‘वर्ल्ड टीव्ही डे’ च्या निमित्ताने… 

International TV Day : 21 नोव्हेंबर रोजी आपण आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजन दिवस साजरा करतो. टेलिव्हिजनची निर्मिती, भारतात टेलिव्हिजनचं आगमन, त्यावरील मनोरंजन आणि प्रबोधनात्मक कथा आणि टेलिव्हिजनमधली स्थित्यांतरं याविषयीचा आढावा.
[gspeech type=button]

“अरे, टीव्ही का बंद आहे ?” हा प्रश्न आपण सर्व आपल्या लहानपणी घरात आल्या बरोबर विचारायचो. आठवतंय ना ? डोळ्यासमोर कोणतीच स्क्रीन नसली की, आपल्याला आजपण अस्वस्थ वाटतं. फरक इतकाच आहे की, आज त्या टीव्हीची जागा आपल्या हातातील या ‘मोबाईल’ नामक छोट्या टीव्हीने घेतली आहे. आपल्या सर्वांच्या घरातील टीव्ही आजही लागतो. अगदीच लागत नाही असं नाहीये. पण, आज तो अगदी मोजून वापरला जातो. हेडलाईन्स पाहिल्या, सिनेमा बघितला, टीव्ही बंद केला. 

आज आपलं आणि टीव्हीचं दोन्ही रिमोट आपल्या हातात आहेत. आधी असं नव्हतं. आपण आपल्या दिनचर्येतील तासनतास हे तेव्हा नाव पडलेल्या ‘इडियट बॉक्स’ला द्यायचो. 

टेलिव्हिजनचा शोध कधी लागला ? भारतात टीव्हीने कधी पदार्पण केलं ? टीव्ही हा आपला एक्सटेंडेड फॅमिली मेंबर कधीपासून झाला ? कधीपर्यंत त्याने आपल्यावर मनसोक्त राज्य केलं होतं ? याचा एक आढावा घेऊयात. 

टीव्हीचा जन्म

सप्टेंबर 1927 मध्ये फिलो टेलर फ्रांसवर्थ या शास्त्रज्ञाने सॅनफ्रान्सिस्को येथे टेलिव्हिजन या इलेक्ट्रॉनिक वस्तूची निर्मिती केली होती. सुरुवातीची काही वर्ष टेलिव्हिजनची क्षमता ही केवळ 343 लाईन्स तेही केवळ 30 फ्रेम्स प्रति सेकंद दर्शवण्याची होती. 1958 पर्यंत ही क्षमता 625 लाईन्स प्रति सेकंद इतकी वाढली. टेलिव्हिजनच्या वापरामध्ये इंग्लंड आणि अमेरिका हे देश  तोपर्यंत जगात अग्रेसर होते. 

भारतात टेलिव्हिजनचं आगमन

1959 मध्ये भारतात टेलिव्हिजनची एंट्री झाली. ‘ऑल इंडिया रेडिओ’ने तोपर्यंत भारतात आपले पाय रोवलेले होते. भारतात, जगात घडणाऱ्या कोणत्याही म्हत्वाची घटनेची माहिती तेव्हा लोक केवळ कान देऊन ऐकायचे; ‘दूरदर्शन’च्या माध्यमातून या घटना डोळ्यांना दिसण्याची आता सोय झाली होती. पण, हा बदल आजच्या 3जी, 4जी, 5जी इतका पटकन घडला नाही. 1976 मध्ये सॅटेलाईट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट (SITE) ची स्थापना करण्यात आली आणि नंतर 1983 पासून भारत सरकारने दूरदर्शनचा व्याप्ती वाढवली.  त्याला ‘मास कम्युनिकेशन’चं सर्वात मोठं माध्यम म्हणून मान्यता देण्यात आली. 

टेलिव्हिजन क्षेत्रातली परकिय गुंतवणूक 

1990 च्या दशकात भारताची सतत वाढणारी लोकसंख्या बघून हाँगकाँगच्या सॅटेलाईट टेलिव्हिजन एशिया रिजन (STAR) या कंपनीने भारतात पदार्पण केलं. पदार्पण करताना एका भारतीय कंपनीसोबत करार करणं बंधनकारक असल्याने ‘झी’टीव्हीचा जन्म झाला. दोन्ही कंपनीची झालेली ही युती भारताचं पाहिलं खासगी हिंदी ‘सॅटेलाईट चॅनल’ म्हणून नावारूपास आलं. 

 ‘एअरवेव्ज’ या केवळ भारत सरकारच्या मालकीच्या असू शकत नाहीत असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने 1995 साली दिला. आणि या क्षेत्रात यामध्ये खासगी क्षेत्राचं योगदान देखील झालं पाहिजे, असं स्पष्ट मत मांडलं. या निर्णयानंतर सन टीव्ही (तामिळ), एशियानेट (मल्याळम) आणि इनाडू टीव्हीची स्थापना झाली. प्रादेशिक टीव्ही चॅनल्स सोबतच त्या दशकांत सीएनएन, बीबीसी आणि डिस्कव्हरी सारख्या आंतरराष्ट्रीय चॅनल्स देखील भारतीय प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. 

छोट्या पडद्याची लोकप्रियता वाढवण्यासाठी सिरियल्स किंवा टेलिव्हिजन सिरीजने आजवर सिंहाचा वाटा उचललेला आहे. 

रामायण : 

1987 मध्ये दूरदर्शनवर सर्वप्रथम प्रसारित झालेली रामायण मालिका.  रामानंद सागर यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलेलं. ही केवळ एक मालिका नव्हती तर ते कलाकार आणि प्रेषकांमधलं एक नातं होतं. दर रविवारी प्रसारित होणाऱ्या या मालिकेच्या वेळी प्रेक्षक हे टीव्हीला हार घालून, उदबत्ती लावून हात जोडून टीव्हीसमोर बसायचे. तेव्हा टीव्ही ही एक महागडी वस्तू मानली जायची. चौकात एक किंवा एका बिल्डिंग मध्ये एक या प्रमाणात तेव्हा टीव्ही उपलब्ध असायचे. 

जगात ‘सर्वाधिक पाहिली गेलेली टीव्ही मालिका’ हा बहुमान मिळालेल्या या मालिकेला रवींद्र जैन यांनी संगीत दिलं होतं. रामानंद सागर ज्या संस्कारी, शालीन पद्धतीने प्रत्येक भाग संपल्यावर छोटंसं निरूपण द्यायचे ते सुद्धा लोक आवडीने बघायचे. परफेक्ट कास्टिंग, हळुवार सादरीकरण, पटकथेत केलेले नगण्य बदल ही ‘रामायण’ लोकप्रिय होण्याची कारणं सांगता येतील. 2020 च्या लॉकडाऊन मध्ये जेव्हा भारत सरकारने घरी बसलेल्या प्रेक्षकांसाठी रामायण पुनःप्रसारित करायचा निर्णय घेतला, तेव्हा देखील या प्रसारणाने लोकप्रियतेची नवी उंची गाठली होती. 

महाभारत : 

1988 मध्ये दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर बी आर चोप्रा निर्मित आणि रवी चोप्रा दिग्दर्शित ‘महाभारत’ या 94 एपिसोड्स असलेल्या मालिकेचं प्रसारण सुरू करण्यात आलं. दमदार कथा, भारदस्त कास्टिंग आणि कलियुगातही लागू पडणारं जीवनाचं सार या सर्व जमेच्या बाजू असल्याने टीव्हीवरील ‘महाभारत’ देखील प्रचंड लोकप्रिय झालं होतं. 

भगवद्गीतेच्या श्लोकाने या टीव्ही सिरीजची सुरुवात व्हायची. टायटल गाणं हे महेंद्र कपूर यांनी गायलं होतं. हरीश भिमानी यांच्या आवाजातील “मै समय हुं…” हे ऐकण्यासाठी प्रेक्षक तेव्हा टीव्ही समोर सर्व कामं सोडून बसायची. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता आणि त्यानंतर दिलेलं ‘विराट रूप दर्शन’ हे भाग आजही युट्युबवर आवडीने बघितले जातात. 

शक्तिमान: 

मुकेश खन्ना यांची निर्मिती आणि शीर्षक भूमिका असलेली ही मालिका 1997 ते 2005 या काळात दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. लोकांना कोणत्याही संकटातून वाचवण्यासाठी नेहमीच उपलब्ध असलेल्या या भारताच्या पहिल्या सुपरहिरोला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. गंगाधर शास्त्री आणि शक्तिमान अशा दुहेरी भूमिका मुकेश खन्ना यांनी या मालिकेत साकारल्या होत्या. या सिरीयल पासून लोकप्रिय झालेलं ‘गंगाधर ही शक्तिमान है’ हे वाक्य आजही सर्रास वापरलं जातं. 

आभाळमाया:

1999 मध्ये छोटा पडदा जेव्हा हिंदी प्रेक्षकांना हाताशी घट्ट धरून होता, त्या काळात मॅजिक बॉक्स प्रॉडक्शन ‘आभाळमाया’ या मालिकेची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. विनय आपटे यांनी या मालिकेचं लिखान आणि दिग्दर्शन केलं आहे. सुकन्या कुलकर्णी, मनोज जोशी हे या सिरीयल मध्ये मध्यवर्ती भूमिकेत होते. आज मराठी चित्रपटसृष्टी मध्ये सक्रीय असलेल्या सर्व कलाकारांचा या मालिकेला एक उत्कृष्ट आणि यशस्वी मालिका करण्यात महत्वाचा वाटा होता. 

मालिका लोकप्रिय होण्यासाठी शीर्षक गीताचं देखील तितकंच योगदान आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अशोक पत्की सरांनी स्वरबद्ध केलेलं, देवकी पंडित यांनी गायलेलं शीर्षकगीत हे आजही प्रेक्षकांच्या मनात जागा करून आहे. 

मराठीतील पहिली आणि सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या या मालिकेने इतर मालिकांसाठी एक मोठा मराठी प्रेक्षकवर्ग उपलब्ध करून दिला, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. 

कौन बनेगा करोडपती : 

3 जुलै 2000 रोजी कौन बनेगा करोडपती या  भारताच्या पहिल्या ‘क्वीज् शो’चं म्युझिक ‘स्टार प्लस’ वर वाजलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजातील अँकरिंग, स्पर्धकांना कमी वेळात आपल्या ज्ञानाच्या जोरावर पैसे कमावण्याची संधी आणि प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पाडणाऱ्या या टीव्ही शोने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. सध्या 16वं सिझन सुरू असलेल्या ‘केबीसी’ने स्टार प्लस ते सोनी टीव्ही हे स्थित्यंतर देखील अनुभवलं आहे. 16 सिझन्स पैकी केवळ तिसऱ्या सिझनसाठी शाहरुख खानने अँकरिंग केली होती. पण, ती प्रेक्षकांना विशेष आवडली नव्हती. 

आज केबीसी म्हणजे बिग बी आणि बिग बी म्हणजे केबीसी हे एक समीकरण प्रेक्षकांच्या डोक्यात फिट बसलं आहे. स्वतः यशस्वी होण्यासाठी धडपडणारा आणि इतरांच्या यशात आनंदी होणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग केबीसी नियमितपणे बघत असतो. केबीसी हा एकमेव शो आहे ज्याचा बारा आठवड्यांचा प्रत्येक सिझन संपला की प्रेक्षक हळहळ व्यक्त करत असतात.  

अमिताभ बच्चन यांच्याकडून हिंदी मध्ये ‘संवाद साधण्याची कला’ शिकण्यासाठी देखील खूप प्रेक्षक हा शो आजच्या भाषेत ‘फॉलो’ करत असतात. 

टेलिव्हिजन इंडस्ट्री ही असाच दर्जेदार कंटेंट तयार करत छोट्या पडद्याचं प्रेक्षकांच्या मनातील स्थान हे सिरीज गणिक मोठं करत राहो यासाठी आमच्या खूप शुभेच्छा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Sickle cell anemia : जगात, सिकल सेल आजार हा एक जनुकीय (genetic) आजार असून मुख्यतः आफ्रिका, मध्य पूर्व भारत आणि
Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT
आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ