एखाद्या डोंगराचा आधार घेत बांधलेल्या दुर्गाला गिरीदुर्ग म्हणतात तर जंगलातील मोक्याची जागा हेरून तिथं बांधलेल्या दुर्गाला वनदुर्ग म्हणतात. समुद्र किंवा नदीतीरी अथवा ऐन पाण्यात असलेला तो जलदुर्ग आणि मैदानात भक्कम तटबंदी वगैरे उभी करून बांधलेला तो भूदुर्ग किंवा भुईकोट असतो. शिवकाळाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा शिवरायांनी या चारही मुख्य प्रकारातील गडकोट आवर्जून स्वराज्यात निर्माण केल्याचा गौरवास्पद इतिहास आपल्याला रोमांचित करतो.
गड-किल्ला बांधणीचं नियोजन
स्वराज्याच्या निर्मितीची लगबग सुरू झाली आणि त्यासोबतच गडबांधणीदेखील. ताब्यात घेतलेल्या तोरणा गडाची डागडुजी सुरू झाली. त्या गडाला अधिक भक्कम करण्यासाठी नव्याने तटबंदी, बुरूज बांधणं अशी कामं जोर धरू लागली. त्यासोबतच जवळच असलेल्या दुर्गम “मुरुम्बदेवाच्या डोंगराचे” लष्करी महत्व सर्वांच्या लक्षात आले. त्या उत्तुंग डोंगरावरही मग गडाचे बांधकाम सुरू झाले. त्याला नाव दिलं गेलं राजगड! एखादा गड बांधणे हे फार आव्हानात्मक काम असते. ऊन, वारा, पाऊस यांच्या माऱ्याला तोंड देतानाच शत्रूचे आक्रमण थोपवता आले तरच तो गड आपल्याला सुरक्षित ठेऊ शकतो. त्यामुळे भक्कम तटबंदी, योग्य ठिकाणे हेरून तिथं बुरूज, दरवाजे, चोर दरवाजे, दारुगोळा आणि धान्याची कोठारे हे सारं नव्याने घडवण्यासाठी भरपूर मनुष्यबळही लागतं आणि पैसादेखील. त्याची व्यवस्थित आखणी केली गेली. त्याकाळी गावोगावी बारा बलुतेदारी असे. त्यापैकी पाथरवट, लोहार, सुतार, चांभार, शिकलगार आदि मंडळी गडाच्या परिसरात दाखल झाली. वेगाने बांधकाम तयार झाले.
दगड फोडून ज्या खाणी तयार झाल्या होत्या त्याला अधिक नीटनेटके करत पाण्याची टाकी निर्माण झाली. गडाचा भूगोल लक्षात घेऊन त्यावर असं काही बांधकाम उभं केलं की ते वर्षानुवर्षे भक्कमपणे सर्व आपत्तीना तोंड देत राहिले. तोरणा उर्फ प्रचंडगड, राजगड आणि त्यानंतर बांधला गेला तो प्रतापगड. या तीनही गडांचे बुलंद दरवाजे, तटबंदी आणि बुरूज आजही आपल्याला थक्क करतात. शिवकाळात मुख्यत: गिरीदुर्ग अधिक प्रमाणात निर्माण झाले कारण शिवरायांनी इथल्या भूगोलाचा अचूक वापर करून घेतला.
हे ही वाचा : मिठावरील कर आणि शिवशाही…!
गड – किल्ले कुठे कसे बांधले जात
सह्याद्रीत सर्वत्र भरपूर लहान मोठे डोंगर. पण म्हणून काही प्रत्येक डोंगरावर गड उभे राहिले नाहीत. त्यासाठी काही खास निकष असायचे. घाटाची वाट, व्यापारी मार्ग, महत्वाची व्यापारी पेठ, महत्वाचे रस्ते यांच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागा निवडून त्याठिकाणी प्राचीन काळापासून गड बांधले गेले. एक गड आसपासच्या सुमारे पंचवीस मैलाच्या परिघातील प्रदेशावर नजर ठेऊ शकला पाहिजे अशा प्रकारे गडाची जागा निवडली जाई. तसेच जिथं गड उभारायचा तिथं पाण्याची योग्य व्यवस्था आहे का याचीही आधी चाचपणी केली जाई. गडाच्या आसपास भरपूर जंगल असावं यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न केले जात.
शिवकाळात आपल्याकडे असलेले कमी सैन्य, मोजका दारुगोळा, तोफा याचं भान लोकांना होतं. त्यामुळे प्रत्येक गड मोजक्या शिबंदीसह अधिकाधिक काळ कसा लढा देऊ शकेल याकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिले. गडाकडे येणाऱ्या वाटा दुर्गम केल्या. वाटेत विविध ठिकाणी पहाऱ्याच्या चौक्या किंवा मेटे उभारली. गुहा, कडेकपारी यांचा वापर करून घेतला. मोक्याच्या जागी बांधलेल्या बुरुजावर तोफा चढवल्या. बाण, गोफणगुंडे आदि अन्य शस्त्रास्त्रे प्रत्येक गडावर सज्ज केली. जेणेकरुन गड चढून मुख्य दरवाज्यात येण्यापूर्वीच शत्रूवर हल्ले चढवता येतील याचे नियोजन प्रत्येक गडावर केले. रायगड, राजगड सारख्या महत्वाच्या दुर्गाभोवतीच्या परिसरात अन्य लहान मोठ्या गडांची साखळी निर्माण करत संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत केली.
गडासाठी जागा कशी हेरत
गडासाठी जागा कशी निवडली जाई याची एक उत्तम गोष्ट उदाहरण म्हणून आवर्जून सांगविशी वाटते. राज्याभिषेक झाल्यानंतर काही काळाने शिवछत्रपतीनी दक्षिण भारताची मोहीम आखली. पाहता पाहता थेट तंजावरपर्यंतचा प्रदेश स्वराज्याशी जोडला जाऊ लागला. जींजीसारख्या महत्वाच्या ठिकाणी उत्तम अशी दुर्गजोडी स्वराज्यात आल्यावर तिथेही अधिक बांधकाम करून त्या दुर्गाला अजिंक्य बनवलं गेलं. मात्र वेलोरचा बलाढ्य भुईकोट काही जिंकता येत नव्हता. मग महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी युक्ती शोधायला सुरुवात केली. त्यांच्या चाणाक्ष नजरेला आसपास असणाऱ्या दोन टेकड्या दिसल्या. त्या दोन्ही टेकड्यांवर गडकोट उभारायची सूचना महाराजांनी दिली. तिथे साजरा आणि गोजरा या नावाचे दोन लहान गड बांधले गेले. तिथून हल्ले करत राहून मग मराठी सैन्याने वेलोरवर आपला झेंडा रोवला..!
कोकणातील जलदुर्ग
जी गोष्ट गिरीदुर्गाबाबत तीच जलदुर्गाबाबत. कोकणभूमीला शिवछत्रपती नवनिधि असं म्हणायचे कारण इथून मिळणारे विविध प्रकारचे उत्पन्न. फळे, नारळ, भात, वरी, नाचणी, मीठ या गोष्टींच्या निर्मिती आणि व्यापाराला त्यांनी चालना दिली आणि त्यातून रयत संपन्न झालीच आणि स्वराज्याचा खजिनाही समृद्ध होऊ लागला. त्यामुळे कोकणात येणारी प्रत्येक घाटवाट सुरक्षित करत तिथल्या जुन्या गडांना अधिक बळकट केलं गेलं किंवा नवीन गड बांधले गेले.
नदी आणि समुद्रातून होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूला गारद करण्यासाठी नदीच्या मुखाशी, उगमापाशी विविध दुर्ग बांधले. विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आदि जुन्या दुर्गाची भक्कम डागडुजी करतानाच त्यांनी सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, रत्नदुर्ग, खांदेरी, बाणकोटचा हिंमतगड, दाभोळजवळ गोपाळगड, कल्याणच्या खाडीजवळ दुर्गाडी आदि नवे जलदुर्ग निर्माण करून सागरकिनारा सुरक्षित केला. पोर्तुगीज, सिद्दी,इंग्रज यांचे वर्चस्व मोडून काढले. (या लेखमालेत पूर्वी आपण खांदेरीच्या जलदुर्गाच्या निर्मितीची आणि युध्दाची कहाणी तुम्ही वाचली असेलच).
हे ही वाचा : जलदुर्ग खांदेरी आणि इंग्रजांची शरणागती…
गड-किल्ल्यांची गुणवत्ता
हे सर्व करताना त्यांनी गुणवत्तेकडे बारीक लक्ष दिले. म्हणून तर जवळपास साडेतीनशे वर्ष जुने असे हे दुर्ग आजही भक्कम उभे आहेत. सिंधुदुर्गची निर्मिती करताना त्याच्या पायात हजारो टन शिसे ओतले गेले. चुना वगैरे साहित्य प्रत्यक्ष इंग्रजांकडून विकत घेतलं. मात्र सगळा व्यवहार करताना लोकानी कडक लक्ष ठेवावे यासाठी ते सतत सूचनापत्रे देत होते. पत्रातील “टोपीकर साहुकार चतुर जात..प्रसंगी डोळियातील काजळ काढून नेतील आणि त्याचा रोजमुरा मागतील..” अशी वाक्ये शिवराय लिहितात. ही वाक्ये ते किती बारकाईने दुर्ग बांधणीवर लक्ष ठेऊन होते याचीच प्रचिती देत राहतात.!
त्याकाळात झालेल्या दुर्गबांधणीची गुणवत्ता कशी होती याचं एक उदाहरण सांगतो, सिद्दीचा जंजिरा जिंकणे हे शिवाजी महाराजांचे स्वप्न होतं. कित्येकवेळा प्रयत्न करूनही ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. अगदी मरेपर्यंत शिवराय त्यासाठी झुंजत राहिले, मात्र जंजिरा जिंकता आला नाही तरी त्यांनी त्याच्या आसपास नवे दुर्ग उभारून सिद्दीची पुरेपूर नाकेबंदी केली. त्या जंजिऱ्यासमोर असणाऱ्या शिवछत्रपतीनी बांधलेल्या पद्मदुर्गला तुम्ही अवश्य जावे. तिथे भर समुद्रात लाटा अंगावर झेलत, सिद्दीच्या सैन्याची सतत होणारी आक्रमणे यांचा कणखरपणे सामना करत मावळ्यानी तटबंदी आणि बुरूज उभे केले. तिथे गेल्यावर तुम्हाला दिसेल की लाटांच्या माऱ्याने दगड झिजलेत पण सांधे (joints) जोडण्यासाठी वापरलेले मटेरियल अजूनही तसेच आहेत. आजच्या काळातील सीमेंटपेक्षा ते अधिक गुणवत्तापूर्ण आहे.
आर्थिक तरतूद
स्वराज्यातील गडकोटाच्या संरक्षणासाठी महाराजांचे खास बजेट असायचं. विविध ठिकाणी लुटलेल्या शत्रूच्या बाजारपेठामधील धन त्यांनी अजिबात स्वत:च्या मौजमजेसाठी वापरले नाही. त्यातील प्रत्येक कण स्वराज्याच्या कामी येईल याची दक्षता घेतली. त्यातही अधिकाधिक धन हे दुर्गाच्या निर्मितीसाठीच वापरणारा हा राजा फार फार मोठा होता. जगावेगळा होता. म्हणूनच समर्थ रामदास शिवाजी महाराजांना कौतुकाने “गडपती” म्हणतात..! धन्य तो राजा आणि धन्य त्यांचे ते दुर्गप्रेम..!
1 Comment
खूप छान! नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेखन!
सुधांशुजी, अभिनंदन!