ठाणे शहराला एक दीर्घ आणि संपन्न साहित्यिक परंपरा लाभलेली आहे. या शहराने अनेक कवी, नाटककार, लेखक, विचारवंत घडवले आणि अनेक साहित्यिक उपक्रमांना जन्मही दिला. ठाण्याच्या या साहित्य परंपरेचा पाया घालण्याचं काम केलं ते ठाणे शहरात 132 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या ‘मराठी ग्रंथ संग्रहालय’ या आद्य वाचनालयाने. विनायक लक्ष्मण भावे या साहित्य आणि इतिहासप्रेमी तरुणाने आपल्या वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी, आपल्या समविचारी मित्रांसह 1 जून 1893 रोजी हे ग्रंथ संग्रहालय स्थापन केलं.
पहिल्याच वर्षी पुस्तकांची संख्या 40 हून 598
मराठी ग्रंथ संग्रहालयाचे संस्थापक वि.ल. भावे पुढे महाराष्ट्र सारस्वतकार या ग्रंथामुळे प्रसिध्द झाले. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने जमा करण्यासाठी मराठा दफ्तर नावाची संस्थाही सुरू केली होती. भावे यांनी विष्णू भास्कर तथा बाबा पटवर्धन या आपल्या मित्रांसह हे ग्रंथालय सुरू केलं तेव्हा, ग्रंथालयाला स्वतःची जागा ही नव्हती. ठाण्याच्या खारकर आळीतील पंडीत पाठक यांच्या घराच्या ओटीवर वाचनालय सुरू करण्यात आलं. मराठी ग्रंथ संग्रहालयाला पहिल्याच दिवशी ठाणे शहरातून 40 सभासद मिळाले. आणि वर्षाअखेरीस म्हणजे 1893 साल संपता संपता सभासदांची संख्या 172 वर गेली. अवघ्या 76 पुस्तकांनी सुरू झालेल्या या ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या पहिल्या वर्षाच्या शेवटी 598 झाली होती.
लोकमान्य टिळक आजीव सभासद
पुढच्या काही वर्षांमध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामणी केळकर, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, राजकवी यशवंत अशा मान्यवरांनी स्वतःच्या खाजगी संग्रहातील अनेक पुस्तके मराठी ग्रंथ संग्रहालयाला भेट दिली. सुरवातीपासूनच हे मराठी ग्रंथ संग्रहालय फक्त ठाण्यातल्या ग्रंथप्रेमींपुरते मर्यादित नाही अशी भावना होती. म्हणून तर मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या पहिल्या पाच आजीव सभासदांमध्ये लोकमान्य टिळकांचे नाव आढळते. त्याबरोबरच सभासदांमध्ये ठाणे, कुलाबा, पुणे, मुंबई याबरोबरच विजापूर, सौंदळे, जुन्नर, अहमदाबाद, कोल्हापूर, राजापूर, रत्नागिरी, दाहोद अशा दूर दूरच्या गावांमधील लोकांनीही ठाण्यातल्या या ग्रंथालयाचे सभासदत्व घेतले होते. त्याचप्रमाणे या ग्रंथालयातील ग्रंथ संग्रहाचा लाभ लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अशा जाणकारांनी आपल्या अभ्यासासाठी घेतला होता. 1930 मध्ये खारकर आळीच्या टोकाला मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्वतःची वास्तू ‘सरस्वती मंदिर‘ उभारण्यात आली. या वास्तूचे उद्घाटन भारताचार्य चिंतामणी वैद्य यांच्या हस्ते 8 जून 1930 रोजी करण्यात आले.
हे ही वाचा : ठाण्यातील पहिले सार्वजनिक सरकारी वाचनालय – म्युलक लायब्ररी
खारकर आळीतून स्टेशन रोडला स्थलांतर
खारकर आळीतील इमारत वाचकांसाठी गैरसोयीची ठरू लागल्याने ग्रंथ संग्रहालयाने सुभाष पथ म्हणजे जुन्या स्टेशन रोडवर जागा घेऊन नवीन इमारत बांधण्याचे ठरवले. तोपर्यंत तिथे लहानशी पत्र्याची तात्पुरती खोली बांधण्यात आली होती. सुभाष पथावरील नव्या इमारतीचे उद्घाटन 21 एप्रिल 1964 रोजी करण्यात आले. या सोहोळ्याला भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण आणि महामहोपाध्या दत्तो वामन पोतदार उपस्थित होते. ही नवी वास्तू बांधण्याआधी दहा वर्षांपूर्वी म्हणजे 1954 मध्ये नौपाड्यावरील स्वस्तिक वाचनालयाचे विलिनीकरण करुन मराठी ग्रंथ संग्रहालयाची नौपाडा शाखा सुरू करण्यात आली होती. काळ पुढे सरकत गेला, ठाणे शहर वाढलं. ग्रंथालयाच्या सभासदांची संख्या वाढू लागली आणि ग्रंथालयाच्या इमारती अपुऱ्या पडू लागल्या. त्यामुळे दोन्ही इमारती पाडून तिथे नव्या, अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा इमारती उभारण्यात आल्या. 2 जानेवारी 2010 रोजी सुभाष पथावरील मुख्य शाखेच्या नव्या पाचमजली वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. याच वर्षी नौपाडा शाखेच्या नव्याने उभारलेल्या वास्तूचे ही उद्घाटन करण्यात आले.

मराठी साहित्य संमेलनात पुढाकार
मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना करणाऱ्या वि.ल.भावे यांचे मोठेपण हे की स्वतः स्थापन केलेल्या संस्थेचे अध्यक्षपद वा अन्य मानाचे स्थान त्यांनी स्विकारले नाही. भावे यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालयाने पुढच्या काळात अनेक महत्वाच्या उपक्रमांमध्ये, कार्यक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. 1960 साली ठाण्यात 42 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या पुढाकारानेच भरवण्यात आले. त्यानंतर 2010 साली ग्रंथ संग्रहालयाच्या पुढाकारानेच 84 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आले होते. ग्रंथ संग्रहालयाच्या मुख्य इमारतीमध्ये अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासाठी सुसज्ज अभ्यासिका आहे, ज्याचा उपयोग शेकडोंना होतो.
शतकपूर्ती करणाऱ्या ग्रंथालयांचे संमेलन
2017 मध्ये ग्रंथ संग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा मुहूर्त साधून संस्थेतील दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील शतकपूर्ती करणाऱ्या ग्रंथालयांचे संमेलन 2018 मध्ये भरवून संग्रहालयाने आपल्या कल्पकतेची चुणूक दाखवलेली आहे. ग्रंथालयाचे माजी विश्वस्त ॲड. प्रभाकरराव रेगे यांनी दिलेल्या देणगीमधून गेली पंचवीस वर्षे जिल्हा स्तरीय साहित्याला कै.वा.अ. रेगे पुरस्काराने गौरवले जाते. 2018 पासून ग्रंथालयातर्फे ‘श्रीस्थानक राज्यस्तरीय ‘पुरस्कार देऊन वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा गौरवही करण्यात येतो. वाचन कट्टा, काव्य कट्टा, करिअर कट्टा असे उपक्रम सातत्याने आयोजित करुन नव्या वाचकांना ग्रंथालयाशी जोडण्याचे काम केले जाते.
हे ही वाचा : ठाण्यातले पहिले वर्तमानपत्र – अरुणोदय
आधुनिक सुविधांसोबतच मॉलमध्ये विस्तारित कक्ष
बदलत्या काळाची पावले ओळखून मराठी ग्रंथ संग्रहालयाने नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. ग्रंथालयाच्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून टॅब उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. थ्री डी प्रिंटरची सुविधाही ग्रंथालयात उपलब्ध आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचे सदस्यत्व मिळवले आहे. असे सदस्यत्व मिळवलेले हे महाराष्ट्रातली पहिले सार्वजनिक ग्रंथालय आहे. ज्ञानपीठ दालन हा सगळ्या ज्ञानपीठ विजेत्या साहित्यांच्या साहित्याचे प्रदर्शन मांडण्याचा संग्रहालयाचा अभिनव उपक्रम लवकरच पूर्णत्वाला येईल. महाराष्ट्रात प्रथमच मॉलमध्ये ग्रंथालयाचा विस्तारीत कक्ष उघडण्याचा मान मराठी ग्रंथ संग्रहालयाला मिळाला आहे. ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये मराठी ग्रंथ संग्रहालयाचा हा कक्ष लोकांचे लक्ष वेधून घेतो. आता ग्रंथालयातर्फे घरपोच ग्रंथ सेवाही सुरू करण्यात आली आहे.
132 वर्षापूर्वी वि.ल.भावे यांनी स्थापन केलेल्या या ठाणे जिल्ह्यातील पहिल्या सार्वजनिक मराठी ग्रंथालयाने काळाबरोबर वाटचाल करताना आवश्यक ते बदल करत आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आपलं रुप अद्ययावत केलेलं पाहायला मिळतं. मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे ही संस्था म्हणजे ठाणे शहराचा मानबिंदू आहे.