या आणि कर्णधारपदाच्या आड फिटनेसची समस्या येतेय. भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं पुढचं सर्कल हे इंग्लंडविरुद्धच्या खडतर दौऱ्याने सुरु करणार आहे. त्यामुळे 5 टेस्ट मॅचमध्ये जो नेतृत्व करु शकेल अशी क्रिकेटपटूला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शुभमन गिलचं नावच सध्या या रेसमध्ये पुढे येतंय. जसप्रीत बुमराहही भारतीय टीमच्या कर्णधारपदाचं स्वप्न बघतोय. मात्र, शुभमन गिलमुळे त्याचं हे स्वप्न साकार होण्याची चिन्ह कमी आहे. शुभमन आणि बुमराहबरोबरच के. एल राहुल आणि युवा यशस्वी जयस्वालचा पर्यायही भारतीय निवड समितीसमोर आहे. येणाऱ्या काही दिवसात इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होणार आहे. त्यावेळी आपल्याला रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून कोणाच्या नावाला पसंती मिळते याचा उलगडा होईल