वसंत पंचमीला ‘ज्ञानपंचमी’ असे ओळखले जाते. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे आपण म्हणतो. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो. काही ठिकाणी; विशेषतः नृत्यकला शिकवणाऱ्या संस्थांत; विद्येची देवता सरस्वतीची पूजा करतात. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. केशरी, पिवळा, हिरवा या रंगाची वस्त्रे परिधान करून हा दिवस साजरा करतात. याच दिवसात सावरीच्या वृक्षाला बहर येतो.
सात श्लोकांच्या पत्रांच्या विवाहाची इच्छा
पंढरपुरात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या विवाहाचा हाच दिवस आहे. त्या संदर्भात सांगितली जाणारी कथा काहीशी अशी आहे. रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला म्हणजेच पांडुरंगाला सात श्लोकांचे पत्र पाठवले. हे पत्र म्हणजे जगातले पहिले प्रेमपत्र आहे असे समजतात. पंढरपुरात कै. ह. भ. प. वा. ना. उत्पात वसंत पंचमीच्या कालावधीत रुक्मिणी स्वयंवराची कथा सांगत असत. रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाशी विवाह करण्याची आपली इच्छा पिता भीष्मक यांना बोलून दाखवली होती. परंतु रुक्मिणीचा भाऊ रुखमी याला हा प्रस्ताव मान्य नव्हता. रुक्मिणीने सात श्लोकांचे एक पत्र लिहून सुदैव ब्राह्मणाकरवी ते श्रीकृष्णाकडे पाठवले. त्यांनी हे पत्र श्रीकृष्णाला वाचून दाखवले. हे पत्र वाचून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे पाणीग्रहण केले. कथेच्या समाप्तीच्या दिवशी रुक्मिणी पांडुरंगाचा विवाह फार जोरदार स्वरूपात केला जायचा. मंदिर समितीने ही परंपरा पुढे चालवली आहे. या सोहळ्याची व्याप्तीदेखील वाढली आहे.
वसंतपंचमीपासून ते रंगपंचमीपर्यंत गुलालाची उधळण
या दिवसात पहाटे रुक्मिणीस पवमान अभिषेक होतो. रोज सर्व अलंकार घातले जातात. वसंतपंचमी पासून रंगपंचमी पर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीस पांढरा पोशाख केला जातो. रोज अंगावर गुलाल उडवला जातो.
हे ही वाचा : गुरु गौरवाची माघी एकादशी
विवाह समारंभाकरता देवळाचा थाट
गेली काही वर्षे या सोहळ्याला स्थानिकांबरोबर परगावच्या भाविकांची देखील खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या सोहळ्यासाठी गावातील महिला नटून–थटून गजरे माळून मंदिरात दाखल होतात. या दैवी विवाहाची तयारी आदल्या दिवशी पासून चालू होते. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवले जाते. यावर्षीच्या वसंत पंचमीसाठी पुण्यातील भारत भुजबळ यांनी साडेतीन ते चार टन फुले व सुमारे एक टन ऊस वापरून अप्रतिम सजावट केली होती. सनई, चौघडा, वाजंत्रीवाले बोलावले जातात. रांगोळ्या काढल्या जातात. लग्नाचा संपूर्ण थाट देवळातच असतो. खरे तर आपण असे म्हणूयात की रुक्मिणी पांडुरंग विवाह म्हणजेच वसंत पंचमी. हा सोहळा माघी प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमी असे पाच दिवस साजरा होतो.
वर-वधुचे विशेष पोषाख आणि अलंकार
वसंतपंचमीला समस्त बडवे मंडळी रुक्मिणीस पांढरी जरीची साडी, खण, नारळ, ओटी, गजरा, हार ,पेढे हा आहेर आणतात. तसेच उत्पात मंडळींकडून विठोबाला उंची वस्त्रे, हार , पेढे असा आहेर करतात. या दिवशी एखाद्या वधूप्रमाणेच रुक्मिणी मातेस नटवले जाते. पांढऱ्या साडीवर सर्व मोत्याचे अलंकार नथ, टोप, तोडे, विविध प्रकारचे हार, हिरे जडीत अलंकार, फुलांच्या मंडावळ्या असे तिथे देखणे रूप असते. तसेच विठ्ठलालाही उंची वस्त्र, मंडावळ, हार घालून तयार करतात. विवाहप्रसंगी अक्षता वाटल्या जातात.
हे ही वाचा : विठू माऊलीचा धुंधुरमासातला खास आहार
वरात आणि शोभायात्रा
लग्न झाल्यावर सर्वांना शिऱ्याचा आणि लाडूचा नैवेद्य वाटला जातो. सायंकाळी सहा वाजता गावातून मिरवणूक काढतात. यावेळी आतषबाजी होते. रथातील रुक्मिणीचे नवरीचे रूप पाहण्यास गावात रस्त्यावर दुतर्फा गर्दी असते. खरोखरीच एखाद्या लग्न सोहळ्याच्या शोभायात्रेचे हे स्वरूप असते. मिरवणूक शेवटी मंदिरात आणतात आणि आरती होऊन या अनुपम सोहळ्याची सांगता होते.
सांगलीचे ख्यातनाम चित्रकार कल्याण शेटे यांनी काढलेली रुक्मिणी स्वयंवराची चाळीस अप्रतिम चित्रे रुक्मिणी मातेसमोरील मंडपात लावलेली आहेत. सध्या चालू असलेल्या देखभालीच्या कामांमुळे ही चित्रे एका बाजूला ठेवण्यात आली आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ववत शेटे यांच्या कलाकृती आपल्याला पाहता येणार आहेत.