भटकत्या आत्म्यांचं अम्युझमेण्ट पार्क

जेआरडी टाटांसोबतही ‘एक डाव भुताचा’ रंगला होता. पुण्यातच टेल्कोचा बंगला त्यासाठी कारणी’भूत’ झाला. या बंगल्यामध्ये त्यांना भुताटकीचा अनुभव आल्याचं पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं. पुण्यात मोठा गदारोळ उडाला. अर्थात त्यावेळी महाराष्ट्रात ‘भटकती आत्मा’ नव्हती. आत्म्याला स्त्रीलिंगी संबोधन हिंदी भाषेच्या प्रभावातून आहे याची नोंद घ्यावी.
[gspeech type=button]

जेआरडी टाटांना भुताने पलंगावरून ढकलून दिलं. टेल्को कंपनीमध्ये एका भल्या पहाटे जेआरडी टाटांना हा भुताचा अनुभव आला होता. सुमारे तीन दशकांपूर्वी पुण्यातल्या पत्रकारांशी बोलताना जेआरडी टाटांनी हा अनुभव सांगितलं होता. जेआरडी टाटांचा दोन वेळा भुताशी सामना झाला. पहिल्यांदा हा अनुभव ते पुण्यातील टेल्कोच्या बंगल्यात असताना आला. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला एका अदृश्य हाताने पलंगावरून खाली ढकललं. अर्थात ते भूतच असावं याबद्दल त्यांना खात्री वाटली.

एका भिक्खूंच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्यानंतर रात्री त्यांना जो अनुभव आला तोही त्यांनी पत्रकारांना सांगितला होता. “मी जागा झालो, तेव्हा तो माझ्या पलंगाजवळ उभा होता,” असं जेआरडी म्हणाले होते.

परवा म.टा.मध्ये ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांनी पुण्यातल्या भुताटकीच्या किश्शाची उजळणी केली. अनेक वर्षांनी टाटा समूहाचे प्रमुख झाल्यानंतर रतन टाटाही त्याच टेल्कोच्या बंगल्यातल्या खोलीत राहिले होते. पण त्यांना काही भुताने गाठलं नाही, हेही त्यांनी आपल्या लेखात नमूद केलं.

महाराष्ट्रातली ‘भटकती आत्मा’ या विषयावर 37 वर्षांपूर्वी जेआरडी टाटांना फारसं काही माहीत असण्याची शक्यता नव्हती. ते बिच्चारे भल्या पहाटे पुण्यात त्यांच्या बाबतीत झालेल्या अनहोनीला घाबरले.

पुणे हे प्राचीन राजकीय शहर आहे. त्यामुळे इथे भटकत्या आत्म्यांना अधिक वाव मिळतो. शनिवारवाड्यात नारायणराव पेशव्यांची एक ‘भटकती आत्मा’ असल्याचं सांगितलं जातं. नारायणराव पेशव्यांचं हे प्रातिनिधिक भूत महाराष्ट्रातल्या भटकत्या आत्म्यांचा थरारासाठी ‘कारणीभूत’ आहे. कारण ‘काका मला वाचवा’ असे आवाज अजूनही शनिवारवाड्यात ऐकू येतात, असं म्हणतात.

मधल्या काळात पुण्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये ‘हाकामारी’ नावाची भटकती आत्मा कुप्रसिद्ध होती. ही हाकामारी म्हणे विद्यार्थ्याला हाका मारायची. जो विद्यार्थी मागे वळून बघेल तो गेलाच.

पुण्याचा राजकीय इतिहास भटकत्या आत्म्यांचाच आहे. हल्ली महाराष्ट्रातल्या राजकीय अंधारात हाकामारी ही भटकती आत्मा फिरते. कोणत्याही इतर पक्षातून आपल्या पक्षात येण्यासाठी हाकामारी फिरत असते. जो राजकीय उमेदवार आपल्या पक्षात राजकीय फायद्याला उपेक्षित आणि वंचित होतो तो या हाकामारीच्या हाकेला बळी पडतो.

हे भुताचे किस्से फार पुणेकेंद्री होत असतील तर तशी मुंबईतही हॉण्टेड जागा आहेत. मुंबईच्या राजभवनमध्येही एकेकाळी भूत दिसायचं म्हणतात. खरं खोटं देव जाणे, पण पुण्यातल्या व्हिक्टरी थिएटर प्रमाणे इथेही पहाटे खुर्च्या आपटल्याचे आवाज येतात. काही लोक म्हणतात गूढ शक्तींच्या ‘पहाटेच्या शपथांचे’ हे खेळ पडसाद आहेत.

लोकांना चमत्कारी परीकथा वाचायला आवडतात. तशा भुतांच्या गोष्टीही ऐकायला आवडतात. मनोरंजनाच्या विश्वात तर हॉरर प्रयोगांना मोठाच प्रेक्षक असतो. पण सध्या भुताटकीचं टुरिझमही जोरात आहे. अशा हॉण्टेड हाउसना परदेशात पर्यटन उद्योगासाठी मागणी असते.

भारतात उत्तराखंडमध्ये मसुरीजवळ लम्बी देहर खाण आहेत. ब्रिटिश काळात आग लागल्यामुळे अनेक कामगार या खाणीत जळून खाक झाले होते. या खाणीत आजही कामगारांच्या किंकाळ्या ऐकू येतात असं सांगितलं जातं. इथे या भुताटकीचं दर्शन घ्यायला अनेक पर्यटक जातात. त्यांच्यासाठी रात्री मशाली घेऊन खाणीत उतरण्याची मनोरंजक साहसी थरारक सहलही आयोजित केली जाते.

टाटांच्याच मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये सर्वात वरच्या मजल्यावर स्वातंत्र्ययुद्धातील एका स्वातंत्र्यसैनिक विदुषींची भटकती आत्मा पाहिल्यांचं लोक सांगतात. तिथली एक आरामखुर्ची आपोआप हलायला लागल्याचं पाहून अनेक परदेशी पर्यटकही रात्री स्वीट सोडून पळालेत असं सांगतात. पण कसाबच्या हल्ल्यापासून ही नाइटेंगेल भटकती आत्मा आता दिसत नाही. पण जेआरडींच्या टेल्को बंगल्यासोबतच ताजच्या या मजल्यावर भुताटकीचं टुरिझम नक्की विकसित करता येईल.

पण सर्वात मोठं हॉण्टेड टुरिझम महाराष्ट्रातल्या महामार्गांवर करता येईल. इथे रोज शेकडो अपघात होत असतात. रस्त्यावर रात्री-अपरात्री अपघातग्रस्त अतृत्प भटकते आत्मे नक्की दिसतील. रस्त्यावरच्या प्रत्येक खड्ड्यात एखादा तरी भटकता आत्मा असण्याची शक्यता नक्की आहे.

इथल्या उड्डाण पुलांवरच्या अपघातात बळी गेलेले अतृप्त आत्मे तर मोठ्या संख्येने भेटतील. चंदन नगरमध्ये एका मुलीचं भूत म्हणे बाहुलीसह ओरडत पळताना दिसतं. ती मुलगी घर कोसळून मरण पावली होती. महाराष्ट्रात तशी बिल्डरांच्या चुकीमुळे अनेक घरं कोसळत असतात. पडलेल्या, जळलेल्या इमारती, आत्महत्याग्रस्त शेतकरी, हत्या केलेल्या किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या गेलेल्या बलात्कारपीडिता आणि त्यांच्यासारखे निष्पाप अत्याचारग्रस्त या सगळ्यांचे अतृप्त भटकते आत्मे महाराष्ट्रात फिरत असतील.

या सगळ्या आत्म्यांशी संवाद साधण्याचे अनुभव आपल्या भीती विकत घेणाऱ्या उच्चभ्रूंचे पर्यटन अधिक थरारक करतील.

पण राजकीय भटकत्या आत्म्यांच्या पर्यटनाला कसलीच सर नाही. त्या पलीकडे जाऊन असंही म्हणावसं वाटतं की, महाराष्ट्र ही अतृप्त भटकत्या राजकीय आत्म्यांचं अम्युझमेंट पार्क आहे.

हे वाचून झाल्यावर तुम्हाला नावाने कुणी हाक मारली तर मागे मात्र वळून बघू नका.

कारण बिनगठ्ठा मतदारांना ‘हाकामारी’ हिंग लावून पण विचारत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि
Agricultural Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील भागांमध्ये आपण या उद्योगांची अधिक माहिती घेत आहोत.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ