मराठी भाषा अन्य राज्यांमध्ये बोलली जाण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे महाराष्ट्राच्या अन्य भाषिक प्रदेशांना लागून असणाऱ्या सीमा आणि दुसरे म्हणजे मराठी भाषिकांचे विविध कारणास्तव झालेले दीर्घकालीन स्थलांतर.
तामिळनाडूमधील तंजावर मराठी भाषिक समूहाप्रमाणेच तेलंगणामध्ये आरे मराठी समूह आहे. हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातील मराठी भाषा विभागाचे तत्कालीन विभागप्रमुख श्रीधर कुळकर्णी यांनी या बोलीचा मागोवा घेण्यासाठी 1980-90 च्या दशकांत एक प्रकल्प हाती घेतला होता. त्या प्रकल्पाचे फलरूप असणारा अहवाल हा त्या बोलीबद्दलचा ग्रंथ आहेच. पण त्या सोबतच एका मराठी भाषिक जातीबद्दल विचार करायास लावणारा ग्रंथ आहे, मराठीच्या एका बोलीच्या शब्दकोशावरील ग्रंथ आहे आणि आरे मराठ्यांच्या तमाशा लोक-रंजन आदी कलांचे स्वरूप सांगणारा ग्रंथ आहे. आज आपण या पुस्तकाच्या आधारे आरे-मराठीची ओळख करून घेऊया.
आरे मराठी समाजाच्या स्थलांतरांविषयीचे सिद्धांत
- महाराष्ट्रात 400/500 वर्षांपूर्वी एक मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळात अन्न-पाण्याकरता गावेच्या गावे एका ठिकाणाहून दुसरीकडे गेली होती. त्यापैकी काही जण तेलंगणातसुद्धा गेले असावेत. असे गेलेले लोक पुढे तिथेच स्थायिक झाले असावेत अशी शक्यता आहे.
- मुख्यत्वे वारंगल आणि करीमनगर या भागात हा समाज आढळतो. एकेकाळी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक इत्यादी प्रांताविषयी भाषावार वर्गवारी झाली नव्हती. तेव्हा मराठी, कानडी आणि तेलुगु समाज हा एकमेकांत मिसळलेला होता. आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा इत्यादी भाग सातवाहन राजांच्या अधिपत्याखाली होते आणि त्यामुळेच या ‘अश्मक’ देशाच्या भागांच्या ‘त्रिके अश्मिके’ असा उल्लेख शिलालेखातून आलेला आहे. त्या काळी आपल्याला वाटते त्याच्यापेक्षा जाती आणि देश यांचे संमिश्रण पुष्कळच वेगळ्या प्रकाराने होते.
- नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती अशा भागांतून हे स्थलांतर झाले असावे. भाषेच्या दृष्टीनेही हा अजमास जुळेल असे वाटते. कदाचित हा जुन्याकाळी मराठी मुलुखही असू शकेल, आणि तेलुगु लोकांनी हा प्रदेश व्यापल्यावर ही मराठी ‘पॉकेट्स’ पण काही ठिकाणी राहिली असतील. करीमनगर-वारंगल या जिल्ह्यांप्रमाणेच इतर ठिकाणची पाहणी केल्यासही ही गोष्ट सिद्ध होऊ शकेल.
आरे-मराठी समाजाचे स्वरूप
जाती-जमातींच्या संदर्भात विचार केला असता, स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण बोली असलेल्या अनेक जमाती तेलंगणात आढळून येतात. ब्रह्मखत्री, गीरगोसावी, भावसार क्षत्रिय, पद्मशाली, स्वकुळ साळी, जोशी (भटक्या जमातींपैकी कुडमुडे जोशी, स्मशान जोगी इ.), चांभार, सईस अशी त्यापैकी काही जमातींची नावे आहेत. या जमातींचे वास्तव्य साधारणपणे बाजारपेठांच्या गावी असते. वर्तमान प्रवाही मराठीशी त्यांचा संबंध येतो. त्याचप्रमाणे व्यवसायाच्या निमित्ताने अन्य भाषिकांच्या बोलींचे संस्कारही त्यांच्यावर होतात. या सर्वच जाती-जमातींची मराठी बोली सारखी नाही. जातिपरत्वे स्थलपरत्वे मराठी बोलीची भिन्न रूपे आढळतात. महाराष्ट्राशी (विशेषतः मराठवाड्याशी) सोयरसंबंध चालू असलेल्या जमातींची बोली त्यामानाने वेगळी पडते.
आपण क्षात्रकुलोत्पन्न आहोत अशी या समाजाची धारणा आहे. तुळजा भवानी हे या समाजाचे कुलदैवत आहे. एकाही पुरुषाने किंवा त्याच्या नजिकच्या पूर्वजाने तुळजापूर पाहिलेले नाही. तथापि, कार्यप्रसंगाला प्रथम आवाहन होते ते तुळजाभवानीचे. तुळजाभवानीचे गोंधळी (भोपे) एकेकाळी वर्षातून एकदा या भागात भिक्षेसाठी येत असत. आता मात्र ही भिक्षा थांबली आहे.
आरे-मराठी भाषेचे स्वरूप
आरे मराठी समाज जन्मत: द्वैभाषिक आहे. त्यांच्याकरता मराठी ही कुलभाषा तर तेलुगू ही सहज भाषा म्हणजे स्थानिक व्यवहाराची भाषा आहे. वैयक्तिक आणि स्व-समाजाच्या पातळीवर आरे मराठीचा वापर केला जातो तर आपल्याच समाजात सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवर विचार-विनिमय करताना तेलुगू भाषेचा वापर केला जातो.
प्रत्यक्ष भाषेमध्ये नातेवाचक शब्दांपैकी अनेक शब्द मराठी असले तरी त्यावर त्यातील काही शब्दांवर तेलुगू भाषिक उकार लागलेले दिसतात. उदाहरणार्थ – आई, आज्जी, बापू, चुलतं, भावो/बावो, लेंकु इ. मात्र एक ते दहा आणि शंभर इतकेच मराठी संख्यावाचक शब्द माहिती आहेत. तीन दहा (तीस), दोन दहा नु चार (चोवीस) इत्यादी. शिक्षणाचे माध्यम तेलुगू असल्याने सुशिक्षित समाजातही अशीच भाषा वापरली जाते.
भाषिक नमुना
खालील उताऱ्यात मराठी घरांत साजऱ्या होणाऱ्या सणांविषयी माहिती दिली आहे.
सुशिक्षित भाषकाचा एक नमुना
आरे मराठी समाजाचे समृद्ध सांस्कृतिक-साहित्यिक विश्व आणि भाषेची वैशिष्ट्ये पुढील आठवड्यात बघू.