पेणमधल्या गणेशमूर्ती
मुंबईपासून 67 किमी अंतरावर असणारे पेण हे शहर गणेशमूर्ती घडवण्याचे महत्त्वाचे उत्पादन केंद्र आहे. शाडू माती आणि प्लास्टरनं गणपती तयार करणे हा पेणमधील लोकांचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. गणपती मूर्तींसोबतच शाडू माती आणि प्लास्टरचे गौरी मुखवटे ही देखील स्थानिक कारागिरांची खासियत आहे. सध्या पेण शहर आणि तालुक्यात एक हजाराहून अधिक गणपती मूर्ती कार्यशाळा आहेत.
तब्बल एक लाखाहून अधिक व्यक्ती या व्यवसायाशी विविध स्वरुपात जोडल्या गेल्या आहेत. आता तुम्हांला लक्षात आलं असेलच की, किती मोठी रोजगार क्षमता या व्यवसायानं पेण इथं निर्माण केली आहे. सध्या इथं घडवलेल्या गणपती मूर्ती आणि गौरींच्या मुखवट्यांना मुंबई आणि पुण्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात मागणी आहे.
गणपती कार्यशाळेची मुहुर्तमेढ
पेणमध्ये या व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवण्यासाठी पेणमध्येच स्थायिक झालेल्या देवधर कुटुंबाचे फार मोठे योगदान आहे. सध्या ह्या कुटुंबातील चौथी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे. या व्यवसायाची सुरुवात भिकाजी कृष्ण देवधर यांनी केली. त्यांना भिकू टिकली म्हणूनही ओळखले जातं. 1875-80 च्या दरम्यान ते कोकणातून पेण इथं उपजीविकेसाठी स्थलांतरित झाले. मूळचे कलाकार असल्याने भिकाजी देवधर वर्षभर विविध कलाकुसरीची कामे करत असत. उदा. पगड्या बांधणे, पताका बनवणे, गणेशमूर्ती तयार करणे, इत्यादी. त्यांना स्थानिक जमिनदारांनी प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळ दिलं.
पूर्वी भाद्रपद चतुर्थीला धर्मशास्त्रानुसार अंगणातील किंवा नदीकाठच्या मातीची मूर्ती घडवून गणेशाची प्रतिष्ठापना करण्याची पद्धत घराघरांत होती. जात्यात कलाकार असल्याने त्यांनी पेणमधील स्थानिक लोकांच्या मदतीने गणेशमूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. या मूर्त्या आकर्षक आणि सुंदर असल्याने त्यांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पण सध्या असलेले व्यावसायिक स्वरुप मात्र, तेव्हा या कार्याला प्राप्त झालेले नव्हते. ज्याला आपण वस्तू विनिमय प्रणाली (बार्टर सिस्टिम) म्हणतो त्या पद्धतीने हे व्यवहार होत होते. धान्याच्या किंवा इतर उपलब्ध वस्तूंच्या बदल्यात गणेशमूर्ती दिल्या किंवा घेतल्या जायच्या.
मूर्तीकामाला व्यावसायिक रूप
पुढे लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिल्यानंतर मूर्तीकामाच्या या व्यवसायाला चांगले दिवस आले. भिकाजी कृष्ण देवधरांच्या मुलानेही हेच काम सुरु ठेवले. त्यांचे नाव बाबुराव देवधर. ते समुद्रमार्गे मुंबईला गणपतीच्या मूर्ती पाठवित असत. अशाप्रकारे या पिढीत गणेशमूर्ती पेणमधून बाहेर पाठविल्या जावू लागल्या. यातूनच देवधरांचा कौटुंबिक व्यवसाय भरभराटीला आला. पण तरीही यादरम्यान ही कला स्थानिक पातळीवरच विकसित होत होती.
1920 नंतर देवधरांची पुढची पिढी राजाभाऊ देवधर आणि वामनराव देवधर यांनी या घरगुती व्यवसायाला कारखानदारीचे स्वरुप दिले. या पिढीत कौटुंबिक व्यवसाय विभक्त झाला. राजाभाऊ देवधर आणि वामनराव देवधर स्वतंत्रपणे गणेशमूर्ती बनवू लागले. मग मजूरी, कारागिरी, इतर संलग्न कामे जसे रंगकाम, वाहतूक इ.साठी कामगारांची गरज भासू लागली. त्यातून स्थानिकांना जवळपास वर्षभर रोजगार मिळू लागला.
मूर्तीकामातील तंत्र
देवधर कुटुंब मुंबईस जावून गणपती आणि गौरींचे प्लास्टरच्या मूर्ती बनविण्यासाठी लागणारे साचे बनविण्याचे तंत्र शिकून आले. म्हणून पेण इथं गणपतीचे साचे तयार करणारे हे पहिले कुटुंब आहे. पर्यायाने 1980 नंतर शाडूमातीसोबतच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती तयार होऊ लागल्या. कारण तुलनेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती जास्त टिकावू असतात. त्यामुळे मूर्ती दूरवर पाठवणे शक्य होऊ लागले आहे. याच दरम्यान राजाभाऊ देवधर आणि वामनराव देवधर यांच्याकडे काम करणा-या काही कारागिरांनी स्वत:चा गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय स्वतंत्रपणे सुरू केला आणि हा व्यवसाय पेणमध्ये पुढे भरभराटीस आला.
गणेशमूर्ती कलेला आंतरराष्ट्रीय ओळख
देवधर कुटुंबातील यापुढच्या पीढीत, राजाभाऊ देवधर आणि वामनराव देवधर यांच्या मुलांनी, म्हणजेच आनंद आणि श्रीकांत यांनी गणेशमूर्तींचा व्यवसाय सुरु ठेवला. परंपरेने मिळालेल्या कलेला श्रीकांत देवधरांनी जे जे स्कूल ऑफ आर्टसमधून कलेचे तांत्रिक शिक्षण घेवून वेगळे आयाम दिले. यामुळे श्रीकांत देवधरांनी त्यांच्या व्यवसायाला वेगळे स्वरूप दिले. पूर्वी श्रीकांत देवधर परंपरेने चालत आलेल्या व्यवसायाला अनुसरून गणेशमूर्ती बनवित. पण सध्या श्रीकांत देवधर यांनी गणेशमूर्ती तयार करणे बंद केले आहे. एक कलाकार म्हणून ओळख असल्याने ते जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी गणपती मूर्ती घडवण्याच्या कार्यशाळा आणि व्याख्याने घेतात. अशाप्रकारे पेण मधील गणेशमूर्ती घडवण्याच्या कलेला त्यांनी आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या वडिलांनी घडवलेल्या सर्व गणेशमूर्तींचे आणि गौरींच्या मुखवट्यांचे उत्कृष्ट नमुने त्यांनी जपून ठेवले आहेत.
आनंद देवधरांचा गणपतीमूर्ती आणि गौरी मुखवटे घडवण्याचा व्यवसाय आजही छोट्या प्रमाणावर सुरु आहे. त्यांचा विशिष्ट ग्राहकवर्ग दरवर्षी गणेशमूर्ती आणि गौरींचे मुखवटे घेण्यासाठी त्यांच्या कार्यशाळेला भेट देतो. याशिवाय आनंद देवधर इतर अनेक प्रकारच्या, देवांच्या, संतांच्या, वगैरे मूर्ती मागणीनुसार तयार करून देतात. त्यांच्या वडिलांनी आणि त्यांनी घडवलेल्या मूर्तींचे एक छोटे संग्रहालयही त्यांच्या कार्यशाळेजवळच आहे. आनंद आणि श्रीकांत देवधर यांची पुढची पिढी मात्र या व्यवसायात नाही. त्यामुळे आनंद आणि श्रीकांत देवधर ह्यांची ह्या क्षेत्रात काम करणारी शेवटची पिढी आहे असं म्हणावे लागेल.
मूर्तीकलेने पेणची भरभराट
अशा प्रकारच्या मूर्ती घडवण्याचा व्यवसाय महाराष्ट्रातील प्रत्येक गावात स्थानिक स्वरूपात आहे. पण मग हा व्यवसाय पेण येथेच अधिक विकसित का झाला? देवधर कुटुंबाची कलासक्तता, त्यांचे हा व्यवसाय प्रस्थापित करण्यामागचे प्रयत्न आणि चार पिढ्यांचे सलग योगदान ही ह्यामागची महत्वाची कारणे आहेत. पण त्याव्यतिरिक्त पेण गावात उपलब्ध असणारी स्वस्त मजूरी आणि स्थानिक लोकांचे या कलेला वाहिलेले योगदान, यामुळे हा व्यवसाय पेणमध्ये भरभराटीला आला. तसेच मुंबई आणि पुणे या दोन मुख्य बाजारपेठांच्या मध्यभागी असल्यानं पेण हे गाव महाराष्ट्रातील प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून विकसित झाले.
पेणचे गणपती ब्रँन्ड
देवधर कुटुंबाने गणेशमूर्ती घडवण्याचा व्यवसाय पेण शहरात सर्वप्रथम सुरू केला. देवधरांसोबत काम करणाऱ्या मदतनीसांनी पुढे स्वतःचे उत्पादन केंद्र सुरू केले. परिणामी सध्या संपूर्ण शहर गौरी-गणपती बनवण्याच्या व्यवसायात गुंतले आहे. ह्यामुळे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून शहराची भरभराट झाली आहे. आज गणेश मूर्ती कलेमुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात ‘पेण‘ ची आणि पर्यायाने महाराष्ट्राचीही ओळख निर्माण झाली आहे. पेणचे गणपती हा एक स्वतंत्र ब्रॅण्ड झाला आहे. पर्यायाने पेण गणपतींचे गाव म्हणूनही प्रसिद्ध झाले.