गेल्या 11 वर्षांपासून देशात मोदी सरकार सत्तेत आहे. या काळात त्यांनी ग्रामीण भागासाठी आणि विशेषतः महिलांसाठी खूप योजना आणल्या. यातल्या काही योजना तर इतक्या प्रभावी ठरल्या की त्यामुळे लाखो लोकांचं आयुष्यच बदलून गेलं. पण या योजनांचा खरंच कुणाला जास्त फायदा झाला, हा प्रश्न आहेच.
1. ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’मुळे ग्रामीण महिलांना मोठा दिलासा
तुम्ही कधी ग्रामीण भागात गेला असाल, तर पाहिलं असेल की बायका चुलीवर लाकडं जाळून स्वयंपाक करायच्या. या धुरामुळे त्यांच्या डोळ्यांना खूप त्रास व्हायचा, कधी कधी तर आजारपणही यायचं. पण 2016 मध्ये मोदी सरकारकडून ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ जाहीर करण्यात आली. या योजनेमुळे अनेक गरीब घरातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळालं.
मे 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, तब्बल 10 कोटींपेक्षा जास्त महिलांना त्यांच्या घरात गॅस कनेक्शन मिळालं आहे. यामुळे आता बायकांना धुराचा त्रास होत नाही, त्यांचं आरोग्य सुधारलं आहे. शिवाय, स्वयंपाकासाठी लागणारा वेळही वाचला आहे. हाच वाचलेला वेळ त्या आता इतर कामांसाठी, मुलांच्या अभ्यासासाठी किंवा स्वतः काहीतरी शिकण्यासाठी वापरत आहेत.
2. प्रधानमंत्री आवास योजना
प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वतःचं एक घर असावं, मग ते लहान असो वा मोठं. शहरांमध्ये घर मिळणं खूप अवघड असतं, विशेषतः गरीब लोकांसाठी. यासाठी सरकारने 2015 मध्ये ‘प्रधानमंत्री आवास योजना’ सुरू केली. या योजनेमुळे आतापर्यंत 1.18 कोटींपेक्षा जास्त घरांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी लाखांहून अधिक घरांचा ताबा लोकांना मिळाला आहे. आणि तिथे लोक राहायलाही लागले आहेत. या योजनेमुळे अनेक लोकांचे स्वप्न पूर्ण झालं आहे. शिवाय, ही घरं बांधताना बांधकामाच्या क्षेत्रातही अनेकांना काम मिळालं. त्यामुळे शहरी गरीब आणि खेडेगावातून शहरात आलेल्या लोकांनाही खूप मोठा आधार मिळाला आहे.
3. सर्वांसाठी बँक खाते: जन धन योजना
आपल्या देशात आधी खूप लोकांची स्वतःची बँक खातीच नव्हती. पण मोदी सरकारने 2014 मध्ये ‘प्रधानमंत्री जन धन योजना’ आणली आणि यामुळे खूप मोठा बदल झाला. या योजनेचा मुख्य उद्देश हाच होता की, भारतातील प्रत्येक नागरिकाचं बँक खाते असावं, अगदी गरिबातल्या गरीब व्यक्तीचंही. 2015 मध्ये फक्त 14.7 कोटी लोकांची बँक खाती होती, पण ऑगस्ट 2024 पर्यंत हा आकडा 53 कोटींच्या पुढे गेला आहे.
- या योजनेमुळे काय फायदा झाला
रुपे कार्ड: आतापर्यंत 36.14 कोटींपेक्षा जास्त ‘रुपे कार्ड’ देण्यात आली आहेत. यामुळे लोक आता दुकानं किंवा इतर ठिकाणी डिजिटल पेमेंट करू शकतात, म्हणजे पैसे सोबत ठेवण्याची गरज नाही.
खात्यात पैसे वाढले: जन धन खात्यांमध्ये जमा होणारे पैसे 2015 पासून 2024 पर्यंत 4 पट वाढले आहेत. लोकांनी बँकेत पैसे ठेवायला सुरुवात केली आहे.
झिरो बॅलन्स खाती कमी झाली: खूप खात्यांमध्ये आधी झिरो बॅलन्स असायचा. पण आता अशा खात्यांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. लोकांना बँकिंग व्यवहाराची सवय लागली आहे.
बँक जवळ आली: जवळपास 100% गावांमध्ये 5 किलोमीटरच्या आत बँक सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता बँकेत जाण्यासाठी लोकांना दूर जावं लागत नाही.
योजनांचा फायदा थेट खात्यात: जन धन योजनेमुळे सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचे पैसे थेट लोकांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले. त्यामुळे लोकांना लगेच फायदा मिळू लागला, विशेषतः महिलांना आणि गरीब लोकांना याचा खूप फायदा झाला आहे.
- लाखो लोक गरिबीतून बाहेर पडले
या सगळ्या योजनांमुळे आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमुळे भारतातील लाखो लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2011-12 मध्ये आपल्या देशात 27.1% लोक खूप गरीब होते. पण 2022-23 पर्यंत हा आकडा फक्त 5.3% राहिला आहे. याचा अर्थ, 26.9 कोटींपेक्षा जास्त लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.
हे कशामुळे शक्य झालं?
– देशाच्या अर्थव्यवस्थेत चांगली वाढ झाली आहे.
– लोकांना वीज, स्वच्छ शौचालयं आणि स्वतःची घरं मिळाली.
– सरकारने गरिबांसाठी अनेक योजना राबवल्या, ज्याचा फायदा थेट लोकांना मिळाला.
हेही वाचा :केंद्र सरकारची नवीन विमा सखी योजना; दोन लाख महिलांना मिळणार रोजगार
3. बँक खात्यांमुळे गावांचा विकास
बँक खाती फक्त पैसे ठेवण्यासाठी नसतात, तर ती लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतात. लोकांना आता बचत करण्याची, कर्ज घेण्याची, विमा काढण्याची आणि पेन्शनची सोय मिळाली आहे.
महिला आणि छोट्या व्यावसायिकांना मदत: महिलांना आणि छोटे व्यवसाय करणाऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कर्ज मिळवणे सोपे झाले आहे.
यामुळे फक्त श्रीमंत लोकच नाही, तर सर्वात कमी उत्पन्न असलेल्या लोकांनाही आर्थिक विकासाचा फायदा मिळत आहे. मोदी सरकारच्या काळात फक्त योजनांचा फायदा मिळाला नाही, तर लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळाली आहे. ज्या महिला आधी लाकडं गोळा करून स्वयंपाक करायच्या, त्या आता स्वच्छ गॅस वापरतात आणि त्यांच्या मुलांना शाळेत पाठवू शकतात.
ज्यांच्याकडे पक्कं घर नव्हतं, त्यांना आता स्वतःचं घर मिळालं आहे. जे लोक आधी बँकेच्या बाहेर होते, ते आता डिजिटल अर्थव्यवस्थेचा भाग बनले आहेत. गेल्या 11 वर्षांत मोदी सरकारने महिला आणि ग्रामीण भागात खूप मोठे बदल घडवले आहेत.