पारंपारिक शेतीला छेद देत सीताफळाची लागवड; दौंडच्या शेतकऱ्याची यशोगाथा

Farming : पुण्यातल्या दौंड इथल्या एका एमबीए केलेल्या तरुणानं शेतीला प्राधान्य दिलं आहे. स्थानिक पारंपरिक पिकाला फाटा देत त्यानं वेगळं पिक घेत वर्षाला लाखो रुपयाची कमाई केली आहे. नव्या जाणून घेऊयात दौंडच्या शेतकऱ्यांची यशोगाथा.
[gspeech type=button]

अलिकडे अनेक तरुण हे शेती क्षेत्राकडे वळत आहेत. उच्च शिक्षण घेतल्यानंतर कॉर्पोरेट जगतात चांगल्या नोकऱ्या मिळवूनही काही वर्षांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती करण्याला प्राधान्य देत आहेत. यामध्येही पारंपारिक शेती ऐवजी प्रायोगिक शेती करण्याला प्राधान्य दिलं जातं आहे. 

पुण्यातल्या दौंड इथल्या एका एमबीए केलेल्या तरुणानंही शेतीला प्राधान्य दिलं आहे. स्थानिक पारंपरिक पिकाला फाटा देत त्यानं वेगळं पिक घेत वर्षाला लाखो रुपयाची कमाई केली आहे. नव्या जाणून घेऊयात दौंडच्या शेतकऱ्यांची यशोगाथा.

कृषी पदवीधर तरुण शेतकरी

पुण्यातील दौंड तालुक्यामधील श्रीधर दिवेकर यांनी वडिलोर्पाजित पारंपरिक ऊसाच्या शेतीला छेद देत सीताफळाची शेती करायला सुरुवात केली आहे. वर्षाकाठी सीताफळाच्या उत्पादनातून ते प्रति एकर 6 लाख रुपयांची कमाई करतात.

श्रीधर यांच्या आजोबांपासून घरच्या जमिनीत ऊसाचीच शेती केली जात असे. यातून त्यांना घरखर्च निघेल इतकच उत्पन्न मिळत होतं. श्रीधर यांनी कृषी विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी करण्याऐवजी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. एकीकडे शेती सुरु असतानाच 2022 साली त्यांनी पुण्यातून एमबीएचं शिक्षणही पूर्ण केलं.  

शेती हा मुख्य व्यवसाय म्हणून करताना सध्याच्या ऊस शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून स्थिरस्थावर होता येणं अशक्य असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यामुळे ऊसाच्या ऐवजी कमी शेतखर्च आणि जास्त उत्पन्न मिळवून देईल अशा पिकाची लागवड करण्याचं त्यांनी ठरवलं.  

सीताफळाची लागवड करण्याचा निर्णय

काही पिकांची लागवड, त्यांची घ्यावी लागणारी काळजी, त्याचा खर्च आणि मिळणारं उत्पन्न यावर  संशोधन केल्यानंतर श्रीधरने  सीताफळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने सीताफळाची एनएमके-01 गोल्डन ही जात निवडली. एनएमके-01 गोल्डन या जातीच्या सीताफळांचं उत्पादन चांगलं मिळतं. शिवाय या जातीच्या फळामध्ये बियांचं प्रमाण कमी असतं, गर (पल्प) खूप जास्त असतो. या गरापासून विविध उत्पादने तयार करण्यासाठी हा गर दीर्घकाळ साठवू (स्टोअर) करु शकतो. त्यामुळे या जातीतल्या सीताफळांना बाजारातही मोठी मागणी आहे. यूएई, सौदी अरेबिया, कॅनडा आणि काही युरोपीयन देशांमध्ये भारतीय सीताफळाची निर्यात केली जाते. 

हे ही वाचा : कृष्णाकाठच्या प्रगतशील महिला शेतकरी नूतन मोहिते

किफायतशीर शेती

प्रक्रियायुक्त पदार्थांच्या व्यवसाय क्षेत्रामध्ये सीताफळाच्या पल्पला चांगली मागणी आहे. आइसक्रीम, ज्यूस, मिल्कशेक अशा वेगवेगळ्या अन्नपदार्थांसाठी त्याचा वापर होतो. त्यामुळे सीताफळाची शेती ही किफायतशीर शेती आहे, असं श्रीधर याने सांगितलं. 

2016 साली सोलापूरमधल्या बार्शी  इथून एका नर्सरीमधून त्याने एनएमके-01 गोल्डन जातीची रोपं आणली. त्याने या नर्सरीतून 1,148 रोपं खरेदी केली. एक रोप 75 रुपयाला पडलं. एका एकरमध्ये 350 ते 400  रोपं लावली जातात. दोन रोपांमध्ये 8 फूटाचं अंतर ठेवलं. तसंच दोन ओळींमध्ये 14 फूटाचं अंतर ठेवून 2016 च्या जून महिन्यात या रोपांची लागवड केली. 

सीताफळासाठी शेतात पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा झाला पाहिजे. शेतात पाणी साचून राहिलं तर रोपांची मूळं कुजून मरू शकतात. श्रीधर यांच्या शेतात काळी माती होती. त्यामुळे मग त्यांनी वाफे तयार करुन त्यावर रोपटी लावली. यामुळे पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होऊ लागला. चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी मातीमध्ये pH चं प्रमाण हे 6.5 – 8.5  दरम्यान असणं आवश्यक असतं, त्यापेक्षा ते जास्त नसावं.

या रोपांवर रोग येण्याची, किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. पण या रोपांचं पांढऱ्या बुरशीपासून संरक्षण करावं लागतं. ही पांढरी बुरशी फळाला लागली तर फळ खराब होतं. परिणामी उत्पादन घटतं. अन्यथा एका झाडातून साधारण 20 ते 30 किलो उत्पादन मिळतं. 

उत्पादन आणि उत्पन्न

श्रीधरने 2016 साली सीताफळाची लागवड केल्यानंतर चौथ्यावर्षी म्हणजे 2020 पासून सीताफळं यायला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी एका झाडाला सरासरी 5 किलो सीताफळं आही. वर्षागणिक यामध्ये वाढ होत गेली. 2024 साली श्रीधरने प्रत्येक झाडावरुन साधारणत: 22 किलो सीताफळं काढली. प्रति किलो 80 रुपये दराने त्याची विक्री केली. 

गेल्या हंगामामध्ये त्यांनी तीन एकर शेतीतून 18 लाख रुपये कमावले. पूर्वी उसाच्या शेतीतून वर्षाला 2.5 ते 3 लाख उत्पन्न मिळायचं. त्याहून दुप्पट उत्पन्न हे आता सीताफळाच्या शेतीतून मिळत आहे. सिंचन, मजूर आणि इतर देखभालीचा खर्च वजा करता श्रीधरला या शेतीतून 14 लाख रुपयाचा नफा झाला आहे. 

 हे ही वाचा : पुण्यात ‘आंतरराष्ट्रीय’ आंब्यांची यशस्वी लागवड!

सीझनपूर्वीच फळ बाजारात आल्याने दर चांगला मिळतो

श्रीधर हे सीताफळाच्या उत्पादनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहत नाहीत. त्यांनी त्यांच्या शेतात ठिंबक सिंचनाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यावर सीताफळाचा हंगाम सुरु होण्यापूर्वीच वा सुरुवातीलाच श्रीधर यांच्या शेतातून सीताफळ बाजारात येतात त्यामुळे त्यांना चांगले दर मिळतात. 

ठिंबक सिंचनाच्या व्यवस्थेसाठी त्याने प्रति एकर 80 हजार रुपयाचा खर्च केला आहे. या ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी आणि अन्य पोषकमूल्य ही थेट झाडाच्या मुळाशी जातात. अनेकदा झाडांच्या मुळाशी खतं किंवा औषध फवारणी केली जाते आणि पावसाचं पाणी आलं की, मग ते सगळं पाण्यासोबत वाहून जातं. याऐवजी झाडांना आवश्यक आहे, तेवढंच पाणी ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून दिलं तर खतं, पाणी, औषधांचा पुरेपुर फायदा झाडांना मिळतो. 

अवशेष मुक्त शेतीवर भर

ठिंबक सिंचनासोबतच श्रीधर हे रिसायड्यु – फ्री शेती म्हणजे अवशेष मुक्त शेती करण्यावर भर देतात. अवशेष मुक्त शेती म्हणजे, झाडांचं आणि त्यावरील फळाचं बुरशी वा किडीपासून संरक्षण करण्यासाठी सरकारमान्य औषधांचा प्रमाणात वापर केला जातो. मात्र, या रसायनांचा वापर आणि फळ तयार होण्यामध्ये पुरेसं अंतर ठेवलं जातं. जेणेकरुन हे फळ ग्राहकांना मिळेपर्यंत त्यावर फवारलेल्या रसायनांचा अंमल संपलेला असेल.  परिणामी सेंद्रीय खतांचाच वापर केला जातो. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

International Mango Cultivation : जपानचा मियाझाकी हा आंबा सुद्धा त्याच्या रंगाच्या वैविध्यामुळे प्रसिद्ध झालेला आहे. महत्वाचं म्हणजे हा आंबा आता
Pune Riverfront Project : पुण्यातल्या मुळा-मुठा या नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी पुणे पालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये नदी
Shingroba Temple : आजही देशावरून जेव्हा धनगर बांधव कोकणात मेंढ्या घेऊन उतरतात, तेव्हा शिंग्रोबाच्या मंदिरात ही लोकं मेंढीच्या पान्हातून थेट

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ