नवी मुंबई येथे असलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये मूळ माथाडी कामगारांमध्ये आता बांग्लादेशच्या नागरिकांचा शिरकाव झाल्याचा धक्कादायक खुलासा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केला. मागील काही वर्षांपासून या एपीएमसी मार्केटमध्ये बांग्लादेशी कामगारांची घुसखोरी वाढल्याचे वक्तव्य त्यांनी केलं. मात्र नेमका हा सर्व प्रकार काय आहे या एपीएमसी मार्केटमध्ये या बांगलादेशी कामगारांना कोण कामाला ठेवतात, त्यांची ओळख कोण लपवताय आणि या सर्व गंभीर प्रश्नाकडे प्रशासन का दुर्लक्ष करते? हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा खूपच गंभीर आणि देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. याच सर्व प्रकाराबाबत आम्ही नरेंद्र पाटील यांच्याकडून नेमकं एपीएमसी मार्केटमध्ये चाललंय काय, याबाबत माहिती घेतली.
माथाडी कामगार म्हणजे नेमके कोण?
मुंबई बंदर असल्याने साहजिकच इथं गोदी होती. संपूर्ण भारतामधून येणारा माल हा मुंबईत उतरला जात होता. आणि मुंबई मार्केट मधून तो माल वितरित केला जायचा. गोदिचा माल खाली करणे तो माल भरणे, गोडाऊनमध्ये माल भरणे-उतरवणे, यासारखी कामं मूळ माथाडी कामगार करत होता. कालांतराने सरकारची योजना बदलली. सरकारने हे सर्व काम एपीएमसी मार्केट नवी मुंबईत स्थलांतर केले. टप्प्याटप्प्याने भोर, जावळी, सातारा, सांगली, नगर सोलापूर अशा अनेक ठिकाणचे लोक या मार्केटमध्ये माथाडीचे काम करायला लागले. आणि हे सर्व कामगार मराठी भाषिक होते. कालांतराने यामध्ये मोठी घुसखोरी झाली. आणि यामध्ये बांग्लादेशी नागकरिकांची ‘माथाडी कामगारां’मध्ये भर पडली. सध्या एपीएमसीच्या ‘फ्रूट मार्केट’मध्ये अनेक बांगलादेशी कामगार आहेत.
वारंवार संबंधित विभागांना सांगूनही दुर्लक्ष
नरेंद्र पाटील सांगतात की, “आम्ही वारंवार बाजार समितीला याबाबत सांगत आहोत. की जो माथाडी कामगार काम करत आहे. त्याला कायद्याप्रमाणे लायसन्स दिले पाहिजे. तर त्यांना लायसन्स दिले जात नाही. गेटवर तपासणी केली जात नाही. त्यामुळे या बांग्लादेशी घुसखोरांची संख्या एवढी वाढली की, भारताला जसा बांग्लादेशी घुसखोरांकडून धोका आहे. तसाच धोका माथाडी कामगारांसाठी निर्माण झाला आहे. तरीसुद्धा कामगार माथाडी बोर्ड, बाजार समिती, पोलीस यामध्ये लक्ष घालत नाहीत. पोलीस स्टेशनला याची तक्रार दिली तर तात्पुरती कारवाई होते”.
हे ही वाचा : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबत समज गैरसमज
काही व्यापारी देत आहेत बांगलादेशी कामगारांना आसरा
काही व्यापारी बांगलादेशी कामगारांना आसरा देत असल्याचं पाटील यांनी सांगितलं. एपीएमसी मार्केटमधील काही व्यापारी बांग्लादेशी कामगार कमी पैसे घेतात म्हणून त्यांच्याकडून काम करून घेतात. त्यांना राहायला जागा देतात. अशा व्यापाऱ्यांवरही कारवाई केली जात नाही. हे व्यापारी कमी पैशासाठी बांग्लादेशी कामगारांना आसरा देतात. त्यांना स्वतःच्या गोडाऊनमध्ये राहायला जागा देतात. त्यांच्यावर कारवाईच होत नाही. याचं कारण बाजार समिती पैसे खाते याला पूर्णता संचालक मंडळ जबाबदार आहे. त्यामुळे या सर्व प्रकारावर सरकार कामगार विभागाने गांभीर्याने काम केलं पाहिजे जे होत नाही.
ज्यांच्याकडे बांग्लादेशी कामगार काम करत आहेत, त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं
ज्या व्यापाऱ्यांकडे बांग्लादेशी कामगार काम करत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पोलीस यंत्रणा तात्पुरती नोंद करते आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष करते तसं न करता ज्या व्यापाऱ्यांनी भाड्याने गोडाऊन जागा घेतली त्यांच्यासह ज्यांनी ही जागा भाड्याने दिली आहे, त्यांच्यावर सुद्धा ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे.
नरेंद्र पाटलांनी केला धक्कादायक खुलासा
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी एपीएमसी मार्केटमधील भयाण वास्तव सर्वांसमोर आणलं आहे. खरं तर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न संपूर्ण देशामध्ये ऐरणीवर आहे. अनेक राज्यांमध्ये या बांग्लादेशी घुसखोरांनी तळ ठोकला आहे. आता त्यातच महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये बांग्लादेशी घुसखोर असल्याचा दावा नरेंद्र पाटील यांनी केला. हा दावा नक्कीच विचार करायला भाग पाडणारा आहे. पोलीस प्रशासन असेल किंवा सरकार असेल किंवा कामगार विभाग असेल यांनी या खुलाशानंतर सर्व यंत्रणा राबवून बांगलादेशी घुसखोर कोण आहेत?. त्यांना आसरा देणारे कोण आहेत?त्यांना शोधून काढून त्यांना आसरा देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. तसेच जे बांग्लादेशी घुसखोर या एपीएमसी मार्केटमध्ये काम करत आहेत. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवण्यासाठी काम करणं गरजेचं आहे. अन्यथा या बांग्लादेशी घुसखोरांची संख्या वाढण्यास वेळ लागणार नाही. सरकारने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.