लोकसभा निवडणूक 2024 पासून देशात वाढलेल्या मतदारांची संख्या हा चर्चेचा विषय झाला आहे. मतदारांची संख्या, मतदानाचा वाढलेला टक्का, महिला मतदार यासगळ्या बाबींमुळे पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. यासगळ्या धर्तीवर बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाकडून मतदार यादी पडताळणी केली जात आहे. या पडताळणीनुसार निवडणूक आयोगाने 35 लाखाहून अधिक मतदारांची नावं मतदार यादीतून काढून टाकणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
यामध्ये ज्या मतदारांचा मृत्यू झाला आहे, ज्या मतदारांना परदेशातलं नागरिकत्व मिळालेलं आहे किंवा जे देशाच्या अन्य राज्यात कायमस्वरुपी स्थायिक झाले आहेत आणि ज्या मतदारांची नावं राज्यातच दोन वेगवेगळ्या ठिकाणी आढळलं आहे, अशा मतदारांची नावं या मतदार यादीतून वगळली जाणार आहेत.
83 टक्क्याहून अधिक पडताळणी फॉर्म
सोमवार दिनांक 14 जुलै 2025 रोजी निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आयोगाकडे 83.66 टक्के पडताळणीसाठी मिळालेले आहेत. या फॉर्मनुसार, 1.59 टक्के म्हणजे 12 लाख 55 हजार 620 मतदारांचा मृत्य झाला आहे. तर 2.2 टक्के म्हणजे 17 लाख 37 हजार 336 मतदारांनी कायमस्वरुपी अन्य ठिकाणी स्थलांतरण केलेलं आहे. याशिवाय 0.73 टक्के म्हणजे 5 लाख 76 हजार 479 मतदारांची दोन – दोन ठिकाणी नावं असल्याचं आढळलं आहे. अशा एकूण 35 लाख 69 हजार 435 मतदारांची नावं बिहार विधानसभा निवडणूकीच्या मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. ही प्रक्रिया अजूनही सुरुच असल्याने या संख्येत वाढ होणार हे निश्चित आहे.
11.82 मतदारांची पडताळणी प्रक्रिया बाकी आहे
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण 7 कोटी 89 लाख 69 हजार 844 मतदारांपैकी 6 कोटी 60 लाख 67 हजार 208 मतदारांचे पडताळणी प्रक्रिया फॉर्म आयोगाला मिळाले होते. आता फक्त 11.82 मतदारांची पडताळणी प्रक्रिया बाकी आहे. जुलै अखेरपर्यंत ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यापैकी अनेक मतदारांनी आपले फॉर्म भरले असून त्यांची कागदपत्रे सादर करायची आहेत. ही कागदपत्रे आयोगाला मिळाल्यावर प्रक्रिया पूर्ण होईल.
आयोगाच्या ईसीआई-नेट या संकेतस्थळावर सोमवार दिनांक 14 जुलै 2025 च्या संध्याकाळपर्यंत 5.74 फॉर्म अपलोड केले गेले होते.
प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे
मतदानामध्ये प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे म्हणून बिहार निवडणूक आयोगाने विशेष मोहिम हातात घेतली आहे. या अंतर्गत पडताळणी प्रक्रिया पुर्ण झाल्यावर तिसऱ्या टप्प्यात 1 लाख बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) घराघरात जाऊन भेटी देणार आहेत. त्यांच्यासोबत 1.5 लाख बीएलए (बूथ लेव्हल एजंट) ही असणार आहेत. दर दिवशी किमान 50 फॉर्म त्यांना संकलित करुन तपासायचे आहेत.
तर, शहरी भागामध्ये वॉर्ड पातळीवर शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे. त्यानुसार शहरातली 261 ठिकाणं निवडून तिथल्या 5,683 वॉर्डमध्ये मतदार यादी शिबिर होणार आहेत.
स्थलांतरित मतदारांनाही विशेष सूचना
बिहारमधल्या अनेक मतदारांनी नोकरीच्या निमित्ताने देशातल्या वेगवेगळ्या भागात स्थलांतरण केलेलं आहे. पण हा मतदार मतदानासाठी राज्यात परतत असतो. यासाठी निवडणूक आयोगाने अशा सर्व मतदारांना वृत्तपत्राच्या माध्यमातून सूचना दिलेल्या आहेत. तसेच आयोगाच्या ईसीआईएनईटी या ॲप वर किंवा संकेतस्थळावर जाऊन पडताळणी फॉर्म भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जर डिजिटल पद्धतीने हे पडताळणी फॉर्म भरणं शक्य नसेल तर कुटुंबियांच्या मदतीने किंवा थेट बीएलओशी संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे.