मध्यप्रदेशातल्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पामध्ये दहा हत्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हत्तींच्या या अनैसर्गिक मृत्यूंना कारणीभूत आहे कोदो धान्य.
रोजच्या आहारामध्ये तृणधान्याचा समावेश करावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 2023 चे वर्ष मिलेट वर्ष म्हणून घोषित केलं होतं. उत्पादन घेण्यासाठी सोयीचं आणि भरपूर पोषणमूल्य असलेलं धान्य ही तृणधान्याची विशेष ओळख आहे. मात्र, हेच कोदो तृणधान्य खाल्ल्याने दहा हत्तींचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
नेमकं काय घडलं?
बांधवगड व्याघ्र प्रकल्पामध्ये 29 ऑक्टोबरला वनविभागाला 4 हत्ती मृत स्थितीत आढळले. तर 6 हत्ती गंभीररित्या आजारी होते. दुसऱ्या दिवशी मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे आणखीन चार हत्तींचा मृत्यू झाला. तर 31 ऑक्टोबरला उपचारा दरम्यान उर्वरित दोन हत्ती मृत्यूमुखी पडले. अशाप्रकारे तीन दिवसात एकूण दहा हत्ती दगावले.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये या मृत हत्तींच्या पोटामध्ये कोदो धान्याचे दाणे आढळून आले. त्यावरुन वनात रुजलेलं बुरशीजन्य कोदो धान्य खाल्ल्यामुळे या हत्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्य वनरक्षण व्ही.एन. एम्बार्ड यांनी दिली आहे.
या घटनेनंतर येत्या दोन दिवसात संपूर्ण वनातलं कोदो धान्याचं पीक नष्ट करणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
कोदो धान्य विषारी असते का?
कोदो धान्य हे शूगर फ्री धान्य म्हणून ओळखलं जातं. यामध्ये प्रथिने, आणि फायबरची मात्रा सुद्धा खूप जास्त असते. महत्त्वाचं म्हणजे हे धान्य कोरडवाहू जमिनीत घेतलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा या धान्याचं उत्पादन घेणं परवडत.
मात्र, या धान्यामधल्या काही घटकांमुळे हे धान्य विषारी धान्य सुद्धा बनतं. यासंदर्भात अनेक रिसर्च पेपर्स आजवर प्रसिद्ध झाले आहेत. 2023 साली, कोदो धान्यामध्ये विषारी सायक्लोपियाझोनिक ऍसिडचा संभाव्य धोका या आशयाचा रिसर्च पेपर सादर केला होता.
कोदो धान्य हे कोरडवाहू जागेत घेतलं जातं. हे धान्य पूर्ण तयार झाल्यावर कापणीच्या वेळी जर का पाऊस पडला किंवा मोठ्या प्रमाणावर जर धुकं पडलं तर या धान्याच्या दाणांमध्ये आणि चाऱ्यामध्ये एर्गॉट नावाची बुरशी किंवा सायक्लोपियाझोनिक ऍसिड तयार होते. यामुळे संपूर्ण पीक विषारी बनतं. परिणामी, हे धान्य खाण्यासाठी वापरता येत नाही. त्यामुळे असा विषारी चारा वा धान्य खाल्ल्यावर आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
प्राण्यावर विषारी धान्याचा काय परिणाम होतो?
या विषारी धान्याच्या सेवनानं सर्वात आधी प्राण्यांच्या हृदयावर आणि रक्तप्रसरणावर परिणाम होतो. यामध्ये प्राण्यांना उलट्या होऊन ते बेशुद्ध पडतात.
त्याच्या शरिरातील अनेक अवयवांवर परिणाम होऊन त्याचं कार्य थांबते. परिणामी मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होऊन त्यांचा मृत्यू होतो.
यापूर्वी अशा घटना कधी घडल्या आहेत?
इंडियन मेडिकल गॅझेटनुसार 1922 साली कोदो धान्यामुळे विषबाधा झाल्याची घटना आढळून आली. उत्तरप्रदेशमधल्या शहाजापूर इथल्या डॉक्टर आनंद स्वरूप यांनी मार्च 1922 मध्ये कोदो धान्याच्या विषबाधेमुळे चार रुग्ण सापडल्याची नोंद केली होती. यामध्ये एका वृद्ध महिला, एक 22 वर्षीय तरुण, 12 व 9 वर्षाच्या लहान मुलांचा समावेश होता.
फेब्रुवारी 1922 मध्ये, डॉ. आनंद स्वरूप यांनी, तिलहार इथल्या एका व्यक्तीने, कोदोपासून बनवलेल्या रोटी खाल्ल्याने त्यांच्या कुत्र्याला विषबाधा झाल्याचं सांगितलं असल्याचा उल्लेख केला होता.
सन 1983 साली, कोदो धान्याचील वैविधता या रिसर्च पेपरमध्ये कोदो धान्याच्या सेवनाने विषबाधा होऊन मृत पावलेल्या हत्तीचा उल्लेख केलेला.
त्यानंतर 2022 साली सुद्धा विषारी धान्याच्या सेवनामुळे एका हत्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मध्यप्रदेशच्या वनविभागाने दिली आहे.
दरम्यान, या विषारी धान्याने कोणत्याही व्यक्तीचा आजवर मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही आहे.