कोकणातला ऐरणीचा प्रश्न आहे तो मुंबई-गोवा महामार्गाचा. या महामार्गामुळे कोकणातले अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. हा रखडलेला प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर दिसतो आहे. साधारण वर्षभरात मुंबई-गोवा महामार्गावर वेगवान वाहतूक शक्य होईल. कशेडी बोगद्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही. परंतु निवडणुकांच्या तोंडावर फील गुड वातावरण निर्माण करता यावे यासाठी सत्ताधारी पक्षांनी एका बाजूचा बोगदा वाहतुकीसाठी खुला ठेवला आहे. या प्रवासात महामार्गाबाबत आम्ही सर्वच राजकीय व्यक्तींना प्रश्न विचारले आणि जवळपास प्रत्येकाने या महामार्गाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
रायगड जिल्ह्यातल्या पेणजवळच्या गागोदे गावी आम्ही कोकण दौऱ्यातील झिरो माइल शोची सुरुवात केली. कारण इथे आचार्य विनोबा भावेंचं जन्मस्थळ आहे. गागोदे गाव हे विनोबाजींच्या ग्रामदान आंदोलनातलं एक महत्त्वाचं गाव. इथे विजय दिवाण विनोबा भावेंच्या जन्मस्थळाची व निकटच्या जमिनीची देखभाल करतात. ग्रामदान म्हणजे गावाचं दान नाही, तर जमिनीची सामूहिक मालकीच गावाची. विजय दिवाण सांगतात, विनोबा भावेंच्या या आंदोलनाचा भाग म्हणून देशभरात साडेतीन हजारहून अधिक गावं ग्रामदान कायद्याखाली सामूहिक मालकीची झाली आहेत. गावातील व्यक्ती या फक्त ताब्यातील जमिनीच्या वहिवाटदार असतात. सातबारावर गावाचा मालकीहक्क असतो. त्यामुळे भांडवलशहा शेतकऱ्यांवर आर्थिक वा मनगटशाहीचा दबाव टाकून जमीन घेऊ शकत नाही. रायगड जिल्ह्यातील सद्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामदान चळवळीचं हे महत्त्व विजय दिवाण यांनी अधोरेखित केलं. ते विनोबाजींच्या जमिनीत नाचणीचं आणि भाताचं पीक घेतात.
पेण शहरामध्ये लक्ष्मण केशव जोशींचा 1948 सालापासूनचा जुना पोह्यांचा कारखाना आहे. आज त्यांची माधव जोशी व त्यांचे बंधु हा पोह्यांचा व्यवसाय सांभाळतात. जोशी बंधूंचं म्हणणं आहे की आता भात मोठ्या प्रमाणावर मिळत नाही. मूळ 13 कारखान्यांपैकी केवळ एक कारखाना उरला आहे. तोही पुढे सांभाळायला कोण नाही, म्हणून बंद पडू शकतो. पेणमधले पोह्याचे बहुतांश कारखाने गुजरातमध्ये नवसारीकडे गेलेत. त्यांची पुतणी तेजल मनोज आठवले हिच्याशीही बोलणं झालं. तिला माहेरचा ब्रँड टिकवायचा आहे. पण या कारखान्यासमोरची आव्हानं पेलण्यासाठी काय करावं याबद्दल निश्चय नाही.
पेणमधून आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावस या ठिकाणी देसाई बंधू आंबेवाले यांचे सीईओ अमर देसाई यांना भेटलो. त्यांनीही आंब्याच्या गरापासूनच्या प्रक्रिया उद्योगासमोरची आव्हानं सांगितली. वातावरण बदलाचा मोठा परिणाम आंब्याच्या उत्पादनावर होतो आहे. उत्पादनात अनिश्चिती आली आहे. त्यामुळे किमतीवर परिणाम होतो. कॅनिंगसाठी केवळ 30 टक्के आंबा येतो. तसेच सीझनल उत्पादन असल्यामुळे बँकांकडून निधी मिळण्यात अडचणी येतात. इथे आंबा किंवा काजूसाठी स्वतंत्र मार्केट यार्ड नाही. त्याची आवश्यकता असल्याचं ते सांगतात.
कोकणात अॅरोमा उद्योगातील लागवडीची सुरुवात झाली आहे. पचौली या सुगंधी वनस्पतीच्या लागवडीसंबंधात आम्ही नवीन सावंत या कृषीतज्ज्ञाशी गप्पा केल्या. अॅरोमा उद्योगातली ही वनस्पती आंबा किंवा काजूच्या बागेत आंतरपीक म्हणून घेता येते. त्यातून पर्यायी सुरक्षित उत्पादन मिळू शकतं. राजापूर येथे पचौलीपासून तेल निर्मितीचा कारखाना त्यांनी उभा केला आहे. परंतु, कोकणातला शेतकरी अजूनही या पिकांबाबत साशंक आहे. अवेअरनेसची नितांत गरज आहे. या पिकांवर क्लायमेटिक कंडिशनमधल्या बदलांचा फारसा परिणाम होत नाही. आणि दर स्थिर आहेत. पण लोकांपर्यंत ती पोहचवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील, असं नवीन सांवत सांगतात.
अॅरोमा उद्योगाशी निगडितच कणकवलीमध्ये आम्ही हेमंत सावंत यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांनी कणकवलीत सुगंधी तेलाचं युनिट उभं केलं आहे. हेमंत सावंत हे लेमन ग्रासचं पीक घेतात. शिवाय ते स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्षही आहेत. या क्षेत्रातले कृषी पदवीधर एकत्र आले आहेत. त्यांच्या मार्फत हेमंत सावंत यांना अॅरोमा क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांना एकत्र आणायचं आहे.
कणकवलीत त्यांच्यामागे आमदार नितेश राणे मदत करत आहेत. आम्ही नितेश राणेंच्या मुलाखतीतही कृषीपूरक प्रक्रिया उद्योगाबाबत तसेच मासेमारी व पर्यटनाबद्दलही प्रश्न विचारले. नितेश राणे यांनी सकारात्मकरीत्या उत्तरं दिली.
भात, आंबा, काजू, फणस, रातांबा (कोकम), नारळ, सुपारी, पचौली, लेमन ग्रास, वेटिवेर (वाळा) या कोंकणातल्या उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योगांवर भर देण्याची गरज आहे. कोविड कालखंडात अनेक तरुण कोकणात परत आले आहेत आणि नव्या व्यवसायाच्या संधी धुंडाळत आहेत. या निवडणुकांच्या रणधुमाळीत ते इथल्या लोकप्रतिनिधींना आणि उमेदवारांना या आधारावरच प्रश्न विचारत आहेत. अनेक प्रश्न इथल्या उमेदवारांसाठी अडचणीचे किंवा आव्हानात्मक वाटले तरी ‘कोकणचो आवाज’ या प्रक्रिया उद्योगातला नवतरुणच बुलंद करणार आहे.