सुचेता कडेठाणकर हे नाव वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या अनेकांना ठाऊक आहे. वेगळी वाट म्हणजे रूढ करिअर /अर्थार्जनाच्या वाटेने न जाता स्वतःला आयुष्याकडून नेमकं काय हवं आहे, याचा शोध घेता घेता स्वतःच्या अस्तित्वाचं प्रयोजन सातत्याने शोधत राहणारी ही मंडळी! नावलौकिक, पैसा या भौतिक गोष्टींचं त्यांना गरज-महत्त्व समजत नाही का? तर ते व्यवस्थित समजतं आणि या व्यक्ती हे कामही लीलया करून दाखवतातही. आणि म्हणून निव्वळ विक्षिप्त, ध्येयवेडी असे शिक्के मारून त्यांना नजरेआड करता येतच नाही. आयुष्य कसं जगायचं याबाबतची ठोस उद्दिष्टे, स्वयंशिस्त आणि स्वप्रेरणेचं तेज यांच्या बोलण्यातूनही झळकत असतं. सुचेताही या सगळ्याला अपवाद नाही.
गोबीच्या वाळवंटात सोळाशे किमी पायी प्रवास
तिच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर आपला शेजारी देश चीन. या चीनच्याही पलिकडे आहे मंगोलिया. या देशातल्या गोबीच्या वैराण वाळवंटातून तब्बल सोळाशे किलोमीटर चालून आलीय सुचेता कडेठाणकर. गोबी हे आशियातलं सर्वाधिक लांबीचं वाळवंट. सलग 52 दिवस चाललेल्या या अतिशय कठीण पायपिटीतून ती तावून सुलाखून निघालीय.
गोबीचं वाळवंट पार करणारी पहिली भारतीय महिला
ते अंतर पायी पार करणं म्हणजे भल्याभल्या गिर्यारोहकांनाही आव्हान वाटतं. हे आव्हान जगभरातल्या अशा इतर 12 आव्हानप्रेमींसोबत सुचेता कडेठाणकरनेही स्वीकारलं. 25 मे 2011 ते 15 जुलै 2011 अशी तब्बल 52 दिवसांची खडतर कसोटी पाहणारी ही मोहीम फत्ते करणा-या सहाजणांमध्ये सुचेताही होती. गोबी पार करणारी ती पहिली भारतीय आहे. ही मोहीम पूर्ण झाली त्या घटनेला आता 13 वर्षं उलटून गेली आहेत. आणि सुचेतासाठी ही मोहीम आता तिच्या ‘वाढण्यातल्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा’ वाटतो. पण ‘गोबीचं वाळवंट पार करणारी पहिली भारतीय’ ही एवढीच ओळख तिला मान्य नाही. त्यात ती गुंतून पडलेली नाही.
उंटाने मारलेली लाथ आणि निखळलेल्या खांद्यासह प्रवास
गोबी हा अनुभव तिने एका लेखाद्वारे सांगितला आहे. तिच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, ‘शरीराला होणा-या वेदनांचं आपण एरवी स्तोम माजवून ठेवतो. गोबी मोहिमेच्या दरम्यान शरीराला होणा-या या वेदना शरीराचा एक भाग बनल्या होत्या. वेदना आणि शरीर हे जणू भिन्न नाहीच, असं वाटायचं. दररोज वाळवंटातल्या त्या उष्णतेमध्ये तीस-पस्तीस किलोमीटरचं अंतर चालल्यावर पायांना येणारे फोड, नखांना होणा-या जखमा या क्षुल्लक वाटू लागल्या. मोहिमेच्या साधारण विसाव्या दिवशी मला आमच्यातल्याच एका उंटाने जोरदार लाथ मारली. त्या लाथेमुळे माझ्या पायाला थोडंफार लागलं, पण खांद्याला जोरदार दुखापत झाली. त्या वेळी माझा खांदा खरं म्हणजे निखळला होता.(ही गोष्ट मला मोहिमेतून परतल्यावर समजली.) तेव्हा मोहिमेचे पुढचे तीसहून अधिक दिवस शिल्लक होते. खांद्यामध्ये होणा-या वेदना भयानक होत्या. त्यामुळे दररोज सॅक पाठीवर घेण्यासाठी नवनवीन युक्त्या मी शोधून काढीत असे. अर्थात, शेवटपर्यंत मला सॅक विनावेदना पाठीवर घेण्याची पद्धत सापडलीच नाही.
वेदनेचे वेगवेगळे स्रोत आणि वेदनेची सवय
पण या खांद्याच्या दुखण्यामधून मला आपल्या शरीराच्या वेदनेबद्दलचा एक शोध लागला. आपलं शरीर हे मुळात वेदनांचे वेगवेगळे स्रोत निर्माण करण्यात तरबेज असतं. खरं म्हणजे विसाव्या दिवसानंतर या संपूर्ण मोहिमेमध्ये माझा सर्वाधिक वेदनादायक भाग माझा खांदा असायला हवा होता. पण कित्येक दिवस असे जात असत की खांद्याची वेदना मला जाणवतच नसे. डाव्या पायाची करंगळी किंवा उजवा घोटा एखाद्या दिवशी कमालीचा दुखू लागे आणि शरीर वेदनेचा आणखी एक स्रोत निर्माण करी. मग माझं लक्ष जुन्या वेदनेला विसरून या नवीन स्रोताकडे वळे. शरीर दिवसागणिक असे दुःखाचे, वेदनेचे स्रोत निर्माण करत जाई. पण त्या सर्वांवरून लक्ष काढून घेतल्यावर आपल्याला त्या वेदनेचा विसर पडतो, मनाला त्या वेदनेची सवय होऊ लागते आणि मग शरीरही त्रास देत नाही, असं माझ्या लक्षात आलं आहे.
वाळवंटात उमगलेलं जगणं
कित्येक वेळा मी दिवस संपवून जेवण झाल्यावर माझ्या स्लीपिंग बॅगमध्ये शिरत असे. तेव्हा दिवसभरात मी चाललेलं प्रत्येक पाऊल मला आठवत असे. त्या पावलाखालचा रस्ता तसाच्या तसा माझ्या समोर जिवंत उभा राहत असे. काल दुपारच्या जेवणात आपण कोणती भाजी खाल्ली हेही जेव्हा इकडे आल्यावर आठवेनासं होतं, तेव्हा वाळवंटात आलेला हा अनुभव मोठा विचित्र वाटतो. प्रत्येक क्षण त्यामधल्या छोट्या छोट्या कंगो-यांसकट जगणं म्हणजे काय हे मला वाळवंटामध्ये उमगलं.
जगभरातील अनोळखी लोकांसोबतचा 52 दिवसांचा प्रवास
दिवसा खूप ऊन आणि रात्री खूप थंडी, आजूबाजूला पसरलेली फक्त रेताड, नापीक जमीन- एकही हिरवा कोंब नसलेली. क्षितिजाच्या विस्तारापर्यंत स्वच्छ दिसणारं दृश्य- एकसुरी. अशा परिस्थितीमध्ये जगभराच्या काना-कोप-यां मधून आलेल्या अनोळखी लोकांबरोबर 52 दिवस चालताना स्वतःच्या अनेक क्षमतांचा कस लागला, अनेक धडे मिळाले.’
रुटिनशी प्रामाणिक असणारी साहसी माणसं
धाडसी/साहसी मोहिमा ज्या-त्या व्यक्तीच्या capability/क्षमता सिद्ध करतात हे खरं. मात्र साहस म्हणजे तेवढयापुरतं सीमित असू शकत नाही, सर्वसामान्य आयुष्य जगणारी, रुटीनशी प्रामाणिक असणारी माणसंही तेवढीच साहसी असू शकतात असं सुचेताचं सांगणं आहे. इतिहास या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सुचेताने एक पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली होती. मात्र नंतर ती कॉर्पोरेट क्षेत्रात आयटी प्रोफेशनल म्हणून ती काम करू लागली.
स्वत:च्या क्षमता जोखण्याची संधी देणा-या मोहिमा
आयटी कंपनीत आधी टेक्निकल रायटर, नंतर लीड इन्फॉर्मेशन डेव्हलपर म्हणून काम करणाऱ्या सुचेताने आध्यात्मिक जीवन रोजच्या जीवनातही लागू केले जाऊ शकते हे लक्षात घेऊन साहसी आणि वेद पठणाचा अभ्यास करण्यासाठी तिची कॉर्पोरेट नोकरी सोडली. गिर्यारोहण आणि विशेषत: स्वत:च्या क्षमता जोखण्याची संधी देणा-या मोहिमा हे तिचं पॅशन आहे. कोहम फिट हा तिचा पुण्यात योग स्टुडिओ आहे. निरनिराळ्या प्रकारचे योग-अध्यात्म उपक्रम तिथे सुरू असतात.
अध्यात्माच्या मार्गावर
अध्यात्म मार्गावरच्या प्रवासाबद्दल ती सांगते की, ‘माझा प्रवास कर्मयोगाने सुरू झाला. परिणाम किंवा परिणाम कधी प्रकट होतील किंवा होणारही नाहीत. याची फारशी चिंता न करता मी जे काही करते ते करण्याच्या प्रक्रियेत मी नेहमीच मग्न आहे. हे सहजपणे ज्ञान योगात विकसित झाले. सुरुवातीला मी स्वतंत्रपणे धर्मग्रंथांचा अभ्यास केला, पण सखोल अभ्यास करण्याबद्दल अधिक गंभीर होत गेल्याने, स्वामी दयानंद सरस्वती यांच्या परंपरेनुसार अन्नकट्टी येथील अर्शा विद्या गुरुकुलममधील साधनेद्वारे मी माझी समज वाढवली.’
‘स्तोत्र आणि मंत्रांचे पठण हा लहानपणापासूनच माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. आईने मला अनेक गोष्टी शिकवल्या. मला वाटतं की शालेय वक्तृत्व स्पर्धांमध्ये मिळालेलं यश हे मुख्यतः माझ्या मंत्रोच्चारामुळे होते. मी पारंपारिक वैदिक शैलीत जप करत नव्हते, पण मला योग्य वेद पठण शिकण्यासाठी मी नेहमी शोध घेत होते आणि कोविडच्या काळात मला शेवटी वेद अभ्यास सापडला.