ट्रेकर्सची नाळ इतिहास आणि भूगोलाशी जोडलेली असावी!

Trekking: ट्रेकर्स असणं म्हणजे फक्त गड-किल्ले चढण्यापुरतं मर्यादित नसतं. आपण एखाद्या गड-किल्ल्यावर जातो तेव्हा, तिकडच्या इतिहासाची आवड, माहिती आणि तिकडची भौगोलिक स्थिती समजून घेणं म्हणजे खरं ट्रेकिंग असतं
[gspeech type=button]

ट्रेकर्स असणं म्हणजे फक्त गड-किल्ले चढण्यापुरतं मर्यादित नसतं. आपण एखाद्या गड-किल्ल्यावर जातो तेव्हा, तिकडच्या इतिहासाची आवड, माहिती आणि तिकडची भौगोलिक स्थिती समजून घेणं म्हणजे खरं ट्रेकिंग असतं.हे मत आहे मुंबईतील ट्रेकर्स महेंद्र राव यांचं. महेंद्र राव हे खूप वर्षांपासून, नित्यनेमाने किंवा फक्त ट्रेकिंगच करतात या वर्गवारीतले नाहीत. पण एखाद्या गड-किल्ल्यावर जाताना त्याविषयी पूर्ण माहिती असणे व ती घेण्याची इच्छा मनात बाळगून, सतर्क राहून ट्रेकिंगची पॅशन असलेले, एक अभ्यासू ट्रेकर आहेत. आजच्या सदरमध्ये आपण त्यांचा ट्रेकिंगचा अनुभव आणि काही विशेष टिप्स जाणून घेणार आहोत.

कोर्लई किल्ल्यावरचा पहिला ट्रेक

तिसऱ्या- चौथ्या इयत्तेतल्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड-किल्ल्यांची माहिती दिली जाते. तेव्हा आजुबाजूला फक्त बैठी घरं आणि इमारती पाहणाऱ्या आपल्या सगळ्यांना आपसूकच या गड-किल्ल्यांचं आकर्षण वाटायला लागतं. मात्र, लहान वयात इथे एकट्याणं जाणं शक्य नसतं. त्यासाठी शाळेतून सहल नेणं किंवा पालक फिरायला घेऊन गेले तरच हे गड – किल्ले पाहता येतात.

महेंद्र राव हे मुळचे अलिबागमधल्या रेवदंडा इथले.. त्यामुळे त्यांनी शाळेत असताना तिथल्याच कोर्लई किल्ल्याला सगळ्यात पहिल्यांदा भेट दिली होती. ट्रेकर्सच्या दृष्टीने हा मध्यम स्वरुपातला किल्ला आहे. गावातलाच हा जलदुर्ग प्रकारातला किल्ला असल्याने याची बरीच माहिती त्यांना होती. त्यामुळे हा किल्ला प्रत्यक्ष पाहताना त्यांना खूप आनंद झाला… त्यामुळे इतिहासाच्या पुस्तकातून माहिती मिळालेले सगळेच किल्ले पाहण्याची त्यांची इच्छा तीव्र झाली. शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यावर पुढे त्यांनी मित्रांसमवेत रायगड किल्ला पाहिला.

आवड जोपासताना आर्थिक स्वालंबता ही महत्त्वाची

छंद वा आवड जोपासण्यासाठी वेळ काढणं आवश्यक असतं. पण वेळ जरी असला तरी खिशात त्यासाठी चार पैसे ही असायला लागतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना प्रत्येक वेळी आपली आवड जोपासताच येते असं नाही. अनेकदा ट्रेकिंगला जायचं म्हटलं तर खर्चाची रक्कम ही जरा जास्त असायची. याशिवाय ट्रेकला जाण्यासाठी अनुभवी लोकंही सोबत असणं गरजेचं होतं. या सगळ्या परिस्थितीत 15-20 वर्षापूर्वी राव यांची ओळख नागेश बांदेकर यांच्याशी झाली. त्यानंतर त्यांनी यूथ हॉस्टेलच्या माध्यमातून अगदी कमी खर्चात, अनुभवी संघासोबत आपल्या ट्रेकिंगची आवड जोपासण्याला सुरुवात केली. या मधल्या काळात हरिश्चंद्र गड, हरिहर किल्ल्याचे ट्रेक केले होते. पण खऱ्या अर्थाने किल्ले पाहणं, समजून घेणं हे यूथ हॉस्टेलच्या मेंटर्सकडून शिकत ट्रेक्स केले.

हेही वाचा:ट्रेकिंग हौस नाही,तर पॅशन म्हणून फॉलो करा

शारीरिक क्षमता

जर मनात खरंच इच्छा असेल, एखादी गोष्ट मनापासून आवडत असेल तर वेळ आणि वयाचं बंधन येत नाही. ट्रेकिंगसारखी अॅक्टिव्हिटी करताना तुम्ही वयाने तरुणच असला पाहिजे अशी काही अट नसते. त्याऐवजी तुमची शारीरिक क्षमता, शिस्त आणि सजगता ही जास्त आवश्यक असते. हे तिन्ही गुण राव यांच्याकडे होते. त्यामुळे विद्यार्थीदशेनंतर अनेक वर्षांनी पुन्हा ट्रेकिंग सुरु करणं सोपं गेलं. या गुणांसोबतच इतिहासाची आवडही तितकीच कारणीभूत ठरली.

ट्रेकिंगचा फायदा

ट्रेकिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण शिकतो ती म्हणजे टीम बिल्डींग. या कौशल्याची खरंतर आताच्या कॉर्पोरेट जगामध्ये जास्त गरज भासते. जेव्हा एखाद्या संस्थेमार्फेत ट्रेकिंगला जातो तेव्हा बऱ्याचदा त्या ग्रुपमध्ये नवीन लोकं असतात, त्यांच्याशी ओळख करुन अवघड टास्क पूर्ण करतो, या सगळ्यातून सांघिक पद्धतीने एखादं कार्य पूर्ण करण्याचं कौशल्य आपल्याला शिकता येते.

याशिवाय आपण जे इतिहासात वाचतो, शिकतो ते सगळं प्रत्यक्षात पाहून त्यांची सांगड घालता येते. जेव्हा आपण पुस्तकात वाचतो सगळ्यात उंच कळसूबाईचं शिखर तेव्हा त्याची उंची हे त्या शिखरावर चढत असताना प्रत्यक्षात अनुभवता येते. थोडक्यात पुस्तकातून बाहेर पडून प्रत्यक्षात आपण हे सगळं अनुभवातून शिकत जातो.

गड-किल्ले आले म्हणजे निसर्ग तर आलाच. शहरात राहत असताना आपल्याला खूप मर्यादित झाडं, वनस्पती यांची माहिती असते. पण जेव्हा जंगल, दाट झाडीच्या मार्गाने आपण किल्ल्यांवर जात असतो, तेव्हा निरनिराळ्या प्रकारची झाडं, फुलं आपल्याला पाहायला मिळतात. सोबत या विषयातले कोणी वाचक किंवा माहितगार असतील तर त्यांच्याकडून आणखीन माहिती मिळून आपल्या ज्ञानात चांगली भर पडते.

गावातील अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात चालना मिळते

स्वयंसेवी संस्था या नेहमी वाट दाखविण्यासाठी स्थानिक गावकऱ्याला सोबत घेतात. त्याला ‘वाटाड्या’ असं म्हटलं जातं. किल्ल्यांवर जाण्यासाठी अनेक वाटा असतात. दरवर्षी प्राण्यांच्या जाण्या-येण्यामुळे सुद्धा या वाटांमध्ये बदल घडलेले असतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला नवीन मार्ग तयार झाल्यामुळे स्थानिक गावकरी सोबत असणं उत्तम असते. या रुपात त्या वाटाड्यालाही काही आर्थिक मोबदला मिळतो.

प्रत्येक ट्रेकमध्ये वाटाड्या सोबत असणं खूप फायदेशीर असतं. काही वेळेला आपल्याला वाटेल दरवर्षी ज्याठिकाणी जातो तिथे पुन्हा जाताना वाटाड्याची काय गरज? तितका रस्ता आपण शोधू शकतो. तर तो आपला गैरसमज असतो. रस्त्याशिवाय इतर अडचणीही येऊ शकतात ज्यातून बाहेर पडण्यासाठी हे वाटाडे आपल्याला मदत करु शकतात. हे सांगताना राव यांनी त्यांना आलेला एक अनुभव सांगितला. काही वर्षापूर्वी त्यांनी एका संस्थेसोबत कर्जत इथे उतरुन खांडस इथून गणेशखिंडीच्या मार्गातून भीमाशंकर हा ट्रेक करायचं ठरवलं होतं. असे लांब पल्ल्याचे ट्रेक्स असतात, तेव्हा संस्थेकडून त्या संपूर्ण मार्गाचा रेकी ट्रेक केला जातो. राव हे त्या रेकी ट्रेकच्या ग्रुपमध्ये होते. जवळपास 10-12 जणांचा तो ग्रुप होता. श्रावण महिना सुरु होता म्हणून पाऊस रिमझीम पडत होता. त्या ट्रेक मार्गावर अनेक ग्रुपची गर्दी होते. त्यामुळे त्यांनी वाटाड्या न घेताच जायचं ठरवलं. त्या ट्रेक्सच्या एका आडवळणावर चक्क दरेडेखोर होते. त्यांनी तिकडून जाणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सकडून त्यांच्याजवळ असलेल्या वस्तू घेऊन लुटलं. तेव्हापासून ट्रेकिंगसाठी वाटाड्या असल्याशिवाय ट्रेकला जायचं नाही हे त्यांनी मनोमन ठरवलं.

काही वेळेला रात्रीचा ट्रेक असेल तर जेवणाची व्यवस्थाही गावातच करता येते. गावात असे ग्रुप्स असतात जे तुम्हाला साधं जेवण आणि निवासाची व्यवस्था उपलब्ध करुन देतात. त्यामुळे त्यांनाही दोन पैसे मिळत असतात. अशा पद्धतीने गावातली अर्थव्यवस्थेलाही काही प्रमाणात चालना मिळते.

हेही वाचा: ट्रेकिंगचं प्लानिंग करता मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा

सुरक्षा

ट्रेकिंगला जाणं म्हणजे निदान आपल्या स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेणं ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. यामध्ये आपण कोणासोबत जातो इथपासून आपण काय खातो, आपण काय कपडे घातले आहेत अशा सगळ्या गोष्टी येतात. सर्वात प्रथम जेव्हा आपण ट्रेकिंगला जाणार असतो तेव्हा आपण कोणासोबत जात आहोत त्यांचे संपर्क क्रमांक (मोबाईल नंबर) आपल्या कुटुंबियांना देणं अत्यावश्यक असतं. यदाकदाचीत तुमच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर, तुमचे कुटुंबीय घाबरुन न जाता अन्य सहकाऱ्यांशी संपर्क साधू शकतील.

दुसरी गोष्ट ट्रेकिंगला जाताना तुमचे कपडे, पायातले बुट हे ट्रेकिंग करण्यासाठी योग्य असावेत. पावसाळा असल्यामुळे पुर्ण रेनकोट असावा. अंगभर कपडे असावेत कारण अनेकदा जंगलातून जात असताना सर्पदंश किंवा जळूचा दंश होण्याची शक्यता असते. तसंच पायात डोंगर चढताना ग्रीप पकडतील असे चांगले सोल असलेले शूज असले पाहिजेत. शक्यता स्पोर्ट्स शूज ट्रेकिंगसाठी टाळावेत. कारण स्पोर्ट्स शूजमुळे चढणवर ग्रीप धरली नाही तर पाय निसटून खाली पडण्याची भिती असते.

प्रथोमपचार साहित्य हे प्रत्येक ट्रेकिंगच्या वेळेला आपल्यासोबत असलंच पाहिजे. यामध्ये पाण्याने भिजल्यामुळे थोडंफार ताप, सर्दी वाटतं असेल तर त्यावरची गोळी, सिरप, जखम झाल्यास डेटॉल, अँटीसेप्टिक क्रीमआणि बँडेज असलं पाहिजे. तसंच ते कसं वापरायचं याचीही माहिती असली पाहिजे.

ट्रेकिंगचं व्यावसायिकीकरणामुळे सुरक्षेचे तीनतेरा

अलिकडे प्रशिक्षित संस्थेसोबत चार-पाच ट्रेक केल्यावर काही जण आपापला ग्रुप तयार करुन ट्रेक आयोजित केले जातात. त्यामुळे या आवडीला एकप्रकारे व्यावसायिकीकरणाचं रुप आलं आहे. नवनवे ग्रुप तयार होऊन ट्रेकला जाताना आयोजित करणारेच पुरेशी तयारी करत नाहीत, सोबत वाटाड्या घेत नाहीत, ट्रेकमध्ये जे – जे कोणी येणार आहेत ते तो ट्रेक पूर्ण करण्यासाठी सक्षम आहेत की नाहीत, त्यांची पार्श्वभूमी काय याबद्दलची माहिती न घेताच सरसकट सगळ्यांना घेऊन ट्रेकला सुरुवात केली जाते. यामुळे अनेकदा अपघात घडतात.

बऱ्याचदा शनिवार रविवार अशा आठवड्याच्या शेवटच्या दिवसात ट्रेक केलं जातं. पण हल्ली या दोन दिवसात सगळ्याच ट्रेकिंग स्थळावर एवढी गर्दी होते की ज्या स्थळावर ट्रेकिंगसाठी जात आहोत तिथे एकावेळी किती लोक जमू शकतात याचा काही हिशोब केला जात नाही. त्यामुळे वाटेवरुन घसरणे, चेंगराचेंगरी होणं अशा घटना घडतात. त्यामुळे अलिकडे पॅशन म्हणून ट्रेकिंग करणारे अनेकजण ऑड डे म्हणजे सोमवार ते शनिवारच्या दरम्यान ट्रेकला जाणं पसंत करतात.

अविस्मरणीय ट्रेक

जेव्हा इतिहास घडलेल्या गड-किल्ल्यावर आणि निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा प्रत्येक क्षण हा न विसरणाऱ्या क्षणातच गणला जातो. त्यामुळे आपसूकच प्रत्येक ट्रेक हा अविस्मरणीयच असतो. मुळात ट्रेकला आपण आपली आवड जपण्यासाठी जातो. ऐतिहासिक वास्तू पाहण्यासोबत निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी जातो. आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम आहोत म्हणून हे सगळं तितक्या सहजतेने आपल्याला अनुभवता येते. पण जे विकलांग आहेत आणि त्यांनाही हाच आपल्यासारखा अनुभव घ्यायचा असेल त्याचं काय? आपल्याला कधी हा प्रश्न पडला आहे का? जर मनात दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर तेही विकसांग बांधव हा अनुभव घेण्यासाठी येतात असाच एक अनुभव राव यांना आला.

महेंद्र राव हे तिसऱ्यांदा रायगड प्रदक्षिणेचा ट्रेक करत होते. हा साधारण 14 – 15 किमीचा मार्ग आहे. थोडा रस्ता सोडता पूर्ण रस्ता हा खाच-खळगे आणि डोंगर चढणीचा आहे. राव यांच्या काही अंतरावर एक अंध व्यक्ती या प्रदक्षिणामध्ये सहभागी झाली होती. जोपर्यंत रस्ता चांगला होता तोपर्यंत ती व्यक्ती चांगल्या प्रकारे सूचनांच्या आधारे चालत होती. पुढे खाच खळग्याची वाट सुरु झाल्यावर सुद्धा ती व्यक्ती प्रयत्न करत होती. काही वेळेला यश मिळतं होतं काही वेळेला पडत होती. पण वाट अधिक धोकादायक झाल्यावर राव आणि त्यांच्या ग्रुपमधल्या आणखीन एका सहकाऱ्यांनी त्यांचे दोन्ही हात पकडून त्यांना ती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी मदत केली. आतापर्यंत अनेक चांगले-वाईट अनुभव त्यांना मिळाले होते. काही मजेशीर ही होते. पण आपण जे उघड्या डोळ्यांनी अनुभवतो हाच अनुभव घेण्यासाठी एका अंध व्यक्तीला मदत करुन रायगडाची प्रदक्षिणा पूर्ण केली हा अनुभव आयुष्यभरासाठी आनंद आणि समाधान देणारा होता अशी भावना राव यांनी व्यक्त केली.

4 Comments

  • Ratnakar Hinge.

    Khup Chan Lihile Aahe.CongratulaionDearMhedra.

  • Manisha Suryavanshi

    Khup chan Proud of you Mahendra Rao👏👍

  • Amey B

    फार छान माहिती अणि उत्तम लेखन…👏👍

  • Minal Rao

    Very nice article , thank you

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

4 Responses

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Trekking : ट्रेकच्यावेळी ट्रेक लीडर आणि स्वयंसेवक म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
Trekking : ट्रेकिंगची आवड जपायची आहे पण त्यासाठी लागणारा खर्चही फार असतो. खिशाला परवडतील अशा किंमतीत राहण्याची, खाण्याची आणि पूर्ण
Trekking : ट्रेकिंगसारखं अॅडव्हेंचर करताना काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ट्रेकिंगचं ठिकाण, कधी, कसं जायचं यासह काय - काय

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ