ओडिशामधील पुरी येथे असलेले जगन्नाथाचे मंदिर एक वैष्णव धार्मिक स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. मंदिरातील जगन्नाथ, विष्णू किंवा कृष्णाचे एक रूप मानले आहे, पण त्याची मूर्ती आणि पूजा पद्धत पारंपरिक वैष्णव परंपरेहून खूप वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. याच कारणामुळे वैष्णव संप्रदायामध्ये पुरीला विशेष महत्व आहे. येथे जगन्नाथ म्हणजेच जगाचा नाथ अशी व्युत्पत्ती सांगतली जाते.
जगन्नाथ संप्रदायाच्या उत्पती अनेक मते
एका मतानुसार – इसवी सनाच्या आठव्या ते दहाव्या शतकांत पुरूषोत्तम नावाची देवता मुख्यतः कामात्मक स्वरूपात प्रसिध्द होती. विष्णुच्या उपासनेवर तांत्रिक आणि वज्रयान संप्रदायांचा प्रभाव पडल्यामुळे ही देवता उदयास आली असे मानले जाते. विष्णु आणि काम या दोघांची उपासना एकत्रित झालेली आढळते. पुढे दक्षिण भारतीय वैष्णव संप्रदायाचा पूर्व भारतात प्रसार झाला तेव्हा, पुरूषोत्तम देवता कृष्णरूप मानली जाऊ लागली. तिचे कामप्रधान रूप हळूहळू मागे पडले. तरीसुद्धा, ‘जगन्मोह’ हे पुरूषोत्तमाचे एक विशेष बिरूद कायम राहिले. पुढील काळात तर ते इतके प्रसिद्ध झाले की लोकभाषेत आणि जनमानसात ‘पुरूषोत्तम’ नाव झाकोळले गेले.
मूळ मंदिरात पूर्वी दोनच देवता
मूळ पुरूषोत्तमाच्या मंदिरात केवळ दोन देवताच होत्या. एक पुरुष आणि एक स्त्री. ह्या देवता वैष्णव परंपरेतून उदयास आल्या असल्या तरीही त्यांचे स्वरूप तात्कालिक तंत्रसंपृक्त शक्तिपंथाच्या प्रभावाखाली घडले गेले. भक्तांनी या दोन देवतांना, पुरुषरूपातील देव आणि त्याची स्त्रीरूपातील शक्ती म्हणून अनुभवलं आणि पूजलं.
जगन्नाथपुरीतल्या मूर्तींचं वैशिष्ट्य
सध्या मात्र जगन्नाथाच्या मंदिरात तीन देवता आहेत. जगन्नाथ, त्याचा भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा. ह्या तिघांच्या मूर्ती कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या आहेत. ह्या मूर्ती रंगीत रंगांनी सजवलेल्या आणि थोडीशा खडबडीत आहेत. ह्या मूर्ती चौरस, सपाट डोके आणि चेहऱ्याशी एकरूप झालेल्या खांबांप्रमाणे आहेत. या मूर्तींना मान, कान आणि हातपाय नाहीत. त्यातील जगन्नाथाच्या मूर्तीची ओळख मोठ्या गोल चेहऱ्यामुळे होते. मूर्तीला दोन मोठे सममित गोल डोळे आहेत, त्यांना पापण्या नाहित. यातील एक डोळा सूर्याचे आणि दुसरा चंद्राचे प्रतीक मानला जातो. जगन्नाथाच्या कपाळावर उर्ध्वपुंड्र आहे. मूर्तीचा काळा रंग आणि इतर चेहरेवैशिष्ट्ये ही कृष्णाच्या विराट रूपाची अमूर्त कल्पना दर्शवतात, असं स्टार्झा या अभ्यासकाचे मत आहे. जेव्हा जगन्नाथाला बलभद्र आणि सुभद्रासोबत दाखवले जाते, तेव्हा त्याची ओळख गोल डोळ्यांमुळे सहज होते, कारण बलभद्र आणि सुभद्राच्या अमूर्त मूर्तींमध्ये डोळे अनुक्रमे अंडाकृती किंवा बदामाच्या आकाराचे असतात. त्याशिवाय बलभद्राची मूर्ती पांढ-या आणि सुभद्राची पिवळ्या रंगाची आहे. तसेच जगन्नाथाचे डोके सपाट असते, तर बलभद्र व सुभद्राची डोकी अर्धवर्तुळाकार कोरलेली असतात. दर आठ, बारा किंवा एकोणीस वर्षांनी जेव्हा अधिक ज्येष्ठ महिना येतो तेव्हा जुन्या मूर्तींचं विसर्जन करून नवीन मूर्ती घडविल्या जातात. ह्या विधीला नबकलेवर असे म्हणतात.
जगन्नाथ संप्रदायाच्या मूळ आदिवासी परंपरेत
ह्या वैशिष्ट्यपूर्णे मूर्ती आणि त्या अनुषंगाने येणा-या विधीचा अभ्यास करून अनेक अभ्यासकांनी ह्या संप्रदायाचे मूळ एखाद्या आदिवासी परंपरेमध्ये असावे असे मत मांडले आहे.
आदिवासी परंपरेमध्ये देवतांची मानवाकृती (anthropomorphic) रूपे दुर्मीळ असतात. अनेकदा आदिवासी पूजास्थाने पूर्णपणे रिकामी असतात किंवा त्यामध्ये एकच प्रतीकात्मक रूप आढळते. जसे की लाकडी खांब, मातीचे खांब, दगड, वृक्ष इत्यादी. मात्र, या प्रतीकांना हिंदू धर्मातील मूर्तीप्रमाणे पूजनीय देवतेचे अधिष्ठान लाभत नाही. जगन्नाथाच्या लाकडी मूर्तींच्या संदर्भात त्यांचा उगम शोधण्यामागे, अशा आदिवासी परंपरांचा आधार घेत गृहीतके मांडली गेली. जगन्नाथाच्या मंदिरांमध्ये लाकडी खांबांनाच मानवाकृती रूप देण्यात आले आहे आणि त्यांचे रूपांतर पुढे मूर्तीमध्ये झाले आहे असे आढळून येते.
हिंदू धर्माची सर्वसमावेशकता
हिंदू धर्मात इतर धर्म व परकीय संप्रदायांना सामावून घेण्याची आणि त्यांचं एकत्रीकरण करण्याची एक असामान्य क्षमता आहे. भारतातील आदिवासी आणि लोकधर्माच्या संदर्भात, त्यांना हळूहळू हिंदू धर्मात सामावून घेण्याच्या प्रक्रियेला “Aryanization” आणि “Sanskritization” म्हणून ओळखले जाते. मध्ययुगीन काळात या प्रक्रियेमागे दोन मुख्य कारणे होती. पहिलं म्हणजे, वाढती भक्ती चळवळ आणि दुसरं म्हणजे, नव्याने निर्माण झालेली मंदिर-संस्था. राजाश्रय लाभलेल्या या मंदिरांनी हिंदू धर्म प्रसारकाची भूमिका बजावली. पुरीतील जगन्नाथ मंदिर हे अशा विकासाचं ठळक उदाहरण आहे. त्यामुळे मूळ आदिवासी असलेली ही देवता स्वतःचे मूळ रूप टिकवत वैष्णव संप्रदायांचा एक भाग बनली.
हेही वाचा – लघुचित्रांद्वारे रामायण
सध्याचे जगन्नाथाचे मंदिर पुरी येथे बाराव्या शतकात बांधण्यात आले. या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात इ.स. 1135 नंतर, राजा अनंतवर्मन चोडगंगदेव (इ.स. 1078–1147) यांच्या दीर्घ कालावधीतील शेवटच्या दशकात झाली.