पर्माकल्चरच्या पध्दतीप्रमाणे आपण मोठ्या स्तरावर भोवतालच्या पर्यावरणाची माहिती घेत घेत हळूहळू लहान स्तरावर आलो आहोत. गेल्या दोन भागात जागतिक आणि स्थानिक भूगोल आणि हवामानातील महत्वाचे घटक समजून घेतले. आता आपलं शेत आणि त्यावर परिणाम करणाऱ्या आजूबाजूच्या घटकांचं मूल्यमापन (analysis) ह्या भागात करूया.
हे सर्व नकाशावर मांडलं की, एका नजरेत महत्वाच्या गोष्टी स्पष्ट होतात. ह्याला म्हणतात सेक्टर मॅप. आपल्या जागेचं विहंगम दृष्य (Bird’s Eye View) आणि त्यावर दाखवलेले हे ठळक घटक, ही डिझाईन सुरू करण्याची पहिली पायरी आहे.
सेक्टर मॅप: मोहरान फार्म्स
वन्यजीवांचा अधिवास आणि वावर
हजारो वर्षे पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या वन्यजीवांच्या उपजत सवयीने ते वेगवेगळ्या भागात प्रवास, प्रजनन किंवा वास्तव्य करतात. आपल्या आजूबाजूला कोणकोणते वन्यजीव म्हणजे पशू, पक्षी, कीटक, उभयचर, सरपटणारे प्राणी आहेत त्याची माहिती घ्यावी. त्यांच्या सवयी, महत्त्व काय आहे हे जाणून घेणे गरजेचे असते. यावरुन आपल्याला आपल्या शेताची उत्पादकता वाढवून त्यांचीही काळजी घेता येईल.
दोडामार्ग, कूर्ग या भागात कळपाने राहणाऱ्या जंगली हत्तींचं वास्तव्य असतं. त्यांच्या जाण्यायेण्याच्या पुरातन वाटा असतात. वर्षानुवर्षे तिथे न फिरकताही त्यांना ह्या वाटांची माहिती असते. खासकरून मोठा दुष्काळ पडला की, एरवी न वापरल्या गेलेल्या मार्गाने ह्या हत्तींची प्रमुख माता तिच्या कळपाला घेऊन जाते. अशा वाटा, त्यांचा अधिवास उध्वस्त न करणे हे हत्तींच्या अस्तित्वासाठी तसेच माणूस व वन्यजीव ह्यांचा संघर्ष न होण्यासाठी हे महत्वाचे आहे.
वानर, डुक्कर किंवा नीलगाय, शेकरू, अस्वल, लांडगे, कोल्हे, बिबट्या याही प्राण्यांचा आणि मोर, हॉर्नबिल, ODKF सारख्या पक्षांचा अधिवास आपल्या क्षेत्रात असेल तर त्यासंबंधी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
स्थानिक वनसंपदा
आपल्या आजूबाजूला कोणती वनसंपदा आहे ह्याची माहिती असणे अत्यावश्यक आहे. एकतर आपल्याला वातावरणाला सरावलेल्या वनस्पती कोणत्या हे कळेल. दुसरं म्हणजे काही बाहेरून आलेल्या आणि आक्रमकपणे पसरणाऱ्या, वाढणाऱ्या (Invasive) वनस्पती आजूबाजूला आहेत का ते कळेल. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या स्थानिक वनस्पती आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांचा नैसर्गिक अधिवास टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक की काळजी घेता येईल.
उदा. साताऱ्याजवळील कास पठारावर पावसाळ्याच्या शेवटी शेवटी स्थानिक एंडेमिक वनस्पतींची विविधता पाहायला मिळते. विविध रंगाच्या, आकाराच्या फुलांनी संपूर्ण पठार बहरलेलं असतं. फुलपाखरे आणि परागीभवन करणारे इतर कीटक ह्यांचा आगळा वेगळा सोहळा तिथे असतो. त्यामुळे कास पठार एक जागतिक वारसा म्हणून गेली काही वर्षे जपला जातोय. त्यातून स्थानिकांना पर्यावरणपूरक पर्यटन व्यवसायही उपलब्ध झाले आहेत आणि निसर्गही जपला जातोय.
वाऱ्याची दिशा
आपल्या जागेवर वारा कोणत्या ऋतुत, कोणत्या दिशेने, किती वेगात वाहतो याचा अभ्यास महत्त्वाचा आहे. किती बाष्पोत्सर्जन होईल? वाऱ्याला तोंड देऊ शकणाऱ्या वनस्पती कुठे असणे आवश्यक आहे? वनभिंत किती जाड आणि किती घनदाट असावी? त्यात कोणत्या वनस्पती असाव्यात? शेताच्या आतील भागात किती अंतरावर, किती उंचीची वनभिंत असावी इत्यादी गोष्टी त्यावरुन ठरता येतात. जिथे थेट वारा आत येतो, अशा ठिकाणी केळीसारख्या वनस्पती लावल्या तर त्यांचं नुकसान होतं आणि जमिनीतील आर्द्रताही निघून जाते.
काहीवेळा सुगंध किंवा दुर्गंध विशिष्ट दिशेला वाहून जाण्यासाठी वाऱ्याची मदत घेता येते. गुरांचा गोठा किंवा कोंबड्यांचं खुराडं घराच्या आजूबाजूला असणं व्यवस्थापनाच्या आणि लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने चांगलं असतं. पण काहीवेळा त्याचा उग्र वास येतो. या कारणामुळे आमचा गोठा आणि कोंबड्यांचं खुराडं खूप मोकळं मोकळं आहे म्हणजे वारा एकतर त्यांना पटकन सुकवतो आणि त्यांची दिशा घराच्या दक्षिणेला आहे. त्यामुळे त्यातून जो काही थोडाफार वास येऊ शकतो तोही घराच्या दिशेने न येता परस्पर फूड फॉरेस्टमध्ये फिरला जातो.
पाण्याची उपलब्धता आणि सांडपाणी व्यवस्था
आपल्या जागेवर पडणारा पाऊस कोणत्या ऋतूत आणि कसा पडतो, पावसाच्या पॅटर्नमध्ये गेल्या काही दशकात काही बदल झालाय का? आपल्या शेती, पशुपालन, घरगुती वापरासाठी सध्या किती आणि कसं पाणी उपलब्ध आहे आणि भविष्यात किती होऊ शकेल ही माहिती मिळवणे गरजेचे आहे.
याशिवाय अंघोळीचं आणि संडासचं पाणी म्हणजे ग्रे वॉटर आणि ब्लॅक वॉटर कशाप्रकारे शेतातून बाहेर जाणार आहे? कुठे पूर येण्याची शक्यता आहे? या गोष्टीसुद्धा नकाशावर मांडायला हव्यात. चांगले आणि शुद्ध पाणी हे दिवसेंदिवस अधिकाधिक महत्त्वाचे होत जाणार आहे हे, त्याचा वापर जागरूकतेनेच करायला हवा.
ध्वनिप्रदूषणाला आळा
कधी कधी बाजूने एखादा रस्ता जात असतो किंवा खूप आवाज करणारा एखादा प्लांट जवळ असू शकतो. अशावेळी कोणत्या दिशेने आणि किती आवाज येऊ शकतो ते लक्षात घ्यायला हवं. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करता येतात किंवा आवाजाच्या स्त्रोतापासून दूर घरांचं बांधकाम करता येतं.
युटिलिटी लाईन्सची नोंद
जमिनीखालून पाण्याच्या लाईन्स, टेलिफोन, इंटरनेट लाईन्स, ड्रेनेज सिस्टिम्स इ. असू शकतात. कधीकधी विजेच्या तारा आपल्या जागेतून जात असतात. ह्या सगळ्याची नोंद नकाशावर घेणे अत्यावश्यक असते, अन्यथा अपघात किंवा इतर मोठं नुकसान होऊ शकतं.
वणवा
कोणत्या बाजूने आणि किती प्रमाणात वणवा लागू शकतो हेही नकाशावर दाखवणं महत्वाचं आहे. म्हणजे त्या बाजूला वणवा अडवण्यासाठी सोय करता येईल. वणवा सहन करू शकणाऱ्या वनस्पती लावता येतील आणि लक्ष ठेवता येईल.
मायक्रोक्लायमेट
सेक्टर नकाशात नोंद करून ठेवण्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या जागेवर असणारे विविध मायक्रोक्लायमेट.
शेत जरी एका मोठ्या क्लायमेट झोनचा भाग असला, तरीही नीट लक्ष देऊन पाहिलं तर आपल्या शेतातच अनेक मायक्रोक्लायमेट जाणवतात. एखादं तळं किंवा ओढा किंवा नदी असेल तर तिथे, एखादं उन्हात तापत असलेलं वाळूचं टेकाड असेल, एखाद्या मोठ्या वृक्षाखालची जागा असेल अशा प्रत्येक ठिकाणी त्या त्या वातावरणात जोमाने वाढू शकणाऱ्या वनस्पतींसाठी आदर्श परिस्थिती असते.
आमच्या शेतात काही वर्षांपूर्वी बरीच जमीन उघडी होती त्यामुळे ती उन्हात तापायची. त्यावरून वाहणारे उष्ण वारे ओलावा उडवून न्यायचे, त्यामुळे मिरीसारखी पिकं घेणं तिथे शक्य नव्हतं. आता बहुतेक जमीन झाकली गेल्याने दमटपणा आणि थंडावा वाढला. आता मिरी, लेंडी पिंपळी सारख्या वनस्पतींसाठी आदर्श मायक्रोक्लायमेट तयार झालं.
एखादा रस्ता उन्हात दिवसभर उन्हात तापतो आणि त्यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला कोरडं आणि उष्ण मायक्रोक्लायमेट तयार होतं. अशा ठिकाणी नारळ/सुपारीसारख्या झाडांपेक्षा उष्ण/कोरडी हवा सहन करणारी ताम्हण, बहाव्यासारखी झाडे सहज वाढू शकतात.