हवामान बदलाची लढाई ही लांब पल्ल्याची लढाई आहे. विकास व्हायला हवा, रोजगार मिळायला हवा हे सगळं मान्य आहे. आपल्या मूलभूत गरजा भागायला हव्यातच. पण ह्या गोष्टी करण्याचे स्रोत म्हणजे जल, जंगल, जमीन, जनावरं, जैवविविधता हेच आपण संपवत आहोत. देवराई, जुन्या विहिरी या गोष्टी कशा टिकतील, याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. कारण हवामान बदलाचा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे.
आपल्याकडे नियोजन ते मूल्यांकनापर्यंत वेगवेगळ्या व्यवस्था तयार केलेल्या आहेत. त्यात महिलांचा समावेश फार क्वचित आहे. पर्यावरणसत्तेत जास्तीत जास्त महिला पुढं येण्याकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण पाणी, इंधन आणि शेतीच्या कामासाठी हवामानावर अवलंबून राहावं लागतं. या गोष्टींशी महिलांचा संपर्क सर्वाधिक येतो. रिसोर्स एण्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट आणि बाईमाणूस यांनी 250 गावसंवादानंतर हवामानबदलामुळं स्थानिक आव्हानं आणि त्यावर उपाययोजनाही तयार केल्या. पुढील मुद्द्यांवर शासन, प्रशासन आणि तळागाळातली जनता यांनी एकत्रित काम केल्यास हवामान बदलाचे नकारात्मक परिणाम कमी करण्यास मदत होईल.
हवामान साक्षरता आणि प्रशिक्षण
निवडक महिला प्रतिनिधींना हवामान बदल, त्याचे परिणाम याबाबत माहिती द्यावी. उपाययोजनांच्या नियोजनाचे प्रशिक्षण द्यावे. हवामान समित्यांमध्ये महिलांचा समावेश असायलाच हवा.
हवामान शब्दकोष निर्मिती
हवामान आणि हवामान बदलासंबंधी बरेचसे शब्द आणि संकल्पना इंग्रजीत येत असतात. त्यामुळं स्थानिक भाषेत हे समजायला कठीण जातं. त्यामुळं पंचायत स्तरावर हवामानासंबंधी माहिती, शब्द आणि व्याख्या समजावणं सोपं व्हावं, याकरता हवामान शब्दकोष तयार करावा. यात स्थानिक प्रभाव, तापमान, पाऊस, वेगवेगळे संदर्भ याबद्दल माहिती असावी. यामुळं महिलांना हवामान बदल समजावणं आणि त्यावर योग्य निर्णय घेणं सोपं होईल.
आदिवासी क्षेत्रातील उपजीविकेचे साधन
जंगल, जमीन, जल, जैवविविधता ह्या गोष्टी आदिवासींच्या अर्थकारणाशी संबंधित आहेत. हवामान बदलाचा थेट परिणाम साधनसंपत्तीवर होत असतो. त्यामुळं त्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.
संवर्धन समित्या
स्थानिक, जिल्हा आणि राज्य स्तरावर हवामान संबंधित निर्णय घेणाऱ्या सर्व समित्या, राज्य हवामान बदल परिषद आणि आपत्ती व्यवस्थापन यासर्वांमध्ये महिलांचा समावेश असावा. निवडक महिला नेत्यांना हवामान साक्षरता आणि नियोजनाचे प्रशिक्षण देणे.
सरकारी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण
हवामान स्थिरता, अनुकूलन आणि आपत्ती व्यवस्थापनात गुंतलेल्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी लिंग-संवेदनशील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
राज्यस्तरीय संशोधनास प्रोत्साहन
महिलांची उपजीविका, आरोग्य, अन्न सुरक्षा आणि साधनसंपत्तीतील हस्तक्षेपावर झालेल्या हवामान बदलांच्या भिन्न परिणामांवर राज्यस्तरीय संशोधनास प्रोत्साहन देणे. लिंग-तफावत माहिती गोळा करण्यासाठी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांसोबत भागीदारी करणे.
हवामान प्रतिरोधक पायाभूत सुविधा
ग्रामीण आणि शहरी झोपड्यांकरता हवामान प्रतिरोधक पायाभूत सुविधा उदाहरणार्थ, शाळा, आरोग्यसेवा, गृहनिर्माण, जल पुरवठा प्रणाली, सामुदायिक इमारती उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करणे.
हवामान नियंत्रण यंत्रणांची स्थापना
शेती, श्रम, मासेमारी आणि जल क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांवरील हवामान बदलांचे परिणाम लक्षात घेण्यासाठी निधी पुरवणाऱ्या लिंग-संवेदनशील हवामान नियंत्रण यंत्रणांची स्थापना करणे.
प्रभावित भागातील लोकांसाठी सुविधा
संवेदनशील हवामान, दुष्काळ प्रभावित, पूरग्रस्त क्षेत्रांमधील महिला, मुले आणि मुलींना अन्न, स्वच्छ पाणी, आरोग्यसेवा, स्वच्छ प्रसाधनगृहांची सोय करणे.
हवामान-प्रतिरोधक शेती तंत्रज्ञान
हवामान-प्रतिरोधक शेती तंत्रज्ञानाचा प्रचार करणे. उदाहरणार्थ सेंद्रीय शेती, भरडधान्य उत्पादन, स्थानिक शेती पद्धती आणि पीक घेण्याच्या विविध पद्धती यात महिला शेतकऱ्यांचाही समावेश होईल हे पाहावं.
पाण्याशी संबंधित
पावसाचे पाणी संकलन, पुनर्वापर, पुनर्निमिती याबाबत लोकांना शिक्षित करणे, विविध उपक्रमांचं आयोजन करून लोकांना प्रोत्साहन देणे, जलजीवन अभियानाची संपूर्ण अंमलबजावणी करणे.
घरगुती जलसुविधा पुरवठा योजना
लिंग समानतेवर लक्ष केंद्रीत करून, ग्रामीण भागातील घरगुती जल पुरवठा योजनांची पूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करणे. जल संसाधन आणि निर्णय प्रक्रियेत महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे.
उपजीविकांवर नकारात्मक प्रभाव टाकणारे प्रकल्प टाळणे
स्थानिक समुदायांच्या उपजीविकांवर नकारात्मक प्रभाव टाकणारे मोठे ऊर्जा प्रकल्प टाळणे. त्याऐवजी, सौर गावांसारख्या समुदाय-केंद्रीत नवीनीकरणीय ऊर्जा उपाययोजनांना प्रोत्साहित करणे. उदा. जायकवाडी धरणावरील सौर उद्यान प्रकल्प हजारो मासेमारी महिलांना प्रभावित करू शकतो, परंतु सातारा जिल्ह्यातील मन्याचीवाडी इथला सौर गावासारख्या उपक्रमामुळं स्थानिक अर्थव्यवस्थेला हानी न पोहोचवता ऊर्जा संक्रमणाची उद्दीष्टे साधता येतील.
राजकीय पक्षांनी हवामान बदल आणि त्याच्या परिणामांना आता गंभीरपणे घेण्याची वेळ आली आहे. या उपाययोजना राबवण्याकरता राजकीय इच्छाशक्तीही खूप महत्वाची आहे. कारण पर्यावरणासंबंधी अनेक समित्या तयार होतात, अहवाल येतात पण ते कागदावरच राहतात. त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी फार कमी होते. गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळं अनेक संकटं आपल्यावर येत आहेत. आता गंभीरपणे काम करायला हवं.
1 Comment
लय भारी!!