ठाणे शहराचं एक मोठ्ठ वैशिष्ट्य म्हणजे या शहरात फक्त दीड किलोमीटरच्या टप्प्यात सहा वेगवेगळ्या धर्मांची प्राचीन प्रार्थना स्थळे आहेत. ठाणे रेल्वे स्थानकाकडून कोर्ट नाक्याच्या दिशेनं सरळ चालत निघालो की श्री कौपिनेश्वर मंदिर, महागिरीमधील जामा मशिद, जांभळी नाक्यावरचं सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च, अग्यारी लेनमधील कावसजी पटेल अग्यारी, उथळसर नाक्यावरील ज्यू सिनेगॉग, जेलच्या तळ्याजवळचं प्रोटेस्टंट पंथियांचं सेंट जेम्स चर्च अशी विविध धर्मियांची प्रार्थना स्थळं पाहायला मिळतात. यातलं एक प्राचीन स्थान म्हणजे टेंभी नाक्यावरचं जैन मंदिर.
ठाणे शहराच्या जडण घडणीत आणि विकासात जैन समाजाचा सहभाग महत्वाचा आहे. गेली अनेक वर्षे हा समाज ठाणे शहराच्या सामाजिक वर्तुळात मिसळून गेलेला पाहायला मिळतो. आज विस्तारलेल्या ठाण्यात अन्यत्र काही जैन मंदिरे उभी राहिलेलीही पाहायला मिळतात. पण ठाणे शहरातील सर्वात प्राचीन जैन मंदिर हे टेंभी नाक्यावर आहे.
जैन मंदिराची परंपरागत कथा
या जैन मंदिराबाबत एक कथा परंपरेनं चालत आली आहे. सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी आदेश्वर महाराज हे बैलगाडीतून प्रथम तिर्थंकर आदिनाथ भगवानांची एक मूर्ती घेऊन निघाले होते. वाटेत रात्र झाल्याने त्यांनी ठाण्यात मुक्काम केला. सकाळी पुढे प्रवासाला निघायचं तर बैलगाडी जागची हलेना. मग गाडीतली मूर्ती काढून दुसऱ्या गाडीने न्यावी म्हणून प्रयत्न केले तर गाडीतली मूर्तीही हलवता येईना. अखेर जमलेल्या सगळ्या जैन भाविकांनी विचार केला की हा बहुदा परमेश्वराचा संकेत आहे, की या मूर्तीची स्थापना ठाण्यातच करावी. मग त्याप्रमाणे ठाण्यात जैन मंदिर बांधण्याचे ठरले. मा. रुपचंद हजारीमल, गुलाबचंदजी, पोखराजजी यांनी मंदिर बांधण्यात पुढाकर घेतला आणि 1848 साली ठाणे शहरात जैन धर्मातील पहिले तीर्थंकर ऋषभदेव (आदिनाथ भगवान) यांचं पहिलं जैन मंदिर उभे राहिलं. तेव्हा पासून आजतागायत ठाणे शहरातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील जैन धर्मिय या मंदिरात उपासना, प्रार्थना करायला येतात.
आकर्षक शिल्पांच्या माध्यमातून कथाकथन
शिल्पशास्त्राचे अभ्यासक, जाणकार जैन धर्मातील शिल्पकार सोमपूरा यांच्या मार्गदर्शनाखाली कसबी कारागिरांनी मूळ मंदिर बांधलं. अतिशय कलात्मक आणि आकर्षक मूर्तींनी, नक्षिकामाने हे मंदिर सजवलेलं आहे. मंदिर बांधण्यासाठी मखराना दगडाचा वापर केला आहे. आज हे मंदिर फक्त जैन धर्मियांसाठीच नाही तर सर्वच ठाणेकरांसाठी एक अभिमानाची वास्तू ठरले आहे. या मंदिरातील मूर्ती ठाण्यात पावणे दोन वर्षे असली तरी मूळात सहाशे वर्षे पुरातन आहे. ही मुर्ती जैन धर्मातील प्रथम तिर्थंकर ऋषभदेव ज्यांना आदिनाथ म्हणून ही ओळखलं जातं त्यांची आहे.
या मंदिराचा साधारण सव्वाशे वर्षांनी जिर्णोध्दार करण्यात आला. 75 वर्षापूर्वी म्हणजे 1948 मध्ये जैन भाविकांनी या मंदिरासमोरची जागा घेऊन तिथे तिर्थंकर मुनिसुव्रतस्वामी म्हणजेच मुनिश्वर महाराजांचे भव्य मंदिर उभारले. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळची दोन भव्य गजराज शिल्पे अतिशय लक्षवेधी आहेत. मंदिराच्या आतमध्ये छोट्या शिल्पांमधून जैन धर्मातील पुराणकथा दाखवल्या आहेत. नुकतेच राजस्थान – जैन समाजातर्फे मुनिश्वर महाराज मंदिराच्या डाव्या बाजूला नवीन मंदिर बांधण्यात आले. या नव्या मंदिरात 23 वे तिर्थंकर शंखेश्वर पार्श्वनाथ यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या थाटामाटात करण्यात आली. या निमित्ताने अकरा दिवसांचा मोठा उत्सवच जैन समाजाने साजरा केला.
हे ही वाचा : पेशवाईतील श्री विठ्ठल मंदिर
पर्युषण पर्वाचा उत्साह
ठाण्यातील जैन मंदिरांमध्ये जैन समाजाचा मुख्य सण ‘पर्युषण पर्व’ मोठ्या उत्साहाने पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. पर्युषण या शब्दाचा अर्थ आहे मनातील विकारांचे शमन करणे. काम, क्रोध, नीम, वैर अशा विकारांपासून दूर राहून आत्मशुध्दी करणे हा या सणाचा हेतू असतो. या पर्वासाठी जैन समाजातील साधू-संत, आचार्य यांना सन्मानपूर्वक या मंदिरात चार महिने आधी निवासासाठी आमंत्रित केले जाते. सबंध चातुर्मास त्यांचे इथे वास्तव्य असते आणि त्यांच्या प्रवचनांचा लाभ जैन समाजातील भावीक मोठ्या श्रध्देनं घेतात. सध्या ठाण्यामध्ये श्री ऋषभनाथजी स्वामी, श्री मुनिसुव्रत, श्री शंखेश्वर पार्श्वनाथ, श्री चंद्रप्रभु, श्री. अजितनाथ, श्री वासुपुज्य, श्री दिगंबर जैन मंदिर अशी जैन मंदिरे विविध ठिकाणी आहेत.
दानधर्मात अतुलनीय कार्य
जैन समाज जसा भाविक आहे तसाच कनवाळूही आहे. दया धरम का मूल है, या विचारावर या समाजाची वाटचाल सुरू असते. त्यामुळेच कोव्हिड काळात गरजूंसाठी वैद्यकिय तपासणी, उपचार सुविधा, मेडिकल किट वितरण हे उपक्रम जैन बांधवांनी केले. या बरोबरच इतरवेळी रक्तदान शिबिरे, डेंटल कॅम्प असे उपक्रम त्यांच्यातर्फे नेहमी राबवले जातात.
श्री राजस्थानी जैन संघ, श्री तेरापंथ जैन संघ, श्री वर्धमान स्थानकवासी जैन संघ, श्री थाना जैन मित्र मंडळ, श्री राजस्थानी महिला सेवा मंडळ अशा विविध संघटनांद्वारे जैन समाज आपले सामाजिक-धार्मिक उपक्रम आयोजित करतात. गेली दोनशे वर्षे जैन समाज ठाणे शहरात मिसळून गेला आहे. उद्योग-व्यवसाय, समाजसेवा आणि धार्मिक उपक्रम या त्रिसूत्रीवर त्यांचा प्रवास सुरू आहे. टेंभी नाक्यावर असलेले ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्राचीन जैन मंदिर म्हणजे ठाण्याच्या सांस्कृतिक परंपरचा ठेवा आहे, त्याचा सन्मान सर्वांनी केला पाहिजे.
1 Comment
5jr2up