भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT विश्लेषण

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT विश्लेषण करून या उद्योगांसमोर असलेली आव्हाने आणि विकासाच्या संधी यांची माहिती करून दिली आहे.
[gspeech type=button]

भारतातील कीटकनाशक उद्योगांची सद्यस्थिती समजावून घेऊन त्यानुसार भविष्याचे नियोजन करण्यासाठी SWOT विश्लेषण या उद्योग व्यवस्थापन साधनाचा वापर प्रभावीपणे केला जाऊ शकतो. SWOT म्हणजे आपण अभ्यास करत असलेल्या गोष्टीबद्दल अधिक माहिती घेऊन त्या गोष्टीबद्दलच्या चार प्रमुख बाबींचे विश्लेषण करणे. या चार बाबी म्हणजेच सामर्थ्य (Strengths), कमकुवतपणा (Weaknesses), संधी (Opportunities) आणि धोके (Threats). उद्योगांचे सामर्थ्य (Strengths) हा सकारात्मक गुणधर्म ओळखून त्यांचा व्यावसायिकरीत्या वापर केला आणि त्यांचा विकास केला तर उद्योगांची प्रगती होते. कमकुवतपणा (Weaknesses) हा नकारात्मक गुणधर्म उद्योगांच्या प्रगतीमधील अडथळे बनू शकतात. त्यामुळे ते वेळीच ओळखून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्याचप्रमाणे संधी (Opportunities) हे आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असलेले सकारात्मक घटक असतात, ज्यांचा योग्य रीतीने वापर केल्यास उद्योगांची प्रगती होण्यास मदत होऊ शकते. तर धोके (Threats) म्हणजे आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असलेले नकारात्मक घटक असतात, ज्यांच्यामुळे उद्योगाच्या प्रगतीला खीळ बसू शकते. असे धोके वेळीच ओळखून त्यांच्यापासून उद्योगाला वाचविण्याचे उपाय योजावे लागतात. 

भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT विश्लेषण केल्यावर लक्षात आलेल्या बाबी अशा आहेत.

सामर्थ्य (Strengths)

  1. कमी खर्चिक उत्पादन : मोठ्या प्रमाणात कीटकनाशक उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेली औद्योगिक निर्मिती आणि उत्पादन क्षमता भारतात उपलब्ध असल्यामुळे तसेच अन्य विकसित देशांच्या तुलनेत मनुष्यबळ कमी खर्चात उपलब्ध असल्यामुळे एकूण उत्पादन खर्च विकसित देशांच्या तुलनेत कमी राहतो. त्यामुळे भारतीय उद्योग जगातील अन्य देशांमधील उद्योगांशी स्पर्धा करण्यास सक्षम आहेत.
  2. प्रक्रिया तंत्रज्ञानाची उपलब्धता : कीटकनाशक निर्मितीमध्ये मूलत: औद्योगिक पातळीवर काही रासायनिक प्रक्रिया केल्या जातात आणि त्या करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान वापरावे लागते. असे तंत्रज्ञान भारतातील उद्योगांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे कीटकनाशके बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध रासायनिक घटकांची मागणीनुसार निर्मिती करणे या उद्योगांना शक्य आहे.
  3. उत्पादन क्षमता : भारतातील कीटकनाशक उद्योगांकडे भारतीय बाजारपेठेतील मागणी आणि परदेशातील मागणी पुरवता येईल इतकी भरपूर प्रमाणात उत्पादन क्षमता आहे. याचा उपयोग करून हे उद्योग देशांतर्गत तसेच निर्यात बाजारपेठेत उत्पादने पुरवू शकतात.     
हे ही वाचा : कृषी रसायन उद्योग

कमकुवतपणा (Weaknesses)

  1. संशोधन व विकास कार्याचा खर्च : शेतीमधील आणि आसपासच्या बदलत्या परिस्थितीत प्रभावी ठरणारी आणि नवनवीन प्रकारच्या किडींचे हल्ले परतवून लावत पिकांचे संरक्षण करू शकणारी कीटकनाशके तयार करत राहणे ही संशोधन आणि विकास कार्याची प्रक्रिया सातत्याने करावी लागते. त्यासाठी मोठा खर्च येतो. विकसित देशांमधील उद्योगांच्या तुलनेत भारतातील उद्योग संशोधन आणि विकास कामांसाठी होणारा मोठा खर्च पेलू शकत नाहीत.
  2. मान्सूनवर अवलंबून असलेली शेती : भारतात सिंचनाची व्यवस्था मर्यादित असून शेती प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पादन आणि पर्यायाने उत्पन्न मिळण्याची व शेती किफायतशीर होण्याची शक्यता मर्यादित असते. त्यामुळे कीटकनाशक खरेदी-विक्रीवर त्याचा बऱ्याच अंशी वाईट परिणाम होतो.
  3. कीटकनाशक वापरातील असमतोल : भारतातील विविध राज्यांमध्ये, विविध पिकांमध्ये, तसेच विविध जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांच्या कीटकनाशक वापरामध्ये अतिशय विविधता किंवा असमतोल आढळतो. भारतात अल्पभूधारक शेतकरी बहुसंख्येने आहेत. त्याशिवाय ओलिताखालील किंवा बागायती शेती असलेले शेतकरी कमी, तर कोरडवाहू शेती असलेले बहुसंख्येने आहेत. या सर्व घटकांमुळे वापरात जो असमतोल आहे त्यामुळे कीटकनाशक निर्मिती, विक्री आणि नफा यांचे व्यावसायिक गणित साधणे काहीसे जटील होऊन जाते.
  4. भांडवलाची आवश्यकता : कीटकनाशक निर्मिती उद्योग सुरू करण्यासाठी आणि नियमितपणे चालविण्यासाठी बराच भांडवली खर्च येतो. त्यामुळे हा व्यवसाय नफ्यात चालविण्यासाठी विविध प्रकारची उत्पादने, स्वतंत्र विक्री व्यवस्था आणि खेळते भांडवल आवश्यक असते.
  5. आरोग्यास अपायकारक : कीटकनाशके ही मानव व पशूंच्या आरोग्यास अपायकारक असल्यामुळे, तसेच वापरताना योग्य काळजी न घेतल्यास पर्यावरणाला हानिकारक ठरू शकणारी उत्पादने असल्यामुळे, कीटकनाशक निर्मिती करताना कारखान्यात काम करणारे कामगार, उत्पादन झाल्यानंतर साठवणूक व विक्री व्यवस्था हाताळणारे कर्मचारी, प्रत्यक्ष वापर करणारे शेतकरी व शेतमजूर, ज्यांच्यावर कीटकनाशके फवारली जाणार ती पिके, पिकांना हानिकारक नसलेले कीटक, मित्र कीटक, नैसर्गिक पाण्याचे स्रोत, वन्य प्राणी, वन्य वनस्पती या सर्वांनाच कीटकनाशके वापरताना वेगवेगळ्या प्रकारे अपाय होण्याची शक्यता असते. त्यामुळे या उद्योगात अतिशय काळजीपूर्वक काम करावे लागते. त्यासाठी कुशल व्यवस्थापक आणि कर्मचारी यांची आवश्यकता भासते, व त्यामुळे एकूणच खर्च वाढतो.       
  6. रजिस्ट्रेशनचे नियम : कीटकनाशक निर्मिती करण्याअगोदर सुरक्षिततेच्या दृष्टीने कीटकनाशक उद्योगांना कीटकनाशकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक घटकांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) प्रक्रिया करून घ्यावी लागते. त्यासाठी अतिशय काटेकोर नियमांचे पालन करावे लागते. तसेच निर्माण केलेली उत्पादने योग्य प्रकारे काळजीपूर्वक वापरली जावीत, यासाठी पॅकिंग, लेबलिंग, वापरण्याचे योग्य प्रमाण शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत त्यांना कळवणे इत्यादी अनेक गोष्टी कराव्या लागतात. यामुळे साहजिकच निर्मितीचा खर्चसुद्धा वाढत जातो.
हे ही वाचा : कीटकनाशके आणि कृषी रसायने

संधी (Opportunities)

  1. नाविन्यपूर्ण उपयोजित तंत्रज्ञान विकसित करणे : उद्योगांनी आपल्या व्यवसायाची व्याप्ती विशिष्ट कीटकनाशक उत्पादने निर्माण करून त्यांची विक्री करणे इतकीच मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या सोडविणे व त्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय शोधणे अशी व्यापक केली, तर उत्तम प्रगतीची संधी आहे.
  2. भारत म्हणून मिळणारा फायदा : कर सवलती, कमी खर्चिक मनुष्यबळ इत्यादीमुळे कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करणे शक्य आहे. 
  3. कालावधी संपलेल्या पेटंटपासून नवीन उत्पादने : नवीन संशोधन करण्यात खर्च करण्यापेक्षा कालावधी संपलेल्या पेटंटचा अभ्यास करून नवीन उत्पादनांची निर्मिती करणे शक्य आहे.  
  4. निर्यातीची संधी : शेती करणाऱ्या अनेक देशांमध्ये कीटकनाशक निर्यातीची मोठी संधी आहे.   
  5. वापर वाढविणे : भारतात सध्याचा प्रति हेक्टरी कीटकनाशक वापर अन्य देशांच्या तुलनेत कमी असल्यामुळे वापर वाढवून विक्री वाढविणे शक्य आहे.    
  6. ग्रामीण भागात दूरसंचार सुविधा : वाढत्या सुविधांमुळे नवीन उत्पादनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे अधिकाधिक सहजपणे व परिणामकारकरित्या करणे शक्य आहे.  
  7. वाढलेला पतपुरवठा : शेतीसाठी विविध संस्थात्मक पातळीवर पतपुरवठा वाढला असल्यामुळे कीटकनाशकांवर खर्च करणे शक्य होत आहे. त्यामुळे विक्री वाढू शकते.  
  8. किमान आधारभूत किमतीत (MSP – Minimum Support Price) वाढ : अनेक पिकांसाठी सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमती वाढत असल्यामुळे कीटकनाशकांवर खर्च करणे शक्य होत आहे. त्यामुळे विक्री वाढू शकते.  
  9. ड्रोन तंत्रज्ञान : आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाने कीटकनाशक फवारणी केल्यामुळे कीटकनाशक वापर सुलभ होऊन मजुरीचा हेक्टरी खर्च कमी झाला आहे. त्यामुळे विक्री वाढू शकते. 

धोके (Threats)

  1. जनुक स्थानांतरित पिके : बीटी कपाशीसारख्या जनुक स्थानांतरित पिकांची लागवड केल्यास कीटकनाशके कमी प्रमाणात वापरावी लागतात. त्यामुळे जनुक स्थानांतरित पिकांची लोकप्रियता वाढत आहे आणि भविष्यात कीटकनाशकांची विक्री अजूनही कमी होऊ शकते.
  2. सेंद्रिय शेतीची वाढती लोकप्रियता : ग्राहकांमध्ये विषमुक्त अन्न सेवनाची व शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीची लोकप्रियता वाढत असल्यामुळे कीटकनाशकांची विक्री कमी होऊ शकते.
  3. बोगस व भेसळयुक्त कीटकनाशके : बाजारात मिळणाऱ्या बोगस व भेसळयुक्त उत्पादनांमुळे दर्जेदार उत्पादनांच्या विक्रीवरसुद्धा परिणाम होऊ शकतो.  
  4. कडक कायदे : कीटकनाशक उत्पादन, साठवणूक, विक्री व वापर यासंबंधीचे कायदे कडक असल्यामुळे उद्योगांच्या वाढीच्या दृष्टीने तो नकारात्मक घटक मानला जातो.   
  5. करांचे वाढते प्रमाण : वाढत्या करांमुळे नफा कमी होत असल्याचा दावा उद्योग करतात. 
  6. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती : उद्योगांचा किफायतशीरपणा कमी होण्यासाठी कच्च्या मालाच्या वाढत्या किमती हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते.

लेखाच्या पुढील भागात आपण भारतातील कीटकनाशक उद्योगातील विक्री व्यवस्थापनाविषयी माहिती घेऊ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ