तुकाराम महाराज नित्यनेमाने वारीला येत असत. तुकाराम महाराजांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती वारीला येत असत. काही कागदपत्रांमधील नोंदींनुसार ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुका गळ्यात घालून पंढरीला येत असत. पण त्याला पालखीचं स्वरुप नव्हतं. काही कारणांनी या परंपरेत खंड पडला. आणि 1832 साली ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हैबतबाबा आरकोळकर यांनी पुढाकार घेऊन पंढरपूरला पालखी नेत या सोहळ्याला सुरुवात केली.
वारकरी म्हणजे काय?
वारंवार येणं म्हणजे वारी. जो पंढरपूरला सतत येतो आणि जातो तो वारकरी. व्यक्तीनं पंढरपूरात वारंवार येणं आणि जाणं ही संकल्पना ‘वारी’ मागे आहे. यात शिष्यानं किंवा उपासकानं गुरूकडून (दीक्षितांकडून) एकदा वसा घेतला की वर्षातून एकदा तरी पंढरपुरात येणं हा नियम आहे. काही वारकरी हे वर्षातून दोनदा किंवा वर्षातल्या चार मोठ्या एकादशीच्या दिवशी पंढरपुरात येऊन पांडुरंगाचं दर्शन घेतात. काही वारकरी तर दर महिन्याच्या एकादशीलाही विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. ही वारंवारता प्रत्येक व्यक्ती तिच्यानुसार स्वीकारते.
आषाढी एकादशीच्या पालखीचे महत्त्व
प्रत्येक महिन्याची एकादशी ही वैष्णवांकरता महत्त्वाची आहे. पण त्यातही चार एकादशींना जास्त महत्व आहे. त्यातही आषाढी एकादशीचा मान आणखीन वरचा आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळं इथल्या सर्व परंपरा, सण, उत्सव हे शेतीशी बांधले गेले आहेत. महाराष्ट्रात आषाढात जोरदार पाऊस सुरू होतो. त्याआधी मृग नक्षत्रावर पाऊस पडून पेरण्यांची काम उरकली जातात. या पेरण्या झाल्यावर वाफसा येईपर्यंत (पेरलेलं बियाणाला धुमारा फुटणे, उगवून वर येणं) शेतकऱ्याला 15 दिवस शेतात फारसं काही काम नसतं. त्यामुळं आषाढी वारीला साहजिकच जास्त महत्त्व आलं. आषाढी एकादशी ही देवशयनी आणि कार्तिकी एकादशी ही प्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. पांडुरंगानं स्वतः संत नामदेवांना सांगितलं की, “आषाढी, कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गोज पांडुरंगी”. त्यामुळं यातूनही या दोन एकादशींच्या वारीचं महत्व अधोरेखित होतं. चैत्र आणि माघ महिन्यातील वारी नंतर यात येऊन मिळाल्या आहेत.
वारीची सुरूवात कशी झाली?
संत ज्ञानेश्वरांच्याही आधीपासून पंढरपूर वारीची परंपरा असल्याचं दिसून येतं. ज्ञानोबांचे वडील पंढरपूरला वारीला आल्याचे काही जुन्या कागदांमध्ये उल्लेख आहेत. भगवान शंकर हे पहिले वारकरी असल्याचे अनेक दाखले स्कंद, पद्म इतर पुराणं आणि संत वाड्०मयात आढळतात. श्रीविष्णूची भेट घेण्यासाठी भगवान शंकर पंढरपुरात येत असल्याचा उल्लेख या साहित्यांमध्ये आढळतो.
पंढरपूर हे शैव आणि वैष्णवांचं एकत्रित क्षेत्र
वारकरी हा व्यक्ती केंद्री सप्रंदाय नसून समूहकेंद्री संप्रदाय आहे. त्यामुळेच वारीही एकट्यानं करायची नसून ती समुहानं करायची असते. घरातले सदस्यही सोबत हवेत. त्यामुळं भगवान शंकरांच्या सोबत पार्वतीमाता, गणपती, नंदी यांच्यासोबतीनंच येत असल्याचे दाखले पंढरपुरात मिळतात. पद्मावतीच्या इथं पार्वती दमल्यानं विश्रांतीकरता थांबली, नदीजवळ नंदी दमून थांबला ते मारुतीपाशी, पुढं गणपतीही थांबला आणि भगवान शंकर एकटेच श्रीविठ्ठलाला भेटले. अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांची, उज्जैन (अवंतिका) आणि द्वारका या सप्त पुरींमधील काही क्षेत्र केवळ शिवाची तर काही क्षेत्र केवळ विष्णूची म्हणून मान्यता आहे. कांचीमध्ये शिव आणि विष्णू आहेत पण त्यामध्येही अंतर आहे. मात्र पंढरपूरात हरी आणि हर या दोघांमध्येही भेद नाही.
पालख्यांच्या प्रस्थानाचे दिवस
पालखी सुरू होण्याचा प्रत्येक संस्थानाचा दिवस हा ठरलेला आहे. ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला तुकाराम महाराजांचं प्रस्थान होतं. तर ज्ञानेश्वर महाराज पंढरपुराकरता ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला निघतात. तुकाराम महाराज देहूतून निघून आळंदीत यायचे मग पादुका घेऊन पंढरपूरकरता निघायचे. त्यामुळं आताही तुकाराम महाराजांची पालखी आधी निघते. याच सुमारास नाथ महाराजांच्या पालखीचंही प्रस्थान होतं. ज्याला त्याला पायी चालत पंढरपूरला पोहचायला किती दिवस लागतात, यानुसार प्रस्थानाचे दिवस ठरवले आहेत.
कर्नाटकातील घोड्यांना पालखीत मानाचं स्थान
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत शितोळे सरकारांच्या घोड्यांना मानाचं स्थान आहे. शितोळे मूळचे पुण्याचे सरदार. उत्तर हिंदुस्थानात महादजी शिंदेंसोबत राहिल्यामुळे शितोळ्यांचा पराक्रम वाढत गेला. शितोळ्यांनी एका लढाईत विशेष पराक्रम गाजवत निजामाच्या तावडीतून राघोबादादांना सोडवलं. त्यावेळी माधवराव पेशव्यांकडून कर्नाटकातील काही गावे बक्षिस मिळाली. यात कर्नाटकातील अंकली गावाचाही समावेश आहे. पालखीचे आद्यप्रवर्तक हैबतबाबांचं शिंदे घराणंही सरदार घराणं. शितोळे आणि हैबतबाबा दोन्ही घरांमध्ये वारीची परंपरा होती. दोन्ही घरांमध्ये सोयरिकही होती. पालखी सोहळा करण्याचं ठरल्यावर हैबतबाबांनी शितोळे सरदारांना यात योगदान देण्याची विनंती केली. शितोळेंनी या पहिल्या पालखीसोहळ्यासाठी या पालखीची सुरक्षा, तीन वेळची पूजा, व्यवस्था याकरता सुमारे पाचशे लोकांचा जमाव दिला. सोहळ्याचा खर्च, माऊलींच्या इतमामासाठी घोडे ही व्यवस्था शितोळेंकडून करण्यात आली. एका घोड्यावर माऊली स्वार असतात तर सुरवातीच्या घोड्यावर जरी पटका असतो. अंकलीहून ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला हे घोडे निघतात. सुमारे साडेतीनशे किलोमीटर अंतर चालत हे घोडे ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला आळंदीत पोहचतात. त्यांना माऊलींच्या समाधीचं दर्शन दिलं जातं, पेढे खाऊ घालतात.
पालखी आणि मानाच्या दिंड्या
माऊलींच्या रथाच्या मागे आणि पुढे दिंड्यांचे प्रकार आहेत. या प्रत्येक दिंडीला क्रमांक देण्यात आले आहेत. माऊलींच्या प्रस्थानाच्या दिवशी पुढे बावीस दिंड्या आणि मागच्या दिंड्या माऊलींच्या वाड्यामध्ये प्रदक्षिणा घालून आत येतात. परंपरेने या प्रत्येक दिंडीची जागा ठरलेली आहे. त्या जागेवर येऊन या दिंड्या भजन करत उभ्या राहतात. या भजनात खेळीया असतो. खेळीयाचे अनेक प्रकार आहेत. माऊलींच्या कारंजा मंडपात परंपरेने ठरलेले मानकरी येतात. या मानकऱ्यांचं माऊली, विठ्ठल-रखुमाई, पंढरपूर, वारकरी संप्रदाय, सेवा यामध्ये काही ना काही योगदान आहे. माऊलीच्या पादुका समाधीवर ठेवण्यात येतात. वासकर, शितोळे आणि आरमाळकर हे या सोहळ्यातील महत्त्वाचे तीन मानकरी आहेत. संस्थानाचे चोपदार या मानकऱ्यांना आमंत्रण देऊन बोलावतो. हे मानकरी आपल्या दिंड्या घेऊन येतात. सर्वात शेवटी शितोळे सरकार येऊन माऊलींच्या समाधीपाशी जातात. हैबतबाबांचे विद्यमान वंशज माऊलींची आरती करतात. त्यानंतर संस्थान आरती करते. यानंतर पादुकांना समाधीवरून उचलून पालखीत ठेवण्यात येते. यावेळी पिवळ्या रंगाच्या कापडाच्या पुरचुंडीमध्ये नाणं, हळकुंड, तांदूळ, सुपारी हे जिन्नस बांधून ते पादुकांच्या खाली ठेवतात. पुढील प्रवासात कोणतंही विघ्न येऊ नये या आशेनं ही पुरचुंडी ठेवली जाते. या पादुका पालखीत ठेवण्याचा मान पंढरपूरमधील बडवे कुटुंबाला आहे. पण आता काळानुरुप संस्थानच्या विश्वस्तांकडून या पादुका पालखीत ठेवण्यात येतात.
अठरा आकड्याचा संबंध
सुमारे अठरा दिवसांनी म्हणजेच आषाढ शुद्ध दशमीला या पालख्या पंढरपुरात पोहचतात. ज्ञानेश्वरीमध्ये एकूण अठरा अध्याय आहेत. या अठरा दिवसांत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत ज्ञानेश्वरीतील एका अध्यायाचं रोज क्रमानं वाचन केलं जातं.
हेही वाचा – विश्वदेवाकडे येणारे रस्ते
(पंढरपूर नगरपरिषदेचे निवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल जोशी यांनी पंढरपूरच्या इतिहासाचे अभ्यासक अॅड आशुतोष बडवे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचे शब्दांकन)