बॉलीवूड आणि मराठी सिनेमामध्ये मागील काही वर्षांपासून ‘बायोपिक’ला चांगलंच उत आला आहे. नवीन, काल्पनिक कथानक निवडण्यापेक्षा निर्माता, दिग्दर्शक हे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील खऱ्या घटनांना मोठ्या पडद्यावर दाखवण्यास उत्सुक आहेत. हिंदी आणि मराठी सिनेमा असं दोन्ही मिळून मागच्या दहा वर्षांत जवळपास 100 बायोपिक सिनेमा प्रदर्शित केले असतील.
लोकमान्य टिळकांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मिल्खा सिंग, मेरी कॉम ते चंदू चॅम्पियन पर्यंत बरीच प्रेरणादायी व्यक्तींचा जीवनप्रवास आपण मधल्या काळात मोठ्या पडद्यावर बघितला आहे. प्रश्न असा आहे की, या महान लोकांची ही चित्रपट स्वरूपातील आत्मचरित्र आपल्याला खरंच प्रेरणा देतात का ? की आपण या सिनेमांकडे केवळ एक उत्तम कथानक म्हणून बघतो ? हा एक प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे. कारण, प्रेरणादायी व्यक्तींबद्दल आपल्याकडे बोललं, लिहिलं, वाचलं आणि आता तर मोठ्या पडद्यावर बघितलं ही खूप जातं. पण, समाजावर या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असल्याचं चित्र दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे.
ऑलिम्पिक पदक जिंकून येणाऱ्या खेळाडूंचे कित्येक सिनेमे आपण प्रेक्षक म्हणून पाहिले आहेत. पण, आपण आजही पदक मिळवतांना किती स्ट्रगल करतोय हे जगजाहीर आहे. तसंच, कित्येक कलाकारांच्या संघर्षाची कथा आपण मधल्या काळात सिनेमांमधून बघितली आहे. पण, तरीही सुशांत सिंग राजपूत सारखे कलाकार तरुणपणी आर्थिक किंवा भावनिक ताण न सहन झाल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.
कर्तव्यनिष्ठ, ध्येयवादी अशा कित्येक लोकांच्या कथा आपण आजवर बघितल्या; पण, तरीही आजचा तरुण हा भरकटलेला, काही अंशी विकृतींकडे झुकलेला का वाटतोय ? ह्याच्या मुळाशी जाणं आता गरजेचं झालं आहे.
मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या विविध क्षेत्रातील यशस्वी लोकांच्या टॉप 5 बायोपिक बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
चंदू चॅम्पियन :
भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते मुरलिकांत पेटकर यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा कबीर खान यांनी लिहिला आणि दिगदर्शित केला होता. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने जगाला दाखवून दिलं की, तुमचं छोट्या गावात जन्माला येणं, अभ्यासात हुशार नसणं, तुम्हाला बंदुकीची गोळी लागणं हे सगळं तुमच्या इच्छाशक्तीसमोर नतमस्तक होऊ शकतं. आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची तुमची इच्छा असेल तर, तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल हे हा सिनेमा बघतांना पदोपदी जाणवतं. कार्तिक आर्यनने या सिनेमात पेटकर यांची भूमिका साकारली आहे.
भाग मिल्खा भाग :
भारताला कॉमनवेल्थ खेळांमध्ये आणि ‘एशियन गेम्स’ मध्ये धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या धावपटू मिल्खा सिंग यांची जीवनकथा ही एखाद्या सिनेमाला साजेशी आहे. या सिनेमाचे लेखक प्रसून जोशी आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी हे योग्यपणे हेरलं होतं. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात फरहान अख्तर याने मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती.
भारताच्या फाळणीची पार्श्वभूमी, लहानपणीच्या मिल्खा यांचं समाजकंटकांपासून जीव वाचवत पळणं आणि नंतर पाकिस्तानमध्ये जाऊन तिथे धावण्याची शर्यत मोठ्या फरकाने जिंकणं हे सर्व अद्भुत, असामान्य आहे. प्रत्येक क्रीडापटूला कोणत्याही स्पर्धेपूर्वी दाखवावा असा हा सिनेमा आहे.
एम.एस.धोनी :
‘कुल कॅप्टन’ आणि ‘लीडरशिप’ म्हणजे काय ? हे शिकवणारा भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा नीरज पांडे यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला होता. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही छोट्या पडद्यावर आवडीने बघितला जाणाऱ्या सिनेमांपैकी एक आहे.
सुशांतसिंग राजपूत याने एम एस धोनीची भूमिका साकारली होती. झारखंड मध्ये केलेला क्रिकेटचा सराव, स्टेशन मास्तर या पदावर नियुक्ती झाल्यावर धोनीची होणारी घुसमट, क्रिकेटमध्ये निवड होण्यासाठी मित्रांनी केलेली मदत, पाकिस्तानमध्ये जाऊन केलेली फटकेबाजी आणि 2007 चा टी-ट्वेंटी आणि 2011 चा क्रिकेट विश्वचषकमध्ये भारताला जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या एम एस धोनी ची कथा ही खूप सकारात्मक आणि प्रेरणादायी आहे.
12th फेल :
आयपीएस ऑफिसर मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा विधु विनोद चोप्रा यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. अनुराग पाठक यांनी लिहिलेल्या एका पुस्तकातील माहितीच्या आधारे सिनेमाची पटकथा आकारास आली आहे. विक्रांत मेस्सी या गुणी अभिनेत्याने मनोज कुमार शर्मा यांची भूमिका हुबेहूब साकारली आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक तरुणाला अपयशाने खचून जाऊ नका, असा संदेश हा सिनेमा देतो. चंबल सारख्या डाकुंसाठी कुप्रसिद्ध असलेल्या छोट्या खेड्यात जन्मलेला मुलगा पिठाच्या गिरणीत काम करतो, गरिबीवर मात करतो आणि एक दिवस आयपीएस बनून सर्वांना प्रेरित करतो, असं हे कथानक आहे.
स्वरगंधर्व सुधीर फडके :
आपल्या मराठीत देखील यशाला गवसणी घालण्यासाठी संघर्ष करावा लागणारे कित्येक व्यक्तिमत्व आहेत. वर उल्लेख केलेल्या व्यक्तिमत्वांपैकी स्वरगंधर्व सुधीर फडके यांचं क्षेत्र फक्त वेगळं होतं. आणि संघर्ष ही तितकाच कडवट होता. लेखक, दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी बाबूजींचं आत्मचरित्र प्रेक्षकांना कळावं यासाठी पुढाकार घेतला.
1919 मध्ये कोल्हापूर येथे जन्मलेला एक मुलगा वयाच्या 18 व्या वर्षी आपलं शहर सोडतो, मुंबई गाठतो. संगीत क्षेत्रात त्याला पाहिजे तसं यश मिळत नाही. काही वर्ष तो नोकरीविना गाण्याचे कार्यक्रम करत उदरनिर्वाह करतो. मग, तो कोलकत्ता येथे जाऊन नोकरी करतो. वडिलांच्या आजारपणामुळे तो कोल्हापूरला परत येतो. इथे त्याची भेट गदिमांसोबत होते आणि तिथून एका संगीतकार, गायकाच्या प्रवासाला सुरुवात होते. ‘गीत रामायण’ हे त्यांनी संगीतबद्ध केलेल्या कलाकृतींपैकी सर्वोत्तम मानलं जातं.
जिवंत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संघर्ष हा अटळ आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा अडचणी येतात तेव्हा या व्यक्तिमत्वाच्या बायोपीकच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला मार्ग मिळू शकतो.