महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारा पहिला जिल्हा ठरला आहे. 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सिंधुदुर्गमध्ये एआय प्रणाली सुरू करण्यात आली.
सिंधुदुर्ग बनला ‘स्मार्ट’ जिल्हा
या एआय प्रणालीमुळे जिल्ह्यातील लोकांना खूप फायदा होणार आहे. कमी वेळेत चांगल्या सुविधा मिळतील. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षणात इतर जिल्ह्यांपेक्षा पुढे आहे. दरडोई उत्पन्नातही सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातून पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आहे. टँकरमुक्त जिल्हा म्हणून पण सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. आणि आता ‘एआय जिल्हा’ म्हणून सिंधुदुर्गची नवीन ओळख निर्माण होत आहे.
नागरिकांना मिळणार जलद सेवा
सिंधुदुर्ग जिल्हात आता एआयचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी करण्यात येत आहे. एआय प्रणालीचा वापर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांनाच खूप फायदेशीर ठरणार आहे. जिल्हा परिषद, तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयातील कामासाठी आता कमी वेळ लागेल. कारण एआयमुळे अनेक कामं लवकर , पारदर्शकपणे आणि अधिक कार्यक्षमतेने होतील. यामुळे लोकांच्या रोजच्या व्यवहारात देखील चांगले बदल होतील.
शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी मित्र’
एआय प्रणालीचा सगळ्यात मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यांच्यासाठी ‘शेतकरी मित्र’ नावाची नवीन सुविधा ऊपलब्ध होणार आहे. याचा उपयोग एक डिजिटल मदतनीस म्हणून होईल. यामुळे शेतकरी कमी पाणी आणि कमी खतं वापरून जास्त पीक घेऊ शकतील. तसेच त्यांना वेळेवर शेतीबद्दलची माहिती मिळेल आणि त्यांना शेतीचं नियोजन व्यवस्थित करता येईल. शेतकऱ्यांना यातून आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल.
आरोग्य आणि कृषी क्षेत्रात नव्या संधी
एआयमुळे एक्स-रे तपासणी किंवा आजाराचं निदान आणि त्यावरचे उपचार आता लवकर होतील. डॉक्टरांना अचूक माहिती आणि आकडेवारी मिळाल्यामुळे ते लवकर निर्णय घेऊ शकतील. कृषी क्षेत्रातही एआयमुळे खतांचा आणि पाण्याचा वापर किती करायचा, ते नियंत्रित ठेवता येईल. यामुळे शेतीतलं उत्पादन वाढायला मदत होईल.
पोलीस आणि वन विभागाला विशेष मदत
पोलिसांना आता कायदा-सुव्यवस्था राखायला आणि गुन्हे थांबवायला एआयची मदत होईल. घरफोडी किंवा चोरीसारख्या घटनांवर लक्ष ठेवणं आणि चोरांना शोधून काढणं या तंत्रज्ञानामुळे आता सोपं होईल.
वन विभागासाठी पण एआय खूप उपयोगी ठरेल. जंगलातल्या प्राण्यांच्या हालचालींवर आणि त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवण्यासाठी एआय मदत करेल. या माहितीच्या आधारे म्हणजेच, जर लोकांना काही धोका असेल उदा. एखादा प्राणी गावात आला असेल तर , त्याची माहिती आधीच मिळेल आणि लोकांना सावध करता येईल.
एकंदरच एआयच्या वापरामुळे सिंधुदुर्गमधील नागरिकांचे सर्व व्यवहार आता जलद आणि चांगल्या दर्जाचे होतील, अशी आशा आहे.