AI तंत्रज्ञान आता सगळ्याच क्षेत्रात वापरता येत आणि AI मुळे आपली कामं लवकर होत आहेत. AI तंत्रज्ञानाची आपल्या आरोग्य क्षेत्रातही मोठी मदत होत आहे. दिल्लीमध्ये भारताचं पहिलं ‘AI-शक्तीवर चालणारं MRI स्कॅनर’ सुरू झालं आहे. याला ‘एक्सेल 3T’ (Excel 3T) असं म्हणतात.
हे AI-MRI स्कॅनर खास का आहे?
सध्या वापरात असणाऱ्या MRI स्कॅनरमध्ये तपासणीसाठी खूप वेळ लागतो. पण AI तंत्रज्ञान असलेल्या या नवीन मशीनमुळे तपासणीसाठी लागणारा वेळ जवळपास अर्धा झाला आहे. म्हणजे, जी तपासणी करायला आधी एक तास लागायचा, ती आता फक्त 30-40 मिनिटांत होते. या AI मशीनच्या मदतीने खूप स्पष्ट आणि शार्प फोटो येतात यामुळे डॉक्टरांना आजार ओळखणं सोपं होणार आहे. हे मशीन खास करून हृदय, मेंदू आणि हाडांच्या समस्या तपासण्यासाठी खूप उपयोगी आहे.
अनेकदा MRI तपासणी करताना रुग्णांना बराच वेळ एकाच स्थितीत पडून राहावं लागतं, यामुळे त्यांना त्रास होतो. खासकरून वयस्कर व्यक्तींना, लहान मुलांना किंवा ज्यांना बंद जागेत भीती वाटते अशा व्यक्तींना याचा त्रास होतो. पण या नव्या मशीनचा वापरामुळे आता तपासणीसाठी वेळ कमी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना होणारा त्रास देखील कमी होतो.
AI आता फक्त भविष्यातली कल्पना राहिलेली नाही, तर ते आता प्रत्यक्ष उपचारात उपयोगी पडणारं साधन झालं आहे. AI मुळे स्कॅनमध्ये येणारे जे ‘आर्टिफॅक्ट्स’ असतात, ते खूप कमी होतात. त्यामुळे फोटो 50% पर्यंत जास्त स्पष्ट आणि अचूक येतात.
हृदयाच्या MRI मध्ये हे खूप महत्त्वाचं आहे, कारण अगदी लहानसा बदलही लवकर ओळखता आल्यास उपचारात मोठा फरक पडतो.
भारतातील वाढत्या आजारांवर या AI तंत्रज्ञानाची कशी मदत होईल?
भारतात आजकाल संसर्ग नसलेल्या आजारांचं (Non-Communicable Diseases – NCDs) प्रमाण वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 63% मृत्यू NCDs मुळे होतात आणि 27% मृत्यू हे हृदयविकारामुळे
होतात. यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे, पाश्चिमात्य देशातील लोकांच्या तुलनेत भारतीयांमध्ये जवळपास 10 वर्षे लवकर हृदयविकाराचे आजार होतात. आणि 40 ते 69 वयोगटातील मृत्यूंपैकी 45% मृत्यू हृदयविकारामुळे होतात.
एवढं असूनही, चांगल्या दर्जाच्या तपासणी सुविधा अजूनही सगळ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. अशा वेळी AI-तंत्रज्ञानावर आधारित तपासणी पद्धती खूप महत्त्वाच्या ठरतात. दिल्लीतील एका हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, ‘भारतासारख्या जास्त रुग्णसंख्या असलेल्या देशात जिथे डॉक्टर्स आणि तज्ज्ञांची संख्या कमी आहे. आणि तपासणीला उशीर होतो, तिथे AI मुळे जलद फोटो तपासणीला मदत होईल आणि कामातील चुका पण कमी होतील. AI तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात डेटा तपासला जातो आणि त्यातल्या समस्या शोधून डॉक्टरांना आजार ओळखायला मदत होते. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी होणार आहे.
हे AI तंत्रज्ञान भविष्यात उपयोगी येईल?
दिल्ली सरकारला आरोग्यसेवेत सरकारी आणि खाजगी भागीदारी वाढवायची आहे. दिल्लीचे राज्यपाल, विनय कुमार सक्सेना यांनी सांगितलं की, ‘आजकाल हृदयविकार संबंधित आजार वाढत आहेत. दिल्लीतील प्रत्येक रहिवाशाला कमी खर्चात तपासणी सुविधा मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.’ त्यांनी इतर दवाखाने आणि निदान केंद्रांनाही पुढे येऊन या बदलात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
सध्या भारतात AI वर आधारित बहुतेक आरोग्य सेवा मोठ्या शहरांमध्ये खाजगी कंपन्यांकडून दिल्या जातात. त्यामुळे सरकारी दवाखाने आणि गावाकडील आरोग्य केंद्रांपर्यंत ही सुविधा अजून पोहोचलेली नाही. AI चे फायदे सगळ्यांना मिळावेत यासाठी तज्ज्ञांच्या मते, भारताला मजबूत नियम, एकत्र काम करण्याची सोय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी AI वापरण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे.