असं म्हणतात की, युद्धात सगळे प्रकार क्षम्य असतात. येनकेन प्रकारे शत्रूला पराभूत करणे हेच उद्दिष्ट असल्यामुळे रसद पुरवठा आणि पाणी तोडणे याला युद्धनीतीमध्ये फार महत्व असते. शत्रूला अन्न – पाणी मिळू न देणे यासाठी जेव्हा राजा किंवा सेनापती नियोजन करत असतो, तेव्हा आपल्याला या गोष्टी कमी पडता कामा नयेत याचंही नियोजन केलेले असते. प्राचीन काळापासून दुर्ग बांधणी करताना तिथे पाणी आहे का, पाणीसाठा निर्माण करता येईल का याची चाचपणी आधी करावी असं छत्रपतींनी राजनीतीत सांगितलं आहे. शिवकाळात देखील याचा फार बारकाईने विचार केला गेला होता.
अन्न-धान्य साठा आणि पाणीसाठ्याची निर्मिती
स्वराज्याच्या सुरुवातीला निर्माण केलेल्या राजगडापासून शेवटपर्यंत प्रत्येक गडावर पुरेसा पाणीसाठा निर्माण करण्याकडे छत्रपती शिवरायांनी बारकाईने लक्ष दिले. राजगडाच्या बालेकिल्ल्यातील चंद्रकोरीसारखे देखणे टाके आणि गडभर विखुरलेली अन्य टाकी, पद्मावती माचीवरील तलाव, राजवाड्याशेजारील पाण्याचा तलाव हे तर आजही पाहता येतात. महत्वाची गोष्ट दूरवर पसरलेल्या संजीवनी आणि सुवेळा माचीवरील पहारा देणाऱ्या सैनिकांना देखील तिथेच जवळ पाणी उपलब्ध असावं याची सोय केली गेली. तसच माचीवरील पाण्याचे टाके आपल्याला लोहगडवरील विंचूकाटा माचीवरसुद्धा पाहायला मिळते. गडाची दुर्गम चढण चढून येताना, घाटवाट चढून येत असताना सैनिकांना, वाटसरुना पाणी मिळायला हवं यासाठी गड पायथा, घाटवाटा येथे पाण्यासाठी टाकी खोदलेली आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. रायगडासारख्या राजधानीच्या जागी धान्य कोठारे आणि जागोजागी तलाव, टाकी खोदून इतका साठा करून ठेवला की इंग्रजांनीदेखील या व्यवस्थेता विशेष उल्लेख केला होता.. “मोजक्या सैन्यासह हा गड कायम झुंजत राहू शकतो इतका तो अभेद्य आहे.” नुसते तलाव बांधणे इतकच नव्हे तर तयार झालेला पाणीसाठा कसा जपावा, त्यावर छत कसे असावे यासाठी देखील काळजीपूर्वक प्रयत्न केले गेले. शिवरायांच्या आज्ञापत्रात असे सगळे उल्लेख न विसरता केले आहेत.
पाणीसाठ्याचं बारकाईनं नियोजन करणे
आधी पाण्याची व्यवस्था निर्माण करायची, मग त्याचं संरक्षण करत शत्रूला त्यापासून दूर ठेवायचं हे धोरण शिवकाळात फार काटेकोरपणे राबवलं गेलं. त्याकाळी शत्रूचे सैन्य येत असल्यास त्यांना प्यायला पाणी मिळू नये म्हणून कित्येक वेळी विहिरीमध्ये विषारी द्रव्ये टाकली जात. धान्यसाठा लपवला जाई किंवा नष्ट केला जाई. अन्नपाण्याविना तडफडणाऱ्या शत्रूसैनिकांना मग लवकर पराभूत करता येत असे. गडाचे बांधकाम करताना दगड फोडत खाणी तयार होत. त्यावेळी जर पाण्याचे झरे लागले तर त्या ठिकाणी निगुतीने तलाव बांधला जाई. अगदी भर समुद्रात आसपास खारे पाणी असताना सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी अशा ठिकाणीदेखील गोड्या पाण्याची सोय निर्माण करण्यासाठी प्राधान्य दिलं गेलं.
हे ही वाचा : शिवरायांची अद्भुत दुर्गबांधणी..!
शत्रूला पिण्याचं पाणी मिळू न देणे
लढाईच्या पूर्व तयारीसाठी अशा प्रकारे रसद पुरवठा आणि पाणी यांची आधी तजवीज करून मग लढायला जाण्याची युद्धनीती मराठ्यांनी प्रभावीपणे राबवली. इतकेच नव्हे तर शत्रूच्या प्रांतात सवाऱ्या करताना तिथल्या नद्या, तलाव यांचा अचूक वापर करून घेतला. स्वराज्याच्या विविध लढायावेळी शिवराय आणि त्यांच्या मावळयानी शत्रूला पाण्याच्या साठयापर्यंत पोहचण्यास अटकाव केला. अचूक घेराबंदी करून त्यांचे मार्ग रोखले. पुण्यात ज्यावेळी शाहिस्तेखान तळ ठोकून होता त्यावेळी त्याचे विविध सरदार स्वराज्यावर चालून गेले. त्यातच एक होता कारतलबखान. जवळपास 25 हजार सैन्य घेऊन तो कुरवंडया घाटाने कोकणाकडे निघाला. महाराजांच्या हेरानी सगळे नियोजन आधीच जाणून घेतले होते. त्यानुसार सुमारे दोन हजार सैन्य घेऊन महाराज स्वतः निघाले. खान कुरवंडया घाटात शिरताच लोहगड – लोणावळा बाजूने पुढे येत एकीकडे नेताजी पालकर यांनी घाटाची मागची बाजू ताब्यात घेतली आणि ते शांतपणे थांबून राहिले.
राजगडावरुन आधीच कोकणात उतरलेले महाराज अंबा नदीच्या काठाने घाटाच्या खालील बाजूने पुढे सरकले. घाटातून चढ उतार करून दमलेले खानाचे सैन्य विशिष्ट जागी पोचताच त्यावर चौफेर हल्ला चढवला. दमलेल्या सैन्याला साधं पाणीसुद्धा मिळू दिलं नाही. सैन्यात असलेल्या रायबाघन या महिला सेनानीच्या सल्ल्याने तो माफी मागू लागला. कारतलबखान हा एकेकाळी शहाजी महाराजांचा मोगलाईत असतानाचा सहकारी. त्याने शेवटी त्या मैत्रीची शपथ घेत शिवरायांपुढे शरणागती पत्करली. सगळी शस्त्रे, खजिना, घोडे, तोफा असं सगळं काही ताब्यात घेत महाराजांनी त्याला जीवदान दिले. माणूस पाहून महाराज शत्रूच्या विविध सेनानीसोबत व्यवहार कसा करायचे याचं हे उत्तम उदाहरण.
शत्रूच्या बाबतीत दया-माया दाखवायची नाही
अगदी अशीच काहीशी घटना नंतरही घडली तेव्हा मात्र शिवराय फार वेगळे वागले. 1673-74 चा तो काळ होता. सरसेनापती प्रतापराव गुजर आदिलशाही प्रांतात धुमाकूळ घालत होते. आदिलशाहीचा बहलोलखान हा मोठा क्रूर आणि बिलंदर सरदार होता. त्याचे पूर्ण पारिपत्य करावं, एकतर त्याला मारावे किंवा जिवंत कैद करावं यासाठी मोहीम सुरू होती. जसं पूर्वी महाराजांनी शत्रूचं पाणी रोखलं तशीच रणनीती प्रतापराव गुजर यांनी आखली. कोल्हापूर ते उमराणी या पट्ट्यात मोठे धुमशान सुरू होते. एक दिवस बहलोलखानाचे सैन्य सकाळी पाण्याकडे निघाले तर त्यांना दिसले की मराठ्यांनी त्यांची वाट अडवलेली आहे. त्यांना अजिबात पाणी मिळू दिले नाही. शेवटी तहानलेले सैन्य शरण आले. बहलोलखानाने धर्मवाट मागितली आणि प्रतापराव गुजर यांनी मोठ्या मनाने त्याला सोडून दिले. ही बातमी कळताच महाराज प्रचंड भडकले. “कपटी आणि बिलंदर खान पुन्हा स्वराज्यावर चालून येणार हे तुम्हाला कसे समजले नाही. सरनौबत असून केवळ शिपाईगिरी केली.. याऊप्पर खानाला साफ बुडवल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नये..” असं कठोर शब्दात त्यांना महाराजांनी पत्र लिहिले. शिवाजी महाराजांनी जे धोरण अवलंबलं होतं तेच पुढीच्या काळात बाजीराव पेशव्यांनी राबवलं. निजामाचा पराभव करण्यासाठी त्यांनी गाजवलेली पालखेडची लढाई इतिहासात आजही प्रसिद्ध आहे. तिथेही शत्रूच्या सैन्याला गोदावरी नदीचे पाणी मिळू नये यासाठी रणनीती आखली गेली.
“तहानलेल्यांना पाणी.. आणि भुकेलेल्यांना अन्न देणे..” हीच आपली खरी संस्कृती आहे. मात्र जो शत्रू जीवावर उठलेला असतो त्याच्याशी असे प्रेमाने वागू नये हेच आपल्या राजनीतीचे खरे सूत्र आहे. ते शिवाजी महाराजांसह ज्या – ज्या राजांनी वापरले त्यांनी कायम निर्भेळ यश मिळवले हे आपण लक्षात ठेवायला हवे.!