लाडक्या बहिणींचा सख्खा भाऊ कोण?

'इलेक्ट'ट्रिक मतदारांनी आणि अदृश्य शक्तीने महायुतीच्या पारड्यात भरपूर दान टाकलं. पण अशा वळणावर आणून सोडलं की समोर ताट वाढलेलं असूनही घास घेता येईना.
[gspeech type=button]

नियती अदृश्य शक्तीसारखी असते. या अदृश्य शक्तीमुळे महायुतीला दणक्यात बहुमत मिळालं. ‘इलेक्ट’ट्रिक मतदारांनी महायुतीच्या पारड्यात भरपूर दान टाकलं. पण अशा वळणावर आणून सोडलं की समोर ताट वाढलेलं असूनही घास घेता येईना. सर्व घटकपक्षांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी गुलाल तर उधळला. पण आता लाडक्या बहिणींचा सख्खा भाऊ कोण बनणार, यावर ओवाळणीचं ताट अडून राहिलं. दैव देतं… कर्म नेतं, अशी गत होतेय की काय, अशी शक्यता दिसू लागली.

भारतीय जनता पार्टीचा विधिमंडळ गटनेता ठरेना. फड तर फडणवीसांनीच तुऱ्याला आणलेला. पण सत्तेच्या ऊसालाही कोल्हे लागतात म्हणून निकालपश्चात सवतासुभा मांडता येतो. त्याची चाचपणी पाच सालाबाद प्रमाणे भाजपाकडून केली जात असावी.

पण दैवाने अशी पाचर मारून ठेवली की धड पूर्ण बहुमत नाही आणि मित्रपक्षांचे टँट्रमही सहन होत नाहीत. सर्वाधिक आमदारांचा पक्ष ठरूनही लाडक्या बहिणींचा सख्खा भाऊ उन्हात. चुलत भाऊ मात्र सावलीत?

आता सख्खा-चुलत कुणी काढू नये. अजितदादांच्या पाठिराख्यांनी यावेळा फारच समजुतदारपणा दाखवलाय. त्यांचे 41 आमदार निवडून आले म्हणजे गंगेत घोडं न्हालंय. त्यांनीही बिनशर्त पाठिंब्याचं सूत्र अंगिकारलंय.

पण या बिनशर्तच्या गणितामुळे डेंजर वारं सुटलंय. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चेहरा आता काळजीवाहू दिसू लागलाय. त्यांच्या पाठिराख्यांनी महाराष्ट्रातला एकही नवसाचा मारुती सोडला नाही.

या डिलेमुळे लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ थोडे फार सुखावले असावेत. दुःखात सुख असतं ते असं. मुख्यमंत्री बनण्याच्या निर्णयामध्ये टांगती तलवार आल्यामुळे मीडियातल्या मानलेल्या भावांची मात्र घालमेल सुरू झाली.

या बांक्या प्रसंगी तर हाटेलातले किंवा झाडीतले आमदारही नाहीत पाठलाग करायला. काहीच घडत नाही. मग पर्म्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स सुरू झाली. बरं हल्ली कुणाची काहीच वैचारिक निष्ठा राहिलेली नसल्याने लोक कशावरही विश्वास ठेवू शकतात. घोडेबाजार किंवा खोकेबाजाराचंही अप्रूप वाटेनासं झालंय. ‘बिग बॉस’चा खेळ मांडावा तशी लोकांना राजकारणाची गंमत वाटू लागली आहे. शक्य झालं तर सगळ्या राजकीय बाशिंद्यांना डोंगर-झाडी रिसॉर्टमध्ये एकत्र आणून छुपे कॅमेरे लावून ‘बिग बॉस’, ‘बिग बॉस’ खेळले तर मोठ्ठा टीआरपीवाला ‘शो’ तयार होऊ शकतो.

मुख्यमंत्री बनवण्याच्या ‘रेसिपी शो’मध्ये उशीर होऊ लागलाय. नुस्तीच बिरबलाची खिचडी पकवत चाललेत. काही घडत तर नाही. अशावेळी गावगप्पांना उधाण येतं. बाजारातल्या काही गावगप्पा पुढीलप्रमाणे…

गावगप्पा क्रमांक 1

भारतीय जनता पक्षाला आता शिंदे किंवा अजित पवार यांच्या आमदारांची फारशी गरज उरलेली नाही. अपक्षांना केवळ झाडी दाखवली तरी ते सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा सोबत येतील.

गावगप्पा क्रमांक 2

शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी हे भाजपा मायनस सर्व पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करतील. (काहीही हां श्री)

गावगप्पा क्रमांक 3

शरद पवार 10 आमदारांसह भाजपाला पुन्हा एकदा बाहेरून पाठिंबा देतील. अपक्षांनी आधीच भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे शिवसेना (ए.शिं.) व राष्ट्रवादी (अ.प.) यांना टांग देऊन भाजपा तुतारीवाल्यांना सोबत घेऊन सरकार बनवण्याचा प्रयत्न करू शकते.

गावगप्पा क्रमांक 4

भाजपाचा मुख्यमंत्री करण्यासाठी एकनाथ शिंदे ग्रेसफुली माघार घेतील. त्यांना उपमुख्यमंत्रिपद भूषवायचं नसल्यास ते दिल्लीत मंत्रिपद घेतील.

गावगप्पा क्रमांक 5

भारतीय जनता पक्षात अंतर्गत पातळीवर अजून काही ठरत नाही. देवेंद्र फडणवीसांना कदाचित दिल्लीत पाठवलं जाईल. (हा ठराव खूप आधीपासून गावगप्पांमध्ये आहे.) इथे भाजपचा वरिष्ठ श्रेणीतला कोणताही नेता मुख्यमंत्रीपद भूषवेल. मग तो अमका मराठा नेता, तमका ओबीसी नेता असे नेम्सड्रॉपिंग सुरू आहे.

या गावगप्पा अर्थात सूत्रांचा हवाला देऊन फिरतात. ही सूत्रं अदृश्य शक्तीप्रमाणेच असतात. अखेरीस यातलं काहीही होणार नाही. शिस्तीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. आणि एकनाथ शिंदे व अजितदादा दोघेही उपमुख्यमंत्री बनून हे सगळे लाडक्या बहिणींचे बोर्ड ऑफ ब्रदर्स म्हणून कार्यरत राहतील.

नियतीचे लाडके काहीवेळा अंधश्रद्धाही पसरवत असतात. महाराष्ट्रात एकदा उपमुख्यमंत्री झालेला माणूस मुख्यमंत्री होत नाही, असं अंधश्रद्धेने म्हटलं जातं. बहिणींचे लाडके देवाभाऊ जर पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मात्र या अंधश्रद्धेला कायमचा विराम मिळू शकेल. आणि उर्वरित उपंच्या आशाही पल्लवित राहतील.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Pardhi Samaj : काही चळवळीतील नेतृत्वांनीच पारधी समाजाच्या प्रश्नांचं भांडवल केलं आहे. आजही या समाजातील पुरुषांना खोट्या गुन्ह्याखाली अडकवलं जातं.
ऊसतोड महिला कामगार : बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी हंगामाला जाण्याआधी आणि जाऊन आल्यानंतर सर्व कामगारांची आरोग्य तपासणी केली जाते. यंदा या
Navi Mumbai APMC : मागील काही वर्षांपासून या एपीएमसी मार्केटमध्ये बांग्लादेशी कामगारांची घुसखोरी वाढल्याचा दावा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ