भारत हा सर्वधर्म समभाव असलेला जगातील मोजक्या देशांपैकी एक आहे. भारतीयांची धार्मिक टक्केवारी सांगायची झाली तर इथे 80% लोक हे हिंदू धर्म फॉलो करतात, इस्लाम 15%, ख्रिश्चन 3% आणि शीख धर्म 2% लोक गुण्यागोविंदाने नांदतात. स्वाभाविकपणे, व्यवसायिक यश मिळवण्यासाठी इथला सिनेमा हा बहुतांश लोकांना कनेक्ट होईल असा असतो. असं असलं तरीही, भारतीय प्रेक्षकांची ‘सर्व चांगलं स्वीकार करण्याची’ वृत्ती ही इथे प्रत्येक निर्मात्याला आपल्या धर्मातील प्रथांना, कलाकारांना मोठ्या पडद्यावर सादर करण्याची समान संधी उपलब्ध करून देते. कित्येक वर्षांपासून तीन खान मंडळींना सुपरस्टार म्हणून भरभरून प्रेम देणाऱ्या ‘सेक्युलर’ भारतात सिनेमातून दिसणाऱ्या आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या ख्रिश्चन धर्मीय व्यक्ती आणि पात्रांना देखील नेहमीच आपलंसं मानलं आहे.
अँथनी गोन्सालविसची छाप
बॉलीवूड सिनेमांमधील लक्षात रहाणाऱ्या ख्रिश्चन पात्रांवर नजर टाकली तर बिग बी यांनी साकारलेलं ‘अँथनी गोंसालविस’ हे पात्र सर्वात आधी समोर येतो. 1977 मध्ये प्रदर्शित कादर खान लिखित आणि मनमोहन देसाई दिगदर्शित ‘अमर अकबर अँथनी’ हा एक टिपिकल बॉलीवूड मसाला सिनेमा होता. तीन सख्खे भाऊ लहानपणी हरवतात, तिघेही वेगवेगळ्या धर्मात वाढतात आणि मोठेपणी ज्यांच्यामुळे ते वेगळे झाले त्यांचा एकत्रितपणे वचपा काढतात. ‘माय नेम इज् अँथनी गोंसालविस’ हे गाणं आणि अमिताभ यांच्या अभिनयाने नटलेला आरशात बघून बोलणारा सीन हे प्रेक्षकांना विशेष आवडले होते. भारताची विविधतेतील एकता या सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न निर्मात्यांनी केला होता.
ज्युलीची सुपरहिट गाणी
अमिताभ यांनी साकारलेल्या ‘अँथनी’ आधी मोठ्या पडद्यावर ख्रिश्चन पात्राची प्रमुख भूमिका असलेला ‘ज्युली’ हा सिनेमा देखील लोकप्रिय ठरला होता. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाद्वारे टॉलीवूड अभिनेत्री ‘लक्ष्मी’ हिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. राजेश रोशन यांचं संगीत असलेल्या या सिनेमाचं शीर्षक गीत चांगलंच लोकप्रिय झालं होतं. या सिनेमात ख्रिश्चन मुलगी (ज्युली) ही शशी नावाच्या एका ब्राम्हण मुलाच्या प्रेमात पडते. पण, या आंतरधर्मीय विवाहाला मुलाच्या घरून विरोध असतो. सिनेमाच्या शेवटी सर्वांचं मन परिवर्तन होतं आणि ते दोघे सौख्यभरे नांदू लागतात.
ड्रेसिंगमुळे गाजलेला ‘बॉबी’
1973 मध्ये रिलीज झालेल्या ‘बॉबी’ची कथा देखील एका ख्रिश्चन मुलीला डोळ्यासमोर ठेवून लिहिण्यात आली होती. या सिनेमाची नायिका बॉबी ही गरीब घरातील होती आणि नायक राजा हा श्रीमंत हिंदू घराण्यातील होता. बॉबीचे वडील प्रेमनाथ हे कोळी असतात. राजाचे वडील प्राण हे एक व्यावसायिक दाखवले आहेत. आर्थिक आणि धार्मिक भिन्नता यामुळे बॉबीला राजाच्या घरची पसंती नसते. राज कपूर यांचं दिगदर्शन असलेला हा सिनेमा त्यातील ड्रेसिंगमुळे चांगला गाजला होता. ‘बॉबी’ने प्रेक्षकांना एक ख्रिश्चन कुटुंब आणि त्यांची विचार, आपल्या आप्त्यांची काळजी करण्याची त्यांची पद्धत ही प्रेमनाथ यांच्या अभिनयातून जवळून दाखवली. ‘बॉबी’ला एक ट्रेंडसेटर सिनेमा म्हणतात. कारण त्याने दोन विविध धर्मातील, विरुद्ध आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या नायक, नायिकांना एकत्र आणलं. पुढील काळात बॉलीवूडमध्ये या थीमवर बरेच सिनेमे लिहिले गेले होते.
खामोशी भावूक कलाकृती
1990 च्या दशकांत संजय लीला भन्साळी या दिगदर्शकाने आपल्या सिनेमांतून ख्रिश्चन परिवार मोठ्या पडद्यावर दाखवण्याचं काम बऱ्याच वेळेस केलं आहे. त्यांनी दिगदर्शित केलेल्या ‘ब्लॅक’ मधील राणी मुखर्जीचं कुटुंब हे ख्रिश्चन होतं. ‘खामोशी’ हा सिनेमा सुद्धा नाना पाटेकर यांनी साकारलेलं ‘जोसेफ’ हे पात्र आणि त्याच्या गोव्यात राहणाऱ्या कुटुंबाचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. सीमा बिस्वास यांनी या सिनेमात फ्लॅवी ब्रिगेन्झा या नावाने नानांच्या पत्नीचा रोल केला आहे. या दोघांची मुलगी ‘एनी’ हे पात्र मनीषा कोईराला हिने साकारलं आहे. संगीताची प्रचंड आवड असलेल्या ‘एनी’ ला तिच्या आजी मारिया ब्रिगेन्झा (हेलन) कडून गाण्याचं प्रशिक्षण मिळतं. या सर्व पात्रांचा उल्लेख हा आवश्यक आहे, कारण त्यांनी हा सिनेमा एक सुंदर कलाकृती म्हणून अजरामर करून ठेवला आहे.
‘प्रहार’ समाजकंटकांविरुद्धचा लढा
1991 मध्ये प्रदर्शित झालेला नाना पाटेकर दिगदर्शित ‘प्रहार’ हा सिनेमा ‘पीटर डिसुझा’ नावाच्या एका सैनिकाची कथा आपल्या समोर ठेवतो. पीटर चे वडील जॉन डिसुझा हे वडिलोपार्जित बेकरीचा व्यवसाय करत असतात. आपल्या मुलाने पण तोच व्यवसाय करावा अशी जॉनची इच्छा असते; पण, पीटर सैन्यात भरती होतो आणि तिथे त्याची भेट अति शिस्तप्रिय मेजर प्रताप चव्हाण (नाना पाटेकर) यांच्या सोबत होते. पीटर त्यांना लवकरच कंटाळतो. ट्रेनिंग अर्धवट सोडून पळून जाण्याचा तो विचार करतो. पण, मेजर तसं होऊ देत नाहीत. पुढे ते पीटरचे चांगले मित्र होतात. पीटरच्या लग्नाच्या वेळी काही समाजकंटक त्याचा खून करतात. मेजर चव्हाण या खुनाचा बदला घेतात. हा सिनेमा आपल्याला नाना पाटेकर यांच्यामुळे लक्षात राहतो; पण, पीटर डिसुझा या एका पात्राभोवती सिनेमाची कथा लिहिण्यात आली असल्याने ते देखील तितकंच महत्वाचं वाटतं.